Thursday, December 31, 2015

मुली बदलल्या आहेत आरपार!!

संगीता अरबुने यांची हि कविता मी आणि माझ्या जनरेशनच्या असंख्य मुलींच्या वागणुकीचा खरा अर्थ सांगणारी आहे.

कवितेमधे वर्णिलेल्या सर्व गोष्टी एक मुलगी म्हणून पिढी दर पिढी तशाच केल्या गेल्या पाहिजेत ह्या अट्टहासामधून बाहेर निघणारी माझी पिढी प्रत्येक वेळेस 'का करायचं फक्त आम्हीच हे?' विचारत राहिली आणि मोठे लोक,'हे असं केलंच पाहिजे' इतकच काय ते उत्तर देऊ शकले.

पण हि कविता त्या सगळ्यांना ठणकावून सांगत आहे की आम्ही जे नाकारलं ते नेमकं कशाकरता.

लहानपणापासून आम्हांला सक्षम बनविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले गेले आणि जेंव्हा आगीत उडी घेऊन तावून सुलाखून बाहेर यायची वेळ आली नेमकं तेंव्हाच पूर्वापार चालत आलेल्या रूढींच्या बेड्यांनी जखडून टाकायचा प्रयत्न केला गेला!! पण नाही, इतकं सोपं नाही ते..कारण तुम्हीच दिलेली उर्जा आम्हांला ह्या बंधनांना तोडून पुढे जायचं सामर्थ्य देत आहे.

Tuesday, December 29, 2015

अक्कल

गेले काहि दिवस माझ्या आॅफिस आवारामधे कुत्र्याची ४-५ पिल्लं हिंडत आहेत. मी जमेल तसं त्यांना खायला घालते. काल असंच मी त्यांच्यासाठी कॅन्टीनमधून दूध आणलं आणि ताटली मधे प्यायला ठेवलं. तीनही पिल्लांनी चटचट आवाज करत दूध संपवलं म्हणून मी अजून दिलं पण त्यातल्या एकानेच तितकं संपवलं आणि मी परत ताटलीमधे दूध ओतेपर्यंत तिघेही तिथून बाजूला झाले आणि खेळायच्या पवित्र्यामधे माझ्याकडे बघत शेपूट हलवत उभे राहिले :)

एव्हढासा जीव आहे त्यांचा पण त्यांना पण कळतं की जितकं पोटाला गरजेचं आहे तितकचं खावं. मी असं पण ऐकलंय की सिंहाचं पोट भरलेलं असेल तर समोरून सावज जरी गेलं तरी तो काहिही करत नाही. बहुतेक तरी एक मानवप्राणी सोडला तर बाकी सगळ्यांना कळतं की पोटाला आवश्यक तितकचं अन्न खावं!!

विरोधाभास बघा, माणसाला अन्नाची चव कळते, बाकी प्राण्यांपेक्षा जास्त बुद्धी आहे त्यामुळे एकावेळी किती खावं-काय खावं हेही कळतं पण नाही आम्हाला अन्न वाया घालवायचंच असतं!!
अगदी रोज न-चुकता आमच्या कॅन्टीनमधे किलोने अन्न वाया गेलेलं दिसतं.आमच्या इथे काही स्वस्तात वगैरे जेवण मिळत नाही पण तरी लोक ताट ओसंडून जाइपर्यंत वाढून घेतात आणि मग नाही आवडलं किंवा पोट भरलं की सरळ ताट नेऊन टाकतात.

आॅफिस कॅन्टीन असू देत किंवा हाॅटेल, ताटातलं अन्न टाकून देण्याबाबत परिस्थिती सारखीच आहे!!

लग्न समारंभ किंवा आॅफिस पार्टी असेल तर मग काय विचारायलाच नको! अगदी भरजरी कपडे,दागदागिने घालून नटून-थटून आलेलं पब्लिक कधी न-मिळाल्यासारखं खायला घेतात आणि ताटात अन्न टाकून देतात. तुम्ही ह्याकरता बुफे पद्धत ठेवा नाहीतर वाढपी, लोक कशालाच जुमानत नाहीत!!

ह्यावर उपाय म्हणून असेल कदाचित पण पुण्यातल्या जुन्या काही हाॅटेलांमधे मी एक पाटी वाचली आहे-'ताटात अन्न टाकल्यास जादा पैसे आकारण्यात येतील', ह्या नियमाचं पालन खरंच कितपत काटेकोरपणे केलं जातं माहित नाही :(

मला कळत नाही की नेमकं काय कारण असू शकतं असं अन्न वाया घालवण्यामागे? तुम्ही पैसे देऊन अन्न विकत घेता म्हणून तुम्हाला ते फेकून देण्याचा हक्क मिळतो का? की अन्न फेकणं ही मोठी मर्दानगीची गोष्ट आहे??

हल्ली फेसबुकवर बरेच फोटोज येतात ज्यामधे, अन्न बनवायला किती प्रक्रिया करावी लागते आणि किती सहजतेने ते फेकलं जातं, ह्याबाबतीत जागरूकता करायचा प्रयत्न केला गेला आहे. लोक सवयीप्रमाणे ती पोस्ट पण न-वाचता किंवा नुसतंच बघून लगेच आपापल्या वाॅलवर शेअर करतात पण प्रत्यक्षात जेवतांना कितपत त्यांच्या लक्षात राहतं देव जाणे!!

मी जेंव्हा स्वयंपाक करायला शिकले तेंव्हा त्यात किती कष्ट असतात ह्याची जाणिव झाली आणि ताटात अन्न न-टाकण्याची लहानपणापासून असलेली सवय किती महत्त्वाची आहे हे जाणवलं.मुळात जेवायला घेतांना ताटामधे अन्न कमीच वाढून घेतलं की, चव आवडली नाही म्हणून फेकून देण्याची वेळच येणार नाही ना!!

माझी ही पोस्ट वाचून लाईक-शेअर नाही केलं तरी चालेल पण शक्यतो प्रत्यक्षात अन्नाची नासाडी करू नका आणि दुस-यांनाही करण्यापासून परावृत्त करा.

Sunday, December 13, 2015

लाल डबा

लाल डब्याने प्रवास करणं जितकं त्रासदायक तितकचं एन्टरटेनींग पण असू शकतं ह्याचा अनुभव आज ब-याच दिवसांनी घेत आहे.

बसमधे गर्दी आहे, बरेचसे लोक उभ्याने प्रवास करत आहेत.माझ्यासमोर च्या सीटवर बसलेले एक म्हातारे बाबा एकदम रंगात आले आहेत.कदाचित रोजची त्यांची ही 'घेउन' बडबड करायची वेळ असावी पण आज प्रवास करत असल्यामुळे ते बाबा बहुतेक फक्त बडबडीवरच भागवत आहेत.त्यांच्या बायकोने एव्हाना २-३ वेळेस अगदी 'हळूवार'पणे सौम्य शब्दात त्यांना दम दिला आहे पण अजून तरी म्हणावा तसा परिणाम दिसत नाही.:D

मागच्या रांगेमधे कोणीतरी बाई फोनवर कुठल्यातरी अगम्य भाषेमधे पण खरपूस टोनमधे समोरच्याचा समाचार घेत आहे. जवळपास १५मिनीटे ती बाई सतत बोलत आहे :D :D :D

कोणी कोणी फोनवर जोरजोरात बोलत आहेत तर कोणाचं पोर रडगाणं आळवतंय :D :D

आणि उरली सुरली जनता कानामधे हेडफोन कोंबून ह्या सगळ्या आनंदाला मुकत आहे,असो.

खिडकीच्या बाहेर निळसर-काळी रात्र सगळ्या सृष्टीला आपल्या कवेत घेत थंडीची पखरण करत पुढे सरकत आहे..

आणि चंद्रकोर..काळ्याभोर आकाशात नाजुकशी चंद्रकोर उगवलेली आहे..रस्त्यावरच्या डोळे दिपवणा-या प्रखर प्रकाशापुढे फारच विलोभनीय,नाजूक आणि सुंदर दिसत आहे :) :)

Thursday, December 10, 2015

अंधा कानून

आत्ता NDTV चॅनेलवर बरीच गहन चर्चा चालू आहे ज्यामधे वेगवेगळ्या क्षेत्रातली मंडळी आपापली मतं अगदी जोर देऊन सांगत आहेत.कोणी म्हणतंय की पैसा आहे म्हणून स**न खा* ने चांगला वकील केला अगदी हुशार मंडळींना वापरून स्वतःसाठी न्याय मिळवून घेतला. एकजन आजचा निर्णय देणा-या हायकोर्टाच्या जजला वाईट ठरवत आहे आणि एक जन स**न खा* कसा चांगला, त्याने किती चांगली कामं केली वगैरे चा पाढा वाचत आहे.

ह्या सगळ्या प्रकरणामधे नेमकं कोण दोषी?

NDTV चॅनेलच्या चर्चेनुसार तर मुंबई पोलिस दोषी कारण त्यांनी तपास निट नाही केला आणि म्हणून निर्णय हा लागला.

खरं तर नेमकं काय घडलं हे आपल्यासारख्या सामान्य माणसाला कळणं अत्यंत कठीण आहे कारण मिडीयाने जे आपल्याला सांगितलं तेच अापण बघितलं,ऐकलं आणि त्यानुसार चर्चा करून स**न खा* ला दोषी ठरवलं.

दोषी नेमकं कोण? कोणीही नाही सांगू शकत. आज १३वर्ष झाले पण ह्या केसचा निर्णय शेवटी लागलाच नाही, कारण त्या फुटपाथवर झोपलेल्या माणसाला मारलं कोणी हा प्रश्न अनुत्तरितच राहिला ना!!

खरंच 'अपने देश का कानून अंधा है क्या?'