Tuesday, March 24, 2015

वेळ

मला ना एक वाईट सवय आहे! बाहेर कुठेही गेल्यावर मला आजूबाजूला बसलेल्या लोकांचं निरिक्षण करायला फार आवडतं.

परवा असंच झालं, आम्ही दोघे एका हॉटेलमधे जेवायला गेलो होतो.जेवायची ऑर्डर देऊन झाल्यावर माझं निरीक्षण चालू झालं. रविवार संध्याकाळ असल्यामुळे हॉटेलमधे व्यवस्थित गर्दी होती.वेटरची लगबग चालू होती आणि जवळपास सगळेचजण आपापसात गप्पा मारण्यात मश्गूल होते.

आमच्या शेजारच्या टेबलवर माझं लक्ष गेलं तेंव्हा, तिथे तिनजण बसलेले दिसले. त्यापैकी एक छोटा मुलगा होता साधारण ३-४ वर्षांचा असेल अगदी गोड होता दिसायला :), त्याच्याशेजारी कदाचित त्याची आई बसलेली असावी आणि त्या बाईसमोर एक पुरूष बसलेला होता.

ती बाई आणि तो पुरूष एकमेकांशी गप्पा मारत होते आणि अशा रितीने बोलत-हसत होते की ते एखादं यंग कॉलेजगोयिंग कपल आहे, त्यांचं नुकतंच सूत जुळलं आहे आणि ते एकमेकांमधे हरवून गेलेले आहेत. त्यांच्या आजूबाजूला काय घडत आहे याचं त्यांना काही घेण-देणं नाहीये आणि मुख्य म्हणजे एक लहान मुलगा आपल्या बाजूला बसलेला आहे ह्याचंही भान त्यांना राहिलं नव्हतं.

तो छोटा मुलगा अगदी केविलवाण्या नजरेने सारखा त्या दोघांकडे बघत होता..पण त्या दोघांचं खरंच लक्ष नव्हतं!!
अगदी बोअर होऊन तो नुसता समोर ठेवलेल्या पेल्यातलं पाणी पित बसला होता आणि स्वतःशीच काहीतरी गुणगुणत होता. इतक्यात माझी आणि त्याची नजरानजर झाली आणि मी त्याच्याकडे बघून हसले पण त्याने साशंक नजरेने बघत तोंड दुसरीकडे फिरवलं.

थोड्यावेळाने त्या कुटुंबाने(?) मागवलेला एक पदार्थ आला. मग त्या बाईने त्या छोट्या मुलाला सांगितलं की हातात काट्याचा चमचा घेऊन कसं खायचं ते आणि ती स्वतःचे फोटो काढण्यात मग्न झाली. त्या मुलाने एक किंवा दोनच घास खाऊन चमचा खाली ठेऊन दिला, त्याचं पोट भरलं होतं की त्याला आवडलं नाही माहित नाही पण, त्याच्यासोबत असणा-या त्या दोघांनाही त्याला विचारलं नाही की त्याला भरवायचा प्रयत्न केला नाही!

थोड्यावेळाने मुख्य जेवण आलं आणि त्यासोबत आईस-टी आला.त्या मुलाच्या खाण्याबाबत मगाशचीच गोष्ट घडली.फरक इतकाच की त्याने आईस-टी पूर्ण संपवला.मलाच इतकं विचित्र वाटत होतं ना ते सगळं बघून!

कदाचित त्या छोट्या मुलाने हॉटेलमधे येण्याआधी काहितरी खाल्लं असेल म्हणून त्याची आई त्याला भरवत नव्हती की जेवण करण्याबद्दल आग्रह धरत नव्हती, खरं काय होतं माहित नाही. पण, ज्या पध्दतीने ते दोघेही त्या लहानग्याकडे दुर्लक्ष करत होते ते मला अजिबात पटलं नाही.

ह्या सगळ्या प्रसंगाकडे बघत असतांनाच मागे अजून एक दृश्य दिसत होतं..असंच तिघांचं एक कुटूंब जेवण करत होतं.आई तिच्या २वर्षाच्या मुलीला कडेवर सांभाळत जेवण करत होती, तिला भरवत होती, तिच्याशी बोलत होती. आणि ती मुलगी सुध्दा अगदी आनंदाने सगळ्या गोष्टींना प्रतिसाद देत होती.

दोन अगदी विरूध्द प्रसंग एकाच ठिकाणी घडतांना मी बघितले.

माझ्या मते, पहिल्या प्रसंगामधे जी बाई आहे ती नोकरी करणारी असावी आणि 'आय.टी.' मधे काम करणारी असावी जिला स्वतःच्या नव-यासोबत वेळ घालवायचा होता आणि स्वतःला पण वेळ द्यायचा होता.आणि मुलाला कदाचित जास्त वेळ तीच सांभाळत असेल तिच्या ऑफिसनंतर म्हणून आता हॉटेलमधे आल्यावर ती मुलाकडे लक्षही देत नव्हती!

याऊलट दुस-या प्रसंगामधे जी आई आहे ती कदाचित नोकरी करणारी नसावी, मुलीला सांभाळण्याचा तिला कंटाळा येत नसावा..तिचं पूर्ण विश्व फक्त तिची मुलगी असावी..

माहित नाही खरं काय ते ..पण मी मात्र खूप विचारात पडले..एकदा वाटलं त्या बाईने स्वतःला थोडा वेळ दिला तर काय चूक आहे त्यात? सारखं दुस-यासाठीच दिवसातले २४ तास मोजायचे का - मग तो मुलगा असो वा नवरा! पण मग असंही वाटलं की जर तिच्या लहान मुलाला तिने आत्ता वेळ नाही दिला तर कदाचित पुढे वेळ निघूनही गेलेली असेल!

दोनही प्रसंगांमधली कोणती आई बरोबर वागत होती आणि कोणती चूक माहित नाही पण, मला तरी असं वाटलं की, स्वतःच्या मुलांना शक्यतो जास्त वेळ द्यायला हवा. हल्ली नोकरीच्या निमित्ताने जसे दोघेही बाहेर असतात तसेच मुलंही शाळा-पाळणाघर-ट्युशन्स ह्यामधे व्यस्त असतात.ह्यामुळेच त्यांना आपल्या वेळेची आणि कदाचित त्यांच्यापेक्षा आपल्याला त्यांच्यासोबत जास्तीत जास्त वेळ राहण्याची खरी गरज निर्माण झाली आहे..

Friday, March 13, 2015

ओएमजी - ओह माय गुगल!

आजच्या टाईम्स मधे एक धक्कादायक बातमी वाचली
IITian who killed family fearing AIDS tests negative

गुगल..गुगल..गुगल!!! आयआयटी मधून शिकलेला माणूस सुद्धा नीट विचार करू शकला नाही आणि गुगल च्या नादाने काय करून बसला!!

म्हटलं तर गुगल चा काही दोष नाही ह्या घटनेमधे पण आज जी टेक्नॉलॉजी आपल्या हातात इतक्या सहजपणे खेळतीये तिचे दुष्परिणाम इतके भयंकर असू शकतात!!

'वेबबेड' म्हणून एक मालिका एम.टीव्ही या चॅनेलवर दाखवली जाते. त्यातही अशाच काही लोकांच्या कथा दाखवल्या जातात जे टेक्नॉलॉजीच्या आहारी जाऊन चुकीचे निर्णय घेऊन स्वतःचा किंवा
दुस-याचा जीव धोक्यात घालतात!!

हल्ली खुपच सोपं झालंय ना आपल्यासाठी, हातामधे ३जी मोबाईल असतो, काहीही अडलं की गुगल करा आणि उत्तर मिळवा.

कुठल्याही गोष्टीबाबत कुतूहल वाटणं साहजिक आहे पण, ते कुतूहल शमवण्यासाठी किंवा त्याबाबतीत माहिती मिळविण्यासाठी आपण जे स्त्रोत वापरतो ये कितपत योग्य आहेत आणि मिळालेली
माहिती कितपत 'खरी' आहे याची शहानिशा करतो का?

उदाहरणच द्यायचं झालं तर हल्ली H1N1 म्हणजे स्वाईन फ्लू ची प्रचंड साथ चालू आहे आपल्या भागामधे. ह्याबाबत काळजी कशी घ्यावी पासून ते होमिओपॅथीचं कोणतं औषध घ्यावं, कोणतं
फळ जास्त प्रमाणात खावं इतपर्यंत सर्व माहिती व्हॉट्स अ‍ॅपवरून किंवा फेसबुकवरून सर्सास इकडे-तिकडे पाठवली जात आहे. पण त्यात कितपत तथ्य आहे हे कोणी जाणून घेण्याचा प्रयत्न केला आहे का?

साधारणपणे आपल्याला जेंव्हा काही त्रास व्हायला लागतो म्हणजे सर्दी-खोकला किंवा ताप येणे, शरीर जेंव्हा काही वेगळी लक्षणं दाखवायला लागतं तेंव्हा आपण सहसा लगेच डॉक्टर कडे जात
नाही, मेडीकल वाल्याकडे जाऊन गोळ्या घेऊन येतो किंवा घरी असलेल्या गोळ्या घेऊन काम भागवतो.

पण, हल्ली असंही होत आहे की, काहीही झालं की आधी गुगलबाबाला विचारायचं, विशेषतः जी मुलं-मुली एकटी राहतात किंवा शिक्षणानिमित्त, कामानिमित्त घरापासून दूर राहतात त्यांच्यामधे
गुगलला विचारण्याकडे कल जास्त दिसतो.
हां तर मग गुगलबाबाकडून जे उत्तर मिळेल, समजेल किंवा आवडेल तो पर्याय निवडायचा आणि त्यानुसार पुढचं पाऊल उचलायचं.जर ती मात्रा लागू पडली नाही तरच मग डॉक्टरकडे जायचं! तिथे गेल्यावरही डॉक्टरला आपण 'गुगल'च्या कृपेने मिळविलेल्या ज्ञानाचा पाढा वाचून दाखवायचा आणि स्वतःच स्वतःच्या रोगाचं निदान सांगायचं!

आणि इथेच तर सगळी गम्मत घडत आहे! माहितीचा प्रचंड साठा असणा-या गुगल ला हे कळत नाही की कोणती माहिती खरीच 'खरी' आहे किंवा नाही. माहिती पुरवणं इतकंच त्याचं काम आहे पण तिचा उपयोग कसा आणि कुठे आणि किती प्रमाणात करायचा हे मात्र आपल्यालाच ठरवावं लागतं!

गुगलमधे जी माहिती मिळते ती तुमच्या-आमच्यासारखीच माणसं लिहून साठवतात. प्रत्येकवेळेस मूळ स्त्रोताचा संदर्भ दिलेला असतोच असं नाही त्यामुळे, डोळे उघडे ठेउन माहिती वाचा आणि शक्यतो खात्री करून घेऊन मगच तिचा उपयोग करा.