Monday, March 28, 2011

नेमेची येतो मग ’सोमवार’....


आला पुन्हा हा सोमवार!! वीकेण्ड कित्ती पटकन संपला यारर..काश..वीकेण्ड अजुन एखादा दिवस असता तर काय बिघडलं असतं का? हे आणि असेच विचार येतात माझ्या मनात अगदी प्रत्येक सोमवारी सकाळचा गजर बंद करताना!! तरीही ह्या विचारांना पांघरूणासोबत बाजूला सारून शेवटी मी उठते...कशी बशी तयार होते अन बस-स्टॉपवर पोहोचते..सोमवार आणि त्यातून ९ ची वेळ म्हणजे कोणत्याही बसस्टॉपला किती गर्दी असते हे वेगळं सांगायची गरजच नाही, मग आलेल्या बसमधे अगदी धक्काबुक्की करून मी प्रवेश मिळवते आणि निदान आठवडयाच्या पहिल्या दिवशी तरी ’लेट मार्क’ लागणार नाही ह्या विचाराने गर्दी कापत पुढे सरकते!!

ऑफिसमधे पोहोचल्यावर कॉफीच्या घोटासोबत रटाळ ’सोमवार’ ला सुरूवात करते. नेहमीच्याच कामांवर एकवार हात फिरवून आज काही वेगळं करायला मिळेल का ह्या विचांरात दिवस अर्धा संपतो...हुश्श!! मग थोडा हुरूप येतो की चला आता उरलेल्या दिवसात काय आहे ह्या विचांरात जेवण संपवून परत येते..आणि इतका वेळ महतप्रयासाने दाबून ठेवलेली झोप पुन्हा डोळ्यांवर चढायला लागते!! झालं!! आता कशी घालवणार ही झोप!! मग एक, दोन कधी कधी तर तीन कप कॉफी प्यायल्यावर निद्रादेवी प्रस्थान करतात!!

ह्या सगळ्या खटपटीमधे थोडा वेळ गेल्यावर अचानक लक्षात येतं की आज एका महत्वाच्या विषयावर गुगल करायचं राहिलं, मग काय, डोकं एकदम १०० च्या स्पीडने पळायला लागतं...अगदी कसून काम केल्यावर पोटात कावळे ओरडायला लागल्यावरच लक्ष जातं घडयाळाकाडे अन लक्षात येतं की अरे ’सोमवार’ संपला पण!! मग झालेल्या कामाकडे एकदा नजर टाकून स्व:तवर खुश होउन मी ऑफिसबाहेर पडते!!

अशात-हेने कंटाळवाणी सकाळ आणलेल्या ’सोमवार’ चा शेवट मात्र चांगला होतो!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Monday, March 14, 2011

महिला दीन!!

परवाच माझ्या मैत्रिणीने एका गोंडस मुलीला जन्म दिला. तिचे टपोरे डोळे, लालचुटूक ओठ, काळेभोर केस बघुन कोणीही तिला पटकन जवळ घेइल इतकी गोड. आम्ही सगळ्या मैत्रिणी, ती, तिचा नवरा, तिची सासरकडची मंडळी सगळे खूप खुश झालो ह्या छोटयाश्या परीला बघुन पण, मैत्रिणीचे आई-वडिल मात्र खूप नाराज झाले; त्यांना ’नातू’च हवा होता!! काय म्हणावं ह्या सुशिक्षीत अडाणी लोकांना!!

आजच्या काळातही लोक ’मुलगा हवाच’ असा हट्ट धरतात ह्या गोष्टीवर माझा विश्वासच बसत नाही.

आतापर्यंत मुलींनी कितीतरी क्षेत्रांमधे स्व:तचं कर्तुत्व सिध्द केलं आहे तरीहि कुलदीपक हा हवाच, भलेही तो मुलगा बाहेर कितीका दिवे लावेना!! लहानपणापासून मुलाला सगळं हातात मिळणार का तर उद्या म्हाता-या आई-वडिलांना त्याने सांभाळलं पाहीजे ना, पण प्रत्यक्षात घडतं काहीतरी वेगळचं!! एक ना अनेक असे किती उदाहरणं आहेत.

ह्या वर्षी महिला दिनाला १०० वर्ष पूर्ण झाली पण उपयोग काय?? महिलांसाठी फक्त १च दिवस साजरा करायचा आणि वर्षातले बाकीचे ३६४ दिवस त्यांचा छळ करायचा!! ५ ते ६५ वर्षापर्यंत च्या कोणत्याही मुलीला / स्त्रीला रस्त्याने चालताना, बस, ट्रेन मधुन जाताना विनयभंग, बलात्कार ह्यासारख्या अमानुष कृत्यांना सामोरं जावं लागतं. असल्या बातम्यांनी तर अर्धं वर्तमानपत्र रोज भरलेलं असतं!!

ह्या वेळेसच्या महिला दिनाला तर कहर झाला, दिल्लीमधल्या एका महाविदयालयात सकाळी १०.३० च्या सुमारास एका माणसाने एका मुलीवर सरळ गोळ्या झाडल्या!! असं जर सर्रास सुरू राहिलं तर मुली, बायकांना घराबाहेर पडणं पण अवघड होइल! दुर्दैवाने काही काही घरांमध्ये सुध्दा इतकी वाईट परिस्थिती आहे की, त्या स्त्रीयांना घरात राहणही अवघड जातं!! फक्त गरीब किंवा अशिक्षीत घरांमधेच असं घडतं असं नाहीये तर उच्चभ्रू वर्गामधे देखील हे प्रश्न तितकेच प्रखर आहेत....

आपल्या देशामधे काही प्रदेशांमधे अशीही परिस्थीती आहे की, मुली कमी असल्यामुळे ५-६ पुरूषांचं लग्न एकाच स्त्री सोबत लावलं जातं!!

अगदी मुठभर महिला सोडल्या तर बाकी सगळा महिला वर्ग कायम सहनच करत आलाय आणि अजुनही करतोय!! असंच जर सुरू राहिलं तर एका दिवशी ह्या पृथ्वीवरून स्त्री ही जातच नष्ट होइल!!

स्त्री...जिच्यात हे विश्व निर्माण करण्याची, जिवंत ठेवण्याची शक्ती आहे, तीचा जर असा -हास होत गेला तर एक दिवस जीवनच नष्ट होइल!!!


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, March 8, 2011

वटसावित्री

आज महिला दिनाचं औचित्य साधुन वपुं च्या ’माझं माझ्यापाशी’ ह्या पुस्तकातला एक उतारा इथे नमूद करावासा वाटला

माझं माझ्यापाशी - व.पु.काळे

यमधर्माशी वादविवाद करून नव-याचा प्राण सावित्रीनं वाचवला, ह्यातच सत्यवानही तेवढ्या योग्यतेचा होता, हे सिध्द होतं.
प्रपंच आणि नोकरी, दोन्ही पातळ्यांवर झगडा देणारी प्रत्येक ’स्त्री’ सावित्रीच आहे. ती वर्षभर वटसावित्रीचीच भूमिका बजावत आहे. सत्यवान बारमधे जातोय, घरी पार्ट्या झोडतोय, बायकोवर डाफरतोय, तयार चहाच्या कपाची वाट पाहतोय आणि आपल्यापेक्षा जास्त कौतुक, प्रसिध्दी, गुणवत्ता, कर्तृत्व बायकोजवळ असेल, तर नवरेपणाचा हक्क अबाधित ठेवून, पत्नीच्या प्रगतीच्या आड येतोय.
संसारासाठी अर्थार्जन करणा-या सावित्रीची पूजा आणि व्रत बारमास चालू आहे. धावती गाडी पकडण्यासाठी तिला शारीरिक बळ हवंय, तिनं उपास का करावा? मंगळागौरीची जागरणं का करावीत?
पुराणे संकेत आता झुगारून दिले पाह्यजेत. ह्याचा अर्थ ’श्रध्देला’ तिलांजली दिली, असा होत नाही. बुध्दी आणि शास्त्र इकडं ती श्रध्दा वळली पाह्यजे. किमान, आपण अमुक एक व्रत का करीत आहोत? ह्याचं समर्पक समर्थन बाईजवळ हवं. नव-याचं आयुष्य वटसावित्रीच्या व्रतानं वाढतं, हा संकेतच तपासायला हवा. ते अशक्य आहे, मग स्वत:ची भूमिका स्पष्ट हवी, त्यासाठी स्वत:चा स्वत:वर गाढा विश्वास हवा. तो आत्मविश्वास, आत्मविकास वाढवणा-या गोष्टी जर सायन्सजवळ असतील, तर ’सायन्स म्ह्णजे अध्यात्म’ आणि एक जिताजागता जीव, आयुष्य यशस्वी करण्यासाठी, जागरूकतेने कार्यरत असेल, तर तेच व्रत, ह्या भूमिकेपाशी थांबणं हीच प्रगती.
उरलेल्या सगळ्या रूढी, आज फेकून द्दायला हव्यात.