Thursday, November 17, 2016

व-हाड निघालंय लंडनला

संदीप पाठक यांनी ह्या प्रसिद्ध नाटकाला पुन्हा एकदा रंगमंचावर आणलं आहे.
लहानपणी मी ह्या नाटकाचे प्रयोग ब-याचदा बघितले होते आणि कॅसेट तर आजही ऐकते.
हे नाटक म्हणजे एकपात्री प्रयोगामधलं शिवधनुष्यच आहे आणि ते उचलून धरण्याचा प्रयत्न संदीप पाठक यांनी केला आहे पण तो कुठेतरी केविलवाणा वाटत आहे.
कालच्या प्रयोगाला अगदी पाच-पन्नासच मंडळी होती कारण ५००-१००० च्या नोटांचा गोंधळ झाल्यामुळे तिकिटं बहुदा विकली गेली नव्हती.

कालचा प्रेक्षकवर्ग कमी होता म्हणून असेल किंवा नेमकं काय असेल माहीत नाही पण संदीप पाठक यांना ह्या नाटकाला पेलता आलेलं नाही.

मूळ नाटक बघितलेलं असल्यामुळे त्याच्याशी तुलना होणं साहजिकच आहे, पण तरी मी समोर उभ्या असलेल्या कलाकाराचा अभिनय बघायचा प्रयत्न केला.

तिसरी घंटा झाल्यावर नाटकाचं नाव, कलाकार अशी थोडीफार माहिती दिली जाते पण तसं काही न-होता पडदा लगेच उघडला आणि संदीप पाठक समोर आले. प्रेक्षकांना नमस्कार करत त्यांनीच नाटकाबद्दल माहिती दिली आणि प्रयोगाला सुरूवात झाली.

मराठवाड्यातल्या एका खेडेगावत राहणा-या गर्भश्रीमंत शेतक-याच्या घरात घडणारी ही गोष्ट आहे.त्याचा मुलगा लंडनला शिकायला जातो,एका मुलीच्या प्रेमात पडतो आणि त्यांचं लग्न ठरल्यापासून ते साक्षात लंडनमधल्या प्रशस्त हॉल मधे होण्यापर्यंतचा प्रवास ह्या नाटकातून आपल्यासमोर मांडण्यात आला आहे.

नाटक एकपात्री आहे त्यामुळे आवाजाच्या वेगवेगळ्या लकबीतून, चढ-उतारातून घरामधे असणा-या म्हाताऱ्या-कोता-यांपासून ते पोरांपर्यंत सर्व पात्रांना जिवंत करणं हे मोठं कसरतीचं काम आहे.

बाप्पा म्हणजे कुटुंबप्रमुख ह्यांचा धीरगंभीर आवाज, काशिनाथ म्हणजे त्यांच्या मुलाचा जरा बारीक पण वेस्टर्न अॅक्सेंट असणारा आवाज, बबन्या ह्या तरतरीत पोराचा उत्साह ओसंडून वाहणारा आवाज असे आणि गावातल्या वेगवेगळ्या मंडळींच्या बोलण्याच्या लकबी, घरातल्या बायकांच्या बोलण्याची ढब असा सगळा एकंदरीत आवाजावर बेतलेला अवघड मामला आहे हे नाटक म्हणजे!

श्री.लक्ष्मणराव देशपांडे यांचा आवाज जसा लागायचा अगदी तस्साच संदीप यांचा लागावा अशी अपेक्षा नाही पण, निदान त्या व्यक्तिरेखा ठळकपणे डोळ्यासमोर उभ्या राहाव्यात इतपत तरी चढ-उतार आवाजामधे असायला हवेत. नाटकाच्या सुरूवातीला थोडाफार आवाज लागत होता पण नंतर एकसुरी होत गेलं. त्यामुळे झालं असं की बाप्पा(काशिनाथचे वडील), बबन्या आणि काशिनाथ ही मंडळी डोळ्यासमोर उभी राहतच नव्हती.

ह्या व्यक्तिरेखांमधलं माझं आवडतं पात्र आहे बबन्या. त्याचे संवाद, बोलतांना इंग्रजी शब्दांची केलेली सरमिसळ हे मनोरंजक आहे पण ते समोर उभ्या असलेल्या कलाकाराला सादर करताच आलं नाही :( मला फार वाईट वाटलं,असो.

तुम्ही जर मुळ नाटक बघितलं असेल तर संदीप पाठक यांचं सादरीकरण न-पटण्यासारखं आहे पण, पहिल्यांदा बघत असाल तर एक घटका करमणूक होऊ शकेल. शेवटी इतकंच म्हणेन की, संदीप पाठक यांना अजून कसून मेहनत घ्यावी लागणार आहे तरच कुठे व-हाड 'व-हाड' वाटेल.

Friday, September 2, 2016

मखमली पाऊस

पुण्यात होणारा भुरभुर पाऊस मला खुप आवडतो ☺अगदी नाजुकतेने पावसाच्या लहरी आसमंतातुन जमिनीवर आच्छादल्या जातात.आजुबाजुचा परिसर काही क्षणात साॅफ्ट टोन फिल्म मधे टर्न होतो 😍😍सगळं धुसर अन धुंद दिसायला लागतं.नजर फिरवाल तिकडे डोंगरांवरची हिरवी मखमल मनाला सुखावत राहते.ना प्रखर प्रकाश ना पावसाळी ढगांचा काळोख एक वेगळाच करडा-पांढरा रंग सगळीकडे भरून उरलेला असतो 😊वारा शांत होऊन कुठल्यातरी कोप-यात पहुडलेला असतो पण हवाहवासा गारवा मात्र अंगावर क्वचित शहारा उठवतो.चुकुन एखादा पक्षी हवेत तरंगत जातांना दिसतो.संथ लयीत पडणा-या पावसामुळे रस्त्यावरून पाण्याचे ओघळ वहायला लागतात.खिडकीच्या काचेवर असंख्य जलबिंदू जमा होतात आणि त्यातून बाहेरचं जग एकदम जादुई भासायला लागतं 😊😊

Friday, July 29, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ४

आता तर माझा घराच्या बाबतीतला उत्साह पूर्णपणे मावळला होता म्हणून मी एक महिना काय दोन महिने होत आले तरी जायचं नाव घेत नव्हते. शेवटी नवरा म्हटला की जे असेल ते असेल बघून तर येऊ काय परिस्थिती आहे. हो-नाही करत शेवटी मी तयार झाले आणि गेलो आम्ही बघायला.

आश्चर्य म्हणजे घराचं सगळं काम व्यवस्थित करून ठेवलेलं होतं :)

तरी माझी खात्री करून घेण्याकरिता मी पुन्हा एकदा कसून तपासणी केली आणि समाधानाचा सुस्कारा सोडला, हाश! झालं बाबा माझं घर तय्यार :)

हं लागले १८ महिने पण झालं एकदाचं :)

मग बिल्डरला तारीख कळवली आणि आई-बाबा, भाऊ, मी आणि नवरा आम्ही किल्ली घ्यायला आणि घरामधे कलश ठेवायला गेलो.

घराच्या दारावर स्वतःच्या नावाची पाटी बघून इतकं भरून आलं ना एक क्षण :) आनंदाश्रू दाटून आले होते आणि नव-याच्या चेह-यावर सुद्धा माझ्याबद्दल दिसून आलेला अभिमान अजूनच सुखावून गेला :)

स्वयंपाकघरामधे गणपती बाप्पाचा फोटो आणि कलश ठेऊन पुजा केली.देवाला साष्टांग नमस्कार करून आधी थॅन्क्स म्हटलं आणि आता घराची काळजी घेण्याची जबाबदारी तुझ्यावर असं बजावलं :)

घरात फिरून मस्त फोटो-बिटो काढले आणि समाधानाने परत आलो.

आता नविन घरामधे कधी जायचं रहायला ह्याची स्वप्न रंगवायला मी आणि नवरा सज्ज झालो होतो पण!

हो ना! हा 'पण' काही माझी पाठ सोडतच नव्हता :(

नविन घर म्हटल्यावर फर्निचर केल्याशिवाय राहायला कसं जाणार. बरं नुसतं घरामधलं फर्निचर करून उपयोग नव्हता. घर पहिल्या मजल्यावर असल्यामुळे तीन बॅल्कनीज ना जाळी लावावी लागणार होती, सेफ्टी डोअर करावं लागणार होतं. आणि सर्वात महत्त्वाचं होतं ह्या सगळ्याकरता पैसे कसे उभे करायचे!!

एक पर्याय होता परत एकदा एल.आय.सी. कडून फर्निचर साठी लोन घ्यायचं. चौकशीअंती कळालं की, लगेच असं लोन नाही मिळत निदान एक वर्ष थांबावं लागेल. दुसरा पर्याय म्हणजे पर्सनल लोन काढायचं.

हम्म! पण आधी नेमका किती खर्च येईल हे काढायचं ठरवलं. माझ्या ओळखीतल्या एका आर्किटेक्टला आम्ही घर दाखवलं आणि जुजबी फनिर्चर करून घ्यायला किती खर्च येऊ शकतो हे विचारलं. त्याने साधा सरळ हिशोब सांगितला - प्रत्येक खोली निदान १लाख रूपये. ह्याव्यतिरिक्त सेफ्टी डोअर आणि तीन बॉक्स जाळ्या ह्याला अजून पाऊण-एक लाख लागणार. म्हणजे काय तर मला अजून ५लाखाचं कर्ज डोक्यावर घ्यावं लागणार होतं! लोन घ्यावं का परत हा विचार एकीकडे चालू होता आणि दुसरीकडे बिल्डरकडून पझेशन नंतर जी काही महत्त्वाची कागदपत्रं यायला हवी होती त्याची चौकशी करावी म्हणून एकदा भेटायला गेले.

सहज त्याला म्हटलं, की आता माझा फर्निचर करायचा विचार आहे आणि सेफ्टी डोअर वगैरे पण करणार आहे. तर तो म्हटला, घराच्या आतमधे काय हवं ते करा पण सेफ्टी डोअर किंवा बॉक्स जाळी वगैरे काहीही करायच्या भानगडीत पडू नका कारण अजून Q.C. / C.C - क्वालिटी आणि कम्पलिशन सर्टिफिकेट आलेलं नाही!

आता ही काय नविन भानगड असं विचारल्यावर म्हणतो - घर / बिल्डींग बांधून झाली की महानगरपालिका / ग्रामपंचायत येऊन पाहणी करते आणि मग 'ही वास्तू राहण्यालायक आहे' असं सर्टिफिकेट देते त्यानंतरच तुम्ही रहायला जाऊ शकता.

पुढचा ऑब्वियस प्रश्न होता की, हे सगळं कधी घडणार? किती वर्षांनी मिळणार? त्यावर त्याने अगदी सुंदर स्मितहास्य केलं आणि म्हटला की, मी माझ्यापरिने प्रयत्न करत आहे तरी अजून ६ महिने मिळेल असं वाटत नाही.

६ महिने! आता परत थांबणं आलं. ह्याव्यतिरिक्त अजून एक अडचण होती ती म्हणजे माझं ऑफिस हिंजवडी च्या अगदी विरूध्द टोकाला म्हणजे मगरपट्टामधे होतं. जर इथे रहायला आलो तर रोज मला निदान ५०कि.मी. स्वतः गाडी हाकत जावं लागणार होतं!

सरतेशेवटी आम्ही घर भाडेतत्त्वावर द्यायचं ठरवलं आणि तशी जाहिरात दिली. १महिन्यात आम्हांला हिंजवडी भागामधे आय.टी. कंपनी मधे काम करणारी ५ मुलं भेटली आणि ११ महिन्याच्या करारानुसार आम्ही त्यांना घर रहायला दिलं.

खरं तर जीव थोडाथोडा होत होता, स्वतःचं घर ते पण इतक्या महत प्रयासाने मिळाल्यावर असं दुस-याला रहायला देतांना वाईट वाटत होतं पण पर्याय नव्हता. घर नुसतं रिकामं ठेऊन खराब झालं असतं आणि दुसरं म्हणजे आम्ही सुध्दा भाडेतत्त्वावर राहत होतो तर तितकाच आमचा खर्च भागला असता.

एकीकडे घराचा हा प्रश्न सोडवून मी परत सहा महिन्यांनी बिल्डरकडे चौकशी केली की, त्या सर्टिफिकेटच काय झालं. तर त्याने कारणं द्यायला सुरूवात केली. तोवर इकडे बिल्डींगमधे बरीच मंडळी रहायला आली होती.व्हॉट्स-अप ग्रुप बनवून आम्ही सगळे एकमेकांना अडचणी - अनुभव सांगत होतो. प्रत्येकजण कम्प्लिशन सर्टिफिकेट साठी थांबला होता. पण बिल्डर मात्र सगळ्यांना वेगवेगळी कारणं देऊन टोलवत होता.

शेवटी एकदा तुकडा पाडायचा म्हणून मिटींग बोलावली तर त्याने स्पष्टपणे सांगितलं की, माझा प्रोजेक्ट अजून पूर्ण झालेला नाही, जोवर ह्या बिल्डींगच्या आवारात अशीच एक नविन बिल्डींग उभी राहत नाही तोवर मी ग्रामपंचायती मधे सोसायटी फॉर्मेशन साठी अर्ज करणार नाही आणि तोवर ते लोक काहीही बघायला किंवा सर्टिफिकेट द्यायला तयार होणार नाहीत!

झालं! आता आम्ही सगळेच एका नव्या चक्रामधे अडकले गेलो होतो!

आज ३ वर्षे झाली हा तिढा अजुनही सुटलेला नाही..

Thursday, July 28, 2016

माझं पहिलं घर :) - भाग ३

दोन महिने उशीर झाला होता म्हणून बिल्डरने मला दर दिवसाचं व्याज लावलं आणि सरळ सरळ १लाख रूपये मला जास्त भरायला सांगितले :(

आता तर मी रडायचंच बाकी ठेवलं होतं पण नव-याने मला धीर दिला आणि पझेशनच्या वेळेस बघू काय करायचं ते असं ठरलं.

पुढे मग बिल्डरच्या डिमांड्सना 'एल.आय.सी.' कडून चोखपणे चेक्स मिळत गेले.

बिल्डर ने छातीठोकपणे सांगितलं होतं ( जे प्रत्येकच बिल्डर सांगतो ) की ८ महिन्यांमधे पझेशन देतो! पण १० महिने उलटून गेले तरी काम पूर्ण होता दिसत नव्हतं! मी परत एकदा बिल्डरच्या ऑफिसच्या वा-या करायला सुरूवात केली पण हाय रे कर्मा! सगळं मुसळ केरात!

सरतेशेवटी १५ महिन्यांनी मला घराचा ताबा मिळू शकतो असं बिल्डरचं ई-मेल आलं.

आम्ही दोघे धावतच घराची परिस्थिती बघायला गेलो आणि भली-मोठ्ठी यादीच निघाली अव्यवस्थित कामांची!

सगळ्या भिंतींवर असंख्य भेगा पडल्या होत्या, मुख्य दरवाजा तिरपा लावला होता, खिडक्यांच्या फ्रेम्स आणि भिंत ह्यामधे असलेली जागा व्हाईट सिमेंटने भरलीच नव्हती, असे एक ना अनेक प्रश्न समोर होते.असं असतांना मी पझेशन घेणं शक्यच नव्हतं!

मग काय परत एकदा बिल्डरच्या मागे धावणं चालू केलं. साईट वरच्या इंजिनीयर ला सगळं दाखवलं आणि किती दिवसात पूर्ण होईल असं विचारलं तर म्हणतो,'दोन दिवसात करून देतो बघा मॅडम तुम्हांला, काही काळजीच नका करू तुम्ही!'त्याचा आवेश बघून आम्हाला वाटलं खरंच करेल हा.

पण इतक्या सहजासहजी मला घर मिळावं असं बहुतेक नियतीला मंजूर नव्हतं ;)

अगदीच दोन नाही पण नेक्स्ट विकांताला आम्ही गेलो तर कळालं, ज्याने इतक्या बिनधास्तपणे आम्हांला 'दोनच दिवसाचं' आश्वासन दिलं होतं तो त्याच दिवशी नोकरी सोडून निघून गेला होता!

सगळी मजाच मजा चालू होती मला तर हसावं की रडावं तेच कळत नव्हतं!

मग त्या दिवशी जो नविन साईट इंजिनीयर होता त्याला शोधून आणला, परत सगळी रामकथा प्रात्यक्षिकासहीत त्याला समजावून सांगितली आणि विचारलं, बाबा रे! कधी करू शकशील हे काम तु?! तर तो म्हटला तुमच्या फ्लॅटचा नंबर अजून एक महिन्याने लागेल कारण ह्या आधी ज्यांनी तक्रारी नोंदवल्या आहेत त्यांची कामं मला करावी लागतील! झालं आता अजून एक महिना म्हणजे '३० वर्किंग डेज' थांबावं लागणारं होतं!

Monday, July 25, 2016

माझं पहिलं घर :) - भाग २

खेल तो अभी शुरू हुआ था!!!

टोकन मनी देऊन मी आणि बाबा परतलो होतो, त्यापुढे रजिस्ट्रेशन ची मोठी कामगिरी पार पाडायची होती.

त्याआधी बाबांनी एका वकिलातर्फे प्रोजेक्टची सगळी कागदपत्रं तपासून खात्री करून घेतली. मग चांगला दिवस बघून आणि रजिस्ट्रार ऑफिसमधून अपॉईंटमेंट घेऊन आम्ही बिल्डर सोबत गेलो आणि काम फत्ते केलं.

आता मला बँकेच्या माणसाकडून लोनची सगळी प्रोसिजर पूर्ण करून पहिला चेक काढून घ्यायचा होता.

घर घेण्याच्या बाबतीत नविन माणसाला कुठे कुठे म्हणून ठेचा लागू शकतात ह्याची सुरूवात माझ्यासाठी इथपासून झाली.

माझं पहिलंच घर म्हणून आणि लग्न झालेलं नसल्यामुळे माझ्या आणि बाबांच्या नावाने घराचं रजिस्ट्रेशन करून घेतलं होतं. मी बुक केलेल्या प्रोजेक्टला Axis Bank फायनान्स करत होतं म्हणून मी त्यांच्याकडेच गेले. त्या बँकेच्या माणसाने माझी आणि बाबांची जी काहि कागदपत्रं हवी होती ती सगळी घेतली आणि ११,५००रू. रोख प्रोसेसिंग फीस घेऊन काम पुढे चालू केलं. तोवर इकडे बिल्डरने पहिला चेक काढला.

मी बँकेच्या माणसाला फोन करून चौकशी केली तसं त्याचं उत्तर आलं की, अजून एक आठवडा लागेल पण तुमचं काम होऊन जाईल. मी एका आठवड्याने परत फोन केला पण तेच उत्तर आलं! इकडे बिल्डरला मी रिक्वेस्ट करून मुदत वाढवून घेतली आणि बँकेच्या मागे तगादा लावला. अजून दोन आठवड्याने मला बँकेने मेल करून कळवलं की, माझ्या अॅग्रिमेंटमधे बाबांचं नाव आहे ज्यामुळे पुढे जाऊन लीगल कॉम्पलिकेशन्स होऊ शकतात म्हणून आम्ही तुम्हाला लोन देऊ शकत नाही!! मला पहिला झटका बसला!

ते मेल वाचून मी बँकेच्या माणसाला फोन केला तर तो माणूस म्हणतो की हो बरोबर आहे हे! मी म्हटलं, पहिल्या दिवसापासून तुम्हाला माहित होतं की, जर असं माझ्या वडिलांचं नाव असेल तर बँक लोन देणार नाही तर तुम्ही आधीच का नाही मला कल्पना दिली?? तर निर्लज्ज काहिच बोलायला तयार नाही!

मी मुंबईहून तडक पुण्याला आले आणि त्याच्याशी भांडायला लागले पण तो म्हणतो आता एकच पर्याय आहे की, तुमच्या वडिलांना परत एकदा रजिस्ट्रेशन करून फक्त तुमच्या नावे हा फ्लॅट करायला सांगा. पुन्हा एकदा रजिस्ट्रेशन म्हणजे सरळ-सरळ ४लाखाचा खर्च!!

तोवर गिफ्ट रजिस्ट्रेशन हा नियम आला नव्हता ज्यामधे फक्त ५००रू. मधे हे काम होतं, तो नियम ह्या घटनेनंतर दोन वर्षांनी अस्तित्वात आला!

त्याची ही मुक्ताफळं ऐकून माझ्या डोक्याला मुंग्याच आल्या! भरीत भर माझे ११,५००रू. जे त्याने प्रोसेसिंग फीस म्हणून घेतले होते ते पण परत मिळणार नव्हते :( :(

तिकडे बिल्डरने दुस-या टप्प्याचं काम पूर्ण झालं म्हणून नविन चेक ची डिमांड केली होती आणि इथे माझं होम लोन होण्याचा पत्ता नव्हता!

काय करावं सुचत नव्हतं, एकदा वाटलं घर नको घ्यायला का? परत वाटलं, रजिस्ट्रेशन पण करून झालंनंतर, आता मागे फिरलो तर नुकसानच आहे फक्त! मग काय परत डोळ्याला पाणी लावण्यापासनं सुरूवात!

इतर बँकांना मेल करून चौकशी चालू केली. सगळ्या बँकांनी एकच टिमकी वाजवली की तुमच्या एकट्याचं किंवा असेल तर नव-याचं नाव लावा! आणि 'एस.बी.आय' बँकेचं तर जगावेगळंच गणित आहे. त्यांच्याकडे जर प्रोजेक्ट लिस्टेड नसेल तर ते एकतर दारात उभं करत नाहीत. पण आपण जोर लावायचं ठरवलं तर सांगतात कमीत-कमी ६ महिने लागतील सगळं व्हायला. असं ऐकल्यावर कोण थांबणार आहे म्हणजे निदान मला तरी शक्य नव्हतं :(

दरम्यान माझं लग्न ठरलं आणि होणा-या नव-याच्या मित्राने 'एल.आय.सी.' फायन्सान मधून होम लोन घेतल्याची बातमी कळाली. लग्गेच तिकडे चौकशी केली आणि चक्क त्या लोकांनी माझं रजिस्ट्रेशन डॉक्युमेंट बघून 'हो' म्हटलं :) :)

देवच पावला मला तर :) :)

एल.आय.सी. वाल्यांनी शक्य तितक्या लवकर माझी फाईल प्रोसेस केली आणि पहिला चेक निघाला :) :)

पण!

Friday, July 22, 2016

माझं पहिलं घर :) - भाग १

काल एका मैत्रिणीच्या नविन घराबद्दल वाचलं आणि मी घेतलेल्या पहिल्या-वहिल्या घराच्या आठवणी जाग्या झाल्या.

स्वतःचं घर असावं ही माझी इच्छा पहिली नोकरी लागली तेंव्हापासून मनामधे घर करून होती पण, होम लोनचं गणित जुळवून आणे पर्यंत मी तिस-या कंपनीमधे पोहोचले होते.

नुकतीच पुण्यामधून मुंबईला शिफ्ट झाले होते. पण, घर मात्र पुण्यातच घ्यायचं हा निर्णय पक्का करून मी मुंबई-पुणे-मुंबई अशा खेटा दर विकांताला घालायला सुरूवात केली. सुरूवातीला कोथरूड ह्या माझ्या आवडत्या भागामधे बरीच सेकंड हॅण्ड घरं बघितली पण पसंत पडेना, मग बावधन बघितलं. तिथे एक घर बरं वाटलं म्हणून आई-बाबा आणि जिजूला दाखवलं, पण त्या बिल्डिंगमधे एकूण ६च फ्लॅट्स होते तर जिजू म्हटला इथे सोसायटी होऊ शकत नाही त्याकरता कमीत-कमी ९/१२ फ्लॅट्स लागतात.

मग सर्वानुमते मी नवं कोरं-करकरित घर घ्यावं असं ठरलं आणि 'आय.टी.' च्या पंढरी मधे म्हणजे हिंजवडी भागामधे मी शोधमोहिम आखली.

सगळ्यात आधी मी होमवर्क करायचं ठरवलं. वेगवेगळ्या बँकांना संपर्क करून माझ्या पगारानुसार मला किती होम लोन मिळू शकतं ह्याचा अंदाज बांधला.त्यानंतर हिंजवडी भागामधे किती प्रोजेक्ट्स चालू आहेत आणि तिथे काय रेट आहे हे विचारून घेतलं. माझ्या बजेटमधे फक्त १बी.एच.के. बसत होता म्हणून मग ती पण चाळणी लावली आणि एक यादी तयार केली.

त्या यादीनुसार दर विकांताला एक किंवा दोन जसं जमेल तसं प्रोजेक्ट्स ला आणि आजूबाजुच्या परिसराला भेट देत गेले.सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ही लक्षात आली की जिथे जास्त अ‍ॅमेनिटीझ तिथे सगळ्यात जास्त रेट!

मी थोडा विचार केला आणि घरातल्यांसोबत चर्चा केली की, सोसायटीमधे असणा-या कोण कोणत्या अशा सुविधा खरंच आपण वर्षभर अगदी न-चुकता वापरतो, वापरू शकतो?

अ‍ॅमेनिटी़झ मधे अंतर्भुत केलेल्या गोष्टी - स्विमिंग पूल, जिम, कम्युनिटी हॉल ( ह्यासाठी अ‍ॅनुअल मेंटेनन्स भरायचा असतो आणि त्याव्यतिरिक्त जेंव्हा प्रत्यक्ष वापरायचा असेल तेंव्हा वेगळं ठराविक भाडं सोसायटीला द्यावं लागतं!), प्ले एरिया फॉर चिल्ड्रेन, एखादं मंदिर, जॉगिंग पार्क आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला बेंचेस.ह्याव्यतिरिक्त पण अजून काही ऑप्शन्स असतात जसं मॉल/ हॉटेल्स/ सिनेमा थियटर इ.

इतकी मोठी यादी बघितल्यावर मी एकच विचार केला की, अगदी १००% खात्रीने मी ह्या पैकी एकाही गोष्टीचा उपयोग नजिकच्या काळात करणार नाही मग कशाला उगाच जास्त पैसे मोजा! त्यामुळे यादी मधून अजून १०-१ प्रोजेक्ट्स गळाले.

राहता राहिलेल्या ठिकाणी मी प्रत्यक्ष जाऊन, हिंजवडीमधल्या ऑफिसेस पासून त्या जागांचं अंतर, तिथे असणारी वस्ती, किराणा मालाचा दुकान असं जे त्या घरामधे राहायला आल्यावर अत्यंत निकडीचं असेल असं सगळं बघितलं आणि शेवटी २ प्रोजेक्ट्स फायनल केले.

आता परत एकदा घरच्यांची बैठक बसली आणि त्यातल्या त्यात कुठे बरं घ्यावं घर ह्याचा खल चालू झाला, शेवटी बराच काथ्या कुटल्यावर मी २बी.एच.के. घ्यावा असं ठरलं. पण त्यामुळे बजेट सॉलिड ताणल्या जाणार होतं माझं!

त्यामुळे माझा निर्णय काही पक्का होत नव्हता. मग माझा मामा म्हटला की सुरूवातीचे काही वर्ष जड जाईल तुला इ.एम.आय. भरतांना पण जेंव्हा लग्न होईल, तुझं कुटुंब असेल तेंव्हा घराला अजून एक खोली असती तर बरं झालं असतं असं सतत वाटत राहिल. पण तेंव्हा हे घर वाढवायचा स्कोप नसेल आणि कदाचित हे विकून नविन मोठं घर घ्यायची वेळ येईल!

हं, पॉईंट तो एकदम बरोब्बर था मेरे मामाजी का लेकीन बजेट!!

मग काय, आहेत नाहीत ते सगळे खिसे झटकले आणि वर लोन पण थोडं वाढवून हिम्मत केली आणि एकदाचा फ्लॅट बुक केला!!

त्या दिवशी आपण आयुष्यामधे खुप मोठ्ठं काहितरी अचिव्ह केलं आहे ह्या खुशीत तरंगतच मी मुंबईला पोहोचले :)

लेकीन...

Sunday, July 10, 2016

सॉरी

Gubbare https://www.youtube.com/watch?v=uy4MRiu1-Dw

 आज सकाळी उठल्यावर फेसबुक चाळतांना कोणीतरी शेअर केलेली ही 'गुब्बारे' नावाची शॉर्ट फिल्म बघितली.अजून बघितली नसेल तर नक्की बघा, खुप सुंदर आहे :)

'sorry' - किती छोटासा आणि सोपा शब्द आहे नं पण दुस-याचा विशेषत: नव-याचा किंवा बायकोचा राग आला असतांनाही म्हणायची वेळ आली तर खुप्पच मोठ्ठा आणि अवघड शब्द!!

रोज असं घडतंच की काहीतरी खुट्ट होतं आणि तो तरी नाराज किंवा मी तरी नाराज..मग आॅफिसमधे आहे म्हणून बोलणं होत नाही आणि घरी आल्यावर नेमकं कशामुळे बिनसलं हे शोधायची ताकद उरलेली नसते. मग वाद दुस-या दिवसावर 'हच्चा' म्हणून चढत राहतो अगदी शनवार उगवेपर्यंत!!

वीकांताला निवांत वेळ मिळाला की काहीही कारण चालतं आणि त्या दिवशी झालेल्या एका क्षुल्लक कारणावरून, जे खरंतर मधे कुठेतरी विरघळून गेलेलं असतं, जे भांडण झालं त्याचं चक्रवाढ व्याज उतरवायला.

पण एकदा का वाद घालून झाला की मग सगळं सरळ होतं!!

पण ह्या सगळयामुळे एक पूर्ण आठवडा घरात अबोलीच्या फुलांचा सडा पडलेला असतो, एकमेकांसोबतचे कितीतरी महत्वाचे क्षण हरवून गेलेले असतात..मग वाटतं एकदा 'साॅरी' म्हटलं असतं तर....

Sunday, July 3, 2016

पावसाळी उकळ्या :p

बाहेर पडणारा सुखद पाऊस..भान हरपुन बघणारी मी, अंगावर शहारे उठवणारा गार वारा..अन.. अलगद मला कवेत घेणारी तुझी ऊबदार मिठी..ह्यालाच म्हणतात सुख :) :)

पावसाच्या एका थेंबाने मनातल्या डोहावर असंख्य आठवण-लहरी उठतात..
एक दुस-यात मिसळते आणि वलय मोठं होत होत ह्या क्षणाला येऊन भिडतं..
पाऊस फार लब्बाड आहे :( त्याच्या बरसण्यासोबत तुझी आठवण येणं अगदी क्रमप्राप्त!
अन मग सुरु होते जीवघेणी स्पर्धा..त्याच्या बरसण्याची आणि मी तुझ्या आठवणीत जळत राहण्याची

पाऊस. पाऊस. पाऊस.
नुसतं बघत बसावं त्याचं मनमोहक नृत्य..
एका लयीत येणारी संततधार किंवा विजेसोबत केलेलं तांडव..
गात्र सुखविणारा पण तितकाच छळणारा पाऊस..
झाडा-पानांवरची धूळ सारत लख्ख करणारा आणि मनात मात्र आठवणींचा काळोख भरणारा..
अतीव उत्साहाने धरित्रिला बिलगणारा आणि तुझा-माझा विरह अधोरेखित करणारा..फार वाईट असतो हा पाऊस..

खिडकीच्या तावदानांवर थपडा मारत हाका मारतोय बाहेरचा पाऊस पण रागावली आहे मी त्याच्यावर..का नेहमी असा वागतो तो..जेंव्हा तू सोबत नसतोस तेंव्हाच का येतो :/ त्याला चांगलंच माहित झालं आहे कि मी त्याच्यापेक्षा तुझ्यावर जास्त प्रेम करते म्हणूनच कि काय असा क्षण साधून येतो हल्ली...

पावसाला ना शिक्षा करायला हवी असा नेमक्या कातरवेळी का येतो तो..सगळ्या सृष्टीवर निळी जादू करतो..घरभर निळसर प्रकाश भरून मलाहि त्या निळाईत भिजवून टाकतो..खिडकीपाशी येऊन मी भान हरखून त्याला बघत राहते आणि तो माझ्याकडे बघून फक्त हसतो..कदाचित मला वेडू म्हणत असेल मनातल्या मनात..कारण.. त्याच्या रुपात मला तुझीच छबि दिसते हल्ली ..तसं म्हटलं तर पावसाचा माझ्यावर पहिला हक्क कारण तुला भेटण्याअगोदर त्यानेच तर मला प्रेम करायला शिकवलं..निस्सिम प्रेम..जे त्याचं धरित्रिवर आहे..कितीही काहीही झालं तरी त्याचं येणं..तिला चिंब भिजवून कवेत घेणं..तिच्या सौंदर्याला खुलवणं हे ठरलेलं आहे..तुम्हा दोघांमधे हे साम्य नक्कीच आहे..

पावसाचा जोर ओसरुन तो शांतपणे काळ्याकभिन्न ढगांमधे विसावला आहे..सभोवतालचा निसर्ग तृप्त तना-मनाने स्तब्ध झाला आहे..शांतता काठोकाठ भरून उरली आहे पण माझ्या मनाची कवाडं घट्ट बंद झाली आहेत. कोणत्याही परक्या गोष्टीला, विचारांना आत येण्याची मुभाच नाही जणू ..
आत प्रचंड उलथा-पालथ सुरु आहे, मनाचा आक्रोश चालू आहे..तुझ्या सगळ्या आठवणींनी थैमान मांडलंय..तुझा स्पर्श, तुझे शब्द..तुझं हसणं आणि आत्ता माझ्यापासून दूर असणं..असह्य होतंय मला..हतबलता आली आहे गात्रांना आणि मनाला शीण..तुझं माझ्यात असणं पण माझ्या मनाला दिलासा देत नाही..नाही शक्य मला तुझ्यापासून दूर राहणं निदान ह्या अशा क्षणी!!

Thursday, June 23, 2016

ओ वुमनिया

नाटकः ओ वुमनिया
लेखक: शेखर ढवळीकर
दिग्दर्शकः मंगेश कदम
कलाकारः सुहास जोशी (माय फेव्हरेट),सतिश पुळेकर (अजुनही हॅण्डसम दिसतो यार हा माणुस ;) ), स्वाती चिटणीस, जयंत सावरकर, कादंबरी कदम, आशुतोष गोखले.

नाव ऐकून तुम्हाला कल्पना आलीच असेल की हे नाटक तुमच्या-आमच्या मुली/स्त्रिया/बायका ह्यांवर बेतलेलं आहे. आजीपासून ते पार आजच्या पिढीतल्या माझ्यासारख्या मिसळपाव विचार करणा-या मुलीपर्यंतचा स्त्रीचा प्रवास ह्या नाटकात आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

स्टोरीलाईन हिच आहे आणि आजीची पिढी मग आईची पिढी आणि आजच्या मुलीची पिढी असं तिन जणींनी आपल्याला दाखवलं आहे. बघतांना असं वाटत होतं की हे रोजच आपण आपल्या घरामधे, आजुबाजूला बघत आलो आहे आणि बघत आहे.

याबरोबरीनेच आणखिन एक महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे - पुरूष. अर्थात स्त्रीयांबाबतीत त्यांचं वागणं पिढ्या दर पिढ्या कसं बदललं किंवा नाहीच बदललं हे यातून सांगायचा प्रयत्न केला आहे. मुख्य भर स्त्रीविषयी आहे आणि योग्य ठिकाणी नवरा ह्या प्राण्याला अगदी कोपरखळीपासून ते ढोपर मारण्यापर्यंत सगळं दाखवलं आहे.

विषय जरी तोचतोच असला तरी संवाद हलके-फुलके आहेत आणि मुख्य म्हणजे कसदार कलाकार आहेत त्यामुळे नाटक व्यवस्थित एंजॉय करता येतं :) :)

सुहास जोशी खुपच मस्त आहेत, त्यांचा रंगमंचावरचा वावर इतका सहज आहे की जणू आपण त्यांच्याशी त्यांच्या घरात गप्पा मारत बसलो आहोत.आजी आणि सासू ह्या दोन पात्रामधे त्यांच्या चेह-याचे हावभाव, आवाजाची पट्टी इतकं सुरेख आहे की आपण एक क्षण अचंबित होतो इतका नैसर्गिक अभिनय, वाह!

सतिश पुळेकर प्रदिर्घ काळानंतर नाटकामधून प्रेक्षकांसमोर आले आहेत पण अभिनयाबाबतीत काही वादच नाही.दिसायला तो माणूस अजुनही भारी दिसतो, मुळात मी लहान असतांना त्यांचे चित्रपट बघितले होते तेंव्हाचा चेहरा-अंगकाठी आणि अभिनय अगदी तस्सच आहे.

स्वाती चिटणीस ह्यांचं हे दुसरं नाटक बघितलं मी, त्यांचा अभिनय सुद्धा सहज आहे पण शरीरयष्टी ब-यापैकी बेढब वाटत आहे निदान 'शेवग्याच्या शेंगा' नाटकापेक्षा.

जयंत सावरकर हे तर अगदी नावाजलेले चित्रपट-नाट्यसृष्टी गाजवलेले मातब्बर कलाकार आहेत, त्यांच्याविषयी मी काय बोलणार.मला त्यांचा मेक-अप विशेष म्हणजे मिशी फार आवडली ;)

कादंबरी कदम! हिचं पण मी हे दुसरं नाटक बघितलं, ह्यावेळेस जरा कमी शिरा ताणून अभिनय करायचा प्रयत्न केला आहे, जरा बरं वाटलं त्यामुळे. बाकी तिची उंची कमी असल्यामुळे की काय तिच्या उभं राहण्याची पध्दत आणि चेह-यावरचे हावभाव यांची सांगड काय अजून जुळली आहे असं वाटत नाही! बाकी एका प्रसंगामधे तिने गुजराथी मुलीचं जे बेअरिंग घेतलंय ते छान जमलं :)

आशुतोष गोखले ह्या कलाकाराला मी पहिल्यांदा बघितलं, त्याला विशेष काम नाही एक प्रसंग सोडला तर पण त्याचे कपडे किंवा मेक-अप हे फारच बोरिंग आहे.तो काटकुळा आहे त्यामुळे अजूनच विचित्र वाटतं.हे लोक थोडी बॉडी का बनवत नाहीत? साधारण सगळेच मराठी कलाकार/ हिरो असेच आहेत,स्वतःच्या शरिरयष्टीकडे अजिबात लक्ष देत नाहीत.

असो, तर नाटक छान आहे आणि शक्य असेल तर नवरा/बॉयफ्रेंड ह्यांसोबत बघा म्हणजे त्यांना न-कळत पणे थोडं फार त्यांच्या पार्टनरचं महत्त्व कळेल( जर अजून कळालं किंवा व्यक्त केलं नसेल तर )

Wednesday, May 11, 2016

म्युझिक रिव्ह्यू अर्थात सैराट चा

सध्या सगळीकडे 'सैराट'ची हवा जोरदार चालू आहे. मी तो चित्रपट अजून बघितला नाही पण गाणी कालच पहिल्यांदा व्यवस्थित ऐकली.

'याड लागलं' ह्या गाण्याचं म्युझिक आणि रेकॉर्डिंग प्रसिद्ध 'सिफ्मनी स्टुडियो' मधे झालं आहे. गाण्याची सुरूवात ऐकतांना जाणवलं की किती मधुर संगीत आहे आणि त्याची ओरिजिनॅलिटी लगेच लक्षात आली पण जेंव्हा मराठी शब्द कानावर पडले तेंव्हा अगदी जमिनीवर आल्यासारखं वाटलं.

अर्थात गायकाचा आवाज, शब्द छान आहेत पण हे गाणं कानात हेडफोन्स लावून ऐकत बसलोय असं नाही करता येत कारण त्यात ज्या लो व्हॉल्यूम नोट्स आहेत त्या ऐकण्यासाठी आवाज वाढवा आणि लगेच हाय व्हॉल्यूम नोट्स आल्या की आवाज कमी करा असं सतत करावं लागलं जे मला तरी अजिब्बात आवडत नाही, त्यामुळे ते गाणं अनुभवायची मजा सगळी निघून जाते. अजय-अतुल ह्या जोडीला संगिताची व्यवस्थित जाण आहे आणि त्यांनी योग्य तेच ह्या गाण्यासाठी केलं असेल पण मला नाही ते पटलं,मग भलेही ते सिफ्मनी स्टुडियो मधलं रेकॉर्डिंग का असेना.

दुसरं गाणं - 'आताच बया का बावरलं' हे श्रेया घोषाल ने गायलं आहे जे मला सगळ्यात जास्त आवडलं. तिचा आवाज प्रचंड गोड आहे यार :) :) सतत ऐकावा इतका गोड आहे. ह्या गाण्यासाठी सुरूवातीला घेतलेला कोरस पण फार भारी वाटला मला, त्यात अगदी शेवटच्या शब्दाला घेतलेली हरकत तर लाजवाब आहे, बहोत खुब अजय-अतुल :)

ह्या गाण्याचे बोल पण अगदी त्या मुलीच्या कोवळ्या मनातल्या आणि तिच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत.

आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या गाण्यांचे बोल 'अजय-अतुल' जोडीनेच लिहीले आहेत, त्यातही मी त्यांना ब-यापैकी मार्क्स देईन :)

तिसरं गाणं - 'सैराट झालं जी' हे गाणं सगळ्यात पहिले प्रसिद्ध केलं होतं. हे तसं स्लो पण रोमँटिक गाणं आहे, जे ऐकतांना जोगवा मधल्या 'जिव रंगला' ह्या गाण्याची आठवण येत राहते.ह्यामधे असणारं संगित अगदी 'अजय-अतुल' जोडीचंच आहे हे कोणीपण सांगु शकेल इतकी त्यामधे त्यांच्या आधीच्या गाण्यांना दिलेल्या संगिताची झाक आहे.असो, ह्या गाण्याचे बोल मला आवडले. दोघांच्या मनामधे असलेली नव्या प्रेमाची चाहूल, त्यामुळे आलेली हुरहुर,

प्रेमाच्या घेतलेल्या आणाभाका सगळं सगळं अगदी अलगदपणे टिपलं आहे.त्या दोघांच्या गोड-गुलाबी प्रेमाचा प्रवासच जणू ह्यामधून सांगितला आहे.

चौथं गाणं - 'झिंग झिंग झिंगाट' - हे तर सगळ्या लहान मुलांचं अत्यंत फेव्हरेट गाणं आहे आणि ह्या वर्षीच्या गणपती महोत्सवामधे फक्त ह्याचाच आवाज असणार गॅरेंटीड! ह्या गाण्याचे बोल आणि संगित दोन्ही मधे अगदी तुफान मस्ती करून घेतली आहे अजय-अतुल जोडीने.

तर माझ्या मते पहिलं गाणं सोडलं तर हा अल्बम तुम्ही नक्कीच ऐकू शकता आणि ऐजाँय करू शकता.

Tuesday, April 12, 2016

माय प्लेलिस्ट-१: भूपाळी

उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी

काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

लहानपणी आजोबांनी गायलेल्या भूपाळ्यांनी जाग यायची. पहाटेच्या शांत वातावरणात धीरगंभीर आवाजात एका लयीत माझे आजोबा वेगवेगळ्या भूपाळ्या म्हणायचे, खूप मस्त वाटायचं :)

नंतर आमच्याकडे टेपरेकॉर्डर घेतल्यावर भूपाळ्यांची कॅसेट आणली होती ती बहुतेक करून सणा-सुदीला लावली जायची. मध्यंतरी शिक्षणामुळे घर सोडलं आणि भूपाळी ऐकणं वगैरे बंद झालं. आता लग्नानंतर पहाटे उठायला सुरूवात केली तेंव्हा कुठेतरी काहितरी मिसिंग आहे असं वाटलं आणि गुगलून बघितलं तर माझ्या लहानपणी ऐकलेल्या सगळ्या भूपाळ्या सापडल्या :) :)

आता रोज सकाळी माझ्या घरातली पहाट अगदी सुरमयी असते.तर माझ्या आवडीची भूपाळी आहे - उठि श्रीरामा पहाट झाली

ही भूपाळी माझ्या आवडत्या गायिकेने म्हणजे आशा भोसले ह्यांनी गायली आहे आणि ह्यातले शब्द म्हणाल तर प्रत्येक शब्द इतका चित्रदर्शी आहे की जणू आपण श्रीरामाच्या प्रासादामधे, परिसरामधे उभे राहून सगळं बघत आहोत.

ही भूपाळी ऐकतांना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. कौसल्या माऊली हातामधे चांदीचा कलश घेऊन श्रीरामाच्या खोलीमधे आली आहे.श्रीरामाचं वय साधारण ७-८ वर्षे, तो अगदी गाढ झोपेत आहे.त्याच्या चेह-यावर एक निरागसपणा आणि साखरझोपेमधलं हास्य उमटलं आहे.अगदी कौतुकाने रामाला बघत कौसल्यामाता नाजुक आणि प्रेमाने ओतप्रोत आवाजात गाऊन त्याला जागं करायचा प्रयत्न करत आहे.

उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली

उमलली हा शब्द फार सुंदर वाटतो ह्या ओळिमधे.जणू आकाशाचं फुल उमलत आहे आपली एकेक पाकळी बाजुला सारत असा भास होतो :)

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी

खोलिच्या सज्जामधे उभी राहून जणू आजुबाजुच्या परिसरामधे घडणा-या घटना आता कौसल्या वर्णन करत आहे.हे सगळं ऐकतांना कुठेतरी वेद ऐकल्याचा पुसटसा भास होतो तर दुस-या ओळीतून जाणवतं की गोठ्यातल्या गायींची वासरं-कालवड त्यांना लुचत आहेत आणि भूपाळी गात जाणारी भाटमंडळी मंदिरासमोरच्या रस्त्याने परतत आहेत असं जाणवतं.

काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

ह्या कडव्यामधे कौसल्यामाता श्रीरामाला चंद्र - सुर्याच्या आवागमनाची गंमत सांगत आहे आणि तितक्यात तिला वसिष्ठ मुनिंची काटकुळी पण तेजःपुंज आकृती मंदिराकडे जातांना दिसत आहे. प्रत्येक ओळीतून आजुबाजूला घडणा-या गोष्टी सांगून श्रीरामाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे.

राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

शेवटच्या कडव्यातुन ति सांगत आहे की, आता तर दासीपण आल्या आहेत खोलितल्या समया विझवण्यासाठी आणि बाहेर सूर्य पण अगदी झगझगीतपणे आपला प्रकाश पसरवत सगळ्या सृष्टीला जागं करत आहे, आता तरी जागा हो.

ह्या ओळि गातांना आशाबाईंनी 'राजसा' हा शब्द इतका प्रेमाने उच्चारला आहे की जणू कौसल्यामाता श्रीरामाच्या डोक्यावरून हात फिरवत आहे असा भास होतो.

मस्त वाटतं ही भूपाळी ऐकली की :) :)

Wednesday, March 30, 2016

दोन स्पेशल

मागच्या आठवड्यामधे गुरूवारची सुट्टी सार्थकी लागावी म्हणून 'दोन स्पेशल' नाटकाची तिकीटं मिळवली.ह्यावेळेस वेळेत काढल्यामुळे ४थ्या रांगेत मधल्या सिट्स मिळाल्या :)

**महत्वाची सुचना : हे नाटक अत्यंत सिरीयस आहे!

महत्वाची पात्रं तीन आहेत ह्यामधे. त्यातल्या त्यात जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले ही मुख्य पात्रं आहेत.

पूर्ण नाटक हे एका वृत्तपत्राच्या ऑफिसमधे घडतांना दाखवलं आहे. १९८९ साल चालू आहे आणि रात्रपाळीसाठी आलेला उपसंपादक आहे जितेंद्र जोशी, त्याच्याकडे म्हणजेच दैनिक हिंदुस्थानच्या कार्यालयामधे नोकरी मागण्यासाठी आलेला एक होतकरू तरूण आहे रोहित हळदीकर आणि जितेंद्र जोशीची ९ वर्षांपूर्वीची प्रेयसी जी आज कोणा दुस-याची बायको आहे ती आहे गिरीजा ओक-गोडबोले. ही प्रेयसी ९ वर्षांपूर्वी ह्याच कार्यालयामधे काम करत होती.

रोहित हळदीकर हा बहुतेक नवोदित कलाकार आहे पण त्याचा अभिनय अतिशय नैसर्गिक आहे आणि सातारकडच्या लोकांच्या बोलण्याची लकब त्याने व्यवस्थित केली आहे.

जितेंद्र जोशी ला मी जवळ-जवळ ८ वर्षांनी नाटकात काम करतांना बघितलं पण तो एक ब्रिलियंट कलाकार वाटतो आणि म्हणून आवडतो सुद्धा मला, त्याचा अभिनय इतका सहज आहे ह्याही नाटकामधे की तुम्हांला वाटतच नाही कोणी कलाकार नाटक करत आहे तुमच्यासमोर! जणू एखादा मित्र त्याची कथा, व्यथा आपल्यासमोर मांडत आहे असं वाटतं बघतांना.

गिरीजा ओक-गोडबोले हिचं काम मी आजवर कधीच बघितलं नाही आणि नाटकात तर नाहीच नाही. पण ती कसदार अभिनेत्री आहे हे जाणवलं. कदाचित जितेंद्र जोशीसोबत जुळवून घेता यावं म्हणून तिला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल पण परिणाम अगदी अपेक्षित साधला आहे तिने.

ह्या नाटकामधलं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल मला तर ते बॅकग्राउंड म्युझिक! आजवर इतकी नाटकं बघितली पण असा जिवंत बॅकग्राउंड स्कोर कधी अनुभवला नाही मी! सायकल लावण्याचा आवाज, रस्त्यावरून जाणा-या गाड्यांचा आवाज, रात्रीच्या अंधारात अचानक कर्कश आवाज करत गेलेल्या टिटवीचा आवाज अगदी जिवंत आहेत हे सगळे आवाज.कथेमधल्या एखाद्या पात्रासारखा हा बॅकग्राउंड स्कोअर वापरला आहे.

कथा अशी आहे की, गिरीजा ओक-गोडबोले जितेंद्र जोशीला एक मदत मागायला आलेली असते. जर त्याने मदत केली तर तिची नोकरी शाबूत राहणार असते पण, तेच जितेंद्र जोशीची पत्रकारिता तत्त्व मात्र धुळीला मिळणार असतात.

दोघेही ९ वर्षांनी एकमेकांसमोर येतात आणि हळूहळू कथा उलगडत जाते.त्यांच्यामधले वाद, गैरसमज बाहेर येतात.

एकमेकांच्या संसाराबद्दल विचारपूस होते आणि हे सगळं घडत जातं एक बातमी आल्यामुळे.

नाटकातले संवाद अतिशय संवेदनशील आहेत आणि ज्यांना आयुष्यामधे ब्रेक-अप चा अनुभव आला आहे त्यांच्या आतमधलं सगळं ढवळून टाकणारे आहेत. तसंच पत्रकारिता त्या काळातली किंवा आजच्या काळातली ह्यावरही भाष्य केलं आहे.

तिनही पात्रांचे संवाद खूप छान आहेत पण दोन तासांनंतर सगळं खूप जड व्हायला लागतं.एखाद्या वृत्तपत्र कार्यालयामधे किती टेन्शन्स असू शकतात ह्याची चुणूक या नाटकामधून मिळते.

Monday, March 21, 2016

डोण्ट वरी,बी हॅप्पी

स्पृहा जोशी आणि उमेश कामत ह्या 'एका लग्नाची तिसरी गोष्ट' फेम जोडीचं 'डोण्ट वरी,बी हॅप्पी' हे नाटक सध्या हाऊस फुल्ल गाजत आहे. आता पर्यंत तीन वेळेस प्रयत्न करून शेवटी ७व्या रांगेतल्या तिकीटावर समाधान मानत काल हे नाटक बघायला गेले एकदाची.

नाटकाच्या कथानकाबद्दल थोडी कल्पना होती पण खास स्पृहाला भेटायचं म्हणून मी खरं तर नाटकाला गेले.एरवी नाटकाचा दिग्दर्शक आणि कलाकार बघून मी जायचं ठरवते पण ह्यावेळेस ते काही बघितलंच नाही.

नाटकाची तिसरी घंटा झाली, स्पृहाने आधी महत्वाच्या दोन सुचना दिल्या ज्या प्रत्येक नाटकाआधी देण्यात येतात - १)मोबाईल सायलंट करा आणि २) लहान मुल रडायला लागल्यास त्याला घेऊन त्वरित प्रेक्षागृहाबाहेर जा.

बरं झालं तिने दुसरी सूचना अशी नाही दिली की सर्वांनी आपापली मुलं आणि मोबाईल सायलंटला टाका.लोक ह्या वाक्याला पण फिदीफिदी हसतात! मी गेल्या काहि दिवसात बघितलेल्या जवळपास प्रत्येक नाटकात अशीच सुचना दिली जाते!

पुढे स्पृहाने नाटकाबद्दल माहिती द्यायला सुरूवात केली आणि दिग्दर्शकाचं नाव ऐकलं आणि माझ्या कपाळावर आठी उमटली 'अद्वैत दादरकर'!

मराठी नाट्यरंगभूमीवरचा तसा तरूण दिग्दर्शक आणि नाटकं पण चांगली दिली आहेत त्याने पण! तो कलाकारांकडून प्रचंड अतिशयोक्तीयुक्त काम करवून घेतो आणि जर तो स्वतः नाटकामधे असेल तर मग विचारायलाच नको!त्यामुळे मात्र नाटक सुरू होण्याआधीच माझा मूड थोडा खराब झाला. पण बघूया म्हटलं काय होतंय ते.

नाटक चालू झालं आणि माझी शंका दूर झाली :)

उमेश कामत,स्पृहा जोशी आणि मिहीर राजदा यांनी नाटक अगदी सुंदररित्या आपल्या समोर उभं केलं आहे.नाटकाची मध्यवर्ती कल्पना आहे एका जोडप्याच्या लग्नानंतरच्या आयुष्यामधे घडणा-या घटना.लग्न झाल्यावर जवळपास प्रत्येक जोडप्यामधे होणा-या कुरबुरी अगदी शब्दशः मांडल्या आहेत.म्हणजे एकवेळ बोअर होतं की घरात पण आपण हेच करतो आणि इथेपण हेच बघायचं का! पण अगदीच तसं नाही हं, पण ९९% जोडप्यांना साम्य आढळल्यावाचून राहणार नाही ;)

असो,तर विशेष आभार उमेश कामतचे की त्याने अज्जिबात ओव्हर एक्टिंग केली नाही आणि नाटक बघणं सुसह्य केलं.स्पृहाने सुध्दा प्रामाणिकपणे एका टिपीकल बायकोचा रोल निभावला आहे. मिहीर राजदा हा ह्या नाटकाचा लेखक आहे आणि त्याने संवाद प्रचंड सुंदर लिहीले आहेत :)

वानगीदाखल एक सांगते - ' सगळे नवरे म्हणजे ब्ला.. ब्ला.. ब्ला आणि बायका बिच्चा-या अबला अबला अबला' :p .

नाटक आवडण्याकरता फक्त नट किंवा गोष्ट चांगली असेल तर भागतं असं नाही तर सगळ्याच गोष्टी जुळून यायला हव्यात जे ह्या नाटकामधे आहे.अर्थात दिग्दर्शकाने त्याच्या शैलीची चुणूक दोन सिन्समधे दाखवली आहेच पण पूर्ण नाटक बघता ते सुसह्य आहे.

नाटकाच्या नावात जरी हॅप्पी असलं तरी हे नाटक कॉमेडी नाही त्यामुळे त्या भ्रमात बघायला जाऊ नका मात्र, उमेश कामत आणि स्पृहाच्या अभिनय जुगलबंदीसाठी नक्कीच जाऊ शकता :) :)

Wednesday, February 17, 2016

ट्रान्सजेन्डर्स

काहि दिवसांपूर्वी एका टॅक्सी सर्व्हिसची घोषणा करण्यात आली होती - G taxi. हि टॅक्सी सेवा 'ट्रान्सजेन्डर्स' चालवणार आहेत आणि आज अजून एक बातमी वाचली. अतिशय आशादायक बातम्या आहेत ह्या दोन्हीही :)

समाजाने, बहुतांशवेळा कुटंबानेही नाकारलेल्या ह्या माणसांना अशा कामांमुळे समाजामधे ताठ मानाने जगायला मिळेल हि खूप चांगली गोष्ट आहे.

LGBT वर्गात मोडणा-या व्यक्तींना खडतर प्रयत्न करत स्वत:चं वेगळं अस्तित्व आणि ते पण समाजाचा एक महत्त्वाचा भाग आहेत हे सिद्ध करावं लागणार आहे. अजूनही त्यांच्या बाबतीत अस्पृश्यतेची भावना आपल्यामधे आहे जि ह्या बदलांमुळे कमी व्हायला नक्कीच मदत होईल अशी आशा आहे.


Friday, February 5, 2016

चपटी

आॅफिस संपल्यावर घरी जातांना आमची बस एका वस्तीसमोरुन जाते. तुरळक घरं आणि शेतं दिसतात. घराच्या अंगणात, शेतामधे काहि बायका-पुरुष काम करतांना दिसतात आणि त्यांच्या अवतीभोवती त्यांची छोटी मुलं खेळत असतात. जवळजवळ रोजचंच आहे हे दृश्य पण आज वेगळं काहीतरी दिसलं आणि मनात अगदी चर्र झालं :(

एक छोटी मुलगी खेळत बसली होती आणि तिच्या खेळण्या होत्या एक चेपलेलं स्टीलचं वाडगं आणि देशी दारूच्या दोन रिकाम्या बाटल्या!!

त्या मुलीच्या अंगावर जेमतेम एक मळका कपडा होता पण तिच्या खेळात ति मग्न होती. त्या निरागस जिवाला ह्या गोष्टीची पुसटशी जाणिवही नव्हती की ति कशाशी खेळत आहे :(

अशा कितीतरी निष्पाप, निरागस मुलांचं आयुष्य त्या दारूने नासवलं आहे अाजवर आणि अजूनही तिचं कार्य अव्याहतपणे चालूच आहे!!

हातावर पोट असणाऱ्या माणसांना दारूची चैन कशी काय परवडते?? पोरांच्या अंगावर घालायला कपडे आणू शकत नाही पण दारु सोडणार नाहि!! बायकोला मार-हाण करुन तिच्या कष्टांची कमाई ओरबाडून नेणार पण दारु मात्र न-चुकता पिणार!! गरिबी आणि दारुचं असं कसं विचित्र समीकरण आहे रे देवा :(

Tuesday, January 12, 2016

कष्ट

आमच्या आॅफिस पार्किंगला दोन लेव्हल्स आहेत.लेव्हल-१ दुचाकी साठी आणि लेव्हल-२ चारचाकीसाठी.जागेअभावी कधिकधि चारचाकी गाडी ले-१ ला लावता येते पण काढतांना मात्र नियमानुसार ले-२ मधूनच काढावी लागते.

आत्ताच माझ्यासमोर एक व्यक्ती त्याची चारचाकी ले-१ मधून बाहेर काढू द्या म्हणून सिक्युरिटी गार्डशी हुज्जत घालत होता.जेंव्हा कडक शब्दात त्याला समज दिल्या गेली तेंव्हा मात्र चरफडत त्याने गाडी ले-२ ला नेली.

पुढे बाहेर पडण्यासाठी जे गेट वापरायला हवं त्याऐवजी त्याने दुस-या गेडकडे गाडी वळवली तिथुन नेमकी बस आत येत होती आणि धडक होता होता वाचली!! अर्थात त्या गेटवरही पहिल्या प्रसंगाची पुनरावृत्ती झाली आणि शेवटी त्याला ठरवलेल्या मार्गानेच बाहेर पडावं लागलं!!

त्याचा मुद्दा होता की मला घाई आहे बाहेर जायची तर तुम्ही आजचा दिवस मला जाऊ द्या अाणि जर एखाद्याला असं नियमबाह्य सोडलं कधीतरी तर काय बिघडणार आहे??

काय बिघडणार आहे?? हं!!

आपल्या सोयीसाठी नियम मोडून वागायचं आणि परत हा विचार करायचा की मी एकट्याने असं केलं तर काय बिघडणार आहे?

- मी हेल्मेट नाही घातलं तर कुठे बिघडलं!!

- मी अमुक-तमुक काम अपेक्षेप्रमाणे न-करता 'पटकन' पण ५०%च केलं तर कोणालाही कळणार नाही, जाऊ देत इतका काहि फरक पडत नाही बरंका!!

- मी मारली पान खाऊन एखादी पिंक रस्तावर तर काय बिघडलं, रस्ता तर मोठा आरशासारखा स्वच्छच आहे ना!!

- मी सिग्नलचा लाल दिवा दिसत असतांनाही थांबलो नाही तर काय फरक पडतो, सगळेचजण तसं करतात!!

अशी एक ना अनेक उदाहरणं आपल्या आजुबाजूला रोज दिसतात, कित्येकदा आपणच ते करतो आणि दुस-यांना करतांना बघितलं की शिव्या देतो.

काय म्हणावं ह्या वृत्तीला?? आळशीपणा कि उद्दामपणा कि अजून काही.

मला तरी असं वाटतं कि हल्ली आपण कोणत्याही गोष्टीच्या खोलात जाऊन तिचा विचार करायचा नाही असं ठरवलं आहे. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणचे नियम पाळायचे नाहीतच, भलेही ते आपल्या सुरक्षेसाठी का असेनात,असं आपण वागतो.नोकरी-व्यवसायाच्या ठिकाणीही ह्या विचारसरणीचे बहुतांश लोक दिसतात.

मुख्य मुद्दा एकच आहे- स्वतःला (मानसिक, शारीरिक) कष्ट कमीतकमी पडावेत अशा पद्धतीने जमेल तसं काम करून टाकायचं एकदाचं, मग त्यामुळे पूर्ण व्यवस्था खिळखिळी होऊन ढासळली तरी काय फरक पडणार आहे :( जे काहि परिणाम होतील ते वेळ आल्यावर बघू :D इत्ता टेन्शन नइ लेनेका मामू :D :D :D