Friday, December 30, 2011

सा.सू. - भाग १


काही दिवसांपूर्वी पुण्याला काही कामानिमित्त चक्कर झाली. माझ्या कॉलेजच्या भागामधेच काम होतं, काम आटोपलं आणि सहज फेरफटका मारावा म्हणून मी चालत निघाले. कॉलेजच्या दिवसांपेक्षा थोडाफार बदल झालेला दिसत होता त्या भागामधे, त्या वेळच्या आठवणींमधे चालतानाच समोर एकदम ’ब्राउनी’ दिसला आणि त्या पाठोपाठ काकूंचा मुलगा! हो तोच होता तो, थोडासा ढोला झालाय बहुतेक पण चेहरा सेमच आहे अजुन! मी लगेच नजर वळवली आणि रस्ता क्रॉस करून जायला लागले. ते दोघे पुढे निघून गेले पण, माझे विचार मात्र त्या घराकडे वळले जिथे मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदा ’पेईंग गेस्ट’ म्हणून राहायला गेले होते!

मला अगदी व्यवस्थित आठवते आमची पहिली भेट! २९ जुलै चा तो दिवस होता..पुण्यामधे नेहमी असतो तसा भुरभुर पाऊस सुरू होता..दुपारचा १.३०वाजला होता..कॉलेजमधे फीस भरून मी,बाबा, नुकतीच भेटलेली माझ्याच कोर्सची मैत्रीण आणि तिचे बाबा असे चौघेजण तो पत्ता शोधत निघालो..घर लगेच सापडलं, अगदी पाचच मिनीटावर आहे म्हणून आम्ही सगळे एकदम खुश होतो.दुमजली घराचं छोटसं गेट उघडून आम्ही आत गेलो.पुणेकराचं घर म्हणून थोडी धाकधूक होती मनात पण गेटवर कुठेही पाटी दिसली नाही तसे आम्ही बिनधास्त झालो की आत कुत्रा नसणार.त्यातही दारातली रांगोळी बघून मला थोडं बरं वाटलं.पुढे दारावर देखील कुठे पाटी नव्हती म्हणून आम्ही बेधडकपणे बेल वाजवली..आतून एकदम जोरात कुत्र्याच्या भुंकण्याचा आवाज आला..आम्ही दोघी घाबरून थोडं मागे सरकलो..कोणी तरी कुत्र्याला थोडसं आवरलं आणि करडया आवाजात विचारलं,’कोण आहे?’ मराठी असल्यामुळे मी पुढे होउन सांगितलं, ’पेईंग गेस्ट साठी आलो आहे’. मग एका माणसाने फक्त अर्धाच दरवाजा उघडला आणि बघितलं की बाहेर कोण आलं आहे. शहानिशा करून मगच त्यांनी आमच्यासाठी पूर्ण दरवाजा उघडला. आत गेल्यावर पहिलं दर्शन झालं, ब्राउन कलरच्या एका कुत्र्याचं. तो अगदी रागात आमच्याकडे बघत होता आणि त्याला एका बाईने हाताने आवरलं होतं. त्या बाईने आम्हांला एक-एक प्रश्न विचारायला सुरूवात केली.कोणत्या कॉलेजमधे अ‍ॅडमिशन घेतलं,कोणत्या गावचे आहात,आमच्या दोघींच्या वडिलांना कुठे काम करतात वगैरे विचारलं.आम्ही योग्य ती माहिती पुरवली आणि मग विचारलं की जागा कोणती आहे? त्यावर त्या म्हणाल्या की, आधी मी सगळे नियम सांगते त्यानंतर तुम्हाला जागा दाखवते, जर पटत असेल तर पुढचं बोलूया. मला ह्या आधी कधीही घराबाहेर राहण्याचा अनुभव नव्हता त्यामुळे मी फक्त ऎकत होते.माझी मैत्रीण तर हिंदी भाषिक होती त्यामुळे ती आणि तिचे बाबा पार गोंधळून गेले होते, त्यावेळेस खरं तर आम्हांला गरज होती त्यामुळे त्यांचं ऎकुन घेण्याशिवाय पर्याय नव्हता,म्हणून माझे बाबा म्हणाले ठीक आहे, सांगा.

नियमावली सांगायला सुरूवात झाली.
१. महिन्याचं भाडं अमुक रुपये आहे, ह्यामधे कमी-जास्त काही होणार नाही, उगाच रिक्वेस्ट करू नका.
२. पहिल्या दोन दिवसात पूर्ण भाडं द्यावं लागेल.
२. इथे फक्त १० महिने राहू शकता, पुढे जर राहायचं असेल तर दुसरं शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यानंतर येउन चौकशी करायची, जागा रिकामी
  असेल तरच मिळेल. ( बापरे! म्हणजे फस्ट इयर झाल्यावर काय सगळं सामान घेउन घरी जायचं आणि परत घेउन यायचं! )
३. दिवाळीनंतरच्या ५ महिन्यांचं भाडं तुम्हांला सुरूवातीला द्यावं लागेल मगच राहायची परवानगी मिळेल.( अरे देवा! इतके पैसे तर आज आणलेच नाहीत आपण :-( बाबा आता काय करायचं?? )
४. जेवण, सकाळचा नाश्ता, दूध ह्यापैकी काहिही किंवा सर्व काही हवे असल्यास वेगळे पैसे पडतील. ( चला म्हणजे खाण्याची तरी सोय इथे होउ शकते. )
५. खोलीतला दिवा,पंखा ह्या गोष्टी फक्त गरजेपुरत्या वापरायच्या कारण विजबील वेगळ घेतलेलं नाही.
६. इस्त्री अजिबात वापरायची नाही.
७. गरम पाणी फक्त एक बादली दिले जाईल. ( फक्त एकच बादली ??? )
८. गादी आणि पलंग दिलेला आहे, बेडशीट स्वत:च वापरावं लागेल. उशी मिळणार नाही कारण आमच्याकडे उशी वापरायची पध्दत नाही. ( शेवटचं वाक्य ऎकून तर मला इतकं ह्सू आलं पण वातावरणाची गांभिर्यता बघता मी ते दाबलं. )
९. कपाट फक्त एकच दिलेले आहे, दोघींनी मिळून त्यातील अर्धा-अर्धा भाग वापरायचा. ( हे भगवान! हा कसला नियम?? पैसे घेत आहात तर निदान कपाट तरी सेपरेट द्याना !! )
१०. रात्री ९ नंतर बाहेर जाण्याची परवानगी नाही.
११. इथे असणा-या फोनवर तुमच्या घरच्यांचा फोन आठवडयातून फक्त एकदा घेण्याची सोय आहे, वार तुम्ही ठरवू शकता. ( नशीब! मला वाटलं ह्याचे पण पैसे आकारणार की काय! ;-) )

हूss! हे नियम ऎकुन आम्हांला दोघींना तर टेन्शनच आलं आणि बाबा लोकांच्या कपाळावर घाम! पण आमच्यावर वेळ अशी आली होती की, अडला हरी अन...म्हणून आम्ही चौघांनी सगळे नियम मान्य केले.त्यानंतर आम्हांला खोली दाखवली गेली, खोली तशी मोठी होती, दोन बाजूला खिडक्या होत्या,तिथेच दोन कॉट्स टाकले होते आणि समोर एक गोदरेजचं दोन दरवाजे असलेलं कपाट होतं, त्याला वेगवेगळ्या किल्ल्या देखील होत्या. ते बघून मला जरा हायसं वाटलं.खोली बघून आम्ही दोघींनी आपापल्या बाबांना ’चालेल’ म्हणून सांगितलं. तसे माझे बाबा पुढे झाले आणि म्हणाले की, ’ह्या मुली आजपासून इथे राहू शकतील का?’ लगेच काकू म्हणाल्या, ’पूर्ण महिन्याचं भाडं द्या आणि सामान लगेच आणा, काहीच हरकत नाही!’ आम्ही एकमेकांकडे बघायला लागलो, फक्त ३ दिवसांकरता पूर्ण महिन्याचं भाडं?? काय हे पुणेकर रे देवा! मी तर बाबांना म्हणाले की राहू देत मी मामाकडे राहीन आणि १ तारखेला इकडे शिफ्ट होइन. माझ्या मैत्रीणिने पण असच ठरवलं आणि १ तारखेला येतो म्हणून निघायला लागलो तसं काकूंनी सांगितलं की, ’ऑगस्ट महिन्याचे पूर्ण पैसे द्यावे लागतील तरच जागा राहील नाहीतर ३ दिवसात कोणा दुस-याला दिली जाउ शकते! मला तर इतका राग आला ना, ह्या लोकांना काही माणुसकी आहे की नाही, सगळ्या गोष्टी फक्त व्यवहार म्हणूनच बघायच्या आणि प्रत्येक गोष्ट पैशातच मोजायची!! आमचे हात दगडाखाली अडकले होते त्यामुळे पैसे दयावेच लागले!

आम्हां दोघींचे बाबालोक राहायला चांगली जागा मिळाली ह्या निश्चिंतीत परतीच्या प्रवासाला निघाले.

क्रमश:

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Thursday, November 24, 2011

एक प्रसंग


संध्याकाळी ऑफिस मधून निघाले आणि आईचा फोन आला,

आई : अगं, सगळं ठिक आहे ना तिथे?
मी : (गोंधळून) हो, ठिक तर दिसतय, पण झालं काय?
आई : अगं, आज एका माणसाने एका नेत्याच्या तोंडात मारली!! टिव्हीवर सारखं तेच दाखवत आहेत आणि काही भागामधे ह्या गोष्टीमुळे गोंधळ सुरू झाल्याचं पण बातम्यांमधे सांगत आहेत, म्हणून लगेच तुला फोन केला.
मी : (हसून) अगं आई, इथे तसं काही नाही झालं, काळजी करू नकोस, घरी गेल्यावर बोलू.

मी फोन ठेवला आणि आईने सांगितलेल्या प्रसंगाबद्दल विचार सुरू झाले. मी तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला आणि खरंच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटलं त्या शुरवीर सरदारजीचं ज्याने इतक्या ज्येष्ठ नेत्याच्या मुखात भडकावली. ह्या सगळ्या नेत्यांना इतकी ’Z' लेव्हल ची सिक्युरीटी असते आणि तरीही ह्या व्यक्तीने इतकं अवघड काम कसं पार पाडलं असेल बरं. असो. त्याने आज जे काम केलं त्यासाठी प्रत्येकाने (अर्थात त्या नेत्याच्या समर्थकांना सोडून) त्याचं तोंडभरून कौतुकच केलं आहे.

मला तसं तर त्या नेत्याच्या (कृष्ण)कृत्यांबद्दल जरा कमीच माहिती आहे पण, गेल्या कित्येक वर्षांमधे आपल्या देशास जे काही नेते मिळाले ते फक्त दामाजीपंतांची आराधना, उपासना, जोपासना करणारे मिळाले, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना एकच ध्यास लागतो आणि जळी, स्थळी, काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त पैसाच दिसतो मग सुरू होतात विविध मार्गाने आपल्या लक्षाला (life-time goal) मिळविण्याचे प्रयत्न. मग कोणी ’आदर्श’ घोटाळे करतं तर कोणी 2G स्कॅम आणि असेच फाईली भरभरून घोटाळे सुरूच आहेत.

९९% नेते असेच आहेत आजच्या भारताच्या नशिबात पण काही नेते अहं मी म्हणेन (मला कळायला लागल्यापासून) मी एकच असा माणूस बघितला जो राजकारणात असतांना देखील कधी कुठल्या प्रलोभनांना बळी न-पडता प्रामाणिकपणॆ दिलेली ५ बर्ष कारभार सांभाळून पुन्हा एकदा जन-सामान्यांमधे मिसळून गेला...मी बोलतीये डॉ.अब्दुल कलाम आझाद ह्यांच्याविषयी!

शाळेत असतांना मला ’अग्निपंख’ हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका प्रामाणिक, बुध्दिमान, आपल्या कामाशी आणि देशाशी इमान राखणा-या वैज्ञानिकाची ओळख झाली. त्यांचे आचार-विचार माझ्यासारख्याच अनेक मुला-मुलींसाठी,तरूणांसाठी प्रेरणादायी ठरले अजुनही ठरत आहेत.

जेंव्हा डॉ.कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले तेंव्हा सगळ्या देशाला अत्यानंद झाला होता. खरं तर, सामान्य माणसाला देशाचा राष्ट्रपती कोण आहे ह्या गोष्टीची ब-याचदा माहिती नसते वा ह्याच्याशी काही घेणं-देणं नसतं पण डॉ.कलाम हे व्यक्तिमत्त्व असं आहे की ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला ख-या अर्थाने आपल्या देशाचा प्रथम पुरूष अभिमानास्पद मिळाला होता.

(डॉ.कलाम ह्यांना राष्ट्रपती पद बहाल करण्यामागे ’राजकारण्यांचं’ काय कारस्थान होतं ते तर माहित नाही पण प्रत्येक भारतीयाला निदान ५ बर्षाकरिता हा दिलासा मिळाला की आता आपल्या देशाची धुरा एका बुध्दिमान माणसाच्या हातात आहे आणि नक्कीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे.)

मागे एकदा मला ’The Kalam Effect' हे पुस्तक वाचायला मिळालं. हे पुस्तक पी.एम.नायर ह्यांनी लिहीलेलं आहे. लेखक हे खरं तर राष्ट्रपती डॉ.कलाम ह्यांचे पर्सनल असिस्टंट होते आणि त्यांनी ह्या पुस्तकात राष्ट्रपतींची कारकिर्दच थोडक्यात मांडली आहे. देश चालविण्याचं शिवधनुष्य डॉ.कलामांनी कसं पेललं, येणा-या बिकट प्रसंगांना कस उत्तर दिलं अशा गंभीर प्रश्नांपासून ते येणा-या प्रत्येक पत्राला उत्तर देण्याच्या प्रयासापर्यंतचा प्रवास ह्या पुस्तकातून उलगडत जातो. पुस्तक वाचतांना आपण एका असामान्य व्यक्तीला खुप जवळून बघत असल्याची जाणिव होते.

आपल्या देशाच्या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत पण त्यातल्या कलमांमधे वेळोवेळी बदल करणं आवश्यक असतं ह्या गोष्टीची जाणीव डॉ.कलामांना होती आणि म्हणूनच त्यांनी स्वत: अभ्यास करून संसदेत अहवाल सादर करून काही कलमांमधे आवश्यक ते बदल करून घेतले.

एक ना अनेक अशा खुप गोष्टी ह्या पुस्तकातून आपल्याला कळतात. एखाद्या व्यक्तीचं राष्ट्रपती असतांना काय कर्तव्य आहे ह्याची सामान्य माणसाला उकल होते.
 
सामान्य माणसाच्या दुर्दैवाने आणि ’राजकारण्यांच्या’ कृपेने डॉ.कलाम ह्यांना फक्त पाचच वर्ष ह्या देशाचा राष्ट्रपती राहता आलं...पण ही व्यक्ती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमचं घर करून राहिली..

वाईट फक्त ह्याच गोष्टीचं वाटतं की, राजकारणी लोक पैशामागे इतके कसे आंधळे होतात आणि देश विकून बसतात.

Dr.Kalam's speech in the european union



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Sunday, November 6, 2011

अपूर्ण


आजच्या युगात खालील लेखात नमूद केलेल्या काही गोष्टींचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण समूळ नष्ट झालेलं नाही.

’नवरा’ ही एन्टीटी जर स्त्रीच्या आयुष्यात नसेल तर फक्त तीच अपूर्ण राहते का? एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं नसेल तर फक्त तिच्याच आयुष्याला काहि महत्त्व नसतं का?

ठराविक वय झालं की, मुलीचे घरचे तिच्यासाठी ’योग्य’ वर शोधतात आणि ’बार’ उडवतात. त्यानंतर त्या मुलीने तिचं सगळं जग सोडून एका नव्या जगात स्वत:ला सिध्द करायची पराकाष्ठा सुरू होते. लव्ह मॅरेज असू देत नाही तर अरेन्ज मॅरेज, सून कम बायको कम बरीच अशी विशेषणं असलेली ’व्यक्ती’ घरात आली की प्रत्येकाच्या तिच्याकडून काहितरी अपेक्षा असतात पण तिच्या अपेक्षांचं काय होतं अशावेळेस?

माहेरची मंडळी म्हणतात की, सासरची मंडळीच आता तुझं घर आहे तेंव्हा तू त्यांच्या वळणाने घे, उगाच स्वत:चं डोकं चालवू नकोस, नीट रहा. पण, अशी अपेक्षा त्या मुलीची असेल तर, की, ती ज्या घरात नविन आलेली आहे त्या घरातल्या थोरामोठयांनी तिला सांभाळून घ्यायला हवं, तिला नविन वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करायला हवी, उसका क्या?

हल्ली जास्ती करून जोडपी लग्नानंतर वेगळीच राहतात(कारण कोणतंही असो). तर, अशावेळेस ’नवरा’ ह्या प्राण्याच्या देखील कधी-कधी अपेक्षा अवाजवी असतात. दुर्दैवाने आजही, आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या सवयींमुळे, मुलगा झाला की, त्याला कोणतंच काम करायची सवय लावली जात नाही, तो पुढे जाउन घराचा कर्ता पुरूष होणार आहे म्हणूनच त्याच्या छोटयातल्या छोटया चुकांपासून ते शुद्ध मूर्खासारख्या वागण्याला झाकलं जातं, त्यामुळे लहानपणापासूनच एक गोड गैरसमजूत त्याच्या मनात रूजवली जाते की, तो जे करतो तेच बरोबर, तोच एक शहाणा वगैरे वगैरे. तर, ह्या सवयीचा पुढे परिणाम आणि अर्थात प्रयोग कम जबरदस्ती बायकोवर सुद्धा होतो ते ही       शे-यांसहित-’उगाच वेंधळ्यासारखं वागू नकोस’,’उगाच शहाणपणा करू नकोस, मी सांगितलेलच बरोबर आहे’. म्हणजे, त्या बाईच्या शिक्षणाचा, तिला असलेल्या बुध्दीचा जणू तिने वापर फक्त आज भाजी कोणती करायची आणि येणा-या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं यासाठीच करायचा का??

स्त्रीला निसर्गाने उपजतच ’मॅनेजमेंट’चं स्कील बहाल केलेले आहे त्यामुळे डिग्री न-घेताही ती घर-दार, व्यवसाय, मुलं-बाळं ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते पण, म्हणून घरातल्या सगळ्याच्या सगळ्या जबाबदा-या फक्त तिच्यावर सोपवणं ही सर्वस्वी चुकीची गोष्ट आहे.

हल्ली स्त्री-पुरूष समानता, स्त्री वर्गाला ५०% आरक्षण ह्या गोष्टी पुढे येत आहेत हे अतिशय चांगलं प्रतिक आहे समाजात होणा-या बदलाचं, पण, तरीहि अजुनही सगळया घराची ही अपेक्षा असते की, बाईने नोकरी करून आल्यावर, घरातली सगळी कामं करावी.पुन्हा सकाळी उठुन सगळी कामं करून घराबाहेर पडावं!! ही आणखीन एक अवाजवी अपेक्षा!!! स्त्री म्हणजे पण एक माणूस आहे, त्यालाही विश्रांतीची गरज असते हा विचार कुठे केलाचं जात नाही. बरं, हे झालं नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी, पण, घरात बसणा-या बायकांचे तर हाल ह्याहीपेक्षा जास्त असतात. त्या एक तर घरी राहुन सगळं घर सांभाळतात + घराबाहेरची जी काहि छोटी-मोठी कामं असतात बॅंकेची वगैरे ती करतात + संध्याकाळी नवरा घरी येण्याच्या वेळेला त्याला प्रसन्न वाटावं म्हणून घर सज्ज ठेवतात आणि जर कधी तिने संध्याकाळी बाहेर जायची इच्छा व्यक्त केली तर आलाच नव-याचा शेरा,’तुला काय काम असतं दिवसभर, मी ऑफिसमधून थकुन आलोय अन लगेच तुला बाहेर जायचयं’!!

घ्या!! म्हणजे, ती बिचारी घरी दिवसभर मरमर करून इतकं सगळं करत असते आणि त्याचं फळ काय तर इतका छान डायलॉग!! उलट,
नव-यांना हे कळायला हवं की, ती सकाळपासून घरातच होती म्हणूनच तिला आता तुमच्यासोबत बाहेर जायचं असतं. पण, इतकी साधी गोष्ट कळेल ते नवरे कसले!!

पण, एक मात्र आहे, पुरूष वर्ग एका बाबतीत फारच हुशार आहे असं म्हणायला हवं, त्यांच्या सगळ्या अपेक्षा विनासायास पूर्ण करण्यासाठी ते कधी-कधी ’कौतुक’ ह्या गोष्टीचा आधार घेतात आणि आपलं काम करून घेतात. ह्या त्यांच्या कौतुकसोहळ्यासाठी पुरूष वर्गातील लेखकांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. स्त्री ला त्यांनी अनंत काळची माता ही पदवी बहाल केली आहे तसंच सहनशील, संयमी, संसाराचा रथ समर्थपणे सांभाळणारी या आणि अशा ब-याच उपमा देउ केल्या आहेत, जेणेकरून, स्त्री वर्ग निसर्गत:च दिलेल्या हळव्या मनामुळे विरघळतात आणि कितीही कष्ट पडत असले तरीहि सगळ्या अपेक्षा पूर्ण करतात. आणि पुरूष वर्ग स्वत:च्या तल्लख बुध्दीवर खुष होतो!!

तुम्हांला वाटत असेल मी कोणी स्त्रीवादी चळवळीची कार्यकर्ती आहे की काय, पण असं अजिबात नाहीये. वर मांडलेले हे विचार माझ्या आजुबाजूला घडणा-या गोष्टींच्या निरीक्षणातून आलेले आहेत.

कदाचित पुरूष वर्गाला हे वाचून वाटत असेल की, तुम्ही काहीही बोला आमच्याबद्दल, पण निसर्गानेच आम्हांला निर्माण केलं आहे तुम्हांला पूर्णत्व बहाल करण्याकरता (आणि हा विचार वाचून ते पुरूषअसण्याच्या अहंकाराने सुखावतही असतील)

पण, मला इथे कोण कितपत पूर्ण किंवा अपूर्ण आहे हे नाही मांडायचं, मला फक्त हे म्हणायचं आहे की, जशी स्त्री अपूर्ण आहे पुरूषाशिवाय तसाच पुरूषही अपूर्ण आहे स्त्रीशिवाय. निसर्गाने फक्त पुरूषालाच सगळी शक्ती + बुध्दी बहाल केलेली नाहिये. काहीही झालं तरी नवनिर्मिती हे एकटया स्त्री किंवा पुरूषाला शक्य नाहिये. कदाचित कोणी एकाने उगाच दुस-यावर वर्चस्व गाजवू नये म्हणूनच की काय, निसर्गाने दोघांनाही अपूर्णत्व बहाल केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करून दोघांनीही ते आचरणात आणणं अपेक्षित आहे.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


 


Thursday, November 3, 2011

नरसोबाची वाडी


दिवाळी म्हटलं की, मला आठवण होते नरसोबाच्या वाडीची.

नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे दत्तात्रय महाराजांचं एक जागृत असं देवस्थान कृष्णामाईच्या तिरावर वसलेलं आहे.

सांगली पासून २५ किमी अंतरावर असणारं हे गाव म्हणजे साक्षात दत्तभूमीच. ही भूमी श्री.दत्तमहाराजांचे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतींच्या १२ वर्षे वास्तव्याने पावन झालेली आहे.

आमच्या घरामधे श्री.दत्तमहाराजांची आराधना केली जात असल्यामुळे, आम्ही दिवाळी च्या आधी येणा-या गुरूव्दादशी ला नरसोबाच्या वाडी ला जायचो. तिथे ह्या काळात खूप मोठा उत्सव असतो.

पुण्याहुन सांगलीला जाणा-या बस मधे बसलं की शेवटचा स्टॉप म्हणजे नरसोबाची वाडी. रात्री अगदी उशीरा पोहोचल्यावर विनोद पुजारी म्हणून बाबांचे मित्र होते आम्ही त्यांच्याकडे उतरायचो. त्यांचं घर मस्त दुमजली होतं. राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था तेच बघायचे.

दिवाळी म्हणजे अगदी कडक थंडी, तरीपण आम्ही एकदा का होईना कृष्णामाईला पहाटे जाउन आंघोळ करायचो. त्यानंतर मंदिरातील काकड आरती व प्रात:कालपूजेला हजर व्हायचो.

मंदिराचा आवार खुप मोठा आहे, प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पहिले डाव्या बाजूची दुकानं तुमचं स्वागत करतात, ह्या दुकानांमधे पुजासाहित्य, प्रसाद आणि थोरा-मोठयांना वाचायला उपयुक्त अशी पुस्तकं देखील मिळतात. इथे मिळणारे पेढे अतिशय चविष्ट असतात आणि इथली खासियत म्हणजे कवठ बर्फी आणि ड्रायफ्रुट बर्फी, ह्या दोन प्रकारच्या बर्फी तुम्हांला दुसरीकडे कुठेच इतक्या छान मिळणार नाहीत. आणि इथली बासुंदी तुम्ही एकदा चाखलीत की तिची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत.

तर, आत आल्यावर उजव्या बाजूला, नारायणस्वामींचं मंदीर आहे. त्यामागे, मोठी धर्मशाळा बांधलेली आहे.थोडंसं पुढे गेलं की, डाव्याबाजूला मुख्य मंदीर आहे जेथे औदुंबराच्या (झाडाच्या) सावलीमधे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाची वाडी सोडण्यापूर्वी ह्या जागी आपल्या मनोहारी पादुकांची स्थापना केली होती ज्याचा पुढे श्री.गुळवणी महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि सध्यस्थितीतील मंदीराची रचना झाली.

आता थोडी नजर वळवा, समोरच कृष्णामाईचं दुथडी भरून वाहणारं स्वच्छ, नितळ पाणी चकाकतांना दिसेल. असं म्हणतात की, पूर्वी पावसाळ्यामधे कृष्णामाईला इतका पूर यायचा की पाणी मंदिरातील पादुकांना स्पर्श करीत असे. पण, आजही कृष्णामाईच्या पात्राला पाणी अगदी काठोकाठ असतं. नदीकाठी बांधलेल्या सुंदर घाटामुळे मंदीर परिसराला एक उठाव आलेला आहे. असं हे प्रसन्न वातावरण असलेल्या मंदिराचं दर्शन घेउन आम्ही घराकडे परतायचो.

पुढे घराकडे जातांना, रस्त्यावर थोडंसं धुकं असायचं आणि सकाळच्या शुध्द हवेत धुपा-दिपाचे वास दरवळत असत आणि क्वचित कुठुन तरी गरमपाण्याच्या बंबाचा धुर दिसत असे. दुतर्फा असणा-या घरांची अंगणं सुध्दा सडा-संमार्जन करून सिध्द असत.सुवासिनी मंदिरामधे पुजायला जातांना दिसत. दिवाळी सुरू होण्यास अवकाश असून देखील अगदी मंगलमय वातावरण असायचं.

नरसोबाच्या वाडीला, मंदीरामधे सकाळी ९ ते १२ ह्या वेळेत मनोहारी पादुकांची पुजा करण्याची संधी भाविकांना मिळते.आम्हीदेखील एकादशीच्या दिवशी ही पुजा करीत असू. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान खिडक्या बसवलेल्या आहेत ज्यामधून पुजा करणा-या व्यक्तीला पादुकांची होणारी पुजा व्यवस्थित बघता येते. तसंच मुख्य व्दारातून इतर भाविकांना दर्शन घेता येते. ह्या तीर्थक्षेत्री असणारे ब्राम्हणवृंद आपल्याकडून यथासांग पुजा करवून घेतात. दुपारी १२ ते १ च्या सुमारास महापुजा, नैवेद्द व आरती होते.

त्यानंतर आम्ही परतायचो. दुपारी विश्रांती घेउन मग संध्याकाळी आम्ही कृष्णामाईच्या पैलतीरी वसलेल्या ’अमरेश्वर’ ह्या शंकराच्या मंदिराला भेट देत असू. हे मंदीर कृष्णामाईच्या काठावर वसलेलं असल्याने तुम्ही नावेतून जाउ शकता किंवा चालतही जाउ शकता.

संधीकालच्या प्रकाशात कृष्णामाईचं पात्र अधिकच सुंदर भासतं, त्या प्रवाहाकडे बघता बघता संध्याकाळच्या पुजेची वेळ कधी होते कळतच नाही.

सकाळी झालेल्या महापुजेपेक्षाही मला संध्याकाळी असणा-या पालखीचं खुप आकर्षण असायचं. नारायणस्वामींच्या मंदिरामधे पालखीची तयारी केली जाते. विशेष म्हणजे ही तयारी सर्व भक्तगणांना बघायला मिळते.सर्वप्रथम उत्सवमूर्तीला अभिषेक केला जातो.त्यानंतर चंदनगंध,कुकुम,काजळ आदिंनी मुखवटयाची सजावट केली जाते. त्यानंतर पुणेरी फेटा बांधला जातो. सरतेशेवटी ताज्या फूलांची आरास केली जाते. त्यानंतर आरती-वात,नैवेद्द होतो आणि "राजाssधिराज, महाराज" च्या गजरात मिरवणुकीची सुरूवात होते. पालखीसोबत चंद्र, सूर्य, चवरी (वारा घालण्याचा पंखा) घेउन तसंच भालदार, चोपदार औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करतात. भक्तांना देखील ह्या पालखीमधे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते. दत्तात्रय महाराजांची विविध स्तुतीपरपदं म्हणत म्हणत ही मिरवणूक साधारण तासभर चालते आणि दिवसाची सांगता होते.

दुसरा दिवस असतो गुरूव्दादशी चा, ह्या दिवशी मोठया प्रमाणात भक्तगण आपल्या गुरूमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता येतात. महापुजा झाल्यानंतर प्रसाद असतो. नरसोबाच्या वाडीला मिळणा-या प्रसादाचं पण एक वैशिष्ठय आहे. इथे पुरी-भाजी असा प्रसाद नसून खीर व वांग्याची भाजी हा प्रसाद असतो. प्रसादाची खीर ही भरडलेला गहू आणि गुळाची केलेली असते. अतिशय चविष्ट अशा या प्रसादाचं सेवन केल्यावर आत्मा तृप्त होतो.त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी पालखी असते. अशात-हेने गुरूव्दादशीचा उत्सव पार पडतो.

...आज कित्येक वर्ष झाले आम्ही नरसिंहवाडीला गुरूव्दादशीच्या निमित्ताने जाउ शकलो नाही पण, दिवाळी म्हटलं की आम्हांला ह्या सगळ्या उत्सवाची आठवण होत नाही असं कदाचितच घडत असेल..

जसा हा उत्सव माझ्या लक्षात आहे तशीच नरसोबाच्या वाडीशी निगडीत एक आठवण खुप वेगळी आणि छान आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे किल्ला करायची पध्दत आहे. तिथे तर किल्ला बनविणे स्पर्धा घेतली जाते आणि ही स्पर्धा अशी तशी नाही तर अगदी अटीतटीची असते. फक्त २,४ विटा घेउन थोडी माती थापली की किल्ला तयार ही तिथे किल्ल्याची व्याख्या नाही. तर, तिथे लहान-मोठे सगळे मुलं व्यवस्थित आखणी करून, विचार करून शिवाजी महाराजांचा एखादा फेमस किल्ला निवडतात मग माती, विटा, चुना, विविध रंग ह्या सर्व साहित्यासह किल्ला बांधणीला सुरूवात करतात आणि साधारण २-४ दिवसात त्या फेमस किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती बनवतात. त्यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे तसंच किल्ल्याच्या आवारात छोटंसं तळं करून त्यात दिव्यावर चालणारी बोट अशा गोष्टी रचून सजावट करतात. आम्ही सर्वजण तर हे सगळं बघून अगदी हरखून जायचो आणि आपण पण असाच किल्ला करायचा घरी गेल्यावर हा विचार घेउन नरसोबाच्या वाडीचा निरोप घ्यायचो..

तर, कशी वाटली तुम्हांला ही आगळी-वेगळी सफर..जमलं तर तुम्ही पण एकदा जाउन याच, माझं तर ह्या दिवाळीचं प्लॅनिंग फिक्स झालेलं आहे.

वरील ब्लॉग जालरंग प्रकाशनाच्या दिपज्योती २०११ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



Sunday, October 9, 2011

सोलेदाद

Lyrics link

वेस्टलाईफ ह्या बॅन्ड च ’सोलेदाद’ हे गाणं ऎकलं आणि डोक्यात विचार सुरू झाले,

ह्या गाण्याची खरी कथा मला माहित नाही, पण, जेंव्हा हे गाणं मी पहिल्यांदा ऎकलं तेंव्हा वाटलं की, बहुदा ह्या कपल चं ब्रेक-अप झालं असावं आणि ह्या मुलाचं त्या मुलीवर खुप प्रेम असणार पण ती सोडून गेल्यामुळे तो दु:खसागरात पार बुडून गेला आहे.

त्या प्रियकराने आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीच्या आठवणींमधे आळवलेलं हे गाणं आहे..त्याला ती सोडून गेल्यावर झालेलं दु:ख प्रत्येक शब्दातून वाहत आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या दोघांनी पुढच्या आयुष्याची स्वप्न बघितली होती त्या जागा आता त्याला भकास वाटत आहेत.आणि म्हणूनच तो म्हणतो, You're a loss I can't replace.

ह्या गाण्यात जे काही तो कवी सांगतो आहे ते कित्येकांच्या बाबतीत घडलंही असेल पण, खरंच, असं कितपत शक्य आहे की, जी व्यक्ती तुम्हांला तुमच्या आयुष्यभरासाठी हवी होती पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगूच शकणार नाही. तुमचं त्या व्यक्तीवर अगदी जिवापाड प्रेम होतं, तिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार होतात पण, आता तिच नाही म्हणून एखाद्याला जिवंतपणी जगणं सोडून देता येतं?

मी कल्पना करू शकते ब्रेकअप झाल्याचं दु:ख किती तीव्र असू शकतं, पण आपल्याला सगळ्यांना हेही माहित आहे, की वेळ-काळ-आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही, त्याच्या गतीनुसार ते पुढे सुरूच राहतं कोणाचीही वाट न-बघता, एकदा पुढे गेलेली वेळही त्याचमुळे कितीही इच्छा असली आणि कितीही प्रयत्न केले तरी परत येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोणी स्वत:ला एकाच जागी थांबवू शकतं, मनातल्या विचारांना एकाच व्यक्तीसाठी बांधून ठेवू शकतं?  

मला तरी वाटतं, एक ठराविक काळच ह्या दु:खाची तीव्रता राहत असावी. मान्य आहे, ह्या आठवणी आयुष्यभरासाठी मनावर ठसे उमटवून जातात पण त्यामुळे माणूस जगण्याचा स्वार्थ सोडू शकत नाही.काहि देवदास झालेही असतील कदाचित अशा प्रसंगानंतर पण, कुठेतरी जगण्याची जी उमेद निसर्गाने माणसात जन्मत:च दिलेली आहे तीला इतक्या सहजा-सहजी झुगारून देणं केवळ अशक्य आहे. तुम्ही स्वत:ला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीहि, काळ, ज्याच्याशी आपलं आयुष्य बांधलं गेलेले आहे आणि आपले आप्तस्वकीय ज्यांमुळे आपल्याला जगण्याची ताकद मिळाली आहे, थांबू देत नाहीत!!

पण, मी म्हणते का थांबावं एखाद्याने? फक्त हट्ट म्हणून की दुस-याचं अटेन्शन मिळविण्याकरता? छ्या....

माझं तर स्पष्ट मत आहे की, निदान स्वत:साठी तरी माणसाने मनमुराद जगायला हवं. माणसाचा जन्म मिळाला आहे आणि ह्या पृथ्वीतलावर कित्तीतरी गोष्टी बघण्यासारख्या, करण्यासारख्या, जगण्याचा खराखुरा आनंद लुटण्यासारख्या आहेत मग का स्वत:हून आयुष्याची राख-रांगोळी करायची.

आयुष्य हे सरप्राइजेस नी भरलेलं असतं, कदाचित तुम्हांला हवी असलेली व्यक्ती पुढच्याच वळणावर भेटणार असेल, फक्त तुम्ही तीथवर जायचा उशीर...    


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Wednesday, September 28, 2011

My daddy strongest :-)


माझ्या आयुष्यातला पहिला हिरो आणि आयडॉल म्हणजे माझे बाबा! ’साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’, हा माझ्या बाबांचा जीवनमंत्र. त्यांची  रास सिंह आहे आणि तसचं त्यांचं व्यक्तिमत्त्व ही सिंहासारखं रूबाबदार आहे, कोणत्याही प्रसंगाला अगदी धीराने, न-डगमगता सामोरं जाण्याची त्यांच्यात ताकद आहे. कधीच उतावीळपणा, अधीरता त्यांच्या वागण्यात आम्हां भावंडांना दिसली नाही.

अगदी हालाखीचे दिवस काढूनही त्यांनी स्वबळावर शिक्षण पूर्ण केलं, शून्यातून सगळं विश्व उभं केलं, पण, या गोष्टीचा त्यांना जरा देखील गर्व नाहीये.

लहानपणी आमच्यावर सगळे संस्कार बाबांनी त्यांच्या वागणुकीतून केले. कोणतही काम असलं तरी आमचे बाबा ते काम परफेक्टच करणार. मग ते त्यांच्या ऑफिसचं काम असू दे किंवा स्वयंपाक! खरं सांगू, माझ्या आईपेक्षा बाबाच पुरणपोळी आणि भाकरी छान बनवतात ;-)

त्यांच्यामुळेच आमच्यातही व्यवस्थितपणा अगदी  लहानपणापासून रूजला. मला अजून आठवतं, शाळा सुरू झाल्यावर नविन आणलेल्या वह्या, पुस्तकांना कव्हरं घालायला बाबा आम्हांला शिकवायचे, कधी जर चूक झाली तर व्यवस्थित समजावून सांगायचे पण, ’मार’ हा प्रकार कधीच नव्हता.

माझ्या बाबांचं अक्षर अतिशय सुंदर आहे, ते उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांची देवावरही खूप श्रद्धा आहे. पण, देव आहे म्हणून तारून नेईल अशी त्यांची वृत्ती नाही, तर ते एक कर्तव्यनिष्ठ मुलगा, पती आणि पिता आहेत.

पुस्तकं वाचायची आवड मला बाबांमुळे लागली, माझ्यासोबत बुध्दिबळ खेळायला बाबाच नेहमी पार्टनर असायचे. माझ्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी सुद्धा बाबाच करून घ्यायचे, मला जेंव्हा पहिलं बक्षिस मिळालं होतं तेंव्हा बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली होती,’बक्षिस मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही आणि जर एखाद्यावेळेस नाही मिळालं तर रडायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचे, यश जरूर मिळतं’..असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत ज्यामधून बाबांनी आमचा स्वभाव घडवला.

मी कधीच त्यांना निराश झालेलं बघितलं नाही, कायम त्यांनी संकटातून अगदी धीराने स्वत:ला सावरलं, कधीच त्यांच्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहिला आणि त्यांनी आमच्या डोळ्यात येऊ नाही दिला.

असं सगळे जण म्हणतात की, आई-वडील जर काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात मिळवू नाही शकले तर त्या गोष्टी पूर्ण करण्याची अपेक्षा ते आपल्या मुलांकडून ठेवतात, पण, आमच्यावर कधीच बाबांनी त्यांच्या इच्छांचं ओझं लादलं नाही, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार शिकू दिलं.

मध्यमवर्गीय म्हटल्यावर ’बाबा’ ह्या व्यक्तीला घर आणि ऑफिस यातून आपल्या मुलांसाठी म्हणावा तितका वेळ काढता येत नाही पण, आमचे बाबा प्रत्येक वेळेस आमच्यासाठी, आमच्याजवळ होते, आहेत. कधी बोर्डाची परिक्षा असू देत अथवा कॉलेजचं अ‍ॅडमिशन, गणपतीची मिरवणूक किंवा कर्णपूरा देवीची जत्रा..

बाबांच्या संयमी स्वभावामुळे लहानपणापासून ते आजतागायत मी कधीही घरामधे कुरबूर, भांडण, रडारड असे प्रकार बघितले नाही, आम्ही सगळी भावंड अगदी खेळकर वातावरणात मोठे झालो.

आम्हां मुलींना स्वावलंबी बनविण्यात आमच्या बाबांचा खूप मोठा वाटा आहे, मी स्वत: ला अतिशय भाग्यशाली समजते मला इतके प्रेमळ, कर्तव्यदक्ष,ढाल बनून आमचं रक्षण करणारे बाबा मिळाले.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, September 6, 2011

सुट्टी



चला, आता फक्त एकच आठवडा राहिला गणेश चतुर्थीला, लवकरात लवकर सामानाची बांधाबांध करायला हवी, १० दिवसांच्या सुट्टीवर जायचं म्हणजे काही विसरायला नको!

घरी पार्वती आई, शंकर आण्णा, कार्तिकेय दादा सगळे कित्ती खुष होतील मला १ वर्षांनंतर बघून आणि मी सुद्धा ह्या सगळ्या मानवांपासून अगदी दूर कैलासावर शांततेत सुट्टी व्यतित करेन. मी त्या टिळकांचा अगदी मनापासून आभारी आहे त्यांनी हा गणेशोत्सव सार्वजनिक केल्यापासून, निदान एका मानवाला तरी माझी कीव आली आणि १० दिवस का होईना माझी ह्या मानवांच्या रहाटगाडग्यातून सुटका झाली!!

हल्ली सार्वजनिक गणेशत्सोव म्हणजे डोक्याला ताप होउन बसलाय! कित्ती लाउड म्युझिक असतं आणि गाणी तर अहाहा...ट ला फ जोडलं आणि नाशिक ढोल त्यात टाकला की झालं ह्यांचं गाणं तयार!! असल्या गोंगाटावर इतकं बेहोष होउन नाचता येतं हे कोडंच मला आजतागायत सुटलं नाही. कधी कधी वाटतं की, इतर देवांसारखे माझे कान जर लहान असते तर निदान कानात बोटं तरी घालून बसलो असतो पण...जाउ द्यात.

मला आणताना आणि १० दिवस संपल्यावर विसर्जनासाठीची जी मिरवणूक काढतात त्याचा फार त्रास होतो, एकतर अतिशय गर्दी असते प्रत्येक मंडळाच्या मंडळींची, त्यात खड्ड्यातले अरूंद रस्ते आणि आलाच तर रिमझिम पासून ते धो धो पडणारा पाऊस आणि हे सगळं कमी की काय म्हणून उरले सुरले ते डीजे कोकलत असतात त्या स्पिकर्स च्या भिंतींमधून! बरं ह्या सगळ्यात शिस्त वगैरे प्रकार हा कधी नसतोच, म्हणजे आपला ’लाडका’ बाप्पा येतोय किंवा आपण त्याला नेतोय ह्या एका गोष्टीमुळे सगळे नियम धाब्यावर ठेवले जातात!!

त्या बिचा-या टिळकांनी समाजप्रबोधनासाठी हा घरातला गणपती बाहेर आणला पण, आता फक्त काही काही गणेश मंडळांमधे एक औपचारिकता म्हणून त्यांचा फोटो लावलेला असतो आणि समाजप्रबोधन म्हणजे काय हे माहित असणं तर दूरच पण हा शब्द सुध्दा अर्ध्याअधिक लोकांनी ऎकलेला नसतो.

उत्सव आहे, सगळीकडे आनंदाचं वातावरण आहे, तुम्ही मजा करा ना, माझी काही हरकत नाहीये पण, जरा काही महत्त्वाच्या गोष्टींचं भान ही ठेवा. जसं की, मिरवणुकीत तारसप्तकातली गाणी लाउन नाचत-गात रस्ता अडविण्यापेक्शा साधं हातात जरी आणलत मला तरी मी खुष होइन. उगाच तास-तास त्या मिरवणुका चालणार, रस्त्यात गर्दी होणार, रहिवाश्यांना सगळ्या गोंगाटाचा त्रास, म्हणजे ह्यात मंडळाची लोकं मजा करणार आणि बाकीच्यांचे हाल!! उगाच खंडणी वसून केल्या सारखं लोकांकडून माझ्या उत्सवाची वर्गणी गोळा करण्यापेक्षा साधा साखर-खोब-याचा नैवेद्य दाखवून एखाद्या पाटावर जरी माझी स्थापना केलीत तरी मी सगळ्यांना आशिर्वाद देइन.

खरं तर, ह्या १० दिवसात एकत्र येउन मंडळाचे कार्यकर्ते वेळ अगदी सत्कारणी लाउ शकतात पण, जेंव्हा मी काही कार्यकर्त्यांना गोळा केलेल्या वर्गणीचा दुरूपयोग करतांना बघतो तेंव्हा खुप वाईट वाटतं पण काय करणार अगदी प्रत्येकाला समजावून सांगणं अशक्य होतंय आता आणि किती किती ठिकाणी मी पुरणार आहे.

मला आणखिन एका गोष्टीचं खुप आश्चर्य वाटतं की, मी वर्षभर ह्या ना त्या मंदिरांमधे बसलेलो असतो पण, जेंव्हा गणेश उत्सव असतो तेंव्हाच ’नवस’ बोलणा-यांची इतकी गर्दी का होते? म्हणजे, मला तरी वाटतं की, त्या मंदिरातही मी तुमचं ऎकु शकतो आणि ह्या मंडळातही, असो.

एक मात्र आहे, एकीकडे महागाई वाढत असली तरीही माझ्या समोर पैसे,सोनं-चांदी ह्या गोष्टींचा होणारा ढीग काही कमी होत नाहीये, मागच्या वर्षीच्या कम्प्यारिझन मधे ह्या वेळेस तो १ल्या दिवसापासूनच वाढत चाललाय.  

मला कौतुक वाटतं ते सगळ्या मुर्तिकारांचं, कित्ती वेगवेगळ्या आणि लोभसवाण्या रूपात मला ते नटवतात, भव्य-दिव्य आकार देतात. अगदी, प्रत्येक देवाच्या साच्यात मला घडवतात.दाग-दागिने, आकर्षक रंगसंगतीने मला सजवतात.मला हे सगळं बघायला खुप आवडतं म्हणजे आवडायचं, कारण हल्ली मी ह्या १० दिवसांमधे पृथ्वीवर थांबतच नाही, आई-बाबांकडे जाउन राहतो.मला हा सगळा गोंगाट, मंडळांचा आणि त्यांच्याकरवी आपला मतलब काढणा-या राजकारण्यांचा चाललेला धिंगाणा बघवत नाही.कीव येते ती सामान्य माणसाची, तो आपला मला वर्षभर भक्तिभावाने पुजतो आणि ह्या १० दिवसांमधेही त्याच्या परीने माझी सेवा करतो, दुर्दैवाने त्याला मी माझ्या चाकोरीच्या बाहेर जाउन मदत नाही करू शकत. कुठेतरी मला सुध्दा लिमिटेशन्स आहेत हे मी सांगण्याचा प्रयत्न करतो पण, सामान्य माणूस काही आशा लावणं सोडत नाही..खरं तर, प्रत्येक मानवामधे माझा अंश आहे, त्याला माझ्याकडे उगाच मंदिरांमधे येउन प्रार्थना करायची, काही मदत मागायची गरजच नाहीये, जर त्याने स्वत: ला एकदा विचारलं, स्वत: वर विश्वास ठेवला तर त्याला सगळं काही साध्य आहे.कधी कधी काही अडचणी येतात, कोणताच मार्ग दिसत नाही पण म्हणून त्याने हाय खाउन प्रयत्न करणं सोडायचं नाही, कारण जर तो थांबला तर मी पण त्याला काही मदत करू शकत नाही..

असो..खुप गप्पा झाल्या आज, मला कामावर जायला अहो म्हणजे मंदिरात जायला उशीर होतोय..बरंय मग, आता भेटू आपण अनंत चतुर्दशी नंतर...मोरया!

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, July 27, 2011

खरंच असं का?


>> जेंव्हा घाई असते नेमकं तेंव्हाच लोकलसाठी तिकीटाच्या रांगेत आपला नंबर येउनही खिडकी बंद का होते??
>> कच्चून पाऊस पडत असतो, ऑफिस ला जायला उशीर झालेला असतो आणि एकही रिक्षावाला आपल्या हाकेला प्रतिसाद देत नाही, असं का?
>> आपल्यात गुण/कसब असूनही, आपल्यापेक्षा फक्त दिसण्यात सुंदर पण बुद्धीने माठ व्यक्तीला आपल्याआधी बढती मिळते ???
>> जेंव्हा अगदी मनापासून काहितरी चविष्ट खायची इच्छा असते नेमकं तेंव्हाच डब्यात ’नावडती’ भाजी येते, असं का :-(
>> सगळं व्यवस्थित प्लॅन करून ठेवावं आणि अगदी शनिवारी निघायच्या वेळेला माशी कुठेतरी शिंकते आणि भन्नाट विकेन्ड चा प्लॅन फूस्स होतो, का होतं असं??
>> ब-याच दिवसांपासून शोधत असलेलं पुस्तक घ्यायला जाण्याचा मुहुर्त साधावा,दुकानात जावं तर कळतं त्या पुस्तकाचं प्रकाशनच आता बंद झालंय!!!???
>> एखाद्या रविवारी मस्त उशीरा उठून, लोळत पेपर वाचल्यावर, आठवडयाची कामं उरकावी ह्या विचाराने बघावं तर नळाचं पाणीच गायब!!!, ऎसा क्यों???
>>कधी-कधी पूर्ण दिवस खुप छान जातो; बॉस,युझर कोणीच ऑफिस मधे कटकट करत नाही, तरीहि संध्याकाळी अगदी रिकामं-रिकामं, बोअर होतंय असं का वाटतं??
>>अगदी जवळच्या माणसाशी बोलतांना कधीतरी असं का वाटतं की आपले शब्द फक्त त्याच्या कानावर आदळत आहेत, त्याला आपण काय बोलतोय हे समजतच नाहीये!!??

>>पण,
कधीतरी एखादा माणूस मद्दपान करून भरधाव वेगात गाडी चालवून एखाद्या निष्पाप माणसाचा जीव घेतो, खरंच असं का होतं??
>>आपल्या समोर कित्येक वेळा काही आक्षेपार्ह गोष्टी घडत असतात, पण आपण कळत असूनही कानाडोळा करतो, आवाज उठवत नाही, असं का??
>>देवदर्शन करून परतत असतांनाच एखाद्या बसला अपघात होउन सगळे प्रवासी ठार होतात, असं का??  
>>कोण,कुठले दहशतवादी येतात आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब लावून सामान्य माणसांचं जन-जीवन विस्कळीत करून जातात आणि एकजात सगळे राजकीय पक्ष अशा प्रसंगी फक्त आपली पोळी भाजून घेतात, देवा खरंच असं का??

>>आणि
नेहमी, आपल्या आवडत्या ठिकाणी किंवा आवडत्या व्यक्तीला भेटायला जातांना अंतर अगदी कमी भासतं अन परतीचा प्रवास इतका लांबलचक आणि कंटाळवाणा का होतो??

>>सगळ्यात विचित्र म्हणजे,
प्रत्येक वेळेस शारिरिक अथवा मानसिक जखमेवर ’काळ’ हे एकच औषध आहे, असं का??

असे कितीतरी प्रश्न तुम्हांला-मला-आपल्या सर्वांना कधी ना कधी पडले आहेत, पडत असतात, पण, प्रत्येक गोष्टी साठी उत्तर मिळतच नाही, मग एकच पर्याय उरतो; आपली बुध्दी असं एखादं छानसं, गोंडस उत्तर तयार करते की, आपलं मन लगेच ते उत्तर ऎकतं आणि तो प्रश्न तिथेच सोडून पुढे जायला तयार होतं!!!  

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, July 20, 2011

माझी शाळा

औरंगाबाद मधे प्रसिध्द असणारी शारदा मंदिर कन्या प्रशाला ही आमची शाळा. मराठवाडा मुक्तिसंग्रामातील क्रांतिकारक गोविंदभाई श्रॉफ ह्यांनी स्थापन केलेल्या श्री.सरस्वती भुवन शिक्षण संस्थेचा अविभाज्य घटक असणारी आमची ही शाळा.
आज कित्येक वर्षांनंतर मला शाळेत जाण्याचा योग आला.
मी ह्या शाळेमधे ५ वी पासुन १० वी पर्यंत शिकले.

शाळेमधे पाउल ठेवलं आणि सगळ्या जुन्या आठवणी माझ्या डोक्यात पिंगा घालू लागल्या.शाळेचं पटांगण सगळ्यात पहिले दिसलं, जिथे आम्ही सगळ्या मुली रोज आपापल्या वर्गानुसार उभ्या राहायचो...मग भागवत मॅडम किंवा जहागिरदार मॅडम समोर यायच्या आणि प्रार्थना, त्यानंतर राष्ट्रगीत आणि मग प्रतिज्ञा व्हायची. त्यानंतर मग एखादया मुलीला किंवा एखादया ग्रुपला स्पर्धेत मिळालेल्या यशाचं कौतुक, त्यांना सगळ्यांना स्टेजवर बोलावून केलं जायचं.



त्यानंतर भागवत मॅडम आम्हां सगळ्या मुलींचे गणवेश तपासायच्या.भागवत मॅडम इतक्या कडक होत्या की आम्ही त्यांचं नाव जरी ऎकलं तरी सगळ्यांची बोबडी वळायची.जसा आम्हांला त्यांचा धाक होता तसाच आमच्या शाळेच्या परिसरातल्या सगळ्या मुलांना देखील होता.त्यामुळे आम्ही मुली मात्र सुरक्षित होतो.शाळेत असतांना आम्हांला कोणताही सोन्याचा दागिना घालण्याची परवानगी नव्हती, पुन्हा वेणी जर घातली असेल तर वेण्या, त्याच्या रिबिन्स,शाळेचा गणवेश, बुट अगदी सगळं व्यवस्थित आहे की नाही हेदेखील भागवत मॅडम तपासायच्या. पण, जर कधी शाळेत जायला उशीर झाला तर मात्र शिक्षा ठरलेलीच, तेंव्हा ती शिक्षा जरी त्रासदायक वाटली तरीहि आज त्या गोष्टिचा ऑफिस ला किंवा कोणत्याही महत्त्वाच्या ठिकाणी वेळेत पोहोचवण्यात मोठा वाटा आहे.
आत गेल्यावर मला एक-एक वर्ग दिसू लागले.आमचा ९ वी चा वर्ग खाली तळमजल्यावर होता, ( त्याच वर्गात आम्ही ७ वी मधे असतांना बसायचो )..आत एक नजर टाकली आणि मी,माझ्या मैत्रिणी कोणत्या बाकावर बसत होतो, काय काय मजा केली हे सगळं आठवलं.
त्यानंतर मी गेले स्टाफ-रूम मधे, तिथे दारात एक क्षण मी अडखळले कारण लहानपणी कधीहि आम्हांला आतमधे जाण्याआधी, ’मॅडम, आत येउ का’, असं विचारावं लागायचं. आज मी सरळ आत जाउ शकले, बघितलं तर, काही मॅडम नविन दिसत होत्या पण,सगळ्या मावशी जुन्याच होत्या.मावशी नेहमीप्रमाणे सगळ्या मॅडमसाठी चहा बनवण्यात दंग होत्या मी त्यांना हाक मारली तर त्यांनी मला ओळखलं, मला  तर इतका आनंद झाला; ह्या मावशी सगळ्यांच्या विशेष आवडीच्या कारण कोणताही तास संपल्याची अथवा मधली सुटी किंवा शाळा सुटल्याची सुचना घंटा वाजवून देण्याचं अत्यंत मोलाचं काम ह्या करत होत्या आणि अजुनही करत आहेत.

त्यानंतर मी मोर्चा वळवला वर्गांकडे, माझ्यावेळेस असणा-या माझ्या मॅडमना शोधण्याकरता. एक एक वर्ग बघत-बघत लहानपणचे दिवस आठवत मी सगळ्यात आधी वळले आमच्या चित्रकलेच्या वर्गाकडे.शाळेमधे एक खास वर्गच चित्रकलेसाठी ठेवलेला आहे, जेंव्हा पण आमचा चित्रकलेचा तास असायचा तेंव्हा आम्ही सर्व मुली आपापलं चित्रकलेचं साहित्य घेउन एका रांगेत त्या वर्गात जाउन बसायचो. तो वर्ग सगळ्यात वेगळा, तिथे ठेवलेले बाक ड्रॉईंग करतांना व्यवस्थित बसता येईल असे बनविलेले होते, त्यातच सगळं साहित्य निट रचून ठेवता येईल असे खण होते आणि चित्र काढतांना एकमेकांना धक्का लागणार नाही अशा पध्दतीत ते ठेवलेले होते.ह्या वर्गामधे सगळ्या मुलींनी काढलेली विविध विषयांवरची अगदी सुंदर चित्र लावलेली होती, दिवाळीला मुलींनी बनविलेले आकाश-कंदिल ही लावलेले असायचे.ह्यातच मला आठवली माझी वर्गमैत्रिण नेहा राणा, चित्रकलेच्या मॅडमची आवडती विदयार्थिनी, अतिशय उत्तम चित्र काढणारी, अगदी शांत अशी मुलगी.

त्या वर्गातुन बाहेर पडले तर समोरच बचतगटाच्या मॅडम दिसल्या.ह्या मॅडम दर महिन्याला आम्हां सगळ्या मुलींना ठराविक रक्कम पोस्टात ठेवायला सांगायच्या.ते पैसे जरी आई-बाबांनी दिलेले असायचे तरी, त्या वयापासुन कुठेतरी बचतीची सवय आमच्या मधे शाळेने रूजवली.

पुढे एका वर्गात दिसल्या माझ्या वन ऑफ दि फेवरेट्स डांगे मॅडम.ह्या मॅडम नाही तर सगळ्या मुलींची बेस्ट फ्रेंड.त्यांनी आम्हांला गणित शिकवलं फक्त पुस्तकातलं नाही तर शाळेच्या बाहेर असणा-या जगाचं सुध्दा!! मला अजुन आठवतं, १० वीत असतांना एक तास आमचा ऑफ होता, तेंव्हा डांगे मॅडम खास आमच्याशी गप्पा मारायला आल्या होत्या..पुढे कॉलेजमधे गेल्यावर मुली कशा बदलतात आणि छोटया-छोटया गोष्टींवरून देखील चांगल्या मैत्रिणींमधे कसे वाद होतात ह्याचे मजेदार किस्से सांगितले तसच, मुलं कधीही मदत करायला तयार असतात आणि कदाचित चान्स ही मारून जातात या आणि अशा ब-याच बिषयांवर चर्चा करून त्यांनी आम्हांला पुढे येणा-या प्रसंगांची तोंडओळख करून दिली होती.

त्यांच्याशी मनसोक्त गप्पा मारून मी पुढच्या मॅडम च्या शोधात निघाले.

लगेच मला दिसल्या सराफ मॅडम. ह्या मॅडमनी मला ख-या अर्थाने घडवलं.लहानपणी मी भरपूर कथाकथन,वक्तृत्व स्पर्धांमधे भाग घ्यायचे तेंव्हा प्रत्येक वेळेस सराफ मॅडमनी माझी तयारी करून घेतली.सादरीकरण कसं करायचं, उच्चार किती अस्खलित असायला हवेत अशा बारिक-सारीक गोष्टींवर त्यांनी खुप भर दिला.त्यांनी माझ्यावर घेतलेल्या मेहनतीमुळेच जवळपास प्रत्येक स्पर्धेत मला माझ्या शाळेसाठी १ला नंबर घेता आला.फक्त अशा स्पर्धांसाठीच नाही तर ७ वी स्कॉलरशिप साठी देखील त्यांनी आम्हां मुलींची खुप छान तयारी करून घेतली.कधी जर आमचा तास ऑफ असेल तर मॅडम आम्हांला त्यांच्या लहानपणच्या गमती-जमती सांगायच्या, तर कधी अशीच एखादी छानशी गोष्ट सांगायच्या.

सराफ मॅडम आणि धामणगावकर मॅडम
नंतर मी भेटले धामणगावकर मॅडमना.ह्या मॅडम म्हणजे माझी अजुन एक मैत्रिणच.माझ्या घराजवळच त्या रहात असल्याने, कधी-कधी शाळा सुटल्यावर मी त्यांच्या घरी जाउन गप्पा मारत बसायचे.त्यांच्या वडिलांनी घरात एक छोटं ग्रंथालयच तयार केलं होतं, त्यामुळे मला अगदी कधीहि एखादं छान पुस्तक वाचायला मिळायचं.ह्या मॅडम आम्हांला विज्ञान शिकवायच्या.खरं तर, ती एक गंमतच होती.म्हणजे आधी आमच्या  वर्गासाठी दुस-या मॅडम नेमलेल्या होत्या विज्ञान विषयासाठी, शालेय वर्ष सुरू झालं तसे त्यांचे तासही सुरू झाले पण, आमच्या वर्गातल्या कोणत्याच मुलीला त्यांनी शिकवलेलं कळत नव्हतं आणि पटतंही नव्हतं.मग, आम्ही सगळ्या जणींनी एका कागदावर सह्या केल्या आणि आम्हांला ह्या मॅडम ऎवजी धामणगावकर मॅडम हव्या अशी विनंती मुख्याध्यापिकांना केली आणि मॅडम नी ती मान्यही केली आणि धामणगावकर मॅडमनी आम्हांला शिकवायला सुरूवात केली. आज हा प्रसंग आठवून आम्ही दोघी अगदी पोट धरून हसलो.

शाळेत असणा-या सगळ्याच गोष्टी एक-एक करून मला आठवत होत्या.त्यातच आठवण झाली ’पूर्णानंद समोसा’ ची, आमच्या शाळेच्या मागच्या बाजुला हे दुकान होतं, मधली सुटी झाली की, कधीतरी आम्ही मैत्रिणी तिथे जाउन समोसा खायचो.शनिवारी अर्ध्या दिवसाची शाळा सुटली की हमखास आम्ही तिथेच पळायचो.तिथे मिळणा-या त्या गरम-गरम, खरपुस समोसा ची चव अजुनही आठवते...


गप्पांच्या ओघात कितीतरी असेच प्रसंग समोर आले.

शाळेत दर वर्षी काही स्पर्धा घेतल्या जायच्या.भित्तीपत्रक बनविणे, सुंदर आणि स्वच्छ वर्ग, फॅन्सी ड्रेस वगैरे. ९ वी मधे असतांना आम्हांला शिवाजी महाराजांवर भित्तीपत्रक बनवायचं होतं.मी आणि माझ्या ३-४ मैत्रिणी एकीच्या घरी बसून त्यावर काम करत होतो.बरीच मेहनत घेउन सगळं साहित्य गोळा करून आम्ही तो अंक बनविला होता आणि आमचा नंबर ही आला होता. १० वी मधे असतांना सुंदर आणि स्वच्छ वर्ग स्पर्धेत देखील सगळ्या मुलींनी अगदी मन लावून वर्ग स्वच्छ केला आणि सजवला होता, त्यातही आम्हांला बक्षिस मिळालं होतं.

शाळेमधे अजुन एक धमाल गोष्ट असायची सरस्वती पुजा. श्रावणात गौरी ज्या दिवशी जेवतात त्या दिवशी आमच्या शाळेत सरस्वती पुजा व्हायची.त्या पुजेसाठी सजावट करण्यात, प्रसाद वाटप करण्यात एक वेगळाच आनंद मिळाय़चा.सगळ्या मॅडम अगदी छान तयार होउन यायच्या,मग त्यातली एक जण पुजा सांगायची, आरती व्हायची...अगदी सगळी धमालच...

ह्या सगळ्या गोष्टींबरोबरच प्रत्येक मॅडमची असणारी विशिष्ट सवय किंवा लकब ह्यावर गाडी घसरली. आम्हांला इतिहास शिकवायला एक मॅडम होत्या, त्या रोज अगदी न-चुकता केसात एक फुल माळून यायच्या, तर हिंदी शिकवणा-या एक मॅडम डाव्या हाताने लिहायच्या पण त्यांच्या अक्षरासारखं हस्ताक्षर मी आजतागायत बघितलं नाही.मराठी शिकवायला एक मॅडम होत्या त्या मराठी कविता अगदी इतक्या समरसून शिकवायच्या की आम्हांला मराठी विषयाचा कधिहि अभ्यास करावा लागला नाही.संस्कृत च्या मॅडम तर संस्कृतसारखा अवघड विषय अगदी सोपा करून आमच्या कडून इतका व्यवस्थित करून घ्यायच्या की अगदी बोर्डाच्या परिक्षेत देखील कधी टेन्शन आलं नाही. आणि सगळ्यात भारी होत्या आमच्या प्रयोगशाळेच्या मॅडम, त्या प्रत्येक प्रॅक्टिकल च्या वेळी ’एकच’ इतकं ’भारी वाक्य’ बोलायच्या की आम्ही सगळ्या मुली एक क्षणभर स्तब्ध होत असू.

हा तर झाला सगळा गमतीचा भाग पण, आज जेंव्हा मी माझ्या शालेय जीवनाकडे बघते तेंव्हा खरंच मी खुप भाग्यवान आहे हे मला जाणवतं.शारदा मंदिर सारख्या शाळेत आणि भागवत मॅडम, सराफ मॅडम, धामणगांवकर मॅडम, डांगे मॅडम यांच्या हाताखाली मी तयार झाले.त्यांनी सांगितलेल्या, शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त शिकवलेल्या गोष्टी आज मला कितीतरी उपयोगी पडत आहेत.छोटया वाटणा-या त्या गोष्टींची बिजं शाळेत आमच्या कोवळ्या मनात रोवली गेली आणि आज त्यांचं झालेलं झाड कुठे एखादा अवघड निर्णय घ्यायला मदत करतं तर कुठे आत्मविश्वासाने उभं राहायला हातभार लावतं...

सगळ्यांशी बोलल्यावर एक मात्र जाणवलं की त्या कुठेतरी खुप चिंतीत आहेत.माझ्याशी बोलतांना त्या म्हणत होत्या की,’तुमच्या बॅच सारखी बॅच नंतर आलीच नाही’, हे ऎकुन एक क्षण बरं वाटलं पण, लगेचच कळालं की त्या असं का म्हणत आहेत.आजच्या स्पर्धेच्या युगात पालकांनीच मुलांच्या डोळ्याला झापडं लावली आहेत त्यामुळे कोणीहि साहित्य वाचन, नाटक,वक्तृत्व,चित्रकला ह्या गोष्टींकडे बघायला देखील तयार नाही आणि जर मॅडमनी फोर्स केला तर मन लावून मेहनत घेण्याची तयारीही नाही.शाळेची लायब्ररी समृद्ध असुनही कोणीच त्या पुस्तकांवरची धुळ झटकायला तयार नाही!!    

हे सगळं ऎकल्यावर मला तर खुप वाईट वाटलं की, आजकालची मुलं किती दुर्दैवी आहेत, त्यांच्यापासुन शालेय जीवनातला आनंदच हिरावून घेतला जातोय पण, त्यांना किंवा त्यांच्या पालकांनादेखील ह्या गोष्टीची जाणीव नाहीये. कदाचित ती जाणीव त्यांना होइपर्यंत उशीर झालेला असेल.

असो.....आज शाळेत गेल्यामुळे माझ्या आयुष्यातला सुवर्ण काळ मी पुन्हा एकदा स्पर्शुन आले....

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Friday, July 1, 2011

शौर्य


ऑफिसमधलं काम पटापटा आवरलं आणि दादरला जाउन मी अगदी धावत-पळत गाडी पकडली..गाडी सुरू झाली...एका जागी स्थिर झाले अन गाडीच्या वेगासोबत माझे विचार धावायला लागले...आज आमच्या घरातल्या सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचा म्हणजे माझ्या भाच्याचा वाढदिवस आहे, आज तो ३ वर्षांचा पूर्ण झाला...विचार करतांना मी पार त्या दिवसापाशी जाउन थांबले जेंव्हा माझ्या बहिणीने आम्हांला फोन करून, ती आई होणार असल्याची गोड बातमी कळवली होती...कित्ती उडया मारल्या होत्या मी आणि माझ्या भावाने..आई,बाबांच्या डोळ्यात अगदी आनंदाश्रुच आले होते...ही बातमी कळाली आणि मग काय, सगळीकडे एकच धमाल सुरू झाली..जो तो आपापल्या परीने, असलेल्या-नसलेल्या अनुभवानुसार ताईला उपदेश करू लागला..आजीने सांगितलं, ’पपई अजिबात खाऊ नकोस हो पोरी’ तर मावशी म्हणाली, ’जास्त ओझं उचलू नकोस गं’...कुठे ताईच्या सासूबाई म्हणाल्या की, ’सकाळ-संध्याकाळ चालायचा व्यायाम कर हो’..आणि आई तर तिला छोटया-मोठया गोष्टी वेळोवेळी सांगतच होती..आणि डॉक्टर ने तर तिला भली-मोठी यादीच दिली होती काय खायचं, काय नाही खायचं, कोणते व्यायाम करायचे वगैरे वगैरे...
इकडे आम्ही भावंडं रोज विचार करायचो की येणारं बाळ कोण असणार, मुलगी की मुलगा? मुलगी असेल तर तिचं आमच्या घरात जंगी स्वागत झालं असतं कारण आमच्या घरात स्त्री-पार्टी एकदम श्ट्रॉंग आहे ;) ..हां आणि मुलगा जरी झाला असता तरी काही हरकत नव्हती..खरंतर आमच्या घरात आता लहान बाळ येणार हा विचारच पुरेसा होता..दिवस अगदी भराभर जात होते...म्हणता म्ह्णता ताईचं डोहाळजेवण येउन ठेपलं..ताईच्या माहेर-सासरकडच्या सगळ्या बायका, ताईच्या मैत्रिणी जमल्या, ताईला एकदम मस्त सजवलं होतं, तिच्यासाठी फुलांनी सजविलेला धनुष्य-बाण आणला होता, गाणी सुरू होती, अगदी हसत-खेळत हा सोहळा पार पडला.

त्यानंतर एका दिवशी मी ताईसोबत दवाखान्यात गेले होते तिची आणि बाळाची तब्येत दाखवायला आणि त्यायोगे मला एक अप्रतिम क्षण अनुभवण्याचं भाग्य लाभलं..डॉक्टरांनी ताईची तपासणी सुरू केली आणि कसल्याशा यंत्रातुन आम्हांला बाळाच्या हृदयाचे ठोके ऎकु यायला लागले...त्या क्षणी मी आजपर्यंत ऎकलेलं सगळं संगीत फिकं वाटलं...कितीतरी वेळ मी भारावून ते सगळं ऎकत होते आणि त्या दिवशी पुन्हा एकदा मी त्या निसर्गनिर्मात्या पुढे नतमस्तक झाले..

एक एक करत दिवस जवळ येत होते...आमची उत्सुकता ताणली जात होती आणि ताईची तगमग बघवत नव्हती...शेवटी तो दिवस उगवला, ताईला दवाखान्यात दाखल केलं..डॉक्टरांची धावपळ सुरू झाली आणि आई,बाबा,जिजू ह्यांचं टेन्शन वाढायला लागलं...’सगळं व्यवस्थित होउ दे रे गणपति बाप्पा’, म्हणून आई मनोमन प्रार्थना करत होती आणि थोडयाच वेळात डॉक्टर बाहेर आले; आई,बाबा,जिजू ह्या सगळ्यांना त्यांनी ’मुलगा’ झाला ही गोड बातमी दिली आणि आम्ही सगळ्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला...लगेचच नर्सने एक छोटुसं, अगदी गुलाबी-गुलाबी गोरं बाळ ताईच्या हातात दिलं...तो क्षण आम्ही सर्वांनी आपापल्या डोळ्याच्या कॅमेरात टिपून ह्रद्यात जतन करून ठेवला...

त्यानंतर दिवस पुन्हा एकदा वा-यासारखे भराभर उडायला लागले...बाळासाठी लागणारे सगळे तेलं, औषधी, घुटी, ताईसाठी लागणारी शेक-शेगडी ह्या सर्वांनी घरात एक वेगळाच वास दरवळू लागला...बाळाचं नाव काय ठेवायचं ह्याची चर्चा घरात सुरू झाली,प्रत्येकाला जे आवडेल, त्याला बघून जे सुचेल अशी बरीच नावं समोर आली...म्हणता म्हणता पिलूचं बारसं ठरलं आणि त्याचं नाव ठेवलं ’शौर्य’....

रोज पिलू वेगळं दिसायचं..१ महिन्याचा होइपर्यंत वाटत होतं तो ताईसारखा दिसतो, पुढे ३ महिन्यात वाटायला लागला तो जिजू सारखा दिसतो...दर वेळेला एका नविन रूपातच आमचा हा बाळकृष्ण आम्हांला दिसत होता.

सगळ्या घराच्या साक्षीने शौर्यची जिवनातली आगेकुच सुरू झाली...आम्ही सगळेजण त्याच्या योगाने पुन्हा एकदा स्व:तचं बालपण अनुभवू लागलो...शौर्यचे एक एक सोहळे अगदी आनंदात पार पडत होते, जावळ काढणे..मग १ला वाढदिवस...मस्त थाटामाटात सुरू होतं सगळं...

मला आठवतं शौर्य जेंव्हा १.५ वर्षांचा होता, सहज बोलता बोलता मी त्याला एक वस्तू आणायला सांगितली आणि तो आईच्या कडेवरून खाली उतरून ती वस्तू घेउन देखील आला...मी थक्कच झाले, आम्ही जे काही बोलतो त्याच्याशी, हे त्याला सगळं कळतं ह्याचं मला खरंच खुप आश्चर्य वाटलं!!

थोडयाच दिवसात आमचं हे लबाड वासरू चुरूचुरू बोलायला लागलं.त्याला आता आम्ही सगळे कोण, कुठे राहतो वगैरे माहित झालं होतं.त्याला ट्रेन भारी आवडते,जेंव्हापण मी त्याला भेटते किंवा फोन करते, तो एकदा तरी म्हणतो, ’माऊ, पक्कन पक्कन तयार हो, आपल्याला ट्रेन मधे बशुन मुंबईला जायच्चं’!!

शौर्यच्या रूपाने आमच्या बाबांना तर एक छोटू दोस्तच मिळाला होता..बाबांचं त्याच्याशिवाय आणि शौर्यचं त्याच्या ’आबां’शिवाय अजिबात पान हलत नव्हतं,बाबा त्याला कधी गाडीवरून तर कधी पायी फिरायला घेउन जायचे मग त्यायोगे चॉकलेटही मिळायचं हे आमच्या ढंपुला अगदी व्यवस्थित माहित झालं होतं...

जसे दिवस जात होते तसे आमच्या लिटील टायगरचे कारनामे गाजायला लागले, घरभर पळायला सुरूवात झाली, बडबडीला उधाण आलं, कुठे मधेच थोडंसं लागलं की रडून रडून घर डोक्यावर घ्यायची पद्धत सुरू झाली...एक ना अनेक कित्ती तरी आठवणी अशा एकापाठोपाठ येत राहिल्या...

आता पिलू ३ वर्षांचा पूर्ण झाला आहे...उद्यापासुन त्याची शाळा सुरू होणार आहे...आमच्या घरातली ही तिसरी पिढी आता ख-या अर्थाने ह्या जगात पाउल ठेवणार आहे, आई-बाबांचं बोट धरून नविन विश्वाची ओळख करून घेणार आहे...स्व:तचं नवं जग निर्माण करण्याकरता!!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Thursday, June 23, 2011

नट - कुसुमाग्रज

शेवटचं वाक्य झालं आणि टाळ्यांच्या कडकडाटात पडदा पडला...नाटक आता संपलं...बाहेर प्रेक्षागृह रिकामं होत आहे...पण, नट अजून तिथेच उभा आहे...अतिशय रंगलेला आजचा प्रयोग नट त्याच्याच नजरेतून पुन्हा एकवार त्या रिकाम्या..नाही...थरारुन उठलेल्या प्रेक्षागृहासमोर उभा राहुन अनुभवत आहे....कुसुमाग्रजांची ’नट’ ही कविता...प्रत्येक कलाकाराची अदाकारी एका वेगळ्याच उंचीवर नेउन ठेवते...


नांदीनंतर
पडदा उघडला
तेव्हा मी तुडुंब भरलेला होतो
हजारो रंगीबेरंगी शब्दांनी,
शरीरभर रोरावणा-या
असंख्य आविर्भावांनी
भीतींनी, आशांनी, अपेक्षांनी;
आता
भरतवाक्य संपल्यावर
प्रयाणाची तयारी करीत
मी उभा आहे
रंगमंचावर, एकटा,
समोरच्या प्रेक्षालयाप्रमाणेच
संपूर्ण रिकामा.

मी उच्चारलेले
काही शब्द, अजूनही
प्रेक्षालयातील धूसर
मंदप्रकाशित हवेवर
पिंजारलेल्या कापसासारखे
तरंगत आहेत,
माझे काही आविर्भाव
रिकाम्या खुर्च्यांच्या हातांना,
बिलगून बसले आहेत,
मी निर्माण केलेले
हर्षविमर्षाचे क्षण
पावसाने फांद्दांवर ठेवलेल्या
थेंबांसारखे
भिंतींच्या कोप-यावर
थरथरत आहेत
अजूनही.
हा एक दिलासा
माझ्या रितेपणाला,
नाटक संपल्याची खंत-
ती आहेच.
नाटक नव्हे, तीन तासांचे
एक अर्करूप अस्तित्व
संपले आहे.
पण संपले आहे ते फक्त
इथे - माझ्याजवळ.
माझ्या त्या अस्तित्वाच्या
कणिका घेउन
हजार प्रेक्षक घरी गेले आहेत;
मी एक होतो
तो अंशाअंशाने
हजारांच्या जीवनात
- कदाचित स्मरणातही -
वाटला गेलो आहे.

Tuesday, June 7, 2011

उणीव


रविवारी दादरला ब्लॉगर्स मेळावा होता कांचन ताईने आयोजित केलेला, मी पहिल्यांदाच त्यात सहभागी होणार होते...तिथे गेले, कार्यक्रम अगदी छान, अनौपचारिक पध्दतीचा होता, १-२ आजोबा, २-४ काका भेटले.अगदी घरातलं एखादं कार्य आहे असच मला वाटत होतं, सरतेशेवटी महेंद्र काकांनी लकी ड्रा घोषित केला आणि त्यात चक्क माझं नाव आलं!?! मला तर एक क्षण कळालच नाही, तुम्हांला वाटेल काय वेडी मुलगी आहे इतकं काय गोंधळायचं, पण जेंव्हा अनपेक्षित पणे असा सुखद क्षण समोर येतो तेंव्हा मला असचं काहिसं होतं....त्यानंतर मी नामकाकांना भेटले, मला त्यांच्या ई-पुस्तकांबद्दल जाणून घ्यायचं होतं..काकांनी माझ्या ब्लॉग बद्दल चौकशी केली आणि अगदी दुस-याच दिवशी मी लिहीलेले जितके पण ब्लॉग्स होते त्यांबद्दल प्रतिक्रिया कळवली, मला खुप छान वाटलं पण नामकाका फक्त त्यावरच नाही थांबले तर त्यांनी माझा एक ब्लॉग एका ई-पुस्तकासाठी टाकायचं ठरवलं होतं आणि माझी परवानगी (खरं तर माझ्यासाठी पर्वणीच होती) मागितली होती, मी काय लगेच हो म्हणाले आणि अगदी अर्धा तासाच्या आत काकांनी मला एक मेल केलं ज्यात माझ्या ब्लॉग नंतर त्यांनी मंजिरीच्या कवितांबद्दल सांगितलं होतं....ते मेल वाचल्यावर मला तर काय करू नि काय नाही असं झालं....मी रविवारी ब्लॉगर्स मेळाव्याला गेले काय आणि आज माझा ब्लॉग ई-पुस्तकासोबत प्रसिद्ध होतो काय...अगदी स्वप्नागत वाटत होतं मला हे सगळं!!!

त्यानंतर मी अगदी भराभर माझ्या आई, बाबा, ताईला, मित्र-मैत्रिणींना ह्याबद्दल कळवलं...लगेच सगळ्यांचे अभिप्राय यायला सुरूवात झाली, कोणी मेलवरून सांगितलं तर कोणी फोन केले तर कोणी चॅट वरून पिंग केलं.....मी अगदी हवेत तरंगत होते काहि क्षण....पण नंतर अगदी जड जड वाटायला लागलं...लहानपणी शाळेत कोणत्याही स्पर्धेत बक्षिस मिळालं की घरी येउन आईला मिठी मारून सगळं सांगायची सवय होती मला ज्याची आज तिव्रतेने आठवण झाली आणि अगदी एकटं एकटं वाटायला लागलं...राहून राहून कोणितरी प्रत्यक्ष भेटून आपल्याशी बोलावं असं वाटायला लागलं......पण पर्याय नव्हता, मग स्वत:ला उठवलं आणि वपुंच्या पुस्तकांच्या कुशीत जाउन बसले!

काहिहि म्हणा..आज तंत्रज्ञान जरी कितीहि प्रगत असलं, आपण एकमेकांशी जगाच्या कोणत्याही कोप-यातून संपर्कात राहू शकत असलो तरीहि प्रत्यक्ष एकमेकांसोबत असण्याची उणीव हे विज्ञान अजून तरी भरून काढु शकत नाही....          


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Friday, June 3, 2011

कातरवेळ


ऑफिसमधे काम करत असतांना सहज नजर वर गेली आणि दिसलं की आकाशाच्या एका कोप-यात सूर्य, आपलं देखील अस्तित्व आहे असं काहितरी त्या काळ्या काळ्या मोठाल्या ढगांना सांगायचा प्रयत्न करतोय, काय प्रकार आहे बघावं म्हणून जागेवरून उठुन खिडकीपाशी गेले तर दिसलं की संपूर्ण आकाश काळ्या-निळ्या ढगांनी अगदी गच्च भरून आलंय आणि आता कधीहि पावसाला सुरूवात होईल....हे सगळं बघुन कुठेतरी मनात तुझा विचार चमकला आणि का काय माहित खुप हुरहूर वाटायला लागली....अगदी एकटं असल्याचा भास झाला...आजची संध्याकाळ खूप अवघड जाईल सरायला असं वाटायला लागलं...आणि अचानक एक विचार चमकला, ह्या वेळेला कातरवेळ का म्हणतात हे उमगलं, तू भेटू नाही शकत हे दिवसभर मनाला समजावून सांगितलं तरीहि त्याचं वाट बघणं आणि त्या वाट बघण्यात संध्याकाळचे चार तास चौपट झाल्यासारखं वाटणं ही सगळी प्रक्रिया काळिज चिरत जाते आणि आपल्याला ह्या धार-धार कात्रिला कुठेही थांबवता येत नाही!!! आह!!!

अजुन मी खिडकीपाशीच उभी होते...मधल्या वेळेत सूर्य कधी अस्ताला गेला आणि उरलं-सुरलं आकाशही त्या ढगांनी व्यापुन गेलं कळलंच नाही आणि बघता बघता पाउस सुरू पण झाला...पहिला पाउस!! एक मन अगदी लहान मुलाप्रमाणे उडया मारत होतं आणि दुसरं मन तुझ्या आठवणींनी अगदी काठोकाठ भरून आलं होतं....ह्या सगळ्या विचारांमधे मी कधी ऑफिसच्या बाहेर पडले ते माझा मलाचं कळालं नाही...मग पहिला थेंब, दुसरा, तिसरा आणि आणि सहस्त्र जलधारा...पहिल्या पावसात मी पुरती भिजले अगदी खोल खोल आतपर्यंत...जणू तुच मला सहस्त्र धारांनी कवेत घेतलस....  


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, May 30, 2011

पाणी-पुरी


बस्स!! ठरलं आता, मी काहिहि झालं तरी आज पाणी-पुरी खाणार ह्या विचाराने ’एलको’ मधे गेले आणि टोकन घेउन पाणी-पुरीवाल्या स्टॉलच्या समोर उभी राहिले पण, पहिली पुरी हातात घेतली आणि एखाद्दा चित्रपटात दाखवतात त्याप्रमाणे माझ्या डोळ्यांसमोरून १३ एप्रिल २०११ च्या वर्तमानपत्रात आलेली ती किळसवाणी आणि धक्कादायक बातमी समोर आली आणि मी ती पुरी तिथेच टाकुन काढता पाय घेतला!!

हे असं आज तिस-यांदा होत होतं. कोण कुठला तो विक्षिप्त माणुस, त्याने इतका गलिच्छ प्रकार केला आणि मी आज दीड महिना झाला पाणी-पुरीच्या सुखाला मुकले!! आमची आई अगदी नेहमी आम्हांला सांगायची की, बाहेर पाणी-पुरी खात नका जाउ हो, ते लोक कसलंही पाणी वापरतात, दुस-या लोकांनी वापरलेल्याच प्लेटस घाणेरडया पाण्यात धुउन काय देतात आणि कहर म्हणजे त्या लोकांचा अवतार तर असा असतो की कित्येक दिवसात आंघोळ केली आहे अस वाटतच नाही, पण ऎकणार ते आम्ही कसले!!

मला अजुन आठवतं, उन्हाळयाच्या सुट्टीत मामा, मावशी कोणाच्याही गावाला गेलो तरी आम्ही एकदम टेस्टी पाणी-पुरी कुठे मिळते हे शोधत शोधत कमीत-कमी ३ पाणी-पुरीवाल्यांकडे जाउन पाणी-पुरी खायचो. पुण्याला कधी मनमीत चाटवाल्या कडे ’मिनरल वॉटर’ पाणी-पुरी तर कधी नागपुरला सिता-बर्डीमधे स्पेशल पाणी-पुरी खायचो आणि शाळा-कॉलेज जवळच्या चाटवाल्याकडे तर रोजच हजेरी असायची!!    

तर असं जोपर्यंत पोटात काही दुखत नाही किंवा आजारी पडत नाही तोपर्यंत बाहेर पाणी-पुरी खाण्याचा मोह काही केल्या सुटत नव्हता पण, त्या एका दुष्ट आत्म्याने आम्हां सगळ्यांचे डोळे अगदी एका क्षणात उघडले!!!

ती बातमी आल्यानंतर सामान्य माणसांना धक्का बसला पण त्याही प्रसंगी काहि राजकीय पक्षांनी त्या माणसासकट इतर पाणी-पुरी चे ठेले असणा-या निर्दोश लोकांना त्रास दिला, अगदी आठ दिवस हे नाटक सुरू होतं. पण, ज्या मुंबई मधे बॉम्बस्फोट झाल्याच्या दुस-या दिवसापासुन सुरळीत व्यवहार सुरू होतात तिथे इतक्या छोटया गोष्टीचा परिणाम आठ दिवस राहिला हेच खुप होतं आणि मग काय लगेच पुन्हा एकदा सगळे पाणी-पुरी वाले आपापले ठेले घेउन समाजकार्य करायला सज्ज झाले!!!

आणि मी मात्र अजुनही माझ्या मनाला ह्या धक्क्यातुन सावरण्यासाठी समजावत राहिले!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Saturday, May 28, 2011

पहिलेपण..


आपल्या आयुष्यात पहिलं असं काहितरी जे घडतं त्याला किती महत्त्व असतं नाइ...

आपल्याला कळायला लागल्यानंतर साजरा झालेला पहिला वाढदिवस...
आपली पहिली शाळा...
पहिली मैत्रिण किंवा मित्र...
पहिलं मिळालेलं बक्षिस...
प्रत्येक पावसाळ्याच्या सुरूवातीला अनुभवलेला पहिल्या पावसाचा पहिला थेंब...
कोल्हापुरच्या महालक्ष्मीच्या मुखकमलावर पडलेलं सूर्याचं पहिलं किरण...
नविन वर्षाचा पहिला दिवस...
शाळा-कॉलेजात आवडलेली पहिली व्यक्ती...
सुचलेली पहिली कविता...
पहिलं प्रेम...
कॅम्पसमधुन लागलेली पहिली नोकरी...
आईच्या हातावर ठेवलेला पहिला पगार...
आवडत्या हिरो किंवा हिरोईनचा फस्ट डे फस्ट शो बघितलेला सिनेमा...
वर्तमानपत्रात किंवा कुठेही प्रसिद्ध झालेला पहिला लेख किंवा ब्लॉग...
घरात आलेलं पहिलं बाळ...
पहिला अ‍पघात (अर्थात, त्या अपघातामधुन पूर्णपणे बरं वाटल्यावर )...
आपण लावलेल्या रोपटयाला आलेली पहिली कळी...
स्वयंपाक शिकुन यशस्वीपणे बनविलेला पहिला पदार्थ...
स्वकमाईतून घेतलेलं पहिलं घर...
पहिली गाडी...

ह्या आणि अशा असंख्य गोष्टी आपल्या आयुष्यात पहिल्यांदा येतात आणि आपल्या मनावर छाप सोडून जातात, तर कधी आयुष्यही बदलून जातात.कधी-कधी काही कडू अनुभवही पहिल्यांदाच येतात पण अशा गोष्टींमधुनच तर आपण शिकत पुढे जाउ शकतो...


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, May 23, 2011

!! प्रतिज्ञा !!


सकाळी ऑफिसला जाताना एका शाळेत सुरू असलेली प्रतिज्ञा ऎकू आली आणि मी नकळत माझ्या शाळेत पोहोचले!!
रोज शाळेत आल्यावर प्रार्थना झाली की, आम्ही सगळे विद्दार्थी छातीवर उजवा हात ठेउन प्रतिज्ञा म्हणायचो..
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत....किती भाबडं जग असतं ना शाळेचं..बाई सांगतात म्हणून आपण रोज किती तरी वर्षं प्रतिज्ञा म्हणालो, त्या वेळेला ह्या सगळया वाक्यांचा अर्थ कितपत कळाला माहित नाही पण, आज इतक्या वर्षांनंतर मला ही प्रतिज्ञा एका वेगळ्याचं अर्थाचं दर्शन देउन गेली!!
भारत माझा देश आहे. सारे भारतीय माझे बांधव आहेत (तरीहि आम्हांला प्रांतियवाद प्रिय आहे.पण, असंही आहे की आमच्या देशात घुसून आमच्याच लोकांना मारणा-याला मात्र आम्ही एखाद्या व्ही.आय.पी पेक्षा जास्त चांगली वागणूक देतो.) माझ्या देशावर माझे प्रेम आहे.(म्हणून तर कुठेतरी आम्हांला फक्त आमचे हक्कच दिसतात आणि देशाप्रती आपलं काहीतरी कर्तव्य आहे हे आम्ही विसरत चाललो आहे!!) माझ्या देशातल्या समृध्द आणि विविधतेने नटलेल्या परंपरांचा मला अभिमान आहे.(ह्याचा प्रत्यय म्हणून की काय आपल्याच देशातील जनता ज्या ज्या प्रेक्षणीय स्थळांना भेट देते तेथे आपल्या अस्वच्छतेचा नमूना प्रदर्शित करते.) त्या परंपरांचा पाईक होण्याची पात्रता माझ्या अंगी यावी म्हणून मी सदैव प्रयत्न करीन.मी माझ्या पालकांचा, गुरूजनांचा आणि वडिलधा-या माणसांचा मान ठेवीन आणि प्रत्येकाशी सौजन्याने वागेन.(दुर्दैवाने आज म्हाता-या आई-वडिलांचा भार कोणालाच सहन होत नाही आणि त्यांची रवानगी वृध्दाश्रमात होते.गुरूजनांचं भाग्य तर काय बोलावं, शाळेत असतानाच मुलं त्यांच्याबद्दल आदराने बोलत नाहीत). माझा देश आणि माझे देशबांधव यांच्याशी निष्ठा राखण्याची मी प्रतिज्ञा करीत आहे.(म्हणूनच सगळे नेते एकमेकांत चढाओढ लागल्या सारखे एकापेक्षा एक असे घॊटाळे करून जनतेचे रक्त शोषत आहेत!!) त्यांचे कल्याण आणि त्यांची समृध्दी ह्यांतच माझे सौख्य सामावले आहे.(खरंच????!!!!)

कधीकाळी आपल्या देशातून सोन्याचा धुर निघायचा असं ऎकलं होतं, ती गोष्ट आजही खरी आहे.आजही सोन्याचा धुर निघतोय पण त्याला कुठेतरी काळा रंग प्राप्त झाला आहे!! शाळेत असतांना आपला देश कोणकोणत्या धान्य, खनिजे अशा गोष्टींबाबत जगात कोणत्या क्रमांकावर आहे हे शिकलो होतो पण आज आपला देश लोकसंख्येत पहिला क्रमांक पटकाविण्याच्या तयारीत दिसतोय आणि आपल्या राजकारण्यांपैकी एकाने आत्ताच जगातील दुस-या क्रमांकाचा भ्रष्टाचारी म्हणून उच्च पद प्राप्त केलं आहे!!

काळानूसार ही प्रतिज्ञा शालेय पाठयपुस्तकांतून बदलायला हवी की कुठेतरी आपण ही प्रतिज्ञा फक्त शाळेपुरती न ठेवता शाळेबाहेरच्या जगात ती आमलात आणयला हवी!!?!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, March 28, 2011

नेमेची येतो मग ’सोमवार’....


आला पुन्हा हा सोमवार!! वीकेण्ड कित्ती पटकन संपला यारर..काश..वीकेण्ड अजुन एखादा दिवस असता तर काय बिघडलं असतं का? हे आणि असेच विचार येतात माझ्या मनात अगदी प्रत्येक सोमवारी सकाळचा गजर बंद करताना!! तरीही ह्या विचारांना पांघरूणासोबत बाजूला सारून शेवटी मी उठते...कशी बशी तयार होते अन बस-स्टॉपवर पोहोचते..सोमवार आणि त्यातून ९ ची वेळ म्हणजे कोणत्याही बसस्टॉपला किती गर्दी असते हे वेगळं सांगायची गरजच नाही, मग आलेल्या बसमधे अगदी धक्काबुक्की करून मी प्रवेश मिळवते आणि निदान आठवडयाच्या पहिल्या दिवशी तरी ’लेट मार्क’ लागणार नाही ह्या विचाराने गर्दी कापत पुढे सरकते!!

ऑफिसमधे पोहोचल्यावर कॉफीच्या घोटासोबत रटाळ ’सोमवार’ ला सुरूवात करते. नेहमीच्याच कामांवर एकवार हात फिरवून आज काही वेगळं करायला मिळेल का ह्या विचांरात दिवस अर्धा संपतो...हुश्श!! मग थोडा हुरूप येतो की चला आता उरलेल्या दिवसात काय आहे ह्या विचांरात जेवण संपवून परत येते..आणि इतका वेळ महतप्रयासाने दाबून ठेवलेली झोप पुन्हा डोळ्यांवर चढायला लागते!! झालं!! आता कशी घालवणार ही झोप!! मग एक, दोन कधी कधी तर तीन कप कॉफी प्यायल्यावर निद्रादेवी प्रस्थान करतात!!

ह्या सगळ्या खटपटीमधे थोडा वेळ गेल्यावर अचानक लक्षात येतं की आज एका महत्वाच्या विषयावर गुगल करायचं राहिलं, मग काय, डोकं एकदम १०० च्या स्पीडने पळायला लागतं...अगदी कसून काम केल्यावर पोटात कावळे ओरडायला लागल्यावरच लक्ष जातं घडयाळाकाडे अन लक्षात येतं की अरे ’सोमवार’ संपला पण!! मग झालेल्या कामाकडे एकदा नजर टाकून स्व:तवर खुश होउन मी ऑफिसबाहेर पडते!!

अशात-हेने कंटाळवाणी सकाळ आणलेल्या ’सोमवार’ चा शेवट मात्र चांगला होतो!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, March 14, 2011

महिला दीन!!

परवाच माझ्या मैत्रिणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे टपोरे डोळे, लालचुटूक ओठ, काळेभोर केस बघुन कोणीही तिला पटकन जवळ घेइल इतकी गोड. आम्ही सगळ्या मैत्रिणी, ती, तिचा नवरा, तिची सासरकडची मंडळी सगळे खूप खुश झालो ह्या छोटयाश्या परीला बघुन पण, मैत्रिणीचे आई-वडिल मात्र खूप नाराज झाले; त्यांना ’नातू’च हवा होता!! काय म्हणावं ह्या सुशिक्षीत अडाणी लोकांना!!

आजच्या काळातही लोक ’मुलगा हवाच’ असा हट्ट धरतात ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही.

आतापर्यंत मुलींनी कितीतरी क्षेत्रांमधे स्व:तचं कर्तुत्व सिध्द केलं आहे तरीहि कुलदीपक हा हवाच, भलेही तो मुलगा बाहेर कितीका दिवे लावेना!! लहानपणापासून मुलाला सगळं हातात मिळणार का तर उद्या म्हाता-या आई-वडिलांना त्याने सांभाळलं पाहीजे ना, पण प्रत्यक्षात घडतं काहीतरी वेगळचं!! एक ना अनेक असे किती उदाहरणं आहेत.

ह्या वर्षी महिला दिनाला १०० वर्ष पूर्ण झाली पण उपयोग काय?? महिलांसाठी फक्त १च दिवस साजरा करायचा आणि वर्षातले बाकीचे ३६४ दिवस त्यांचा छळ करायचा!! ५ ते ६५ वर्षापर्यंत च्या कोणत्याही मुलीला / स्त्रीला रस्त्याने चालताना, बस, ट्रेन मधुन जाताना विनयभंग, बलात्कार ह्यासारख्या अमानुष कृत्यांना सामोरं जावं लागतं. असल्या बातम्यांनी तर अर्धं वर्तमानपत्र रोज भरलेलं असतं!!

ह्या वेळेसच्या महिला दिनाला तर कहर झाला, दिल्लीमधल्या एका महाविदयालयात सकाळी १०.३० च्या सुमारास एका माणसाने एका मुलीवर सरळ गोळ्या झाडल्या!! असं जर सर्रास सुरू राहिलं तर मुली, बायकांना घराबाहेर पडणं पण अवघड होइल! दुर्दैवाने काही काही घरांमध्ये सुध्दा इतकी वाईट परिस्थिती आहे की, त्या स्त्रीयांना घरात राहणही अवघड जातं!! फक्त गरीब किंवा अशिक्षीत घरांमधेच असं घडतं असं नाहीये तर उच्चभ्रू वर्गामधे देखील हे प्रश्न तितकेच प्रखर आहेत....

आपल्या देशामधे काही प्रदेशांमधे अशीही परिस्थीती आहे की, मुली कमी असल्यामुळे ५-६ पुरूषांचं लग्न एकाच स्त्री सोबत लावलं जातं!!

अगदी मुठभर महिला सोडल्या तर बाकी सगळा महिला वर्ग कायम सहनच करत आलाय आणि अजुनही करतोय!! असंच जर सुरू राहिलं तर एका दिवशी ह्या पृथ्वीवरून स्त्री ही जातच नष्ट होइल!!

स्त्री...जिच्यात हे विश्व निर्माण करण्याची, जिवंत ठेवण्याची शक्ती आहे, तीचा जर असा -हास होत गेला तर एक दिवस जीवनच नष्ट होइल!!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, March 8, 2011

वटसावित्री

आज महिला दिनाचं औचित्य साधुन वपुं च्या ’माझं माझ्यापाशी’ ह्या पुस्तकातला एक उतारा इथे नमूद करावासा वाटला

माझं माझ्यापाशी - व.पु.काळे

यमधर्माशी वादविवाद करून नव-याचा प्राण सावित्रीनं वाचवला, ह्यातच सत्यवानही तेवढ्या योग्यतेचा होता, हे सिध्द होतं.
प्रपंच आणि नोकरी, दोन्ही पातळ्यांवर झगडा देणारी प्रत्येक ’स्त्री’ सावित्रीच आहे. ती वर्षभर वटसावित्रीचीच भूमिका बजावत आहे. सत्यवान बारमधे जातोय, घरी पार्ट्या झोडतोय, बायकोवर डाफरतोय, तयार चहाच्या कपाची वाट पाहतोय आणि आपल्यापेक्षा जास्त कौतुक, प्रसिध्दी, गुणवत्ता, कर्तृत्व बायकोजवळ असेल, तर नवरेपणाचा हक्क अबाधित ठेवून, पत्नीच्या प्रगतीच्या आड येतोय.
संसारासाठी अर्थार्जन करणा-या सावित्रीची पूजा आणि व्रत बारमास चालू आहे. धावती गाडी पकडण्यासाठी तिला शारीरिक बळ हवंय, तिनं उपास का करावा? मंगळागौरीची जागरणं का करावीत?
पुराणे संकेत आता झुगारून दिले पाह्यजेत. ह्याचा अर्थ ’श्रध्देला’ तिलांजली दिली, असा होत नाही. बुध्दी आणि शास्त्र इकडं ती श्रध्दा वळली पाह्यजे. किमान, आपण अमुक एक व्रत का करीत आहोत? ह्याचं समर्पक समर्थन बाईजवळ हवं. नव-याचं आयुष्य वटसावित्रीच्या व्रतानं वाढतं, हा संकेतच तपासायला हवा. ते अशक्य आहे, मग स्वत:ची भूमिका स्पष्ट हवी, त्यासाठी स्वत:चा स्वत:वर गाढा विश्वास हवा. तो आत्मविश्वास, आत्मविकास वाढवणा-या गोष्टी जर सायन्सजवळ असतील, तर ’सायन्स म्ह्णजे अध्यात्म’ आणि एक जिताजागता जीव, आयुष्य यशस्वी करण्यासाठी, जागरूकतेने कार्यरत असेल, तर तेच व्रत, ह्या भूमिकेपाशी थांबणं हीच प्रगती.
उरलेल्या सगळ्या रूढी, आज फेकून द्दायला हव्यात.

Saturday, February 19, 2011

PHENOMENAL WOMAN by Maya Angelou

Pretty women wonder where my secret lies
I'm not cute or built to suit a fashion model's size
But when I start to tell them
They think I'm telling lies.
I say,
It's in the reach of my arms
The span of my hips,
The stride of my step,
The curl of my lips.
I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

I walk into a room
Just as cool as you please,
And to a man,
The fellows stand or
Fall down on their knees.
Then they swarm around me,
A hive of honey bees.
I say,
It's the fire in my eyes
And the flash of my teeth,
The swing of my waist,
And the joy in my feet.
I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

Men themselves have wondered
What they see in me.
They try so much
But they can't touch
My inner mystery.
When I try to show them,
They say they still can't see.
I say
It's in the arch of my back,
The sun of my smile,
The ride of my breasts,
The grace of my style.
I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

Now you understand
Just why my head's not bowed.
I don't shout or jump about
Or have to talk real loud.
When you see me passing
It ought to make you proud.
I say,
It's in the click of my heels,
The bend of my hair,
The palm of my hand,
The need of my care,
'Cause I'm a woman
Phenomenally.
Phenomenal woman,
That's me.

Sunday, February 13, 2011

ओतप्रोत पुणेरीपण - लोकसत्ता रविवार पुरवणी

लोकसत्ता रविवार पुरवणी मधील ’सर्किट’ ह्या सदरातील आवडलेला लेख इथे शब्दश: देत आहे.

जगण्याचे, व्यवहाराचे सामान्यांचे नियम धुडकावून आपल्याच मस्तीत जगणाऱ्या विक्षिप्त..सर्किट माणसांमुळेच खरे तर हे जग तोलून धरले आहे. अशा विलक्षण तऱ्हेवाईक माणसांविषयीचे हे साप्ताहिक सदर..
सदाशिव पेठेतील ‘भाग्यश्री’ या बंगल्यासमोर उभे राहिलात की एक पाटी दिसते, ‘माझ्यावर विश्वास असेल तर या, नाहीतर कायमचे कटा. (गणगोतासह)’ या वाक्याखाली दोन्ही दिशांना बाण दाखवून ‘कटण्याचा मार्ग’ही दाखवलेला! अशी पाटी पाहून आत जाण्याची कुणाची हिंमत झालीच, तर समोरच्याच बाजूला एक उंचच्या उंच फलक वाचायला मिळायचा. त्यात दहा सूचना लिहिलेल्या. सगळ्याच भारी. ‘लग्न, मुंज, सत्यनारायण वगैरेंची बोलावणी करणेस दुपारी १२ ते ४ येऊ नये’ किंवा ‘इना, फिना, लक्स वगैरेचे विक्रेते, कर्ज मागणारे, नाटकाची तिकिटे खपविणारे, भीक मागणारे, मदत मागणारे, अमके कुठे राहतात, तमक्याचा लग्नाचा मुलगा कोठे राहतो वगैरे चौकशी करणारे, वर्गणी मागणारे यांनी बिलकुल येऊ नये.’ तुमच्या सोयीच्या वेळी माझेकडे येऊ नका, असा सल्ला देत असतानाच खासगी भेटी ७ ते ९, शनिवारी सुट्टी, दुपारी १२ ते ४ कोणीही येऊ नये, अशा अनाहूत सूचनांचाही भडिमार करणाऱ्या या दहा सूचनांच्या खाली जी कडी केली आहे, ते वाक्य असे : वरील सूचना सर्वासाठी आहेत. गेली २४ वर्षे लोकांच्या अवेळी येण्याने त्रासलो, म्हणून या सूचना कराव्या लागल्या आहेत, क्षमस्व! - प्र. बा. जोग
अस्सल पुणेरीपणा ओतप्रोत भरलेल्या व्यक्तिमत्त्वांमध्ये प्र. बा. जोग यांना अग्रक्रमच द्यायला हवा. आयुष्यभर अन्यायाशी झगडताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता, त्याला शिंगावर घेण्याचे धाडस करणारा हा पुणेकर म्हणजे पुण्याची शानच! व्यवसाय वकिलीचा. उत्तम चालणारा. खरेतर खोटय़ाचे खरे करू शकणारा असा हा व्यवसाय! पण जोगांनी त्याबाबत आपली शुचिता आयुष्यभर सांभाळली. आपण चुकलो नसू तर उगीचच कुणाच्याही शिव्या खायच्या नाहीत, उलट त्याला चार अस्सल शिव्या हासडून त्याची बोलती बंद करण्याची प्र. बां.ची हातोटी जगावेगळी होती. त्यामुळेच त्यांची भाषणे म्हणजे श्रोत्यांसाठी हास्याचा धबधबा आणि मनमुराद करमणूक. जोग मात्र आपली परखड मते जाहीरपणे मांडण्यास कधी कचरले नाहीत. महापालिकेच्या कारभारावरचे वाभाडे काढणारा जोगांसारखा नगरसेवक आणि वक्ता पुन्हा झाला नाही, हेच खरे! नगरसेवक झाल्यानंतर ते पुण्याचे उपमहापौरही झाले आणि त्यांनी प्रत्येक बाबतीत आपली मते शक्य तेथपर्यंत रेटण्याचा कसोशीने प्रयत्न केला.
पण जोग विक्षिप्तपणे वागतात, असा सगळय़ांचा समज होता. समोरच्या माणसाच्या कानफटीत वाजवण्याची क्षमता असणाऱ्याला सगळे घाबरतात, पण जोग कुणालाही न भिता आयुष्यभर सगळय़ांशी भांडत राहिले. या भांडणांचा इतिहास त्यांनी आपल्या डायरीत लिहून ठेवला होता. नंतर त्याचे त्यांनी पुस्तकही लिहिले. त्याचे शीर्षक आहे.. ‘मी हा असा भांडतो’. या पुस्तकाच्या प्रस्तावनेत जोगांनी लिहिलंय की, पुस्तक प्रकाशनापर्यंत झालेली १३०५ भांडणे देणे शक्य नाही, मात्र ही भांडणे तत्त्वाची आहेत. त्यांचे तात्पर्य एवढेच की, ‘भांडणापासून फायदा होत नसून शत्रू मात्र निर्माण होतात. काही लोक सोडून द्या हो, असे म्हणून भांडणे वाढवीत नाहीत व माघार घेतात. मी माघार घेत नाही. शेवटपर्यंत माझे म्हणणे भांडणारांच्या गळी उतरविण्याचा प्रयत्न करतो व भांडणारांचे दात त्यांच्या घशात घालतो.’
जोगांनी आयुष्यात काय मिळवले, असा प्रश्न कुणालाही पडेल. त्यांनीच त्याचे उत्तर ‘माझ्या सर्वागीण प्रगतीचे दहा तक्ते’ लिहून दिले आहे. त्यात आपण वकील कसे झालो, येथपासून ते भाडय़ाच्या घरातून स्वत:च्या घरात आपण कसे आलो आणि आपले वजन २३ पौंडापासून २०० पौंडापर्यंत कसे वाढले, असे अनेक तक्ते आहेत. सामाजिक प्रगती, वाहन प्रगती, वक्तृत्व प्रगती, मासिक उत्पन्न तक्ता अशांचाही त्यात समावेश आहे. जोगांना क्रिकेटचे भारी वेड. १९३९ साली साधा अंपायर म्हणून त्यांनी सुरुवात केली आणि १९४८ मध्ये ते रणजी ट्रॉफीचे अंपायर झाले. त्यांना टेस्ट मॅचचे अंपायर व्हायचे होते. ते होण्यात राजकारण आले, तेव्हा त्यांनी संबंधितांना त्यांच्या तोंडावर शिव्या तर दिल्याच, पण त्यानंतर त्यांनी एक पराक्रमच केला. तेव्हा हा सामना पुण्याच्या नेहरू स्टेडियमवर होणार होता. जोगांनी स्टेडियमच्या बाहेर प्रेक्षक गॅलरीपेक्षाही उंच असे मचाण बांधले. आणि सामना सुरू होताच, त्या मचाणावर बसून लाऊडस्पीकरने त्या सामन्याचे प्रत्यक्ष वर्णन केले. जोगांच्या या धावत्या कॉमेंट्रीसाठीही पुणेकरांनी भरगच्च गर्दी केली होती.
वक्ता म्हणून जोग त्या काळातील सर्वाधिक गर्दी खेचणारे होते. शनिवारवाडय़ावरील त्यांच्या भाषणांना अक्षरश: तोबा गर्दी होत असे. ते त्यावेळी सगळय़ा राजकारण्यांचे शब्दश: वाभाडे काढत. आपण उत्तम वक्ता असूनही पुण्यातल्या वसंत व्याख्यानमालेत आपले भाषण होत नाही, म्हणून प्र. बा. जोगांना फार राग यायचा. हा राग ते जाहीरपणे तर व्यक्त करीतच, पण त्यांनी खास त्यांच्या लकबीची एक कल्पना शोधून काढली. स्वत:च्या मोटारीच्या टपाचे रूपांतर त्यांनी व्यासपीठामध्ये केले. जिथे भाषण द्यायचे, तिथे ते आपली मोटारच घेऊन जात आणि टपावर चढून भाषणाला सुरुवात करीत. त्यांच्या भाषणाचे अध्यक्षस्थान त्यांचाच तीन-चार वर्षांचा छोटा मुलगा स्वीकारत असे. या व्याख्यानाला त्यांनी मग ‘पसंत व्याख्यानमाला’ असे नावही दिले. राजकारण्यांची जाहीर धुलाई करण्याचा हातखंडा असणारे जोग श्रोत्यांच्या फार आवडीचे होते. पण श्रोते फक्त भाषणे ऐकतात आणि टाळय़ा वाजवतात, त्याचा फारसा उपयोग होत नाही, असे वाटून त्यांनी आपली व्याख्यानमालाही बंद करून टाकली.
वकील म्हणून प्र. बा. जोग हुशार होते. खासगी क्लास काढण्यापासून ते वकिली करण्यापर्यंत आणि नगरसेवक होऊन उपमहापौरपदी विराजमान होण्यापासून जाहीर भाषणे करण्यापर्यंत अनेक बाबतींत त्यांनी जगावेगळे विक्रम केले. क्रिकेट हा तर त्यांचा अत्यंत जिव्हाळय़ाचा विषय. आयुष्यभर चौफेर कामगिरी करताना समोर येणाऱ्या प्रत्येकाला त्यांनी जागोजागी सुनावले आणि त्यामुळे त्यांच्या नादाला कुणी लागत नसे, असाही समज त्या काळात होता. ‘मी हा असा आहे’, या पुस्तकाच्या फुकट प्रती पुण्यातील वृत्तपत्रांना देऊनही त्यांनी साधी पोचही दिली नाही, अशी जाहीर टीका करताना त्यांना भीती वाटली नाही.
आयुष्यभर भांडत राहण्याचीही मजा जोगांनी घेतली. आपले हे वेगळेपण जपण्यासाठी त्यांना फारसे काही करावे लागले नाही. फक्त त्यांनी आपली वृत्ती बदलू दिली नाही. दरवर्षी आपल्या वाढदिवशी आपले मृत्युपत्र ध्वनिमुद्रित करून ठेवणारे जोग मागील वर्षांतील घटनांप्रमाणे त्यात आवर्जून बदल करीत. म्हटले तर हा विक्षिप्तपणा आणि म्हटले तर हा स्पष्ट व्यवहार! पुण्याचे पुणेरीपण जपणारा हा माणूस पुण्याचे वैभवच होता, हे निश्चित!
मला झोप लवकर येत नाही व लागलेली झोप काही आवाज झाल्याने मोडते. त्यामुळे माझी अनेकांशी भांडणे झाली. त्याचे प्रकार-
सिनेमाहून परत येताना बाहेरच्या दाराला कुलूप लावण्याची व्यवस्था नसल्याने ‘विमल, ए विमल, उठ’, ‘बाळय़ा, ए बाळय़ा, बाळय़ा रे’, ‘कमळे, अगं झोपलीस काय. उठ ना. आम्ही आलोय’, अशा प्रकारचे विविध भसाडे आवाज, किनरे आवाज निरनिराळय़ा घरांतून येत असतात. वेळी अवेळी येण्याने आजूबाजूच्या लोकांना त्रास होतो याची या लोकांना खंतच नसते.
एकदा माझ्या घराशेजारी दर गुरुवारी भजनाची प्रथा सुरू होणार होती.. मी मनात म्हटले, मेलोच. भजनकऱ्यांना सांगितले. तेव्हा ते म्हणाले, तुम्ही कोण आम्हाला सांगणार दुसरीकडे जा म्हणून? मी त्यांना सांगितले, तुमचे भजन कसे होते ते मी पाहातो. पोलिसांकडे जाऊन मी कंप्लेंट दिली. ते म्हणाले, आम्ही याबाबतीत काही करू शकत नाही. आमचे घर सुदैवाने पश्चिमेस असल्याने वारा आमच्या घराकडून भजनी घराकडे जात होता. मी नवसागर आणून त्यात तंबाखूची भुकटी मिसळली आणि ते मिश्रण झाडाच्या कुंडीत खर पेटवून त्यावर हळूहळू चहाचा चमचा चमचा टाकू लागलो. भजन करणाऱ्यांची अवस्था काय झाली असेल, कल्पनाच करा. त्यातील एक मनुष्य चवताळून माझ्याकडे आला व म्हणाला, ‘हे काय चालवलंय तुम्ही?’ मी त्याच भााषेत म्हणालो, ‘हे काय चालवलंय तुम्ही?’ तो- आम्ही आमच्या घरात भजन करतोय. मी- माझ्या घरात नवसागर आणि तंबाखू जाळतोय. तो- पण तुमचा नवसागराचा धूर आणि तंबाखूचा खाट आमच्या घरात येतोय. मी- तुमचा भजनाचा आवाज इकडे येतोय ना! भजनवाला- तुम्ही बाहेर या म्हणजे दाखवतो. मी- जा हो. असे छप्पन्न पाहिले आहेत दाखविणारे.
पुढे या माझ्या तंबाखू व नवसागर जाळण्याने भजनाचा त्रास कायमचा मिटला.
(‘मी हा असा भांडतो’ या पुस्तकातून-)

Monday, January 17, 2011

बाबेलचा मनोरा - शांता शेळके

शांता शेळके यांच्या पावसाआधीचा पाऊस ह्या ललित-लेख संग्रहातील एक लेख अतिशय आवडला, कुठेतरी रोज आपल्याला येणा-या अनुभवांचा आरसा वाटला म्ह्णून इथे नमुद करायची इच्छा झाली.

इतर कोणत्याही प्राण्याला न लाभलेली बोलण्याची शक्ती मनुष्यप्राण्याला लाभली आहे म्ह्णून तो स्वत:ला इतरांपेक्षा अधिक भाग्यवान समजतो.पण ही शक्ती किती अपुरी आहे, तिला किती मर्यादा आहेत याची जाणीव माणसाला या जगात पावलोपावली होत असतो.आपल्याल न कळणा-या भाषांची तर गोष्टच सोडून द्दा, पण एक भाषा बोलणारे लोक तरी त्या भाषेच्या द्वारा परस्परांचे मनोगत जाणून घेउ शकतात का? "I can't understand you." "I don't get you." ही इंग्रजी वाक्ये आपल्या दैनंदिन व्यवहारातही आपण अनेकदा वापरत असतो.याचा अर्थ काय? आपण अतिशय आतुरतेने, उत्साहाने दुस-याला काहीतरी सांगायला जावे आणि त्याने थंड निरुत्साहाने, उपेक्षावृत्तीने ते ऐकून घ्यावे, हे आयुष्यात कोणाच्या अनुभवाला येत नाही?
ख्रिस्ती धर्मपुस्तकात एक मजेदार कथा आहे.नोहा हा मानवजातीचा एक थोर पूर्वज.त्याच्या वंशजांमध्ये निम्रुद नावाचा एक राजा होऊन गेला.तो फार दुष्ट, हिंसक वृत्तीचा होता.म्ह्णून देवांना तो आवडत नसे.त्या काळी जगातली सारी माणसे एकच भाषा बोलत असत.निम्रुदाला या सा-या माणसांचे एक सलग राज्य स्थापून देवाहूनही वरचढ व्हायचे होते.म्ह्णून त्याने या माणसांना एक प्रचंड शहर बांधायला सांगितले आणि त्या शहरात एक अतिप्रचंड मनोरा उभा करायचा बेत केला.जेहोबा देवाला हे जेव्हा कळाले तेव्हा त्याला ही कल्पना मुळीच आवडली नाही.परंतु निम्रुद व त्याचे लोक यांनी देवाला आव्हान द्यायचे ठरवले.ते म्हणाले, "चला.आपण एक प्रचंड मनोरा उभा करू.इतका प्रचंड की तो आभाळाला भिडेल.आणि मग प्रत्यक्ष देवाचेही आमच्यापुढे काही चालायचे नाही!"
त्यावर जेहोबा देवाने काय केले माहीत आहे? त्याने एक युक्ती योजिली.मनोरा बांधणा-या सा-या लोकांची भाषा त्याने वेगवेगळी करुन टाकली.आता असे झाले की मनोरा बांधणा-या लोकांना एकमेकांची भाषाच मुळी समजेना.मग ते बांधकाम करणार कसे? मनोरा तर अर्धवटच राहिला. अन ज्या प्रचंड नगरीत हे बांधकाम चालले होते तिचे नाव पडले ’बाबेल’. ’बाबेल’ म्हणजे गोंधळ. ’बाबेल’ चेच पुढे ’बाबिलोन’ झाले.

तो बाबेलचा मनोरा तेव्हा अर्धवटच राहिला. पण आजही आपण बारकाईने विचार केला तर असे आढळून येते की सारे जग हाही बाबेलचा मनोराच आहे. इथे एकाचे बोलणे दुस-याला समजत नाही!!

Thursday, January 6, 2011

थंडी...अहाहा!!

पावसाळी सुखद गारवा हळु हळू बोच-या थंडीत रुपांतरित होतो अन दिवाळीची पहिली पहाट घेऊन येते थंडी.....पांघरूणात गुरफ़ुटून झोपायचा ऋतू...सकाळी उशिरा उठुनही धुक्याने दिवसाची सुरूवात करणारा ऋतू...
आईने केलेले उडदाचे,डिंकाचे लाडू खाण्याचा ऋतू...दुपारचा जेवण झाला की, उन्हात पहुडण्याचा ऋतू....मस्त मस्त गरम कपडे घालून गुलाबी थंडीत बागडण्याचा ऋतू...रात्री सिंहगडावर जाउन नीरभ्र आकाशातलं चांदणं लुटण्याचा ऋतू.....थंडी अहाहा!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check