Wednesday, June 20, 2012

प्रसन्न सकाळ


’अरे वा :-) आज मोबाईलचा गजर इतका गोड आवाजात कसा काय गातो आहे?’ असं म्हणून डोळे किलकिले करत मोबाईल हातात घेतला तर तो तर अगदी निपचित पडलेला होता आणि रोजची गजराची वेळ तर अजुन झालीच नव्हती मग तो गोड आवाज येतोय कुठुन ह्या कुतुहलाने मी इकडे तिकडे बघितलं तर खिडकीसमोरच तारेवर बसलेले हे महाशय दिसले


रेड व्हेन्टेड बुलबुल 


इतक्या सुमधुर आवाजात तो गात होता की मी बेडवरून अगदी टुनकन उठुन खिडकीत आले अन बघत उभी राहिले, त्याची समाधी लागलीये हे बघून मी पटकन कॅमेरा काढला आणि त्याचं छायाचित्र टिपून घेतलं. थोडयावेळाने त्याचा साथीदार आला अन दोघे उडून गेले तशी मी आत वळले.आज रोजच्या पेक्षा खुपच लवकर मी जागी झाले होते, घडयाळ बघितलं आणि वाटलं अजुन वेळ आहे तर एक डुलकी काढावी पण पुन्हा वाटलं नकोच, आज इतकी छान सुरूवात झाली आहे दिवसाची तर आता पटापट आवरावं आणि एखादी प्रभातफेरी मारावी. मग काय,मी लगेचच सगळं आवरून बाहेर पडले.

पाय-या उतरून खाली आले तसं हवेत सुखद गारवा जाणवला अन अगदी प्रसन्न वाटलं पुढे गेटमधून बाहेर पडले तर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे आमच्या अपार्टमेंटच्या तिथे असलेलं दुकान उघडलेलं होतं (पुण्य़ात इतक्या लवकर दुकान उघडू शकतं?, असो ) दुधाची गाडी उभी होती आणि १-२ गि-हाईकं काही-बाही घेत होती.त्या गाडीला वळसा घालून मी पुढे मुख्य रस्त्यावर आले अन समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाले!! आजपर्यंत मी ह्या बाजूचा रस्ता कधी बघितलाच नव्हता!! पूर्ण रस्ता अगदी हिरव्याकंच झाडांनी बहरलेला
मी तशाच विस्फारलेल्या डोळ्यांनी ते सौंदर्य न्याहाळत पुढे निघाले.



चौकात आल्यावर उजवीकडे बघितलं तिथेसुध्दा हिरव्या सुंदर झाडांची रांग दिसली अन आश्चर्य करत मी स्वतःला झापलं की इतके दिवस झाले आपण इथे राहतोय पण आतापर्यंत एकदाही आपल्याला ह्या सृष्टीसौंदर्याची पुसटशी कल्पनापण नाही आली,श्या!



पुढे मी वॉक करायला सुरूवात केली तसं लक्षात आलं की रस्त्यावर अगदीच तुरळक गाडया धावत होत्या आणि बहुसंख्य जनता मॉर्निंग वॉक करत होती, मला जरा बरं वाटलं म्हटलं चला आज आपण पण ह्यांच्यासोबत सामील व्हावं.

मी एक-एक गोष्ट न्याहाळत पुढे जात होते, थोडयाच अंतरावर एक बस स्टॉप दिसला तिथे तिन-चार आजी मस्त हसत-खेळत गप्पा मारतांना दिसल्या.त्यांचा उत्साह बघून त्यांना आजी म्हणणं खरंतर चुकीचं आहे,असो.पुढे एक मुलगा त्याच्या क्युट डॉगीला फिरवायला म्हणून घराबाहेर पडला अन त्या डॉगीने जे धूम ठोकली की कोण कोणाला जॉगिंग करवतय हे कळेचना. हे दृश्य बघत असतांनाच मला अचानक विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला कानोसा घेत मी इकडे-तिकडे शोधलं तर दिसलं रस्त्याच्या डाव्या हाताला एका गल्लीत एका बागेमधे काही मंडळी हात वर करकरून चित्रविचित्र पध्दतीने हसत होती,तो हास्यक्लब होता. :-D

ह्या रस्त्यावर मारोतीचं आणि गणपतीचं मंदीरही मला दिसलं म्हणजे लक्षात आलं कारण बरीच मंडळी जाता-येता एक क्षण तिकडे बघून हात जोडत काहीतरी पुटपुटत जातांना दिसली.

रस्त्यावर प्रभातफेरी करणारी बहुसंख्य जनता ही साधारण चाळीशी किंवा त्यापेक्षा वयाने मोठी वाटत होती.बरेच आजोबा त्यांच्या ग्रुपसोबत मस्त चर्चा झोडत होते तर काहीजण तिथल्याच बाकावर हातात देवाचं छोटं पुस्तक घेऊन वाचत बसले होते.एक आजोबा मात्र अगदी सुरा-तालात गाणं म्हणत होते, अगदी तल्लीन होऊन ते स्वतःच स्वत:चं गाणं एंजॉय करत होते.त्यांच्या चेह-यावरचे हावभाव बघून मला इतकं मस्त वाटलं,विचार आला असं असायला हवं माणसाने,आजूबाजूला कोणी बघतंय, हसतंय वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा आपल्या धुंदीतच मस्त जगायचं :-)

थोडया वेळाने काही माझ्यासारखे यंगस्टर्सपण धावतांना दिसले पण ते बिचारे ऑफिसची बॅग सांभाळत बस पकडण्यासाठी धावत होते. मला फार बरं वाटलं माझं ऑफिस दुपारचं आहे म्हणून :-)

जशी माणसं मजेदार दिसत होती तशीच रस्त्यालगत असलेली घ्ररंपण अगदी वेगळेपण जपणारी दिसली.एक-दोन अपार्टमेंटस सोडले तर बाकी जवळपास सगळे बंगलेच आहेत प्रत्येकाला अगदी छान अर्थपूर्ण नाव असलेले.प्रत्येकाच्या बंगल्यात छोटी बाग दिसली त्यात मोगरा,चाफा,कन्हेर,बकुळ अशी विविध फुलझाडं तसंच कोणाकोणाकडे आंब्याचं किंवा अशोकाचं झाड दिसलं.गेटपासून ते दारावर लावलेल्या गणपतीच्या मुर्तीपर्यंत, घराच्या रंगापासून ते बागेत ठेवलेल्या शोभेच्या वस्तूंपर्यंत सगळंच प्रत्येकाच्या बंगल्यात युनिक दिसत होतं.पुण्यातलं पब्लिक सगळ्या बाबतीत चोखंदळ आहे ह्यात काही वाद नाही.

ह्या रस्त्याच्या शेवटी एक मोठी टेकडी आहे, बरीच मंडळी तिकडेही फिरायला जातांना दिसली मग मी पण तिकडे वळले.पहिल्याच क्षणी मला एका घरात खुप मोठठं आंब्याचं झाड दिसलं मस्त कै-यांनी लगडलेलं बघताक्षणी तोंडाला पाणीच सुटलं.

त्या झाडाकडे बघतांना माझा अचानक धक्का कोणाला तरी लागला, बघितलं तर एक आजी हातात काठी घेऊन तरातरा समोर जातांना दिसल्या,निरखून बघितलं तर त्या चाफ्याच्या झाडाची फुलं घ्यायला धावतांना दिसल्या  ;-)
त्यांच्यासारखीच अजुन एक-दोन लोकं हातात पिशव्या घेऊन कंपाऊंड मधून बाहेर डोकावणा-या प्राजक्त, तगर ह्या झाडांची फुलं तोडतांना दिसली, मॉर्निंग वॉकचा हाही एक उपयोग  ;-)

असो, पुढे मी टेकडीच्या पायथ्याशी आले तसे मला बरेच लोक आपापल्या कुत्र्यांना फिरवायला आलेले दिसले आणि त्या गर्दीमधेच एक छोटा मुलगा मस्त झुपझुप स्केटींग करतांना दिसला,इतकं वेगवेगळं बघायला मिळत होतं प्रत्येक वळणावर मला तर आश्चर्यच वाटत होतं :-)

ह्याच विचारांमधे मी टेकडी चढायला सुरूवात केली,तिथेपण जागोजागी लोक व्यायाम करतांना,योगासनं करतांना दिसत होती. मी थोडंच अंतर चढून गेले असेन पण मला धाप लागायला लागली :-( माझ्यापेक्षा वयाने मोठी मंडळी पण भराभर टेकडी चढत होती न मी धापा टाकत होते. मी आत्ता ह्याच वयात 'आयटी' च्या कृपेमुळे म्हातारी झाले होते! माझे खाडकन डोळे उघडले मी त्याच क्षणी मनाशी पक्क ठरवलं, आता नियमीतपणे व्यायाम करायचा,आळस अजिबात करायचा नाही!! त्या विचाराने मला थोडं बळ आलं आणि मी नेटाने चढायचा प्रयत्न करू लागले.

टेकडीवर जास्त हिरवी झाडं नाहीत पण जी तुरळक झाडी आहेत त्यावर मात्र विविध पक्षी अगदी आनंदात नव्या दिवसाचं गाण गात होती.मधेच कुठे साळुंक्यांचा आवाज येत होता तर कुठे पारव्याचा.मधेच एखादा कोकीळ पावसाची चाहूल लागलीये हे सांगत होता तर मधेच काही चिमण्या चिवचिवत होत्या :-) सगळं वातावरण त्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने अगदी प्रसन्न झालं होतं.

हे बॅकग्राउंड म्युझिक एंजॉय करत मी एकदाची टेकडीवर पोहोचले! तिथे एका सपाट जागेवर काही आजोबा लोक काम करतांना दिसले,पुढे जाऊन बघितलं तर ते लोक तिथे असणा-या झाडांना पाणी घालत होते.तसंच अजुन काही आजोबा मारोतीच्या मुर्तीसमोर उभे राहून आरती करत होते.आजूबाजूला बरेचसे दगड लावून त्यांनी ती जागा अगदी छान सुशोभित केली होती.


त्या टेकडीवरून जवळपास अर्ध्या पुण्याचं दर्शन होतं.तसंच ही टेकडी अगदी दूरपर्यंत पसरलेली आहे.टेकडीच्या मागे चांदणीचौक आहे आणि समोर आर्मीलँड.टेकडीवर मी एक फेरफटका मारून खाली जायला सुरूवात केली.सकाळी येतांना जितकी दमछाक झालेली त्यामानाने खाली यायला काहीच वेळ लागला नाही पण आता सूर्य व्यवस्थित वर आलेला होता आणि ऊन चमकत होतं.खाली येतांना अजुन एक गम्मत बघायला मिळाली :) वरती आकाशातून सुखोई विमान जातांना दिसलं  :-D   :-D  वो देखके मेरा दिल तो एकदम गार्डन गार्डन हो गया :-) लहानपणी विमान दिसलं की ते दिसेपर्यंत त्याच्याकडे एकटक बघायची न शक्य असेल तर त्याच्यासोबत धावायची सवय होती मला आणि आत्ता सुखोई बघून मी तेच केलं मी धावत सुटले अगदी ते नजरेआड होईपर्यंत.

थोडयावेळाने माझा वेडेपणा लक्षात आल्यावर मी इकडे-तिकडे बघितलं पण कोणाचच लक्ष नव्हतं माझ्याकडे मग काय मी अगदी काही झालंच नाही ह्या आविर्भावात पुन्हा चालायला लागले :-)

चालतांना समोर दोन काकू विरूध्द दिशेने चालतांना दिसल्या.मला गंमत वाटली,विचार आला इथे लोकांना धड सरळ चालता येत नाही हल्ली रस्त्यावरून आणि ह्या दोघी रोडवर उतारावरून इतक्या सहजतेने उलट कसं काय चालत आहेत? गंमतच वाटली मला  :-D

अशाच गमती-जमती बघत मी घरी परतले. खुपच सुखद अनुभव होता प्रसन्न सकाळच्या ह्या प्रभातफेरीचा :-)
मी तर आता रोज असंच सकाळी फिरायला जाणार आहे, वूड यू लाईक टू जॉईन?


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, June 12, 2012

सरसगड

येस्स फायनली जून सुरू झाला :)
आमच्या ऑफिसमधल्या हौशी ट्रेकर्स ग्रुपने ह्या वेळेस आतापर्यंत न-बघितलेल्या अशा काही जागा निवडल्या आणि सगळी तयारी करून आम्ही ३० जण ९ जून रोजी पावसाळी ट्रेकच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकसाठी सज्ज झालो.

सरसगड सर करून जाण्याचा मनसुबा करून आम्ही सगळे 'आयटी'तले मावळे बसने पाली गावाला निघालो,सुरूवातीला सगळीकडे स्वच्छ ऊन होतं पुढे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेला लागलो तसे थोडेसे काळेढग आकाशात दिसायला लागले तसं आम्हांला जरा बरं वाटलं..पुढे पाली गावाकडे वळलो आणि पाऊस सुरू झाला अगदी जोरात आम्ही सगळेजण एकच गिल्ला करत चलाsss आला एकदाचा पाऊस म्हणून खुश झालो पण पुढे पालीला पोहोचल्यावर कळलं की तो पाऊस फक्त मागच्या रस्त्यावरच पडला इथे अजुनही ऊनच दिसत होतं.

आमच्या म्होरक्याला सुध्दा आजच्या ट्रेकचा रस्ता माहित नव्हता मग तिथे गावात थोडी चौकशी केली आणि आम्हा मावळ्यांच्या तुकडया निर्देशिलेल्या मार्गाकडे कूच करू लागल्या.


मंदिरापासूनच जवळच एका पाऊलवाटेने सरसगडासाठी वाट जाते तिथे येऊन आम्ही थांबलो. म्होरक्या आणि अजुन एक-दोन जण पुढे जाऊन थोडा अंदाज घेऊ लागले.रस्ता तर दिसत नव्हता पण व्यवस्थित अशी पाऊलवाट दिसली जिने आमची वानरसेना पुढे सरकू लागली.बरीच मंडळी अगदी पहिल्यांदाच 'ट्रेक' असतं तरी काय हे आजमावयाला आलेली होती त्यामुळे त्यांनी लगेच आपापले कॅमेरे काढून फोटोसेशन सुरू केलं.थोडयाच अंतरावर सरसगडाचं दर्शन झालं.


निघालो तेंव्हा ऊन जाणवत होतं पण आकाशात काळे ढगही दिसत होते,लवकरच पाऊस येईल ह्या आशेवर आम्ही पुढे सरकत होतो.पण थोडं अंतर चाललो अन लक्षात आलं की ही वाट आता संपली आणि पुढे सगळी काटेरी झाडं-झुडंप आहेत,आता काय करावं बरं? परत आमचे अनुभवी ट्रेकर्स पुढे जाऊन कुठे काही रस्ता दिसतोय का ह्याची पाहणी करून आले आणि लक्षात आलं की आपण बहुतेक तरी चुकीचा रस्ता घेतलाय अन आता पुढे जर जायचं असेल तर ह्या झाडांमधूनच रस्ता काढणं आवश्यक आहे! मग काय, म्होरक्याने ललकारी दिली आणि आम्ही पुढे सरसावलो.एक-एक पाऊल टाकत, काटेरी झाडं बाजूला करत करत ओळीने पुढे जायला लागलो.तो पूर्ण रस्ता मातीचा निसरडा असा होता,चुकून जरी कोणाचा पाय घसरला तरी मागच्या सगळ्यांना आडवं पाडेल अशी भिती वाटत होती.निघालो तेंव्हा पाऊस नाही म्हणून नाराज झालेलो आम्ही आता, बरं झालं पाऊस पडला नाही,नाहीतर ह्या मातीत पाय रूतून बसले असते अन ना धड पुढे जाता आलं असतं ना धड माघे, म्हणून खुश होत होतो.

बराच वेळ तसं चालल्यानंतर पुढे मोठाले दगड दिसू लागले आणि काटेरी झाडं अगदी तुरळक झाली.त्या दगडांवरून चढत वरती जातांना एकेकाला आपापली सगळी शक्ती आणि युक्ती पणाला लावावी लागत होती.एकजण ज्या रस्त्याने जात होता दुसरा त्याच रस्त्याने येतांना घसरत होता त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची वाट शोधत वर यायचं ठरवलं आणि पहिला टप्पा पार पडला :)

सगळे मावळे पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर पुढची चढाई सुरू झाली.इतक्यात दोन-चार करत पावसाचे थेंब आमच्याभोवती फेर धरू लागले,त्यांच्यासोबत नाचत आम्ही पुढे निघालो.ह्या जागी येण्याचा पूर्वानुभव कोणालाही नसल्यामुळे आणि आमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ट्रेकर्सचा ग्रुप सोबत नसल्यामुळे ज्याला सुचेल तसा रस्ता शोधून काढणे मोहिम करत आम्ही एका अशा टप्प्याला येऊन पोहोचलो जिथून सरसगड आम्हांला अगदी जवळून स्पष्ट दिसू लागला.गावातल्या कोणीतरी आम्हांला कल्पना दिली होती की गडाला वरती जायला पाय-या आहेत, त्या पाय-या आम्हांला आत इथून दिसू लागल्या :) एव्हाना आम्हांला सुरूवात करून दोन तास झाले होते,एकीकडे सगळ्यांना भूका लागल्या होत्या पण जेंव्हा पाय-या दिसल्या तसा पुन्हा सगळ्यांना हूरूप आला आणि आम्ही धावतच सुटलो आणि ह्या गडबडीत पुन्हा एकदा चुकीचा रस्ता निवडला.आता मोठाल्या दगडांसोबत मोठाली-काटेरी खोड असलेली झाडं पण होती वाटेत.आम्ही पुन्हा प्रयत्नांची शर्थ करत त्या दगडांवरून उडया मारत ,धडपडत पुढे जायला सुरूवात केली आणि ट्रेकचा ८५% रस्ता सर केला  :D


पाय-या सुरू होण्याआधी एक सपाट जागा लागते जिथे दगडामधे कोरलेली चौकोनी गुहेसारखी एक जागा आहे पण आतमधे काहीच नाहीये.ह्या जागेवरून खाली असणारं गाव,बल्लाळेश्वराचं मंदीर अशा सगळ्या गोष्टी अगदी छोटयाशा पण स्पष्ट दिसतात आणि वरती बघितलं तर सरसगडाचा एक मोठठा काळा पाषाण दिसतो.


मंदीरापासून उजवीकडे बघितलं तर एका नदीचं नागमोडी वळणाचं पात्र दिसतं.ह्या ठिकाणी वारा अगदी नाजूक अशी शीळ घालत कानाजवळून फिरत होता तर समोर डोंगरद-यांची रांग दिसत होती.आकाशात सूर्याचा लपंडाव सुरू होता आणि ऊन-सावल्यांचा मजेशीर खेळ दिसत होता,मधूनच एखादा काळा ढग वाकुल्या दाखवत इकडे-तिकडे पळत होता आणि पाऊस मात्र येत नव्हता..



घटकाभर तिथे विश्रांती घेऊन आम्ही उरलेला २५% भाग सर करायला सुरूवात केली.पाय-या दिसत होत्या त्यामुळे सगळ्यांना वाटलं चला आता पटापटा आपण वरती जाऊ शकतो पण आमचा हा भ्रम अगदी पहिल्या दोन पाय-या चढल्यावरच विरघळला कारण एक पायरी साधारण दीडफुट उंचीची आहे आणि पावसाच्या पाण्याने चांगलीच निसरडी झालेली.मग काय पुन्हा एकदा कूर्मगतीने आम्ही सगळे पाय-या चढून वरती आलो.



हूश्श!! आता गडाच्या साधारण अगदी वरच्या भागात आम्ही येऊन पोहोचलो.तिथे एक दगडी हौद दिसला एका चौथ-यावर तर थोडया उंचीवर एक साचलेल्या पाण्याचं तळं दिसलं.ह्या उंचीवरून खालंच सगळं अगदी ठिपक्यांइतकं लहान दिसू लागलं.जोरदार वारा सुरू होता अगदी इतका की माणूस उडून जाईल :)

आता पुढे कसं जायचं ह्याचा विचार आम्ही सगळे करत असतांनाच एक कुत्रा आमच्या थोडंसं पुढे येऊन उभा राहिला.जणू काही ह्या गडाचा गार्ड आणि गाईड असल्यासारखा.आम्ही निघायला सुरूवात केली आणि त्याने आम्हांला रस्त्याचं मार्गदर्शन करायला.मग काय आम्ही भराभर पुढे जायला लागलो.थोडयाच अंतरावर आम्हांला एक अडचण दिसली.साधारण ३फूट उंच अशी दगडाची नैसर्गिक भिंत होती आणि त्यावर चढण्याकरता अगदी एकच पाय ठेवता येईल असा पायरीवजा दगड.ते बघून पुन्हा एकदा विचार आला की,इथुन पुढे खरंच जायचं की नाही? आता इतकं वरती आलोय तर बास ना वरती नको जायला..पण आमचा कॅप्टन म्हणाला नाही! आता हत्ती गेला अन शेपूट राहिलंय अजिबात माघे फिरायचं नाही..चला आपण प्रयत्न करू,चढता येईलच. आणि काय आश्चर्य आमच्या सोबत असणा-या त्या गार्डने आम्हांला प्रात्यशिक करून दाखवलं!! मग आम्ही सगळेपण चढून वरती पोहोचलो.



येस्स्स्स..आलो एकदाचे सरसगडाला सर करून.
वरती गेल्यावर तिथे विशेष काहीही बघण्यासारखं नाही.एक छोटंसं शंकराचं देऊळ आहे आणि एक चबुतरा.त्या चबुत-याच्या अगदी समोर एक महादेवाच्या पिंडीसारखा डोंगर आहे.



तिथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा खाली जायला निघालो.वरती येतांना जितकं कठीण वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त उतरणं अवघड आहे ह्याचा अंदाज अगदी पहिल्या क्षणालाच आला  :( पण आता पर्याय नव्हता, उतरावं तर लागणारच होतं आणि तेही वेळेत कारण पोटामधले कावळे ओरडून एकच कल्ला करत होते!मग काय घेतलं देवाचं नाव आणि केली सुरूवात.

दगडाची भिंत उतरून आल्यावर समोरचा रस्ता बघतांना एक मनोहारी दृश्य दिसलं अगदी दूरवरून मुसळधार पाऊस घोडदौड करत येतांना दिसला.आमची सगळी वानरसेना ती भिंत उतरून येईपर्यंत तर पावसाने आम्हांला गाठला.
त्या सहस्त्रजलधारांना झेलत सगळेजण पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागलो आणि म्होरक्याचा आवाज आला,अरे चला आपल्याला खालीपण उतरायचं आहे! भानावर येत लगेच सगळे पटापट उड्या मारत पुढे निघालो.दगडी पाय-या उतरून येत असतांना आमचा गार्ड अचानक थांबला निरखून बघितलं तर एक महाशय रस्ता ओलांडतांना दिसले.
समाधीस्थ असलेल्या ह्या खेकड्यानेच आमचा रस्ता अडवला होता



तर पुन्हा एकदा आम्ही त्या सपाट जागी येऊन पोहोचलो.पाऊस पडून गेल्यामुळे आता पुढे कोणत्या रस्ताने जावं ह्याचा विचार होत असतांनाच आम्हांला एक चांगला रस्ता दिसला आणि डोक्यात प्रकाश पडला की येतांना आपण हा रस्ता निवडला असता तर वरती येण्याचा वेळ वाचला असता आणि झाडा-झुडपातून वाट काढत येणंही वाचलं असतं

तर आता रस्ता स्पष्ट झाल्याने आम्ही टणाटण उडया मारत खाली जायला सुरूवात केली.अगदी ४०मिनीटातच आम्ही खाली आलो.
मग एक-एक तुकडी आधी मंदीर आणि पुढे फडके काकूंकडे जेवणासाठी म्हणून कूच करू लागली.
फडके काकूंनी अगदी गरम-गरम वरण-भात-भाजी-पोळी आणि शिरा असं चबिष्ट जेवण वाढलं आणि हाता-तोंडाची लढाई सुरू झाली.पोटभर जेवण करून आम्ही पार्किंगकडे वळलो आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली.

अशा त-हेने, प्रत्येकातली शक्ती आजमावणारा असा हा सरसगडाचा ह्या पावसाळी सिझनमधला पहिला ट्रेक पार पडला :)  

Thursday, June 7, 2012

निरागस



एका दिवशी वाडेश्वरला मी माझ्या ग्रुपची वाट बघत उभी होते,करायला विशेष काही नव्हतं म्हणून सहजच इकडे-तिकडे नजर टाकली तर फुटपाथवर एक वेगळंच दृश्य दिसलं..
एक वयस्क जोडपं बसलेलं होतं..अंगावर ठिगळं लावलेले बेताचे कपडे..हाता-पायाची हाडं-काडं झालेली..कित्येक दिवसात अंगाला पाणी न-लावल्यामुळे काळवंडलेले चेहरे पण तरीही त्यावर हास्य होतं नजर चमकत होती आणि त्याचं कारण होतं त्यांच्याजवळ असलेलं एक छोटं वर्षा-दीड वर्षाचं बाळ

ते बाळ सुध्दा मळक्या कपडयात होतं, कदाचित त्यांच्यासारख्याच कोणा भिकारणीचं असावं आणि कदाचित ते आजी-आजोबा त्याचं बेबीसिटींग करत होते.

त्या आजोबांनी एक पाव त्यांच्या प्लास्टीकच्या पिशवीतून काढला आणि त्याचा मोठा तुकडा त्या बाळाच्या हातात दिला,उरलेल्या तुकडयाचे दोन भाग करून एक आजीला दिला आणि एक स्वतः खायला घेतला.ते बाळ हातात तो तुकडा घेऊन खात होतं आणि त्या दोन्ही म्हाता-यांच्या चेह-यावर त्याचा आनंद दिसत होता.थोडया वेळाने त्या बाळाचं खाऊन झालं तसं त्या आजोबांनी त्याला पाणी प्यायला एक प्लास्टीकची बाटली काढली, ते बाळ पण भारी होतं, त्याने बाटलीचं झाकण उघडून व्यवस्थित पाणी प्यायलं.पोटपूजा झाल्यावर ते बाळ धडपडत उठलं आणि चालायचा प्रयत्न करू लागलं.तो आजीपासून दोन-चार पावलं पुढे जाऊन माघे फिरायचा अन पुन्हा आजीपर्यंत यायचा मधेच त्याचा तोल जाऊन तो पडायला लागला की ती आजी पुढे होऊन त्याला धरायची आणि ते बाळ खुदकन हसायचं आणि ते दोघेपण..मधेच ती आजी त्या बाळाच्या चेह-यावर हात फिरवून कानामागे बोटं मोडत होती..
हा सगळा कार्यक्रम बराच वेळ असाच सुरू होता..तिघांच्या चेह-यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता..मी तर अक्षरशः भान हरपून त्यांचा हा खेळ बघण्यात दंग झाले होते..त्या बाळलीलांमुळे काही क्षणांपुरतं का होईना त्या दोन म्हाता-या जीवांना आयुष्यात आनंद मिळत होता..

कसं ना,बाळ भिका-याचं असू देत नाही तर श्रीमंताचं त्याच्या निरागसतेत कुठेही काहीच फरक नसतो.देवाघरचं ते फुल त्याच्या सहवासातल्या सगळ्यांना सारखाच आनंद देतं..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



Tuesday, June 5, 2012

संवाद



आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं- ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील आत्याबाई.

संवाद या शब्दाचा खरा अर्थ मला माहित नाही पण आतापर्यंत हेच माहितीये की जेंव्हा आपण आपल्या मनातलं कोणाशी तरी बोलतो आणि त्याला ते उमगतं, नेमकं कळतं आणि ती व्यक्ती त्याला प्रतिसाद देते तेंव्हा संवाद साधला जातो..एरव्ही आपण बडबड करतो, गप्पा मारतो कधी स्व:तशीच कधी दुस-यांशी, पण या सगळ्यांपेक्षा संवाद वेगळाच असतो..

शब्द तेच असतात पण भाव वेगळा असतो, त्यातुन उमलणारा विचार नवा असतो कधी आपल्याला अंतर्मुख करणारा तर कधी मनातली सगळी जळमटं दूर करणारा असतो..

पण, कधीही, चला बरं आता आपण एकमेकांशी ’संवाद’ साधूया म्हणून तो जमत नाही, सहज बोलता-बोलता सुरू होतो आणि संपल्यावर एक प्रकारची शांतता मनात भरून उरते.या संवादासाठी नेहमीच शब्दांची आवश्यकता असते असं ही नाही, कधी कधी नरजेतून, मायेच्या स्पर्शातून तर कधी नुसतं एकमेकांजवळ मूकबसून सुध्दा संवाद साधला जातो.कधी तर अनोळखी असणा-या व्यक्तीशी दोन-चार शब्द बोलण्यातून सुध्दा संवाद सुरू होतो तर कधी अगदी आपलं म्हणवणारं माणूस संवाद न-साधू शकल्यामुळे कधी आपल्यापासून दुरावतं हे कळतच नाही..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check