Monday, May 11, 2015

शेवग्याच्या शेंगा

मराठी रंगभूमीवर आलेलं हे नविन नाटक. कालच ह्याचा शुभारंभाचा प्रयोग बालगंधर्व रंगमंदिर पुणे इथे बघायचा योग आला.

गजेंद्र अहिरे लिखित, दिग्दर्शित असलेल्या ह्या नाटकामधे स्वाती चिटणीस, संजय मोने असे मराठी रंगभूमी,चित्रपटसृष्टीतले कसलेले दिग्गज कलाकार आहेत सोबतच हरहुन्नरी अतिशा नाईक आणि इतर कलाकार आहेत.

आयुष्यामधे असलेला एकटेपणा आणि नात्यांमधे असलेली पोकळी ह्या विषयाभोवती हे नाटक गुंफलेलं आहे.
एकमेकांशेजारी राहणा-या चार जणांच्या आयुष्यामधे घडणा-या गोष्टींचं चित्रण आपल्यासमोर उभं केलेलं आहे.साठीच्या वयातले दोघे, चाळीशीच्या वयातली एक बाई आणि एक तरूणी अशी मुख्य चार पात्र ह्यामधे आहेत.

कादंबरी कदम ... हं ती मंगलाष्टक वन्समोअर मधे मुक्ता बर्वेची जी मैत्रिण दाखवली आहे ना ती.. तर तिला नाटकाचा सुत्रधार बनवलं आहे. गोष्ट सांगायला ती सुरूवात करते आणि एकेका व्यक्तीच्या आयुष्यातले पदर उलगडत जातात.

मला कादंबरी कदमची ह्या कामासाठी केलेली निवड नाही पटली.म्हणजे तिने जे यंग,एनर्जेटीक मुलीचं कॅरेक्टर उभं केलं आहे, त्याकरता कदाचित ती आत्ता त्या वयाची आहे म्हणून तिची निवड योग्य ठरेल पण अभिनयाच्या बाबतीत ती थोडी कमी पडते असं मला वाटलं.अभिनय म्हणजे फक्त वेगवेगळ्या लयीत बोलणं पुरेसं नाही ना, त्यासोबत तुमचा चेहरा, तुमचे डोळेही बोलले पाहिजेत. थोडक्यात सांगायचं तर,प्लास्टिक चेह-याच्या दिपिका पडूकोण सारखी ती ह्या नाटकामधे मला वाटली. आणि तिला नाटकाच्या सूत्रधाराची भूमिका बजावतांना बघितल्यावर पण अंमळ वाईटच वाटलं.असो.

तर संजय मोने सर, क्या बात है! त्यांच्याविषयी, त्यांच्या अभिनयाविषयी मी पामर काय बोलणार! साठीच्या वयातला रिटायर झालेला एक साधा, सरळमार्गी चालणारा माणूस, त्याची बायको काही वर्षांपूर्वी त्याला सोडून गेली आहे म्हणून कायम स्वतःच्या कोषात राहणारा असा मि.सुधीर ससाणे इतका अप्रतिमपणे सादर केला आहे की आपण बघतच राहतो. म्हणजे त्या व्यक्तिरेखेच्या चालण्यापासून ते बोलण्याच्या लकबीपर्यंत अगदी बारीकातल्या बारीक गोष्टींवर त्यांनी काम केलं आहे. संजय मोने सरांना नाटकामधे काम करतांना बघणं ही एक पर्वणी आहे असं मला वाटतं. 'ह्म तो तेरे आशिक है' नंतर म्हणजे जवळपास ७-८वर्षांनी ते व्यावसायिक रंगभूमीकडे वळले आहेत आणि त्यांच्या ह्या एकाच रोलने तो सगळा गॅप भरून काढला आहे, हॅट्स ऑफ टू संजय मोने सर.

बाकी सरप्राईज इलेमेंट वाटणारी दुसरी व्यक्ति म्हणजे अतिशा नाईक! हो व्यक्तीच कारण त्यांनी नाटकामधे ज्याप्रमाणे व्यक्तीरेखा सादर केली आहे त्याला तोड नाही. आजवर मी त्यांना फक्त 'फू बाई फू' आणि 'झी अ‍ॅवॉर्ड्स' मधेच कुठल्यातरी पांचट स्कीटमधे बघितलं आहे! कुठेही अतिशयोक्ती न-करता अगदी योग्य तितकंच हसून आणि तेही योग्य पट्टीत त्यांनी अशी काही भूमिका रंगवली आहे ना खरंच लाजवाब!

स्वाती चिटणीस ह्यांच्या सहजसुंदर अभिनयाने ह्या नाटकाला पूर्णत्व प्राप्त करून दिलं आहे.दिसायला त्या सुंदर आहेतच पण अभिनय आणि इतर कलाकारांसोबत एकूणच स्टेजवरचा त्यांचा वावर इतका सहज आणि सुखद आहे की मजा येते :) त्यांची वेशभुषा सुध्दा अगदी छान रंगसंगतीतली आहे त्यामुळे नाटक अजूनच खुलून आल्यासारखं वाटतं.

सर्वात शेवटी पण सर्वात महत्त्वाची व्यक्ती म्हणजे लेखक-दिग्दर्शक गजेंद्र अहिरे सर. नाटकाचं लेखन, त्यात असलेली दोन गाणी, प्रत्येक वाक्य, एकूणच नाटकाचा पूर्ण फ्लो इतका सहज पण अर्थपूर्ण आहे की एक प्रेक्षक म्हणून आपल्याला एक अप्रतीम नाटक बघितल्याच समाधान मिळतं.नाटकामधे टाळ्या घेणारी वाक्यं किंवा हशा पिकवणारी वाक्यं अजिबात नाहीत पण अंतर्मूख करणारी वाक्य नक्कीच आहेत. नवरा-बायको, गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड ह्यांचं नातं, त्यातले बारकावे, त्यातले रूसवे-फुगवे आणि आयुष्यामधे घडणा-या घटनांचा नात्यावर आणि त्या-त्या व्यक्तींवर होणारा परिणाम उत्कृष्ठरित्या दाखवला आहे.

'घंटा रिकामी लोलक गायब' हे एक वाक्य ह्या नाटकातून वापरण्यात आलं आहे.कोणतंही एक्सप्रेशन ह्या वाक्यातून सादर करता येतं इतकं चपखल ते कलाकारांच्या तोंडात बसवलं आहे!

खूप दिवसांनी इतक्या छान नाटकाचा अनुभव घेता आला,ह्या नाटकाच्या पुढच्या वाटचालीसाठी माझ्या शुभेच्छा आणि गजेंद्र अहिरे सरांना एकच विनंती की त्यांनी मराठी चित्रपटांसारखीच मराठी रंगभूमीवरही अशीच वैविध्यपूर्ण नाटकं अजून आणावीत.