Wednesday, December 26, 2012

चंद्र...



किती छान वाटतं ना चंद्राकडे बघितलं की..

खाली इतक्या गाडया धावत आहेत, माणसं इकडून-तिकडे जात आहेत पण त्यातल्या किती लोकांना माहित आहे की आज आकाशामधे चंद्र इतका सुंदर दिसतोय ते,तुझ्या-माझ्यासारखा क्वचित एखादाच असेल..त्या चंद्राला पण खालून धावणा-या यंत्र आणि यंत्रवत झालेल्या माणसांशी काही घेणं-देणं नाहीये! तो त्याच्या त्याच्या आनंदात रोज उमलतो पाकळी-पाकळीने अन एका दिवशी असं पूर्णरूप धारण करतो...

तुम्ही त्याच्या रूपाचं कौतुक करावं अशी त्याची अपेक्षा नाहीये की तुम्ही त्याला बघितलंच नाही आज म्हणून त्याची तक्रार नाहीये..तो स्वत:च्याच धुंदीत आपल्या सख्या-तारकांसहित नभोमंडलात प्रवेश करतो, रात्रभर आकाशाच्या अंगणात रासक्रिडा करत पहाटे सगळ्यांना घेऊन लुप्त होतो..

पुन्हा दुस-या दिवशी संध्याकाळी दुधाळ-मधाळ चंद्रप्रकाश पसरविण्याकरता तो हजर असतो अगदी कसलीच अपेक्षा न-करता...निसर्ग किती निरिच्छ-निरपेक्षपणे आपल्यावर प्रेमाची पखरण करत असतो ह्याचं अगदी नेमकं उदाहरण म्हणजे हा चंद्र..छोटयांचा चांदोमामा, भाऊबिजेच्या दिवशी दूरदेशी असणा-या भावाचा प्रतिनिधी अन प्रेमात धुंद असणा-याचा प्रियकर...

Friday, December 21, 2012

कशाला उगाच..जाऊ देत!


सदर लेखामधे सद्यपरिस्थितीवर भाष्य करण्याचा प्रयत्न केला आहे, ह्यामधून कोणत्याही एका व्यक्तीला किंवा समुहाला दुखावण्याचा हेतू नाही.


भारताच्या राजधानीत बसमधे झालेला गँगरेप, दादरला गर्दीच्या रस्त्यावर कोयत्याने केलेले क्रूर वार, दिवसाढवळ्या घरामधे घुसून अंगावर जंतूनाशक टाकून पेटवून देणं, दिवसागणिक असंख्य अल्पवयीन मुलींवर होणारे बलात्कार आणि बाहेरच्या दुनियेबरोबरच घरामधे देखील वाढत जाणारी असुरक्षितता! रोजची वर्तमानपत्रं, टीव्हीवाले ह्या आणि अशाच प्रकारच्या बातम्या सगळीकडे सांगत एकच प्रश्न विचारत आहेत आपली मुलगी, बायको, वहिनी आणि कोणतीही ’स्त्री’ आज आपल्या देशातल्या कोणत्याच घरात, मोहल्ल्यात, शहरात ’सुरक्षित’ का नाहीये??!!

गर्दीची जागा असू देत नाहीतर शांत-सामसूम रस्ता, पहाट-दिवस-संध्याकाळ असू देत नाहीतर रात्र, एकटयाने बाहेर पडलेली स्त्री असू देत नाहीतर कोणासोबत असू देत..कोणत्याही परिस्थितीमधे तिच्यावर हल्ला होण्याची शक्यता नाकारता येत नाही इतकी भयानक वेळ आता आली आहे.

किती आणि कशाप्रकारे स्त्रीने स्वत:चं रक्षण करायचं? मिरची-पूड ठेवली, कराटेचं प्रशिक्षण घेतलं, अगदी शरीराचा एकही भाग दिसणार नाही असे कपडे केले, सर्वतोपरी काळजी घेतली तरीही तिच्यावरचे हल्ले कमी झाले नाहीत. बाहेर जाणं बंद केलं तर घरातल्यांनी सुध्दा मोकळा श्वास घेऊ दिला नाही. जगायचं तरी कसं तिने!

ही झाली नाण्याची एक बाजू पण दुसरी बाजू काय म्हणते तर ’मुलगी वाचवा’!
तुम्ही बघितलं / ऐकलं असेल गेल्या काही महिन्यांपासून ’लेक / मुलगी वाचवा, तिला ह्या जगात येऊ द्या’ म्हणून सगळीकडे जोरदार शेरेबाजीवजा प्रयत्न सुरू आहेत म्हणजे टीव्हीवर, वेगवेगळ्या प्रभागाच्या नेत्यांच्या शुभेच्छा फलकांवर वगैरे दिसून येत आहे. सुरूवातीला आमिर खानच्या सत्यमेव जयतेचा परिणाम म्हणून लिंगनिदान करून गर्भपात करवून देणा-या भरपूर दवाखान्यांवर छापे घातले गेले, डॉक्टर्सवर कार्यवाही केली गेली वगैरे वगैरे. त्यामुळे लोकांमधे थोडी जागरूकता आली पण खरंच कितपत मुली जन्म घेऊ शकल्या देवालाचा ठाऊक!

खरं तर कशाला जन्माला घालायचं मुलींना सांगा पाहू! तिला जन्माला घालायचं, शिकवायचं, निसर्गाचक्रानुसार ती वयात आली की तिच्या होणा-या शारीरीक-मानसिक त्रासांवर जमेल तशी फुंकर घालत, घरातल्या-आजूबाजूच्यांच्या वखवखलेल्या नजरांपासून पदोपदी तिची जपणूक करत तिला वाढवायचं-मोठं करायचं आणि एक दिवस समाजरूढी म्हणून तिचं लग्न लाउन द्यायचं. तिचं जर नशीब चांगलं असेल तर तिच्या सासरकडची मंडळी चांगली असतील नाहीतर तिथे तिचा मानसिक-शारीरीक छळ सुरू होणार! लग्न होण्याआधी कितीही कर्तुत्ववान असणारी स्त्री सासरी गेल्यावर सगळं कर्तुत्व चुलीत घालून घरच्यांसाठी राबणार पण त्याचा मोबदला म्हणून तिला कौतुकाची थाप मिळेल की नाही ही शंकाच आहे. नवरा जर तिला समजावून घेऊन तिला मदत करणारा असेल तरच ती स्त्री आयुष्य ख-या अर्थाने जगू शकते नाहीतर तिची मानसिक कुचंबना सुरूच राहते अगदी मरेपर्यंत!

आश्चर्य हे आहे की आजही, अजुनही एखाद्या स्त्रीला तिच्या स्वत:च्या घरामधेच मान-सन्मान दिला जात नाही. आपला समाजही असाच आहे की ज्याने ’स्त्रीयांचं काय कौतुक करायचं, तेच तर त्यांचं काम आहे’ असं म्हणून पिढयानपिढया हा कित्ता गिरविला आहे आणि स्त्री-पुरूष हे समान आहेत हे सत्य जणू पुसून टाकलं आहे. स्त्री ही फक्त उपभोगाची वस्तू आहे हेच पुरूषांच्या मनावर बिंबवलं गेलं आहे, जात आहे. नैसर्गिकरित्या स्त्री आणि पुरूष दोघांनाही एकमेकांची तितकीच गरज आहे पण ही गोष्ट दुर्लक्षित करून फक्त पुरूषाला जेंव्हा गरज आहे तेंव्हा तो स्त्रीचा वापर करू शकतो हे समीकरण पक्क झालं आहे! तसं बघितलं तर पुरूष अगदी जन्म घेण्यासाठीसुध्दा स्त्रीवरच अवलंबून आहे पण एकदा ह्या जगात आल्यावर त्याला ह्या गोष्टीचा विसर पडतो अन जिच्याशिवाय आपलं पानदेखील हलू शकत नाही अशा स्त्रीवरच कुरघोडी करत मर्दुमकी गाजवत राहतो.

पण मग स्त्रीने तिच्यावर होणा-या प्रत्येक अत्याचाराला वाचा फोडायला हवी पण दुर्दैव तिथेही तिचाच घात करतं कारण न्यायनिवाडा करणारी बहुसंख्य मंडळी हीसुध्दा पुरूषच असतात! ज्यांच्याकडे दाद मागायची तेच लोकं तिच्या अब्रूचे धिंडवडे काढायला बघतात. बलात्कार झालेल्या अर्ध्याअधिक तरूणी पोलिसामधे जाऊन तक्रार नोंदवत नाहीत कारण कोर्टात केस गेल्यावर तिच्यासोबत घडलेल्या अतिप्रसंगापेक्षा तो प्रसंग कथन करण्याच्या मरणयातना जास्त असतात. एखादीने नेटाने अशी केस लढवली तरी गुन्हेगाराला अगदी क्षुल्लक शिक्षा होते, तो शिक्षा भोगून पुन्हा एकदा निधडया छातीने समाजात वावरतो पण ती मुलगी मात्र समाजाच्या तिरस्कारीत नजरांनी आयुष्यभर घायाळ होत राहते.

म्हणूनच वाटतं, कशाला उगाच मुलगी जन्माला घालायची. ती म्हातारी मंडळी म्हणतात तेच बरोबर आहे, मुलगी होऊच द्यायची नाही म्हणजे पुढच्या गोष्टी आपोआपच टळतात!

जाऊ देत, लेट दिस वर्ल्ड बी ऑफ मेन ओन्ली...      

Monday, December 17, 2012

स्वच्छंदी



टेकडीवर मॉर्निंग वॉक करून झाल्यावर तिथेच असलेल्या एका ब-यापैकी मोठ्या दगडावर मी विसावले..पुण्यात आता थंडीची चाहूल लागायला सुरूवात झाली आहे. सकाळी ब-यापैकी गारही होतं आज पण नुकतंच सूर्यनारायणाचं आगमन झाल्यामुळे कोवळं ऊन अगदी आल्हाददायक वाटत होतं. ह्या टेकडीचा अर्धा भाग वनविभागाकडे आणि अर्धा आर्मीकडे आहे अन त्या दोन्हीच्या मधे जी थोडी जागा आहे त्यात हा नॅचरल जॉगींग ट्रॅक बनला आहे.

मी दगडावर बसून उबदार उन्हाचा अन गार वा-याच्या झुळकेचा आनंद लुटत असतांना समोरच्या झाडावर एक छोटीशी काळ्या रंगाची चिमणी येउन बसली.काही क्षण तिने पंख फडफडवले अन ती लगेच दुस-या झाडावर कुठेतरी उंच जाऊन बसली.मी तिला शोधण्याचा प्रयत्न केला पण ती कुठेतरी गुडूप झाली.

तितक्यात थोडया दूरवर असणा-या एका झाडावरून खूप सा-या साळुंक्यांच्या हसण्याचा आवाज आला, हो अहो, अगदी आपण १० माणसं हसल्यावर जसा अन जितका मोठा आवाज येईल तसाच आवाज होता तो! त्या किती साळुंक्या असतील म्हणून बघायला गेले तोवर त्यांची मैफल संपवून त्या कुठेतरी दुस-या झाडाकडे निघाल्या होत्या.

तिथेच खाली भारव्दाज पक्ष्याचं एक जोडपं खेळतांना दिसलं.त्यातला एक भारव्दाज उडया मारत मारत जमीनीवरून झाडावर जाऊन बसला ( ती कदाचित मादी असावी ) अन दुसरा भारव्दाज त्याच्या मागे मागे येत होता.मग पुन्हा झाडावरच्या भारव्दाजाने उडत दुस-या झाडाकडे कूच केली अन खाली असणारा भारव्दाज त्या झाडाकडे पळाला  ;-)

असंख्य पक्षी ह्या टेकडीवर खेळतांना-बागडतांना-मुक्तपणे विहार करतांना दिसतात.कधी-मधी एखाद्या कोप-यातून मोराचे सुध्दा आवाज येतात ह्या टेकडीवर  :-D पहाटे आलात तर त्यांचं दर्शन होऊ शकतं असं बरेच जण म्हणतात सुध्दा..

कित्ती छान लाईफ आहे नं ह्या सगळ्या पक्ष्यांचं! जेंव्हा हवं तेंव्हा, हवं तिथे ते पोहोचू शकतात.वेळेचं बंधन नाही की कुठे ऑफिसला लेटमार्क लागून हाफ डे वाया जाण्याचा प्रश्न नाही  :-D

पुन्हा कुठेही जायचं फक्त मनात आलं की पंख पसरायचे अन मोकळ्या आकाशात भरारी मारायची, वाव कित्ती मस्त ना :-) नाहीतर आपल्याला बस,रिक्षा-रिक्षावाल्यांच्या कटकटी,स्वतःचं वाहन असेल तर पेट्रोलची होणारी सारखी दरवाढ ह्यामुळे रोजचा किंवा कधीतरी केलेला विशेष असा प्रवास शांतपणे करणंसुध्दा अवघड झालंय हल्ली :-(

पक्ष्यांसाठी ही पण एक चांगली गोष्ट आहे की त्यांना कपडे घालण्याचा त्रास नाही, नाहीतर आपलं बघा!
महिन्याचा अर्धा पगार तर वीकमधे ऑफिसला घालण्याचे, वीकांताला भटकायला लागणारे, लग्न-कार्य आलं. तर कुठे सण-समारंभ आले ह्यासाठी कपडे घेण्यातच जातो!!

अजुन एक अगदी महत्त्वाचं म्हणजे त्यांना लग्नाचं टेन्शन नसतं..जो आवडेल तो, जी मादी भाव देईल तिच्या/त्याच्यासोबत लाईफ एन्जॉय करायचं..उगाच कांदे-पोहे प्रोग्रॅम करायची गरज नाही की विधीवत लग्न करायची..पुन्हा लव्ह मॅरेज / अरेन्ज मॅरेज केल्यावर भांडणं झाली तरी लगेच वेगळं होऊ शकतात अन पोर-टोरं असले तरी त्यांचे ते समर्थ असतात त्यामुळे एकुण काय तर नो टेन्शन अ‍ॅट ऑल्ल्ल्ल्ल  :-D !!

खाण्या-पिण्याचे चोचले नाही त्यामुळे जो काही दाणा-पाणी मिळेल त्यावर गुजराण करायची. सटर-फटर जंक फूड खाण्यामुळे होणा-या त्रासापासून आपोआपच सुटका :) बरं कधी कुठे लागलं-खुपलं,मोठा अ‍ॅक्सीडेंट झाला तरी निसर्गासारखा धन्वंतरी काळजी घ्यायला असल्यामुळे त्याचंपण टेन्शन नाही  :-P

आयुष्याचा कालावधी कमी किंवा प्रमाणात म्हणता येईल, असल्यामुळे म्हातारं जर्जर होऊन घरच्यांसाठी ओझं होण्याचा त्रास नाही!

कश्शा कशाचं म्हणून टेन्शन नाही ह्या पाखरांना..ना कुठे भावनिक गुंतागुंत ना कुठे पैसे कमी पडण्याचा त्रास फक्त निसर्गाच्या सान्निध्यात स्वच्छंदी जगायचं..मस्त मनात येईल तिथे बागडायचं,विहार करायचा..घरटं असेल तर घरट्यात नाही तर कुठेतरी झाडाच्या फांदीवर राहायचं..सकाळ झाली की चिवचिवाट करून जगाला जागं करत आकाशात भरारी घेत नव्या दिवसाचा आनंद लुटायचा..

देवा मलासुध्दा पुढच्या जन्मी असाच एखादा चिमणी किंवा खंडयासारखा पक्षी बनव प्लीज

जावेद अख्तरने एका गाण्यामधे म्हटलंय ना,'पंछी नदिया पवन के झोंके, कोई सरहद ना इन्हे रोके | सरहद इन्सानों के लिए है...'

Sunday, December 9, 2012

हूssह..प्रेम!!



सुधीर गाडगीळ यांच्या ’मुद्रा’ पुस्तकातील ’मैत्र जीवाचे’ हा लेख वाचला अन शेवटच्या वाक्यावर विचार सुरू झाले..

ह्या लेखामधे गाडगीळ यांनी दिग्गज लोकांच्या जिवलग प्राण्यांबद्दलचे किस्से सांगितले आहेत आणि शेवटी नमूद केलं आहे की जितकं प्रेम ही मंडळी त्यांच्या पाळीव प्राण्यांवर करतात तसं त्यांच्या आसपासच्या माणसांवर का करत नाहीत!

प्रेम..नितांत सुंदर अन सगळ्या नात्यांमधली एक प्रमुख भावना. नात्यांपरत्वे प्रेमाची रूपं निरनिराळी आहेत पण भावना एकच..त्या व्यक्तीबद्दल वाटणारा जिव्हाळा, काळजी, त्यासोबत आयुष्यातल्या छोट्या-मोठ्या गोष्टी चवीनं जगणं, आशा-निराशेच्या काळात आधार देणं, समजून घेणं...ते तर एकमेकांवर प्रेम करणा-या व्यक्तींमधे असतं ना, पण तरीही लेखकाने असा प्रश्न का केला?  

नातं कुठलंही असू देत, प्रेम करणारी व्यक्ती अगदी मनापासून प्रेम करत असते पण त्याबरोबरच असं प्रेम करणारी व्यक्ती तसंच प्रेम, जिव्हाळा, आपुलकी, आदरभाव ह्यांची अपेक्षा समोरच्या माणसाकडून ठेवते. तसं बघायला गेलं तर ह्यात वावगं काहीच नाहीये पण अशी अपेक्षा ठेवल्यावर जर समोरची व्यक्ती ती अपेक्षा पूर्ण करू शकली नाही तर कदाचित प्रेमाचा आवेग कमी होऊ शकतो..प्रेम ही सर्वोच्च भावना असली तरी अशावेळेस अपेक्षा वरचढ होते. समोरच्या व्यक्तीसाठी केलेली तगमग दुर्लक्षित केली जातीये ही भावना टोचायला लागते. जितका आदरभाव समोरच्या माणसाबद्दल असतो तो हळूहळू कमी होऊन कदाचित व्देषाची भावना जम धरू लागते. मग ह्यातूनच कधी टोकाची भूमिका घेऊन जोरजबरदस्तीने प्रेम मिळविण्याचा प्रयत्न होऊ शकतो!
खरं तर ते असं मिळविणं हे प्रेम नसतं तर तो फक्त माझा पण तुझ्यावर हक्क आहे ह्याची जाणीव करून देण्याचा केविलवाणा प्रयत्न असतो. अशाने काही साध्य होत नाही उलट नात्यांमधे दुरावा निर्माण होतो, कधीतरी दुरावा इतका वाढतो की ती व्यक्ती एक माणूस म्हणून सुद्धा आपल्या मनातून उतरते!

पण ह्यामधे चूक कोणाची? प्रेम करणा-या व्यक्तीची की ते प्रेम समजून त्याची परतफेड न-करू शकणा-याची? कदाचित कोणाचीच नाही अन दोघांचीपण आहे. प्रेम करणा-या व्यक्तीची चूक ह्यामुळे की त्याने निरपेक्ष प्रेम केलं नाही..प्रेम केलं आहे तर तसंच प्रेम समोरच्या व्यक्तीकडून मिळेल ही अपेक्षा चुकीची आहे. जर अपेक्षा ठेवली नसती तर अपेक्षाभंग झाला नसता आणि त्रासही वाचला असता! पण, एखादाही माणूस अपेक्षांशिवाय जगू शकतो? तुम्ही समोरच्या माणसाची काळजी घेत आहात त्याला समजून घेऊन त्याला रूचेल, आवडेल असं वागायचा प्रयत्न करत आहात तर तसंच समोरची व्यक्ती का नाही वागू शकत? त्याने असं वागावं ही साधी अपेक्षा का नाही ठेवू शकत? ज्या माणसावर प्रेम केलं तो सुध्दा माझ्यासारखाच माणूस आहे त्यालापण भावना आहेत अन दुस-याच्या भावना त्याला कळत असूनही ती व्यक्ती तसं का नाही वागू शकत??

प्रेमाची परतफेड न-करू शकणा-या व्यक्तीची चूक कशी? तर,
कोणीतरी आपल्यावर प्रेम करतंय, आपली काळजी करतंय, त्याच्यासोबत आपण आयुष्यामधे चार घटका चांगल्याप्रकारे अनुभवू शकतो ही सुंदर भावना जाणवत असून देखील ती व्यक्ती तसं नाही वागू शकत, का? कदाचित त्या व्यक्तीला ह्या सगळ्या गोष्टींची सवय झाली असेल पण आपणही त्यात काहीतरी देणं लागतो ही जाणीवच नसेल किंवा त्या व्यक्तीला प्रेम व्यक्त करता येत नसेल किंवा हे नातं त्याच्यावर अप्रत्यक्षपणे लादलं गेलं असेल किंवा सुरूवातीला जी अपेक्षा ह्या व्यक्तीने ठेवली तितकी समोरच्याने पूर्ण केली नाही अन ह्याच व्यक्तीचा अपेक्षाभंग झाला. नाहीतर असंही असू शकेल की भौतिक गरजांची पूर्तता करण्यापेक्षा मोठी असणारी भावनिक गरज पूर्ण करणं ही जबाबदारी त्या व्यक्तीला पेलवत नसेल!

कारणं खूप असू शकतात पण ह्यामुळे होतं असं की दोघांनाही प्रेम मिळत नाही..सुरूवातीला कदाचित वाद अन नंतर मना-मनामधे पडलेलं कायमचं अंतर!

श्या..विचारांचा नुसता गोंधळ आहे हा!! अखेरला वाटतं प्रेम वगैरे काही नाहीये फक्त माणूस दुस-याकडून अपेक्षा करत राहतो त्याने किंवा तिने कसं वागावं ह्याची, त्यात तो कुठेतरी हे मात्र विसरतो की जशा त्याच्या दुस-याकडून अपेक्षा आहेत तशा दुस-यांच्यासुध्दा त्याच्याकडून काहीतरी अपेक्षा आहेत!!

आणि मला उत्तर सापडलं गाडगीळांच्या प्रश्नाचं!

पाळीव प्राणी तुमच्यावर खरंखुरं प्रेम करतात, अगदी निरपेक्ष! तुम्ही सकाळी घराबाहेर पडतांना त्याला घरात बंद करून जा पण संध्याकाळी तो तुमच्या जवळ येईलच. कधी तुम्ही त्याला बाहेर फिरायला नेलं नाहीतर ते तुमच्यावर नाराज होऊन खेळणं बंद नाही करणार उलट तुमचा थकवा घालवण्यासाठी प्रयत्न करेल. तुम्ही त्याला कधी झिडकारलत तरी ते तुम्हांला कधी सोडून नाही जाणार, कधीच तुम्हांला एकटं असल्याचं जाणवू नाही देणार. तुमच्याकडून कसलीच अपेक्षा न-ठेवता तुमच्यावर फक्त प्रेमाचा वर्षाव करत राहणार. कदाचित ह्यामुळेच माणूस, माणसापेक्षा एखाद्या प्राण्यावर जास्त प्रेम करू शकतो..

Saturday, September 15, 2012

सुशिक्षित अडाणी



आय.टी. इंडस्ट्रीमधे काम करणारी सुशिक्षित,उच्चशिक्षित मंडळी रोजच अडाण्यासारखी कशी वागू शकतात ह्याचा अनुभव हल्ली येतोय मला!!
आमच्या ऑफिसने कॅबची सोय केलेली आहे आम्हांला ऑफिसला नेण्या-आणण्याकरता.त्यामधे कधी तीन किंवा चारजण असतात रोज सकाळी.जो कॅबचा व्हेन्डर आहे त्याने सगळी व्यवस्था चांगली केलेली आहे म्हणजे रोज सकाळी पिक-अपच्या १.५ तास आधी आम्हांला मेसेज येतो.त्यामधे ड्रायव्हरचा फोन नंबर, गाडी नंबर आणि जर काही अडचण आली तर व्हेन्डरचा नंबर दिलेला असतो.पिक-अप होण्याआधी ड्रायव्हर प्रत्येकाला फोन करून घराचा पत्ता किंवा पिक-अप पॉईंट आणि वेळ नक्की सांगतो.इतकं सगळं व्यवस्थित असतांना सुध्दा...
>> १० वाजता कॅब येऊन उभी राहिली दारात तरी लोक बाहेर येत नाहीत.
>> ड्रायव्हर फोन करतो तरी म्हणतात दोन मिनीटात आलो अन येतात १० मिनीटानंतर!!
खरं तर नियम असा आहे की कॅब ५मिनीटांपेक्षा जास्तवेळ वाट बघू शकत नाही कुठल्याही पिक-अपची पण आम्हांला घ्यायला येणारे ड्रायव्हर्स चांगले आहेत म्हणून १०-२०मिनीटे थांबतात!
जनरली तीन किंवा चार जणांचं पिक-अप असतं पण पहिल्याच माणसाने जर असा उशीर केला तर मग पुढचे सगळेजण लेट होतात अन शेवटी ऑफिसला पोहोचायला उशीर होतो त्याचा दोष कोणाला द्यायचा??
सकाळी १० वाजता पुण्यातल्या कर्वे रोड, पौड रोड, कोथरूड, हडपसर अशा मोकळ्या(??)रस्त्यांवरून गाडी हाकत चार जणांना गोळा करून हिंजेवाडीसारख्या अगदी रिकाम्या(?!!?) रस्त्याने ऑफिसला जायचं म्हटल्यावर कमीत कमी दीड तास जातो अन जर त्यात पाऊस असेल तर मग विचारायलाच नको!!
अशी परिस्थिती असतांना सुध्दा लोक किती शहाण्यासारखे वागतात ह्याचे काही नमुने खालीलप्रमाणे
>> पहिला पिक-अप घेतला,मॅडमला त्यांच्या पोराला डे-केअरला सोडायचं आहे,अगदी घराजवळच आहे ते पण मॅडम त्याला घेऊन कॅबमधे बसणार,पोराला डे-केअरला सोडणार अन मग गाडी पुढच्या माणसाला घ्यायला निघणार.
(ऑफिसची कॅब ही फक्त एम्प्लॉयीच्या घरापासून ऑफिसपर्यंत दिलेली आहे, खासगी कामांसाठी नाही तरीही!!)
हेच जर त्यांनी पोराला आधी सोडून मग कॅबमधे बसल्या असत्या तर? पण नाही आम्हाला ऑफिसने कॅब दिली आहे ना मग त्याचा वापर आम्ही कसापण करू बाकीच्यांना लेट होत असेल तरी आमचा काही संबंध नाही!!
>> रोज एका व्यक्तीचा पिक-अप पहिला असतो अन १० वाजता कॅब दारात येऊन उभी राहते पण ती व्यक्ती १०.१० च्या आधी गाडीत येऊन बसत नाही,कारण काय तर म्हणे, मला सगळ्यात आधी बसून मग तासभर पुढे बोअर व्हावं लागतं!! (म्हणजे मग यांना बोअर होऊ नये म्हणून हे उशीरा येणार अन पुढचे लोक उशीर होतोये म्हणून बोंबलत बसणार, काय बरं बोलणार ह्यावर??)
>> एक पठ्ठा मुख्य रस्त्यापासून थोडा आत राहतो,कॅब नेहमी त्याला घ्यायला अगदी आतपर्यंत जातेच पण कधी जर उशीर झालेला असेल तरीसुध्दा तो माणूस दोन पावलं चालून मुख्य रस्त्यावर येत नाही अन वेळेवर खाली येऊन थांबणं हा तर त्याला जणू अपमानच वाटतो!!
>> एकदा माझा पहिला पिक-अप झाला (स्वतःचं कौतुक म्हणून नाही पण, मी काहीही झालं तरी कॅबला वाट बघायला लावत नाही,त्यामुळे) गाडी मला बरोबर १०वाजता घेऊन पुढच्या मॅडमला घ्यायला गेलो.ड्रायव्हरने एकदा फोन केला,त्यांचा फोन बिझी.त्यांच्या पत्त्यावर पोहचून फोन केला,पुन्हा फोन बिझी.पाच मिनीटानंतर फोन केला
तरी तेच,फोन बिझी! कॅबवाल्याने मग ऑफिसमधे फोन करून सांगितलं त्या मॅडमना कॉन्टॅक्ट करायला पण त्यांनीसुध्दा फोन करून बिझी असल्याचं कळवलं अन पुढचा पिक-अप करायाला जा म्हणून सांगितलं.आम्ही तिस-या माणसाला घेतलं अन त्या बाईंचा फोन आला की कॅब आली कशी नाही अजुन?? ड्रायव्हरने त्यांना घडलेला प्रकार सांगितला पण त्या ऐकायला तयारच नाहीत म्हटल्या आत्ता जिथे आहेस तिथे थांब मी तिथे पोहोचते.
आम्हांला त्या बाईमुळे आधीच उशीर झाला होता पण आता त्या असं म्ह्टल्यामुळे थांबणं आलंच.मग दहा मिनीटांनी त्या बाई कॅबमधे येऊन बसल्या अन ड्रायव्हरला लगेच ओरडायला लागल्या,थांबता येत नाही का दोन मिनीटंसुध्दा,फोन एकदा एंगेज लागला म्हणून काय झालं असं सोडून जायची पध्दत असते का अन काय काय!
मी तर थक्कच झाले त्यांचे हे बोल ऐकून!! चोरच्या चोर अन शिरजोर! तो ड्रायव्हर काही बोलला नाही म्हणून तो वाद तिथेच थांबला अन आम्ही पुढे निघालो!
तो माणूस गाडीवानाचं काम करतोय,त्याच्या परिस्थितीमुळे काही बोलू शकत नाही म्हणजे तो खुप कमी दर्जाचा आहे अन त्याला काहीच अक्कल नाही,आपणच ह्या जगातले सगळ्यात हुशार ह्या आवीर्भावात का वागतात लोक? समोरचा माणूसपण एक व्यक्ती आहे ही जाणीव उच्चशिक्षण काढून टाकतं का त्यांच्या डोक्यातून??कसला येवढा माज करतात कोणास ठाऊक!!
>> कधी-कधी एखाद्याला काही अडचण असू शकते त्यामुळे उशीर होऊ शकतो पण ती गोष्ट जर तुम्ही कॅबवाल्याला वेळेत सांगितली तर पुढच्या लोकांचा वेळ वाया जात नाही, पण इतकी समज दाखवली तर ते शहाणे म्हणवतील ना! असाच प्रसंग एकदा आला, आम्ही शेवटचा पिक-अप घ्यायला निघालो.हायवेहून एका छोटया रस्त्याने वळसा घेत-घेत त्याच्या घरी पोहोचलो.त्या माणसाला फोन केला पण त्याने उचलला नाही,त्याच्या जागेवर पोहोचल्यावर फोन केला तर त्याने उत्तर दिलं की,'मै पुणेसे बाहर हूं,आज पिक-अप नही है!!'
आता हीच गोष्ट त्याने थोडयावेळापूर्वी सांगितली असती तर आमचा हेलपाटा वाचला असता, पण नाही..आम्ही सुशिक्षित अडाणी आहोत ना,आम्हांला ह्या साध्या गोष्टी माहित असूनही समजून घ्यायच्या नाहीत अन समजल्या तरी तसं वागायचं नाही!!
>> एक तर माणूस इतका हुशार आहे की त्याने त्याचा 'पर्मनंट अ‍ॅड्रेस' देऊन ठेवला आहे अन कॅबवाल्याने फोन केला की त्याला इंग्रजीमधून पत्ता समजावून सांगतो.कॅबवाल्याला कळालं नाही म्हणून तो हिंदीमधे विचारू लागला तर त्याने अगदी शुध्द हिंदीमधे बोलायला सुरूवात केली, आता इतकी चांगली हिंदी इथे कळते कोणाला?? शेवटी एकाने फोन घेतला अन पत्ता समजून घेतला.पण तो माणूस नविन असल्यामुळे त्याला लॅण्डमार्क धड सांगता आले नाही अन आम्ही पंधरा मिनीटे इकडे-तिकडे विचारत कसंतरी त्याला घ्यायला पोहोचलो!!
एक साधा पत्ता धड अपडेट करू नये का ह्या माणसाने? सिस्टीममधे अपडेट करायला १मिनीट पण पुरेसा आहे पण नाही...

आम्ही गर्वाने सुशिक्षित अडाणी म्हणून मिरवणार, सुधारणार नाही!!

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check




Friday, August 10, 2012

आधारवड

ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी


श्री.गंगाधर गणपतराव देशमुख
उर्फ
बाबासाहेब देशमुख



 कोणी साह्य करो वा न करो, शिक्षण होय जे कर्म,
शिकलेच पाहिजे ते; श्रेयस्कर हाच आपणा धर्म.

शिकल्याशिवाय आपला विकास होणार नाही हे मर्म ७० वर्षांपूर्वी खेड्यामधे वाढलेल्या एका कोवळ्या वयातल्या पोराला कळालं अन त्याने स्वत:चं, स्वत:च्या कुटुंबाचं अन पुढे गावाचं कल्याण ह्याच शिक्षणाच्या माध्यमातून घडवून आणलं!

गोरा वर्ण,तरतरीत नाक,सहा फूट देहयष्टी,करारी नजर पण चेह-यावर शांत भाव हे वर्णन आहे माझे आजोबा श्री.गंगाधर उर्फ बाबासाहेब गणपतराव देशमुख यांचं. आयुष्यभर गांधी टोपी घालणारे एक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी ज्यांनी मराठवाडा मुक्तीसंग्रामामधे मोलाची कामगिरी बजावली.आमच्या कुटुंबाचा सगळ्यात ज्येष्ठ,सुज्ञ,प्रेमळ,कर्तव्यनिष्ठ असा हा आधारवड जुलै ३०,२०१२ रोजी आम्हांला पोरका करून गेला..

८४ वर्षांच्या आयुष्यामधे त्यांनी एक आज्ञाधारक मुलगा,समंजस नवरा,कर्तव्यनिष्ठ पिता,प्रेमळ आजोबा अशा घरामधल्या महत्त्वाच्या भूमिका निभावल्या त्याचबरोबर अनुशासन पाळणारा गावकुसाचा पोलिस-पाटील, डोळ्यात तेल घालून शेती बघणारा धनी अशा घराबाहेरच्या भूमिकाही अगदी चोख बजावल्या.  

त्यांचा जन्म २७ एप्रिल,१९२७ रोजी मु.पो.माहोरा, ता.मंठा, जिल्हा जालना येथे झाला.पण वयाच्या बाराव्या वर्षीच त्यांच्या डोक्यावरचं वडीलांचं छत्र हरवलं त्यामुळे सख्खी चार भावंडं,एक चुलत भाऊ अन आई इतक्या कुटुंबाचा भार त्यांच्या कोवळ्या खांद्यांवर येऊन पडला.खेळण्या-बागडण्याच्या वयात असतांना घरावर कोसळलेल्या ह्या संकटाला त्यांनी आईच्या मदतीने खंबीरपणे तोंड द्यायला सुरूवात केली.स्वतःच्या शिक्षणासोबतच त्यांनी शेतीची तसंच बाहेरची कामं हळुहळू शिकायला सुरूवात केली.

वयाच्या सोळाव्या वर्षी आजोबांचं लग्न झालं अन आमची आजी श्रीमती.रमाबाई गंगाधर देशमुख बनून कुटुंबात प्रवेशिती झाली.आजी अवघी चौदा वर्षांची होती पण त्याही वयात परिस्थितीची गांभिर्यता लक्षात घेऊन तिने आजोबांचा आधार व्हायचं ठरवलं अन घराची धुरा सांभाळायला सुरूवात केली.दोघांनी अगदी व्यवस्थित संसार केला.कधी मुबलक पैसा आहे म्हणून उधळ-माधळ केली नाही की कधी सगळं संपलं आता म्हणून दुस-याकडून मागून सण साजरा केला नाही.कायम अंथरूण बघून पाय पसरले अन अडीनडीच्या वेळेसाठी पैश्याची काटकसरीने योग्य ठिकाणी गुंतवणूक करून ठेवली.    

दादा(आजोबा) जसे स्वतःच्या शिक्षणाबाबत जागरूक होते तसेच त्यांच्या भावंडांच्या शिक्षणाबाबतही आग्रही होते.प्रत्येकाने शिकून स्वतःच्या नशिबाला घडवायला हवं ही गोष्ट त्यांना चांगलीच ठाऊक होती म्हणूनच त्यांनी कितीही जरी अडचणी आल्या तरी कोणालाही शिक्षणापासून परावृत्त केलं नाही.त्यांनी भावांना-मुलांना तर शिकवलंच पण बहिणी आणि मुलींना सुद्धा शिक्षणामधे कुठे मागे राहू दिलं नाही.त्या काळातही आमच्या घरातल्या स्त्रीया कमीत कमी ग्रॅज्युएशनपर्यंत शिकलेल्या होत्या.शिक्षणाचा हा वसा पुढे त्यांच्या मुलांनी अन नातवांनी गिरवला अन घरातला प्रत्येक मुलगा-मुलगी,नात-नातू आपापल्या क्षेत्रात उच्च पदावर पोहोचले अन फक्त भारतातच नाही तर दुबई,कॅनडा,लंडन,न्यूयॉर्क सारख्या देशांमधेसुद्धा चमकले.ह्या गोष्टींमुळे गावात अन आजूबाजूच्या परिसरात लोकांना शिक्षणाचं महत्त्व कळायला लागलं अन तेही शिकण्यास प्रवृत्त झाले. 

आजोबांचा स्वभाव शांत न संयमी होता.प्रतिकुल परिस्थिती जरी समोर आली तरी न-डगमगता त्यातून मार्ग काढून पुढे जाणं ह्यात त्यांचा हातखंडा होता.त्यांच्या ह्या स्वभावाला अन एकुणच मानसिक ताकदीला कुठेतरी देवावरचा गाढा विश्वास कारणीभूत असावा.त्यांचा प्रत्येक दिवस,अगदी शेवटच्या क्षणापर्यंतचा, देवाची पूजा-अर्चा केल्याशिवाय कधी सुरू झाला नाही.ते कायम देवाचं नामस्मरण करायचे फावल्या वेळात देवाची पुस्तकं वाचायचे.विविध धार्मिक स्थळांना भेटी द्यायचे,वयाच्या ६५ व्या वर्षी त्यांनी केदारनाथाची यात्रा केली होती.त्यांना फिरायची खुप आवड होती, त्यांनी भारतभ्रमणासोबतच जगातील मोठमोठ्या देशांनाही भेटी दिल्या होत्या अगदी आत्ता गेल्या वर्षी ते दुबई मधल्या वर्ल्ड फेमस टॉवरला भेट देऊन आले होते. 
त्यांना ज्योतिषाशास्त्रातलं सुध्दा कळायचं.आम्हा सगळ्या नातवंडांचं प्रत्येक वर्षीचं भविष्य किंवा कधी कोणत्या कामासाठी चांगला काळ आहे किंवा कधी जर काही अडचणीचा काळ येणार असेल वगैरे हे सगळं ते सांगायचे.  

दादांना जरी ज्योतिषाशास्त्र कळत होतं,देवावर त्यांचा विश्वास होता तरी ते अंधश्रध्दाळू नव्हते,काळानुसार होणारे बदल ते सहजपणे स्विकारत अन स्वतःमधे बदल करवून घेत.अर्थात 'कालाये तस्मै नमः' हे त्यांचं जिवनसूत्रच होतं.घरातील सर्वात ज्येष्ठ न सदैव जागरूक असल्यामुळे त्यांनी काळानुरूप होणारे बदल सहजरित्या घरामधे सुध्दा मुरविले.

माहो-यासारख्या खेडेगावात राह्त असून सुध्दा पूर्वापार काळानुसार चालत आलेल्या स्पृश-अस्पृश भेदभाव अशा चालिरिती त्यांनी कधी मानल्या नाहीत न त्या पुसून टाकून गावकुसातल्या सर्व जाती-धर्मातील लोकांना घराचं दार सदैव उघडं केलं.

मला आठवतं,दादांच्या बोलण्यात कायम म्हणी,वाक्प्रचार गुंफलेले असायचे.कुठल्या प्रसंगाबद्दल जर ते बोलत असतील तर त्याला योग्य असणारी म्हण सांगूनच बोलायला सुरूवात व्हायची.आम्ही नातवंडं तर शाळेच्या आधीच आजोबांकडून अशा भरपूर म्हणी शिकलो होतो..त्यांच्या काही आवडत्या म्हणी अशा

अंथरूण पाहुन पाय पसरावे.

तंग खाना मगर मंग नही खाना (अडचण आहे म्हणून थोडी बचत करा पण लगेच दुस-यापुढे हात पसरू नका).

दूस-याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण स्वतःच्या डोळ्यातलं मूसळ दिसत नाही.

उचलली जीभ न लावली टाळूला.

एक नन्ना हजार में भारी (एक 'नाही' शब्द पुढच्या हजार गोष्टींना रोखू शकतो.)

खाऊन माजा पण टाकून माजू नका (हवं तर अन्न जास्त घेउन खा पण ताटातलं अन्न टाकून त्याचा अपमान करू नका).

ऐसी जगह पे बैठना कोई न बोले उठ,ऐसी बात करना कोई न बोले झूठ. 

आजोबांनी त्यांच्या आयुष्यात भारताच्या पारतंत्र्याचा लढा बघितलाच होता पण पुढे त्यांनी हैदराबाद मुक्ती संग्रामासाठी कामही केलं.भारताला स्वातंत्र्य मिळाल्यावरही महाराष्ट्रातील मराठवाडा, तेलंगना आणि कर्नाटकाचा काही भाग निझामाच्या राजवटीखाली होता.त्याविरूध्द जी चळवळ सुरू झाली त्यामधे अनेकांनी विविध स्वरूपाचं कार्य केलं,ह्या सैनिकांमधे भूमिगत राहून कार्य करणा-यांची संख्यापण खूप होती त्यातलेच एक आमचे आजोबा होते.ह्या सैनिकांना अतिशय जोखमीची कामं अगदी गुप्तपणे करावी लागत ज्यामधे रात्रीतून घरामधे गुप्त मिटींग्स घेणे,इतर स्वातंत्र्यसैनिकांना अन्न-धान्य पुरवठा करणे,पत्रकं-निरोप एका ठिकाणाहून दुसरीकडे पोहोचवणे वगैरे.ह्या सगळ्या कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांना,आहुत्यांना १९४८ मधे यश मिळालं अन निझामाची राजवट संपुष्टात आली.

पुढे आमचे दादा माहो-याचे पोलिस-पाटील म्हणून नेमले गेले.जवळपास वयाची ५० वर्षे त्यांनी ही भूमिका अगदी इमाने-इतबारे निभावली.गावामधे शांतता राखणे,भांडण-तंटा झाल्यास त्यात मध्यस्थी करून तो सोडविणे किंवा एखादं प्रकरण जर हाताबाहेर गेलं तर तालुक्यातल्या पोलिस स्टेशनला कळविणे ह्या गोष्टींची जबाबदारी त्यांच्यावर होती. ह्याबाबतीत माझ्या आजीने एक प्रसंग असा सांगितला की, १९६९-७० साली जेंव्हा भारताला स्वातंत्र्य मिळून बरीच वर्ष लोटली होती पण तरीही खेडयांमधे लोक जात-पात अगदी काटेकोरपणे पाळत होते.त्यामुळे अस्पृश्य समजल्या जाणा-या लोकांना गावातल्या विहीरवर पाणी भरायची मुभा नव्हती, कोणीतरी त्या लोकांना रोज पाणी काढून देत असे.एकदा त्या लोकांनी ह्या पध्दतीविरूध्द चाल करून सरळ त्या विहीरीवर पाणी भरलं त्यामुळे गावातले बाकीचे लोक आजोबांकडे फिर्याद घेऊन आले.त्या अस्पृश्य लोकांनी विहीरीवर पाणी भरल्यामुळे त्यांना शिक्षा करावी अशी त्यांनी मागणी केली.यावर आजोबांनी फिर्याद करणा-या लोकांना कडक शब्दात ठणकावलं की, ती सुध्दा माणसंच आहेत अन कायद्यानुसार त्यांनाही समान हक्क आहे त्यामुळे ते आजपासून विहीरीवर पाणी भरू शकतील,ज्या कोणाला त्रास होत असेल त्याने स्वत:ची दूसरी व्यवस्था करून घ्यावी.अन तेंव्हापासून ती विहीर सर्वांसाठी खुली झाली.        

ह्या कामांबरोबरच आजोबांनी, गावक-यांच्या मदतीने माहो-यामधे विविध सुधारणा करविल्या,गावामधे प्राथमिक शाळा नव्हती त्यामुळे लहान मुलांच्या शिक्षणात अडसर येत होता,ह्यासाठी त्यांनी स्वतःची जमीन शाळा उभारणीसाठी दिली तसंच शाळेमधे शिकविणा-या शिक्षकांची नेमणूक, मुलांसाठी घेतले जाणारे कार्यक्रम ह्याकडेही बारकाईने लक्ष दिलं.दरवर्षी शाळेतून पहिल्या येणा-या मुला-मुलींना शिष्यवृत्तीही देऊ केली. 
माहोरा गांव खुप आतल्या भागात आहे तिथे पोहोचायला मुख्य रस्त्यापासून बरंच आत यावं लागतं.सगळीकडे जोडणारा रस्ता नसल्यामुळे पावसाळ्यामधे जाण्या-येण्याकरता खुप अडचणी येतात त्यासाठी दादांनी गावातर्फे आमदाराकडे अर्ज करून डांबरी पक्के रस्ते करवून घेतले.
तसंच गावाच्या मध्यवर्ती भागात एक १०० वर्ष जुनं विठ्ठल-रखुमाईचं मंदीर होतं,त्याची अतिशय पडझड झाली होती.त्या मंदीराचा स्वखर्चाने जिर्णोद्धार करविला अन पुन्हा एकदा गावक-यांसाठी प्रति-पंढरपूर उभं केलं अन गावामधे टाळ-मृदुंगाच्या नादात हरिनामाचा गजर सुरू झाला..

असे आमचे आजोबा जे संयमी होते, जे मिळतंय त्यात समाधान मानणारे होते.देवाने मला अजुन का नाही दिलं ह्या विचारापेक्षा प्रारब्धाने जे जे दिलं ते त्यांनी गोड मानून घेतलं. कधी कोणाशी भांडले नाही की कधी कोणाला वैरी ठरवून त्याच्याशी संबंध तोडले नाही.कधी जर कोणी त्यांच्याकडे काही मागितलं तर त्याला नाही न-म्हणता शक्य तितकी मदत केली.संसाराचा रहाटगाडगा हसतमुखाने,समाधानाने,इतक्या मोठ्या कुटुंबाला एकत्र ठेवत त्यांनी पार केला अन आज ते पुढच्या प्रवासाला निघून गेले..

अजुनही सकाळी ६ वाजता गजराच्याऐवजी त्यांच्या धीरगंभीर आवाजातील भूपाळ्यांचा आवाज कानी घूमतो..








या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



Sunday, July 22, 2012

श्रावणमास - श्लोक


सकाळी झोपेतून जागे झाल्यावर अंथरूणात बसून हाताची ओंजळ करून म्हणावयाचा श्लोक.
   कराग्रे वसते लक्ष्मी: करमूले सरस्वती।
   करमध्ये तु गोविंद: प्रभाते करदर्शनम॥
हाताच्या अग्रभागी लक्ष्मी, मूलभागी सरस्वती आणि मध्यभागी गोविंद वसतो म्हणून सकाळी तळहाताचे दर्शन घ्यावे.

अंथरूणावरून उठून जमिनीवर पाय ठेवण्यापूर्वी, जमिनीला नमस्कार करून म्हणावयाचा श्लोक.
   समुद्रवसने देवी । पर्वतस्तनमण्डले ।
   विष्णुपत्नि । नमस्तुभ्यं पादस्पर्शं क्षमस्व मे ॥
समुद्ररूपी वस्त्र धारण करणा-या, पर्वतरूपी स्तन असलेल्या, भगवान विष्णूची पत्नी असलेल्या हे पृथ्वीदेवी, तुला मी नमस्कार करतो.माझ्या पायाचा तुला स्पर्श होणार आहे त्याबद्दल मला क्षमा कर.

पूर्वीच्या काळी कडुनिंब किंवा गावरान बाभळीच्या काडया दात घासायला वापरल्या जात असत त्यामुळे वनस्पतीजवळ मागणी मागणारा पण एक श्लोक असा 
   आयुर्बलं यशो वर्च: प्रजा: पशून वसूनि च ।
   ब्रम्ह प्रज्ञां च मेधां च त्वं नो देहि वनस्पते ॥
हे वनस्पती, तू आम्हांला आयुष्य, बळ, यश, तेजस्विता, प्रजा, पशू, संपत्ती आणि त्याचप्रमाणे ब्रम्हाला जाणण्याची व आकलन करण्यासारखी उत्कृष्ट त-हेची तेजस्वी बुद्धी दे.


आंघोळ करतांना म्हणावयाचा श्लोक.
   गंगे च यमुने चैव गोदावरि सरस्वति ।
   नर्मदे सिंधु कावेरि जलेsस्मिन सन्निधिं कुरू ॥
हे गंगे, यमुने, गोदावरी, सरस्वती, नर्मदे, सिंधू, कावेरी तुम्ही सर्व नद्या माझ्या स्नानाच्या पाण्यात या.

सूर्यदेवाला नमस्कार करतांना म्हणावयाचा श्लोक.
    आदिदेव । नमस्तुभ्यं प्रसीद मम भास्कर ।
    दिवाकर । नमस्तुभ्यं प्रभाकर नमोsस्तु ते ॥
हे आदिदेव सूर्यनारायणा, मी तुला नमस्कार करतो. हे प्रकाश देणा-या भास्करा, तू प्रसन्न हो. हे दिवाकरा, तुला मी नमस्कार करतो. हे तेजस्वी प्रभाकरा, तुला मी प्रणाम करतो.

गुरूंना वंदन करतांनाचा श्लोक.
   गुरूर्ब्रम्हा गुरूर्विष्णु: गुरूर्देवो महेश्वर: ।
   गुरू: साक्षात्परब्रम्ह तस्मै श्रीगुरवे नम: ॥
गुरू हेच ब्रम्हदेव, गुरू हेच सर्वव्यापक भगवान विष्णू, गुरू हेच कैलासराणा शिवजी, गुरू हेच साक्षात परब्रम्ह होत. अशा गुरूंना मी नमस्कार करतो.


दिवा लावतेवेळी म्हणावयाचा श्लोक.
    शुभं करोतु कल्याणं आरोग्यं धनसंपद: ।
    शत्रुबुध्दिविनाशाय दीपज्योतिर्नमोsस्तु ते ॥
हे दीपज्योती, तू शुभ आणि कल्याण करतेस. त्याचप्रमाणे आरोग्य आणि धनसंपत्ती देतेस. शत्रू मानणा-या बुध्दीचा नाश करतेस, म्हणून तुला मी नमस्कार करतो/करते.

झोपण्याआधी म्हणावयाचा श्लोक.
   कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने ।
   प्रणत क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नम: ॥
वसुदेवाचा पुत्र जो भगवान श्रीकृष्ण त्याला, सर्व दु:खे हरण करणा-या परमात्म्याला, शरण आलेल्या लोकांचे क्लेश दूर करणा-या गोविंदाला वारंवार नमस्कार असो.

Wednesday, July 18, 2012

श्रावणमास - दर्श ठाणवयी अमावस्या



आज दर्श ठाणवयी अमावस्या.

श्रावणमास सुरू होण्यापूर्वी येणारी ही अमावस्या दिपपूजनाचा दिवस म्हणून पण ओळखली जाते.पूर्वीच्या काळी अंधारात आधार देणा-या मिणमिणत्या पणतीपासून ते लामणदिवा-कंदीलापर्यंत सगळ्या दिव्यांची ह्या दिवशी पूजा केली जात असे.

आदल्या दिवशी घरातल्या सगळ्या दिव्यांची स्वच्छता करून त्यांना लख्ख करून ठेवलं जायचं.मग आजच्या दिवशी सगळ्या दिव्यांना पाटावर मांडून त्यासमोर रांगोळी काढून,गंध-फुलांनी त्यांची मनोभावे पूजा केली जात असे.गुळ-फुटाणे-लाह्या यांचा नैवेद्य दाखवून 'दिव्याची कहाणी' वाचून ह्या पूजेची सांगता होत असे.ह्या सगळ्या दिव्यांमधे मान असतो तो गुळ घालून केलेल्या कणकेच्या दिव्यांचा.हे दिवे वाफेवर बनवून नंतर पुजेत मांडले जातात.तसंच ह्या पुजेसाठी बाभळीची फुलं वापरली जात असत.

अशाप्रकारे, काळामिट्ट अंधार उजळून टाकणा-या ह्या चिमुकल्या सूर्यदूतांची पूजा करून त्यांबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली जात असे.




या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Wednesday, June 20, 2012

प्रसन्न सकाळ


’अरे वा :-) आज मोबाईलचा गजर इतका गोड आवाजात कसा काय गातो आहे?’ असं म्हणून डोळे किलकिले करत मोबाईल हातात घेतला तर तो तर अगदी निपचित पडलेला होता आणि रोजची गजराची वेळ तर अजुन झालीच नव्हती मग तो गोड आवाज येतोय कुठुन ह्या कुतुहलाने मी इकडे तिकडे बघितलं तर खिडकीसमोरच तारेवर बसलेले हे महाशय दिसले


रेड व्हेन्टेड बुलबुल 


इतक्या सुमधुर आवाजात तो गात होता की मी बेडवरून अगदी टुनकन उठुन खिडकीत आले अन बघत उभी राहिले, त्याची समाधी लागलीये हे बघून मी पटकन कॅमेरा काढला आणि त्याचं छायाचित्र टिपून घेतलं. थोडयावेळाने त्याचा साथीदार आला अन दोघे उडून गेले तशी मी आत वळले.आज रोजच्या पेक्षा खुपच लवकर मी जागी झाले होते, घडयाळ बघितलं आणि वाटलं अजुन वेळ आहे तर एक डुलकी काढावी पण पुन्हा वाटलं नकोच, आज इतकी छान सुरूवात झाली आहे दिवसाची तर आता पटापट आवरावं आणि एखादी प्रभातफेरी मारावी. मग काय,मी लगेचच सगळं आवरून बाहेर पडले.

पाय-या उतरून खाली आले तसं हवेत सुखद गारवा जाणवला अन अगदी प्रसन्न वाटलं पुढे गेटमधून बाहेर पडले तर पहिली गोष्ट दिसली ती म्हणजे आमच्या अपार्टमेंटच्या तिथे असलेलं दुकान उघडलेलं होतं (पुण्य़ात इतक्या लवकर दुकान उघडू शकतं?, असो ) दुधाची गाडी उभी होती आणि १-२ गि-हाईकं काही-बाही घेत होती.त्या गाडीला वळसा घालून मी पुढे मुख्य रस्त्यावर आले अन समोरचं दृश्य बघून स्तब्ध झाले!! आजपर्यंत मी ह्या बाजूचा रस्ता कधी बघितलाच नव्हता!! पूर्ण रस्ता अगदी हिरव्याकंच झाडांनी बहरलेला
मी तशाच विस्फारलेल्या डोळ्यांनी ते सौंदर्य न्याहाळत पुढे निघाले.



चौकात आल्यावर उजवीकडे बघितलं तिथेसुध्दा हिरव्या सुंदर झाडांची रांग दिसली अन आश्चर्य करत मी स्वतःला झापलं की इतके दिवस झाले आपण इथे राहतोय पण आतापर्यंत एकदाही आपल्याला ह्या सृष्टीसौंदर्याची पुसटशी कल्पनापण नाही आली,श्या!



पुढे मी वॉक करायला सुरूवात केली तसं लक्षात आलं की रस्त्यावर अगदीच तुरळक गाडया धावत होत्या आणि बहुसंख्य जनता मॉर्निंग वॉक करत होती, मला जरा बरं वाटलं म्हटलं चला आज आपण पण ह्यांच्यासोबत सामील व्हावं.

मी एक-एक गोष्ट न्याहाळत पुढे जात होते, थोडयाच अंतरावर एक बस स्टॉप दिसला तिथे तिन-चार आजी मस्त हसत-खेळत गप्पा मारतांना दिसल्या.त्यांचा उत्साह बघून त्यांना आजी म्हणणं खरंतर चुकीचं आहे,असो.पुढे एक मुलगा त्याच्या क्युट डॉगीला फिरवायला म्हणून घराबाहेर पडला अन त्या डॉगीने जे धूम ठोकली की कोण कोणाला जॉगिंग करवतय हे कळेचना. हे दृश्य बघत असतांनाच मला अचानक विचित्र हसण्याचा आवाज येऊ लागला कानोसा घेत मी इकडे-तिकडे शोधलं तर दिसलं रस्त्याच्या डाव्या हाताला एका गल्लीत एका बागेमधे काही मंडळी हात वर करकरून चित्रविचित्र पध्दतीने हसत होती,तो हास्यक्लब होता. :-D

ह्या रस्त्यावर मारोतीचं आणि गणपतीचं मंदीरही मला दिसलं म्हणजे लक्षात आलं कारण बरीच मंडळी जाता-येता एक क्षण तिकडे बघून हात जोडत काहीतरी पुटपुटत जातांना दिसली.

रस्त्यावर प्रभातफेरी करणारी बहुसंख्य जनता ही साधारण चाळीशी किंवा त्यापेक्षा वयाने मोठी वाटत होती.बरेच आजोबा त्यांच्या ग्रुपसोबत मस्त चर्चा झोडत होते तर काहीजण तिथल्याच बाकावर हातात देवाचं छोटं पुस्तक घेऊन वाचत बसले होते.एक आजोबा मात्र अगदी सुरा-तालात गाणं म्हणत होते, अगदी तल्लीन होऊन ते स्वतःच स्वत:चं गाणं एंजॉय करत होते.त्यांच्या चेह-यावरचे हावभाव बघून मला इतकं मस्त वाटलं,विचार आला असं असायला हवं माणसाने,आजूबाजूला कोणी बघतंय, हसतंय वगैरे फालतू विचार करण्यापेक्षा आपल्या धुंदीतच मस्त जगायचं :-)

थोडया वेळाने काही माझ्यासारखे यंगस्टर्सपण धावतांना दिसले पण ते बिचारे ऑफिसची बॅग सांभाळत बस पकडण्यासाठी धावत होते. मला फार बरं वाटलं माझं ऑफिस दुपारचं आहे म्हणून :-)

जशी माणसं मजेदार दिसत होती तशीच रस्त्यालगत असलेली घ्ररंपण अगदी वेगळेपण जपणारी दिसली.एक-दोन अपार्टमेंटस सोडले तर बाकी जवळपास सगळे बंगलेच आहेत प्रत्येकाला अगदी छान अर्थपूर्ण नाव असलेले.प्रत्येकाच्या बंगल्यात छोटी बाग दिसली त्यात मोगरा,चाफा,कन्हेर,बकुळ अशी विविध फुलझाडं तसंच कोणाकोणाकडे आंब्याचं किंवा अशोकाचं झाड दिसलं.गेटपासून ते दारावर लावलेल्या गणपतीच्या मुर्तीपर्यंत, घराच्या रंगापासून ते बागेत ठेवलेल्या शोभेच्या वस्तूंपर्यंत सगळंच प्रत्येकाच्या बंगल्यात युनिक दिसत होतं.पुण्यातलं पब्लिक सगळ्या बाबतीत चोखंदळ आहे ह्यात काही वाद नाही.

ह्या रस्त्याच्या शेवटी एक मोठी टेकडी आहे, बरीच मंडळी तिकडेही फिरायला जातांना दिसली मग मी पण तिकडे वळले.पहिल्याच क्षणी मला एका घरात खुप मोठठं आंब्याचं झाड दिसलं मस्त कै-यांनी लगडलेलं बघताक्षणी तोंडाला पाणीच सुटलं.

त्या झाडाकडे बघतांना माझा अचानक धक्का कोणाला तरी लागला, बघितलं तर एक आजी हातात काठी घेऊन तरातरा समोर जातांना दिसल्या,निरखून बघितलं तर त्या चाफ्याच्या झाडाची फुलं घ्यायला धावतांना दिसल्या  ;-)
त्यांच्यासारखीच अजुन एक-दोन लोकं हातात पिशव्या घेऊन कंपाऊंड मधून बाहेर डोकावणा-या प्राजक्त, तगर ह्या झाडांची फुलं तोडतांना दिसली, मॉर्निंग वॉकचा हाही एक उपयोग  ;-)

असो, पुढे मी टेकडीच्या पायथ्याशी आले तसे मला बरेच लोक आपापल्या कुत्र्यांना फिरवायला आलेले दिसले आणि त्या गर्दीमधेच एक छोटा मुलगा मस्त झुपझुप स्केटींग करतांना दिसला,इतकं वेगवेगळं बघायला मिळत होतं प्रत्येक वळणावर मला तर आश्चर्यच वाटत होतं :-)

ह्याच विचारांमधे मी टेकडी चढायला सुरूवात केली,तिथेपण जागोजागी लोक व्यायाम करतांना,योगासनं करतांना दिसत होती. मी थोडंच अंतर चढून गेले असेन पण मला धाप लागायला लागली :-( माझ्यापेक्षा वयाने मोठी मंडळी पण भराभर टेकडी चढत होती न मी धापा टाकत होते. मी आत्ता ह्याच वयात 'आयटी' च्या कृपेमुळे म्हातारी झाले होते! माझे खाडकन डोळे उघडले मी त्याच क्षणी मनाशी पक्क ठरवलं, आता नियमीतपणे व्यायाम करायचा,आळस अजिबात करायचा नाही!! त्या विचाराने मला थोडं बळ आलं आणि मी नेटाने चढायचा प्रयत्न करू लागले.

टेकडीवर जास्त हिरवी झाडं नाहीत पण जी तुरळक झाडी आहेत त्यावर मात्र विविध पक्षी अगदी आनंदात नव्या दिवसाचं गाण गात होती.मधेच कुठे साळुंक्यांचा आवाज येत होता तर कुठे पारव्याचा.मधेच एखादा कोकीळ पावसाची चाहूल लागलीये हे सांगत होता तर मधेच काही चिमण्या चिवचिवत होत्या :-) सगळं वातावरण त्या पक्ष्यांच्या किलबिलाटाने अगदी प्रसन्न झालं होतं.

हे बॅकग्राउंड म्युझिक एंजॉय करत मी एकदाची टेकडीवर पोहोचले! तिथे एका सपाट जागेवर काही आजोबा लोक काम करतांना दिसले,पुढे जाऊन बघितलं तर ते लोक तिथे असणा-या झाडांना पाणी घालत होते.तसंच अजुन काही आजोबा मारोतीच्या मुर्तीसमोर उभे राहून आरती करत होते.आजूबाजूला बरेचसे दगड लावून त्यांनी ती जागा अगदी छान सुशोभित केली होती.


त्या टेकडीवरून जवळपास अर्ध्या पुण्याचं दर्शन होतं.तसंच ही टेकडी अगदी दूरपर्यंत पसरलेली आहे.टेकडीच्या मागे चांदणीचौक आहे आणि समोर आर्मीलँड.टेकडीवर मी एक फेरफटका मारून खाली जायला सुरूवात केली.सकाळी येतांना जितकी दमछाक झालेली त्यामानाने खाली यायला काहीच वेळ लागला नाही पण आता सूर्य व्यवस्थित वर आलेला होता आणि ऊन चमकत होतं.खाली येतांना अजुन एक गम्मत बघायला मिळाली :) वरती आकाशातून सुखोई विमान जातांना दिसलं  :-D   :-D  वो देखके मेरा दिल तो एकदम गार्डन गार्डन हो गया :-) लहानपणी विमान दिसलं की ते दिसेपर्यंत त्याच्याकडे एकटक बघायची न शक्य असेल तर त्याच्यासोबत धावायची सवय होती मला आणि आत्ता सुखोई बघून मी तेच केलं मी धावत सुटले अगदी ते नजरेआड होईपर्यंत.

थोडयावेळाने माझा वेडेपणा लक्षात आल्यावर मी इकडे-तिकडे बघितलं पण कोणाचच लक्ष नव्हतं माझ्याकडे मग काय मी अगदी काही झालंच नाही ह्या आविर्भावात पुन्हा चालायला लागले :-)

चालतांना समोर दोन काकू विरूध्द दिशेने चालतांना दिसल्या.मला गंमत वाटली,विचार आला इथे लोकांना धड सरळ चालता येत नाही हल्ली रस्त्यावरून आणि ह्या दोघी रोडवर उतारावरून इतक्या सहजतेने उलट कसं काय चालत आहेत? गंमतच वाटली मला  :-D

अशाच गमती-जमती बघत मी घरी परतले. खुपच सुखद अनुभव होता प्रसन्न सकाळच्या ह्या प्रभातफेरीचा :-)
मी तर आता रोज असंच सकाळी फिरायला जाणार आहे, वूड यू लाईक टू जॉईन?


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Tuesday, June 12, 2012

सरसगड

येस्स फायनली जून सुरू झाला :)
आमच्या ऑफिसमधल्या हौशी ट्रेकर्स ग्रुपने ह्या वेळेस आतापर्यंत न-बघितलेल्या अशा काही जागा निवडल्या आणि सगळी तयारी करून आम्ही ३० जण ९ जून रोजी पावसाळी ट्रेकच्या पहिल्या-वहिल्या ट्रेकसाठी सज्ज झालो.

सरसगड सर करून जाण्याचा मनसुबा करून आम्ही सगळे 'आयटी'तले मावळे बसने पाली गावाला निघालो,सुरूवातीला सगळीकडे स्वच्छ ऊन होतं पुढे पुणे-मुंबई एक्सप्रेसवेला लागलो तसे थोडेसे काळेढग आकाशात दिसायला लागले तसं आम्हांला जरा बरं वाटलं..पुढे पाली गावाकडे वळलो आणि पाऊस सुरू झाला अगदी जोरात आम्ही सगळेजण एकच गिल्ला करत चलाsss आला एकदाचा पाऊस म्हणून खुश झालो पण पुढे पालीला पोहोचल्यावर कळलं की तो पाऊस फक्त मागच्या रस्त्यावरच पडला इथे अजुनही ऊनच दिसत होतं.

आमच्या म्होरक्याला सुध्दा आजच्या ट्रेकचा रस्ता माहित नव्हता मग तिथे गावात थोडी चौकशी केली आणि आम्हा मावळ्यांच्या तुकडया निर्देशिलेल्या मार्गाकडे कूच करू लागल्या.


मंदिरापासूनच जवळच एका पाऊलवाटेने सरसगडासाठी वाट जाते तिथे येऊन आम्ही थांबलो. म्होरक्या आणि अजुन एक-दोन जण पुढे जाऊन थोडा अंदाज घेऊ लागले.रस्ता तर दिसत नव्हता पण व्यवस्थित अशी पाऊलवाट दिसली जिने आमची वानरसेना पुढे सरकू लागली.बरीच मंडळी अगदी पहिल्यांदाच 'ट्रेक' असतं तरी काय हे आजमावयाला आलेली होती त्यामुळे त्यांनी लगेच आपापले कॅमेरे काढून फोटोसेशन सुरू केलं.थोडयाच अंतरावर सरसगडाचं दर्शन झालं.


निघालो तेंव्हा ऊन जाणवत होतं पण आकाशात काळे ढगही दिसत होते,लवकरच पाऊस येईल ह्या आशेवर आम्ही पुढे सरकत होतो.पण थोडं अंतर चाललो अन लक्षात आलं की ही वाट आता संपली आणि पुढे सगळी काटेरी झाडं-झुडंप आहेत,आता काय करावं बरं? परत आमचे अनुभवी ट्रेकर्स पुढे जाऊन कुठे काही रस्ता दिसतोय का ह्याची पाहणी करून आले आणि लक्षात आलं की आपण बहुतेक तरी चुकीचा रस्ता घेतलाय अन आता पुढे जर जायचं असेल तर ह्या झाडांमधूनच रस्ता काढणं आवश्यक आहे! मग काय, म्होरक्याने ललकारी दिली आणि आम्ही पुढे सरसावलो.एक-एक पाऊल टाकत, काटेरी झाडं बाजूला करत करत ओळीने पुढे जायला लागलो.तो पूर्ण रस्ता मातीचा निसरडा असा होता,चुकून जरी कोणाचा पाय घसरला तरी मागच्या सगळ्यांना आडवं पाडेल अशी भिती वाटत होती.निघालो तेंव्हा पाऊस नाही म्हणून नाराज झालेलो आम्ही आता, बरं झालं पाऊस पडला नाही,नाहीतर ह्या मातीत पाय रूतून बसले असते अन ना धड पुढे जाता आलं असतं ना धड माघे, म्हणून खुश होत होतो.

बराच वेळ तसं चालल्यानंतर पुढे मोठाले दगड दिसू लागले आणि काटेरी झाडं अगदी तुरळक झाली.त्या दगडांवरून चढत वरती जातांना एकेकाला आपापली सगळी शक्ती आणि युक्ती पणाला लावावी लागत होती.एकजण ज्या रस्त्याने जात होता दुसरा त्याच रस्त्याने येतांना घसरत होता त्यामुळे प्रत्येकाने स्वतःची वाट शोधत वर यायचं ठरवलं आणि पहिला टप्पा पार पडला :)

सगळे मावळे पहिल्या टप्प्यावर पोहोचल्यावर पुढची चढाई सुरू झाली.इतक्यात दोन-चार करत पावसाचे थेंब आमच्याभोवती फेर धरू लागले,त्यांच्यासोबत नाचत आम्ही पुढे निघालो.ह्या जागी येण्याचा पूर्वानुभव कोणालाही नसल्यामुळे आणि आमच्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच ट्रेकर्सचा ग्रुप सोबत नसल्यामुळे ज्याला सुचेल तसा रस्ता शोधून काढणे मोहिम करत आम्ही एका अशा टप्प्याला येऊन पोहोचलो जिथून सरसगड आम्हांला अगदी जवळून स्पष्ट दिसू लागला.गावातल्या कोणीतरी आम्हांला कल्पना दिली होती की गडाला वरती जायला पाय-या आहेत, त्या पाय-या आम्हांला आत इथून दिसू लागल्या :) एव्हाना आम्हांला सुरूवात करून दोन तास झाले होते,एकीकडे सगळ्यांना भूका लागल्या होत्या पण जेंव्हा पाय-या दिसल्या तसा पुन्हा सगळ्यांना हूरूप आला आणि आम्ही धावतच सुटलो आणि ह्या गडबडीत पुन्हा एकदा चुकीचा रस्ता निवडला.आता मोठाल्या दगडांसोबत मोठाली-काटेरी खोड असलेली झाडं पण होती वाटेत.आम्ही पुन्हा प्रयत्नांची शर्थ करत त्या दगडांवरून उडया मारत ,धडपडत पुढे जायला सुरूवात केली आणि ट्रेकचा ८५% रस्ता सर केला  :D


पाय-या सुरू होण्याआधी एक सपाट जागा लागते जिथे दगडामधे कोरलेली चौकोनी गुहेसारखी एक जागा आहे पण आतमधे काहीच नाहीये.ह्या जागेवरून खाली असणारं गाव,बल्लाळेश्वराचं मंदीर अशा सगळ्या गोष्टी अगदी छोटयाशा पण स्पष्ट दिसतात आणि वरती बघितलं तर सरसगडाचा एक मोठठा काळा पाषाण दिसतो.


मंदीरापासून उजवीकडे बघितलं तर एका नदीचं नागमोडी वळणाचं पात्र दिसतं.ह्या ठिकाणी वारा अगदी नाजूक अशी शीळ घालत कानाजवळून फिरत होता तर समोर डोंगरद-यांची रांग दिसत होती.आकाशात सूर्याचा लपंडाव सुरू होता आणि ऊन-सावल्यांचा मजेशीर खेळ दिसत होता,मधूनच एखादा काळा ढग वाकुल्या दाखवत इकडे-तिकडे पळत होता आणि पाऊस मात्र येत नव्हता..



घटकाभर तिथे विश्रांती घेऊन आम्ही उरलेला २५% भाग सर करायला सुरूवात केली.पाय-या दिसत होत्या त्यामुळे सगळ्यांना वाटलं चला आता पटापटा आपण वरती जाऊ शकतो पण आमचा हा भ्रम अगदी पहिल्या दोन पाय-या चढल्यावरच विरघळला कारण एक पायरी साधारण दीडफुट उंचीची आहे आणि पावसाच्या पाण्याने चांगलीच निसरडी झालेली.मग काय पुन्हा एकदा कूर्मगतीने आम्ही सगळे पाय-या चढून वरती आलो.



हूश्श!! आता गडाच्या साधारण अगदी वरच्या भागात आम्ही येऊन पोहोचलो.तिथे एक दगडी हौद दिसला एका चौथ-यावर तर थोडया उंचीवर एक साचलेल्या पाण्याचं तळं दिसलं.ह्या उंचीवरून खालंच सगळं अगदी ठिपक्यांइतकं लहान दिसू लागलं.जोरदार वारा सुरू होता अगदी इतका की माणूस उडून जाईल :)

आता पुढे कसं जायचं ह्याचा विचार आम्ही सगळे करत असतांनाच एक कुत्रा आमच्या थोडंसं पुढे येऊन उभा राहिला.जणू काही ह्या गडाचा गार्ड आणि गाईड असल्यासारखा.आम्ही निघायला सुरूवात केली आणि त्याने आम्हांला रस्त्याचं मार्गदर्शन करायला.मग काय आम्ही भराभर पुढे जायला लागलो.थोडयाच अंतरावर आम्हांला एक अडचण दिसली.साधारण ३फूट उंच अशी दगडाची नैसर्गिक भिंत होती आणि त्यावर चढण्याकरता अगदी एकच पाय ठेवता येईल असा पायरीवजा दगड.ते बघून पुन्हा एकदा विचार आला की,इथुन पुढे खरंच जायचं की नाही? आता इतकं वरती आलोय तर बास ना वरती नको जायला..पण आमचा कॅप्टन म्हणाला नाही! आता हत्ती गेला अन शेपूट राहिलंय अजिबात माघे फिरायचं नाही..चला आपण प्रयत्न करू,चढता येईलच. आणि काय आश्चर्य आमच्या सोबत असणा-या त्या गार्डने आम्हांला प्रात्यशिक करून दाखवलं!! मग आम्ही सगळेपण चढून वरती पोहोचलो.



येस्स्स्स..आलो एकदाचे सरसगडाला सर करून.
वरती गेल्यावर तिथे विशेष काहीही बघण्यासारखं नाही.एक छोटंसं शंकराचं देऊळ आहे आणि एक चबुतरा.त्या चबुत-याच्या अगदी समोर एक महादेवाच्या पिंडीसारखा डोंगर आहे.



तिथे क्षणभर विश्रांती घेऊन आम्ही पुन्हा एकदा खाली जायला निघालो.वरती येतांना जितकं कठीण वाटत होतं त्यापेक्षा कितीतरी जास्त उतरणं अवघड आहे ह्याचा अंदाज अगदी पहिल्या क्षणालाच आला  :( पण आता पर्याय नव्हता, उतरावं तर लागणारच होतं आणि तेही वेळेत कारण पोटामधले कावळे ओरडून एकच कल्ला करत होते!मग काय घेतलं देवाचं नाव आणि केली सुरूवात.

दगडाची भिंत उतरून आल्यावर समोरचा रस्ता बघतांना एक मनोहारी दृश्य दिसलं अगदी दूरवरून मुसळधार पाऊस घोडदौड करत येतांना दिसला.आमची सगळी वानरसेना ती भिंत उतरून येईपर्यंत तर पावसाने आम्हांला गाठला.
त्या सहस्त्रजलधारांना झेलत सगळेजण पहिल्या पावसाचा आनंद लुटू लागलो आणि म्होरक्याचा आवाज आला,अरे चला आपल्याला खालीपण उतरायचं आहे! भानावर येत लगेच सगळे पटापट उड्या मारत पुढे निघालो.दगडी पाय-या उतरून येत असतांना आमचा गार्ड अचानक थांबला निरखून बघितलं तर एक महाशय रस्ता ओलांडतांना दिसले.
समाधीस्थ असलेल्या ह्या खेकड्यानेच आमचा रस्ता अडवला होता



तर पुन्हा एकदा आम्ही त्या सपाट जागी येऊन पोहोचलो.पाऊस पडून गेल्यामुळे आता पुढे कोणत्या रस्ताने जावं ह्याचा विचार होत असतांनाच आम्हांला एक चांगला रस्ता दिसला आणि डोक्यात प्रकाश पडला की येतांना आपण हा रस्ता निवडला असता तर वरती येण्याचा वेळ वाचला असता आणि झाडा-झुडपातून वाट काढत येणंही वाचलं असतं

तर आता रस्ता स्पष्ट झाल्याने आम्ही टणाटण उडया मारत खाली जायला सुरूवात केली.अगदी ४०मिनीटातच आम्ही खाली आलो.
मग एक-एक तुकडी आधी मंदीर आणि पुढे फडके काकूंकडे जेवणासाठी म्हणून कूच करू लागली.
फडके काकूंनी अगदी गरम-गरम वरण-भात-भाजी-पोळी आणि शिरा असं चबिष्ट जेवण वाढलं आणि हाता-तोंडाची लढाई सुरू झाली.पोटभर जेवण करून आम्ही पार्किंगकडे वळलो आणि 'गणपती बाप्पा मोरया' म्हणत परतीच्या प्रवासाला सुरूवात केली.

अशा त-हेने, प्रत्येकातली शक्ती आजमावणारा असा हा सरसगडाचा ह्या पावसाळी सिझनमधला पहिला ट्रेक पार पडला :)  

Thursday, June 7, 2012

निरागस



एका दिवशी वाडेश्वरला मी माझ्या ग्रुपची वाट बघत उभी होते,करायला विशेष काही नव्हतं म्हणून सहजच इकडे-तिकडे नजर टाकली तर फुटपाथवर एक वेगळंच दृश्य दिसलं..
एक वयस्क जोडपं बसलेलं होतं..अंगावर ठिगळं लावलेले बेताचे कपडे..हाता-पायाची हाडं-काडं झालेली..कित्येक दिवसात अंगाला पाणी न-लावल्यामुळे काळवंडलेले चेहरे पण तरीही त्यावर हास्य होतं नजर चमकत होती आणि त्याचं कारण होतं त्यांच्याजवळ असलेलं एक छोटं वर्षा-दीड वर्षाचं बाळ

ते बाळ सुध्दा मळक्या कपडयात होतं, कदाचित त्यांच्यासारख्याच कोणा भिकारणीचं असावं आणि कदाचित ते आजी-आजोबा त्याचं बेबीसिटींग करत होते.

त्या आजोबांनी एक पाव त्यांच्या प्लास्टीकच्या पिशवीतून काढला आणि त्याचा मोठा तुकडा त्या बाळाच्या हातात दिला,उरलेल्या तुकडयाचे दोन भाग करून एक आजीला दिला आणि एक स्वतः खायला घेतला.ते बाळ हातात तो तुकडा घेऊन खात होतं आणि त्या दोन्ही म्हाता-यांच्या चेह-यावर त्याचा आनंद दिसत होता.थोडया वेळाने त्या बाळाचं खाऊन झालं तसं त्या आजोबांनी त्याला पाणी प्यायला एक प्लास्टीकची बाटली काढली, ते बाळ पण भारी होतं, त्याने बाटलीचं झाकण उघडून व्यवस्थित पाणी प्यायलं.पोटपूजा झाल्यावर ते बाळ धडपडत उठलं आणि चालायचा प्रयत्न करू लागलं.तो आजीपासून दोन-चार पावलं पुढे जाऊन माघे फिरायचा अन पुन्हा आजीपर्यंत यायचा मधेच त्याचा तोल जाऊन तो पडायला लागला की ती आजी पुढे होऊन त्याला धरायची आणि ते बाळ खुदकन हसायचं आणि ते दोघेपण..मधेच ती आजी त्या बाळाच्या चेह-यावर हात फिरवून कानामागे बोटं मोडत होती..
हा सगळा कार्यक्रम बराच वेळ असाच सुरू होता..तिघांच्या चेह-यावर आनंद अगदी ओसंडून वाहत होता..मी तर अक्षरशः भान हरपून त्यांचा हा खेळ बघण्यात दंग झाले होते..त्या बाळलीलांमुळे काही क्षणांपुरतं का होईना त्या दोन म्हाता-या जीवांना आयुष्यात आनंद मिळत होता..

कसं ना,बाळ भिका-याचं असू देत नाही तर श्रीमंताचं त्याच्या निरागसतेत कुठेही काहीच फरक नसतो.देवाघरचं ते फुल त्याच्या सहवासातल्या सगळ्यांना सारखाच आनंद देतं..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check



Tuesday, June 5, 2012

संवाद



आपण दूर गेलेलो असलो पण आपल्यातला संवाद संपला नसला तर नातं टिकतं- ’एका लग्नाची दुसरी गोष्ट’ मधील आत्याबाई.

संवाद या शब्दाचा खरा अर्थ मला माहित नाही पण आतापर्यंत हेच माहितीये की जेंव्हा आपण आपल्या मनातलं कोणाशी तरी बोलतो आणि त्याला ते उमगतं, नेमकं कळतं आणि ती व्यक्ती त्याला प्रतिसाद देते तेंव्हा संवाद साधला जातो..एरव्ही आपण बडबड करतो, गप्पा मारतो कधी स्व:तशीच कधी दुस-यांशी, पण या सगळ्यांपेक्षा संवाद वेगळाच असतो..

शब्द तेच असतात पण भाव वेगळा असतो, त्यातुन उमलणारा विचार नवा असतो कधी आपल्याला अंतर्मुख करणारा तर कधी मनातली सगळी जळमटं दूर करणारा असतो..

पण, कधीही, चला बरं आता आपण एकमेकांशी ’संवाद’ साधूया म्हणून तो जमत नाही, सहज बोलता-बोलता सुरू होतो आणि संपल्यावर एक प्रकारची शांतता मनात भरून उरते.या संवादासाठी नेहमीच शब्दांची आवश्यकता असते असं ही नाही, कधी कधी नरजेतून, मायेच्या स्पर्शातून तर कधी नुसतं एकमेकांजवळ मूकबसून सुध्दा संवाद साधला जातो.कधी तर अनोळखी असणा-या व्यक्तीशी दोन-चार शब्द बोलण्यातून सुध्दा संवाद सुरू होतो तर कधी अगदी आपलं म्हणवणारं माणूस संवाद न-साधू शकल्यामुळे कधी आपल्यापासून दुरावतं हे कळतच नाही..


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Thursday, May 24, 2012

रूटीन



आज ब-याच दिवसानंतर दवाखान्यात जायची वेळ आली..अंहं..विशेष काही नाही,नेहमीच्या चेक-अप साठी गेले होते. सकाळची वेळ होती त्यामुळे दवाखान्यात अगदी मोजकेच लोक दिसत होते.काही टेस्ट करायच्या म्हणून एका काउंटरकडे वळले. तिथे असणा-या माणसाला विचारलं,

मी: गुड मॉर्निंग, मला ही टेस्ट करायची आहे,काय करावं लागेल?

काऊंटरचा माणूस: ( अगदी रूक्षपणाने ) कार्ड आहे का?

मी: ( गोंधळून ) कुठलं कार्ड?

काऊंटरचा माणूस: ( वैतागून ) अहो, तुम्ही इथे याआधी कधी तपासणी केली आहे का? जर केली असेल तर एक कार्ड दिलेलं असेल त्याचा नंबर द्या!

मी: नाही, मी पहिल्यांदाच आलीये. तुम्ही नविन कार्ड बनवा आणि ह्या टेस्ट करायच्या आहेत त्याचे पैसे किती ते पण सांगा.

काऊंटरचा माणूस: हं, हे घ्या कार्ड अन तुमचे xxx पैसे होतात, सुटे पैसे सुध्दा द्या.

मी निमूटपणाने पैसे दिले आणि विचारलं की कुठे जावं लागेल, तर त्याने माझ्या प्रश्नाकडॆ दुर्लक्ष करत माझ्या मागे उभ्या असलेल्या माणसाकडे बघितलं.

मग मी रस्ता शोधत एका लॅबपाशी येऊन थांबले,आत बघितलं तर बाकावर काही माणसं बसली होती आणि एक सुंदर चेह-याच्या मॅडम लोकांची टेस्ट करत होत्या.मी पण आत जाऊन बाकावर बसले आणि बघत होते समोर काय सुरू आहे ते.

त्या मॅडम एका आजीबाईंची टेस्ट करत होत्या, त्या आजीनी विचारलं,’अहो मॅडम, मला ही टेस्ट कशाला करायला सांगितली आहे? मला काय झालंय?’ तसं त्या मॅडमने वैद्यकीय भाषेत काहितरी उत्तर दिलं.तिथे बसलेल्या कोणालाच ते समजलं नाही आणि त्या आजींच्या चेह-यावर काळजीची काजळी पसरली!

माझा नंबर आला तसं मी त्या मॅडमसमोरच्या खुर्चीवर जाऊन बसले आणि गुड मॉर्निंग म्हणत माझा हात पुढे ठेवला. त्यांनी कम्प्युटरकडे बघत अतिशय रूक्ष आवाजात ’रिसीट’ म्हणून विचारलं.माझी टेस्ट झाली आणि निघतांना मी विचारलं की,रिपोर्ट कधी मिळणार तसं त्या मॅडमनी एक बोट वर करत भिंतीवर लावलेल्या एका पाटीकडे इशारा केला.त्यावरची सुचना वाचून मी बाहेर पडले.

ह्या दवाखान्यामधे सगळया प्रकारचे डॉक्टर्स एकाच छताखाली उपलब्ध आहेत त्यामुळे पुढे मी डोळे तपासायचे म्हणून डोळ्यांच्या डॉक्टरकडे गेले. आत गेल्यावर मी डॉक्टरला गुड मॉर्निंग म्हटलं आणि माझं कार्ड समोर केलं.तसं त्यांनी माझा नंबर लिहून घेतला आणि आपल्या असिसस्टंटला मशिन अ‍ॅडजस्ट करायला सांगितलं.माझी तपासणी करून झाल्यावर त्यांनी मला डोळ्याचे काही व्यायाम समजावून सांगितले आणि सुचना दिल्या अगदी रूक्ष आवाजात.
- कंम्प्युटर वर काम करतांना दर वीस मिनिटांनी, मोजून पाच मिनिटे डोळ्यांना विश्रांती द्यायचीच नाहीतर डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल!
- हिरव्या पालेभाज्या,गाजर ह्यांचा समावेश जेवणामधे करायचा नाहीतर डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल.
- रात्री किंवा कमी प्रकाशात कंम्प्युटर वर काम करायचं नाही, नाहीतर (मी मनात डोळ्यांचा नंबर भराभर वाढेल).
- कधी जर डोळे खुपच कोरडे वाटले तर हा xxxx आय ड्रॉप वापरायचा.
सुचना देऊन झाल्यावर मी ’थॅंक्स’ म्हणत बाहेर पडले पण त्या डॉक्टरचं काही लक्ष नव्हतं.

पुढे मी दंतवैद्याकडे गेले तिथेसुध्दा डोळ्यांच्या डॉक्टरकडे आलेल्या अनुभवाची पुनरावृत्ती झाली.

दवाखान्यातुन बाहेर पडतांना मी विचार करत होते की, ह्या दवाखान्यामधे काय आज ’जागतिक शोककळा दिन’ वगैरे आहे की काय? सगळेजण इतके मख्ख चेह-याचे, उत्साह संपलेले का आहेत? अगदी सकाळ्च्या प्रहरी सुध्दा ह्या लोकांमधे काम करायचा उत्साह नाहीये तर संध्याकाळी ह्यांचं काय होत असेल?

तसं पाहिलं तर काऊंटरवर काम करणा-या माणसाला किंवा लॅबमधल्या त्या मॅडमला कदाचित त्यांची ही नोकरी नको असेल दुसरं काहितरी करायचं असेल पण अडचण म्ह्णून ते हे काम करत असतील त्यामुळे त्यांच्यामधे काम करण्याची तितकी इच्छा नसेलही पण ते डोळ्याचे किंवा दाताचे डॉक्टर्स? त्यांनी तर त्यांच्या आवडीने हे क्षेत्र निवडलं आहे ना मग त्यांना सुध्दा इतका कंटाळा यावा? त्यांनी जर असंच को-या चेह-याने सगळ्या रूग्णांना तपासलं तर ज्याला काहीही झालेलं नाहीये त्याला सुध्दा ’बहुतेक आपल्याला काहितरी भयंकर रोग झाला आहे’ असं वाटायला सुरूवात होइल!!

का होत असेल बरं ह्या सगळ्यांचं असं? कदाचित त्यांना दिवसभरात इतक्या लोकांशी बोलावं लागतं,त्यांना तपासावं लागतं,किचकट रोगांचं निदान करावं लागतं त्यामुळे त्या पेशंटसोबत असतांना ते हसणं, नॉर्मल वागणं विसरतही असतील..शेवटी ते पण तर माणसंच आहेत ना..हे तर त्यांचं रोजचं रूटीनच...अरे हो...त्यांचं रूटीन असं आहे म्हणून ते असे वागत आहेत. आश्चर्य ह्या गोष्टीचं आहे की, दवाखान्यातल्या लोकांना जिवंत माणसांसोबत काम करावं लागतं तरीपण ’रूटीन’ मुळे त्यांच्या वागण्यातला जिवंतपणा हरवून जातो!

काही दिवसानंतर मला बॅंकेमधे काही कामानिमित्त जावं लागलं. तिथे मी ’इथे मदत मिळेल’ काऊंटवर चौकशी करून योग्य त्या माणसासमोर म्हणजे एका मॅडमसमोर जाऊन उभी राहिले.

मी: एक्सक्युज मी मॅडम..

त्या मॅडमनी कंम्प्युटरसमोरची नजर वळवून फक्त उजव्या भुवईनेच ’काय आहे’? असा प्रश्न केला..

मी: मला जरा ही कागदपत्रं तपासून घ्यायची आहेत, जरा बघता का?

मॅडम: हं, बघू. असं म्हणून त्यांनी कागद हातात घेतले. १० मिनीटानंतर मी हे कागद तपासेन तोपर्यंत थांबा.

मी ठिके म्हणून तिथेच असलेल्या बाकावर बसले आणि बॅंकेत काम करणा-या इतर कर्मचा-यांना बघायला सुरूवात केली.काही वयस्क,काही तरूण अशी बरीच मंडळी काम करत होती पण सगळ्यांचे चेहरे सारखे दिसत होते..अगदी स्त्री-पुरूष सगळ्यांचे.मी आश्चर्याने मगाशी बोललेल्या मॅडमकडे बघितलं तर त्यांचा चेहरापण सेम इतरांसारखा!! मग माझ्या लक्षात आलं, ह्या सगळ्यांच्या चेह-यावर ’रूटीन’ नामक मुखवटा चढलेला आहे त्यामुळे पुन्हा एकदा उत्साह,कामामधे जिवंतपणा वगैरे वगैरे...छ्या..विसरा.

१० मिनीटानंतर माझं काम त्या मॅडमनी करून दिलं अगदी त्याच निर्लेप आवाजात आणि मी बाहेर पडले. विचारचक्र पुन्हा एकदा रूटीन ह्याच शब्दाभोवती फिरत होतं..माझ्या असं लक्षात आलं की,आपलं तरी काय वेगळं असतं,रोज रोज ऑफिसमधे जाऊन तेच तेच बोअरींग काम करावं लागलं, काहिच नाविन्य नसलं की आपल्याही कुठे लक्षात येतं आपण आजुबाजूच्यांना गुड मॉर्निंग म्हटलंय की नाही ते! कुठल्याही गोष्ट रोज घडायला लागली की त्यातलं नाविन्य हे संपणारच ना, म्हणतात ना रोज मरे त्याला कोण रडे अगदी तसंच...

पण, असं होणं बरोबर नाही ना, अशाने तर आपण माणूसपण हरवून बसू..यंत्र बनून जाऊ आपण...नो यार! रूटीन जर इतकं भयानक असेल तर काहितरी उपाय शोधलाच पाहिजे!

हे विचार सुरू असतांनाच मला कोणीतरी हाक मारली, वळून बघितलं तर आमचे फॅमिली डॉक्टर दिसले. ह्या अवलियाला मी, मला कळायला लागल्यापासुन बघत आली आहे.त्यांच्या कडे कधीही जा ते अगदी हसतमुखाने तुमचं स्वागत करणार.मी लहान म्हणून मला नेहमी एक चॉकलेट देणार आणि जर खुप लागलेलं असेल किंवा दुखत असेल तरी बोलण्यातुन अशी काही जादू करणार की तुमचं दुखणं अर्धअधिक तिथेच पळून गेलं पाहिजे!

बरं त्यांचं हे वागणं अगदी प्रत्येक पेशंटसोबत असायचं. सकाळी ९ ते रात्री ११ पर्यत त्यांचा दवाखाना आणि नंतरचं हॉस्पिटल यामधे मी त्यांना कधीच कंटाळलेलं,चिडलेलं अगदी वैतागलेलं सुध्दा बघितलं नाही. इतक्या विविध लोकांना ते रोज तपासत असतात पण त्यांच्यामधला जिवंतपणा आज वयाच्या पन्नासाव्या वर्षीपण अगदी सळसळता आहे.

तर त्यांनी मला सुप्रभात विश केलं आणि म्हणाले की, उन्हाचं इकडे कुठे फिरतीये. आम्ही दोघे एका झाडाच्या सावलीत थांबलो आणि मी त्यांना माझ्या डोक्यातला रूटीननामक गोंधळ ऐकवला..त्यावर ते कधी नव्हे ते गंभीर होत म्हणाले.’जर तुम्हाला रोज तेच काम करावं लागणार आहे हे माहित आहे तर त्यात आनंद निर्माण करणं हेदेखील तुम्हांलाच करावं लागेल.आमच्यासारख्या दिवसातुन अनेक लोकांशी संबंध येणा-या माणसांना खरं तर जास्त विचार करावा लागत नाही.येणारा प्रत्येक पेशंट काहितरी नविन गोष्ट घेउन येतो.त्याला तपासायचं, रोगाचं निदान करायचं ह्या गोष्टीमधुन सारखे नवे विचार डोक्यात संचारत असतात.कधी कधी मेंदुला मुंग्या आणणा-या गोष्टीसुध्दा समोर येतात पण आपण कोणाला तरी मदत करतोय चांगलं जिवन जगायला हीच भावना त्या प्रसंगातुन मला पुढे जायचा मार्ग दाखवते.

तुमच्या हातात आहे तुमच्या दिवसाला एखाद्या पाणी साचलेल्या डबक्यासारखं करणं किंवा नदीसारखं प्रवाही ठेवणं.आजुबाजुला बघितलं की, खिडकीतुन दिसणारं झाड रोज वेगळंच भासतं, चिमण्या-कावळा हे पक्षी गातात पण रोज त्यांचं गाणं वेगळं असतं कारण रोजचा दिवस हा नवा असतो,काहितरी नविन तुमच्यासाठी घेऊन आलेला असतो त्यामुळे त्या दिवसाला रूटीनच आहे म्हणून हिणवण्यापेक्षा त्या नविन दिवसामधे आपण नविन काय करणार आहोत ते शोधायचं ’ :-)

बस..ह्याउपर काहि करायची गरज नाही पडत. तुमच्या आय.टी. मधे ते वेगवेगळे शिबिरं घेतात ना हिच गोष्ट समजावण्यासाठी? पण मी बघ तुला विदाऊट ट्रेनिंग फुकट सल्ला देतोय ;) इतका जास्त विचार करायचो नसतो ग बाळे इतक्या लहान-सहान गोष्टींचा’. मी ज्या गोष्टीचा इतके दिवस विचार करत होते त्याला काका ’लहान-सहान’ म्हणाले? हीही..

खरंच अगदी दोन मिनिटात डॉक्टरकाकांनी माझ्या डोक्यातला रूटीननामक वळवळणारा किडा चिमटीत अलगद उचलून पार डोक्याबाहेर फेकुन दिला :-) ग्रेटच ...

आज मला कळालं त्यांच्या उत्साहाचं रहस्य, आता मी सुध्दा ते ट्राय करणार, व्हॉट अबाऊट यू??



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check

Wednesday, May 16, 2012

मोहाचा एक क्षण



शुक्रवारी संध्याकाळी कामातून थोडं मोकळं झाल्यावर विचार आला, चला उद्या वीकएन्ड :) लकीली काहीच कामं नाहीत तेंव्हा नुसती झोप काढायची :)

शनिवारी अगदी उन्हं वर आल्यावर जाग आली, आळोखे-पिळोखे देत उठले..अगदी गोगलगायीच्या स्पीडने सगळं आवरलं, जेवण केलं आणि फक्त दोन तासाची वामकुक्षी घेतली..उठल्यावर विचार आला..अरेच्चा, आपली तर झोप पूर्ण झाली आता काय करावं बरं? वाटलं, चला जरा पाय मोकळे करून यावेत. मग अगदी भरभर आवरलं आणि जवळच्याच एका मॉलकडे मोर्चा वळवला.

मॉलमधे प्रवेश करताच गार-सुगंधित झुळकेनं माझं स्वागत केलं आणि मन अगदी प्रसन्न झालं :) 

आता माझ्या आवडत्या कामाला मी सुरूवात केली.तसं तर आज विशेष काही घ्यायचं नव्हतं,फक्त विंडो शॉपिंग करायची होती पण तरीही काही आवडलच तर घ्यायला हरकत नाही असा विचार करत मी माझ्या आवडत्या दालनाकडे वळले. तिथे स्टँडवर वेगवेगळ्या प्रकारच्या, रंगाच्या, ब्रँडच्या बॅग्स, वॉलेट्स, क्लचेस ठेवलेले होते.एक-एक वस्तू न्याहाळत मी सगळं बघितलं पण विशेष काही आवडलं नाही तशी मी पुढे चप्पल-बुट सजवलेल्या भिंतीकडे सरकले. तिथे सुध्दा वेगगेगळ्या ब्रँडचे जोडे,सपाता,चपला ठेवलेल्या होत्या.बघत-बघत मी एका ठिकाणी थांबले. 

मला ती चप्पल अगदी वेगळी वाटली बाकी सगळ्यांमधे म्हणून मी ती घालून बघितली तसा लगेच तिथे उभा असलेला मॉलचा एक माणुस,'मॅडम, मे आय हेल्प यू?' म्हणत पुढे आला.त्याच्याकडे दुर्लक्ष करत मी ती चप्पलच न्याहाळत होते,माझ्या पायाच्या मापाची ती होती आणि खुपच आकर्षक होती,मला ती आवडली  :D 

मग मी त्या माणसाला त्या चपलेचा जोड आणायला सांगितला. ते देतांना त्याने जोडाचं कौतुक करायला सुरूवात केली,'मॅम,धिस ब्रँड इझ व्हेरी गुड अ‍ॅण्ड कम्फर्टेबल, इट्स लुकींग व्हेरी गुड ऑन यू,शल आय पॅक इट?'.मी पुन्हा दुर्ल़क्ष करत आधी ती चप्पल घालून तिथे ठेवलेल्या आरशात स्वतःचे पाय न्याहाळले,मग पुन्हा एकवार नुसतंच पायांकडे बघितलं खात्री करून घेतली की ती सुट होतेय का नाही, मग थोडं चालून बघितलं आणि झालं,(वेडया)मनाने शिक्कामोर्तब केलं की, ही चप्पल चांगली आहे चला घेउया.पण लगेच (शहाणं)मन पुढे आलं आणि त्याने विचारलं, आधी किंमत तर बघ. तशी मी किंमत बघितली तर xxx ओन्ली दिसलं.


वेडं मन -  :-$ 
शहाणं मन - बापरे इतकी महाग? नाही, नाही. नाही घ्यायची, चला पुढे जाऊ.
वेडं मन - हे काय रे शहाण्या!! 
शहाणं मन - चप्पल आहे ना सध्या वापरायला मग पुन्हा कशाला हवीये?
वेडं मन - एक मिनीट थांब..
असं म्हणून वेडं मन विचारमग्न झालं आणि लगेच मन:चक्षु समोरून एक चित्रफित सरकू लागली.ज्यामधे माझं कपाट समोर आलं आणि एक एक ड्रेस फिरू लागले,जवळपास प्रत्येक ड्रेसला मॅच होणारी अशी एक चप्पल होती माझ्याकडे पण, एक स्कर्ट येस्स..एकच असा स्कर्ट होता की ज्याला ती चप्पल सुट होत नव्हती.मग काय, वेडं मन पुढे सरसावलं आणि 
वेडं मन - ए, त्या स्कर्ट साठी हवीये मला ही चप्पल.एकदम सुट होते त्याला :)
शहाणं मन - तो स्कर्ट ह्या चपलेच्या अर्ध्या किमतीचा सुध्दा नाहीये.आणि बाहेर रस्त्यावर अशीच चप्पल इथल्यापेक्षा १/४ किमतीत मिळेल! नाही, इतकी महाग चप्पल नकोच.चला जाऊ आपण..
वेडं मन - अरे पण, रस्त्यावरच्या सस्त्या मालाला काही क्वालीटी नसते.नेमकी वापरायला काढली आणि तुटली तर?
शहाणं मन - .....दुर्लक्ष

पहाता पहाता शहाणं मन आम्हांला दुसरीकडे घेऊन जाऊ लागलं आणि वेडं मन तरीही वळून-वळून बघतच राहिलं..
पुढे कपडयांच्या सेक्शनमधे तर वेडया मनाला अगदी चेव आला, जे टॉप छान दिसेल त्या प्रत्येकावर ती चप्पल कशी सुट होते हे तो अगदी हिरीरीने समजावून देउ लागला..असं करत करत सगळा मॉल बघून झाला, पाय अगदी थकुन गेले म्हणून मी खाण्याच्या ठिकाणी एका खुर्चीवर स्वत:ला झोकून दिलं,पाणी प्यायले आणि खुप उशीर झाला आहे हे बघुन लगेच घरी जायला निघाले..दाराकडे जातांना पुन्हा एकदा त्या चपलेने खुणावलं आणि त्या क्षणी मला ती चप्पल घेण्याचा मोह अनावर झाला आणि तिला घेऊनच मी बाहेर पडले  :D 

घरी आल्यावर लगेच त्या स्कर्ट आणि चपलेची जोडी खरंच जमतीये ना हे तपासून बघितलं,छान दिसत होतं सगळं, स्वतःशीच हसले आणि विचार आला, किती वाद घातला आपण तेंव्हा नाही घ्यायचं म्हणून पण, तो एकच मोहाचा क्षण घातकी ठरला आणि पैसे उधळले गेले..

खरं तर असे मोहाचे फक्त काही क्षणच दर महिन्यात येतात आणि कपडयांचं,चप्पल-बुटांचं,ज्वेलरीचं कदाचित कधी होम फर्निशिंग ने कपाट/घर भरायला भाग पाडतात. अशी काही खरेदी केली की आपण स्वतःला दहादा बजावतो की पुढच्या महिन्यात नो शॉपिंग अ‍ॅट ऑल!! पण, अचानक एका दिवशी हेच क्षण आडवे येतात आणि सणक आल्यासारखे आपण लिंकींग रोड, फॅशन स्ट्रीट नाहीतर हाँगकाँग लेन किंवा एफ.सी.रोडवर जाऊन धडकतो, मनसोक्त खरेदी करतो आणि घरी आल्यावर आईचे बोलणे झेलतो,'अगं, घरातली दोन कपाटं ओसंडून वाहतायेत तुझ्या कपडयांनी आणि आता आणखी शॉपिंग?? कुठे ठेवायचा हा पसारा??' पण ह्यावर आपलं नेहमीचं उत्तर,'आई, ही फॅशन आहे गं सध्या,मी लावते बरोबर कपाट' :-)

काहीही म्हणा हे मोहाचे क्षण वाईटच!! 

पण ही पण गोष्ट तितकीच खरी आहे की, हेच क्षण त्या वेळी अत्युच्च आनंद, प्रसन्नता आणि असं बरंच काही छान छान देऊन जातात  :-)  त्यामुळे वाईट जरी असले ना तरी हे मोहाचे क्षण निदान शॉपिंगबाबत तरी हवेहवेसे वाटतात  :-)



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check