Saturday, March 9, 2013

बालकलाकार = बालकामगार?


'आत्मा' ह्या नविन चित्रपटाचे ट्रेर्ल्स बघितले काल टिव्हीवर. नावावरूनच हा चित्रपट भयपट आहे ह्याची कल्पना येते. ह्यामधे एक छोटी, निरागस मुलगी दाखवली आहे.
एकूणच ते ट्रेलर बघून मला एक प्रश्न पडला की ह्या छोट्या डॉलला भिती नसेल का वाटली बरं ह्यामधे काम करतांना?
कदाचित चित्रपटाचं शूटींग सुरू असेल तेंव्हा नसेलही वाटली पण, प्रत्यक्षात जेंव्हा ती बघेल प्रिमियर शो तेंव्हा तिला स्वतःला असं बघता येईल मोठ्या पडद्यावर? तिच्या मनावर ह्या सगळ्या गोष्टीचा कसा परिणाम होईल?

आज सिनेमामधे म्हणा किंवा टीव्ही सिरियल्स, टीव्ही कमर्शियल्स मधे म्हणा सर्रास लहान मुलं काम करत आहेत.
त्यांचं सगळ्यांच काम नो-डाऊट चांगलं असतं पण १८ वर्षाखालील मुलांकडून काम करवून घेणं हे नियमामधे बसत नसतांना सुध्दा हे सगळं चालतं? की टीव्ही / मिडीयासाठी काम करणा-या मुलांना हा नियम लागू होत नाही? कायदेतज्ञांनी मला इथे थोडी मदत करावी जर माहिती वेगळी असेल तर

'मकडी' ह्या चित्रपटामधे काम केलेल्या मुलीची मुलाखत मी काही वर्षांपूर्वी ऐकली होती. तिला विचारलं की तू तुझं सगळं रूटीन कसं सांभाळतेस? त्यावर तिने जे उत्तर दिलं ते अगदी विचार करायला लावणारं आहे. ती म्हटली,'शूटींग के टायमिंग तो संभालने पडते हैं लेकीन उस वजह से स्कूलमें इर्रेग्युलर हो गयीं हूं, फिर भी एक्झाम से पहले पढाई कर लेती हूं. लेकीन मेरे सारे दोस्त मुझसे दूर हो गये हैं क्योंकी मैं उनके साथ टाईम नहीं बिता सकती और कहीं पर भी अगर जाना चाहूं तो सेलेब्रिटी स्टेटस संभालना पडता है.'

एका १०-१२ वर्षाच्या मुलीची ही प्रतिक्रिया किती बोलकी आहे. चित्रपटामधे काम करणं, ग्लॅमर वर्ल्ड ह्या सगळ्या गोष्टी एकवेळ पैसा, प्रसिध्दी मिळवून देतील त्या लहानग्या मुलीला आणि तिच्या आई-वडीलांना. पण तिचं जे बालपण आहे, शाळेत जाण्याचं वय आहे, मित्र-मैत्रिणींमधे खेळण्याचं वय आहे त्याचं काय? ते एकदा हरवलं की हरवलं ना!

दोन वर्षांपूर्वी स्टार प्लस की कसल्या तरी वाहिनीवर एक सिरीयल सुरू होती ज्यामधे अशीच एक ४-५ वर्षाची मुलगी काम करत होती. घरी खेळतांना तिचा हात फ्रॅक्चर झाला. तिच्या हाताला प्लास्टर घातलं पण ती ज्या सिरीयलमधे काम करत होती त्याचं शूटींग ती नसल्यामुळे अडलं होतं. त्यामुळे हात गळ्यात टांगून तिला कॅमेरासमोर उभं रहावंच लागलं, आता बोला!

हे असे सगळे प्रसंग बघून, वाचून असं वाटतं की कन्स्ट्रक्शन साईटवर काम करणा-या छोट्या मुली, लहान मुलं ह्यांना जसं राबवून घेतात तसंच लाइमलाईटच्या झगमगाटामधे ह्या बालकलाकारांनासुध्दा राबवलंच जातं ना! इथे फरक इतकाच असतो की ही मुलं चांगले कपडे घालून, मेक-अप करून, एसी कारमधून फिरणारी आहेत आणि बांधकाम करणारी मुलं घाणेरड्या वस्तीत राहणारी अन फाटके कपडे घालणारी!

जसा बांधकाम करणा-या मुलांच्या आयुष्यावर, मनावर इतक्या लहान वयात काम केल्यामुळे परिणाम होतो तसाच बालकलाकारांच्या मनावर होत नसेल का बरं? एकाच वेळी मूव्ही, सिरियल, टीव्ही कमर्शियल्स करायच्या. शिफ्ट्स मधे कामं करायची आणि शाळा, खेळ सगळं तरीपण सांभाळायचं तेही ह्या कळत्या- न-कळत्या वयात?

इंग्लीश-विंग्लीश मूव्हीमधे काम केलेला मुलगा सध्या कोणत्यातरी सिरीयलमधे काम करतोय. त्यामधे तो अतिशय लाडावलेला, उध्दट आणि हट्टी दाखवला आहे. आता जर हा मुलगा सिरियलमधे करत असलेल्या रोलमधून बाहेर पडलाच नाही आणि हट्टीच राहिला अधिकाअधिक उध्दट होत गेला, सेलेब्रिटी असण्याची हवा त्याच्या डोक्यातून मेक-अप काढल्यानंतरही उतरलीच नाही, तर ह्याला जबाबदार कोण? त्या सिरियलचा डायरेक्टर किंवा डायलॉग रायटर की त्या मुलाचे पालक?

सध्या टीव्हीवर गाणी म्हणणारी आयडॉल्स, ड्रामेबाज वगैरे शोधण्याच्या स्पर्धा सुरू आहेत. ब-याच काळापासून त्या सुरू आहेत वेगवेगळ्या नावाने. अशाच एका कॉमेडी कार्यक्रमामधे एक छोटी मुलगी पुढे आली तिच्या अंगभूत गुणांमुळे. पुढे तिला सोनी टीव्हीवरचा कॉमेडी शो मिळाला. त्यामधे तर ती चक्क मोठ-मोठ्या कलाकारांना लाजवेल अशा पध्दतीचे हातवारे करत, असभ्य भाषेतले डायलॉग्स म्हणत आजीचे वगैरे रोल्स करू लागली.

आपल्याला असं सगळं बघतांना मजा वाटते, दोन घटका करमणूक होते पण ही मुलं पुढे कशी वागतील?
आपण घरामधे जास्तीत जास्त काळजी घेतो लहान मुलांवर चांगले संस्कार करण्याची. पण, जर लहान मुलांना घेऊन असले कार्यक्रम सुरू असतील तर कार्यक्रमामधे काम करणा-या आणि ते बघणा-या मुलांवर काय परिणाम होईल ह्या सगळ्याचा??

तुम्ही म्हणाल हल्लीची मुलं खूप हुशार आहेत, सगळं बरोबर मॅनेज करतात. अरे पण, त्यामुळे जर त्यांचं मोठं होणं फास्ट फॉरवर्ड होत असेल तर पुढे त्यांच्या जगण्यामधे काही मुल्यं, संस्कार, माणूसपण टिकेल? त्यांना ह्या गोष्टी ज्या वयामधे कळायला हव्यात, शिकायला मिळायला हव्यात, अनुभवता यायल्या हव्यात त्या वयात ते इतके बिझी झाले तर कसं कळेल त्यांना? :(

खूप विचित्र प्रश्न आहेत हे :( उत्तरं मात्र...?  कदाचित तुमच्याकडे असतील, आहेत का हो?      

Thursday, March 7, 2013

प्रवास..



पुस्तकांच्या कपाटामधे काहीबाही शोधतांना अचानक माझी पाटी मला सापडली. अजुनही अगदी सुंदर काळीशार दिसत होती ती..मला आठवतं अगदी पहिलीपासून ते चवथ्या इयत्तेपर्यंत मी पाटी-पेन्सील घेऊनच सगळा अभ्यास केला..पुढे १०वी पर्यंत गणितं सोडवायला सुध्दा वापरली..त्यानंतर मात्र पाटी फक्त सरस्वतीपूजनाच्या दिवशी बाहेर निघायला लागली..

आमच्या घरी अशी पध्दत आहे की मुलगा / मुलगी शाळेमधे जाण्याअगोदर त्याला / तिला ’बासर’ला घेऊन जातात. भारतामधे सरस्वती देवीचं एकमेव मंदीर बासर ह्या गावी आहे. तिथे देवीचं दर्शन घेऊन आई-बाबाच्या मांडीवर बसून पहिला ’श्री’ पाटीवर गिरवला जातो. मी, माझ्या भावाने सुध्दा तशीच सुरूवात केली असं, आई सांगते.

ह्या पाटीने मला मुळाक्षरं गिरवायला शिकवली, चित्र काढायला शिकवली आणि अंकगणिताची सुध्दा ओळख करून दिली. वळणदार अक्षर काढायचं म्हणून पाटीवर दोन्ही बाजूने खूप प्रॅक्टीस केल्याचं अजुनही आठवतं मला..आणि एकदा वर्गामधे गोंधळ केल्याबद्दल बाईंनी शिक्षा म्हणून, शुध्दलेखन घोटून घेतल्याचं सुध्दा अजुन लक्षात आहे माझ्या..

शिक्षणाची पुढची पायरी चढले तसा पाटीचा सहवास दुरावला अन शिसपेन्सीलशी ओळख झाली..शिसपेन्सील, खोडरबर, शार्पनर :) कित्ती कित्ती प्रकार होते माझ्याकडे ह्या तीनही गोष्टींचे :) परिक्षा असल्यावर तर कंपास भरून टोक केलेल्या शिसपेन्सीली आणि दोन-तीन खोडरबर्स कायम असायचे सोबत...हातामधे शिसपेन्सील धरायची सवय होईपर्यंत इयत्ता सातवी आली अन बॉलपेन हातात आला.

पेन वापरायला मिळतंय म्हणून एकदम मोठं झाल्याची जाणीव झाली :) मग वेगवेगळ्या प्रकारचे पेन्स, गृहपाठ करायला म्हणून वेगवेगळ्या रंगांची शाई असलेले पेन्स असं सगळं वापरायला सुरूवात झाली.

दहावी मधे गोल्डन कलरचं झाकण असलेला ’चायना पेन’ वापरला. शाईच्या पेनाने अक्षर अगदी छान येतं ह्या (गैर)समजुतीमुळे मी अगदी बारावीपर्यंत तो वापरला. त्या पेनला स्वच्छ करण्यामधे आणि शाई भरण्यामधे परिक्षेच्या आदल्या दिवशीचा एक तास तर नक्कीच खर्ची पडायचा :) सगळीच मजा मजा..

पुढे कंम्प्युटरचं शिक्षण घ्यायला कॉलेजमधे प्रवेश केला आणि चायना पेन तर सोडाच साधा बॉलपेनही हातात घेणं दुरावलं. फक्त परिक्षेपुरतं काय तो पेन गरजेचा वाटायला लागला..त्यानंतर नोकरी सुरू झाली आणि फक्त पहिल्या दिवशी जी काही कागदपत्रं भरून सही करावी लागते तितकाच पेन बाहेर निघाला. बाकी अं हं, काही कामच नाही उरलं पेनला हात लावण्याचं!

पुढे टच स्क्रीनचा मोबाईल घेतला आणि स्टायलस नावाच्या पेनसदृश लेखणीने लिहायला सुरूवात केली..



आणि आज तेही मागे पडलं जेंव्हा हातामधे आय-पॅड आला. पुन्हा एकदा बोटाने गिरवायला सुरूवात केली :)


सुरूवात बोटांनी मातीमधे मारलेल्या रेघोट्यांनी झाली मग पाटीच्या पाठीवर पांढ-याशुभ्र पेन्सीलीने लिहायला शिकले, मग शिसपेन्सीलीची मानगूट पकडत वह्या-पुस्तकांवर अक्षरं उमटवली, नंतर पेनने त्याचा ठसा उमटवत लिखाणाला नवं रूप दिलं...आणि आज पुन्हा एकदा मी रेघोट्या मारतीये ह्या ई-पाटीवर... 

कळत-नकळत घडलेल्या ह्या प्रवासाचं चक्र पूर्ण झाल्यासारखं वाटलं आज ह्या टप्प्यावर...मस्त होता हा प्रवास