दारामधेच,सर्वांगाला तपासून आत सोडण्याच्या यंत्रामधून मी जात असतांना तिथे उभ्या असलेल्या दोन सिक्युरिटी गार्ड्स स्त्रिया बोलत होत्या -

पहिली स्त्री - कल करवा चौथ का उपास किया का गं? मैने तो नहीं किया, बहुत कडक होता हय!
दुसरी स्त्री - कुत्सितपणे हसत, करवा चोथ! मेरेकु इसी जनम में पती नहीं चाहिए तो आगेके सात जन्मोंके लिए कौन उसे मांगेगा!

मी ते ऐकून पुढे सरकले पण डोक्यामधे तो संवाद घोळत राहिला. मॉलमधे ब-याच स्त्रिया हातावर मेंहदी काढलेल्या दिसल्या तेंव्हा वाटलं हे करवा चौथ नेमकं काय असेल बरं?

माझ्या मैत्रिणीला विचारलं पण तिने, तिला माहित असलेलं एकचं वाक्य सांगितलं,'पती की लंबी उमर के लिए करते हैं, शायद'. अर्थात तिला हे उत्तर तिच्या आई आणि सासूने सांगितलं होतं.

तसं तर मी हरतालिका आणि वटसावित्री पौर्णिमा हे दोन उपवास ऐकले/बघितले आहेत जे लग्न झालेल्या स्त्रिया त्यांच्या पतीसाठी करतात.

पण हे सगळे उपवास नेमके कोणी सुरू केले असतील?
माझ्या आजीला विचारलं तर ती म्हटली,'अगं आमच्या काळी ब-याचदा पुरूषमंडळी कधी व्यवसायानिमित्त दूरदेशी जायची तर कोणी सैन्यात भरती व्हायचे किंवा एखाद्या आजाराने पिडीत असायचे. त्यामुळे, लग्न झालेल्या स्त्रियांना पतीचा सहवास एकूणच कमी मिळायचा. तसंच, तिचं कुंकू बळकट रहावं, धडधाकट परत यावं म्हणून हे सगळे उपास-तापास लावले होते बघ!

पण हल्लीच्या काळी ह्या प्रथेला तोच अर्थ राहिला आहे असं म्हणता नाही येणार. कारण तंत्रज्ञानामुळे नवरा-बायको जरी एका शहरामधे नसले तरी सतत संपर्कात राहू शकतात, ख्याली-खुशाली जाणून घेऊ शकतात. तेंव्हा हा उपवास करायलाच हवा असं काही गरजेचं नाही.
हां पण, हल्ली हे सुध्दा वाढलंय की पोरी वर्षातून हा एक दिवसाचा उपवास करतात आणि बाकी वर्षभर किंवा आयुष्यभर नव-याचा जीव खातात! मी म्हणते कशाला करायचा तो दिखाऊपणा, त्यापेक्षा उपवास न-करता दोन गोड शब्द बोला त्याच्याशी म्हणजे तो सुखी होईल'.

आजीने तर अगदी सहजरीतीने जुन्या-नव्याची सांगड घालत ह्या उपवासाचं रूप मला समजावून सांगितलं.

पण मला अजून एक प्रश्न पडला,'आजी जशा स्त्रिया त्यांच्या पतीसाठी असा उपवास करतात तसा पुरूष करतात का गं?'
ह्यावर आजी अगदी मनमोकळेपणाने हसली आणि माझ्या डोक्यात टपल मारत म्ह्टली,'वेडी गं वेडी, पुरूषमंडळी कधीच कोणताच उपवास करत नाहीत निदान स्वतःच्या बायकोसाठी. माझ्या उभ्या आयुष्यात मी असा एकही पुरूष आपल्या कुटुंबात किंवा आसपास बघितला किंवा ऐकला नाही! पण असं आहे बघ की, त्यांच्या मनामधे आपल्याविषयी प्रेम, काळजी नाही असं नाही. पण, त्यांना स्त्रियांसारखं ते व्रत-वैकल्य करून सिध्द करता येत नाही.

पण मला काय वाटतं माहित आहे का, खरं तर हे सगळे व्रत-वैकल्यं ना बायकांनीच स्वत:चं मन रमवून घेण्यासाठी सुरू केले असावेत कारण पूर्वीच्या काळी टीव्ही वगैरे नव्हते ना' आणि आजी खुदकन हसली Smile

हम्म तर हे होतं आजीचं मत पण मंडळी तुम्हांला जर 'करवा चौथ' किंवा 'हरतालिका' ह्या व्रतांची खरी-खुरी काही कथा माहित असेल तर जरूर सांगा Smile