Saturday, September 23, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - नवरात्र

नवरात्र आलं की लहानपणीच्या दोन गोष्टी आवर्जून आठवतात - एक म्हणजे आम्ही राहत होतो त्या गल्लीत होणारा जोशपूर्ण गरबा आणि कुमारिका म्हणून कोणा-कोणाकडे फराळाला जायची मजा :)
आमच्या गल्लीमधे एक जैन मावशी राहत होत्या त्या आणि त्यांच्यासोबत अजून ब-याच जणी देवीच्या मूर्तीची स्थापना करायच्या. रोज सकाळ-संध्याकाळ देवीच्या सगळ्या आरत्या म्हणणे, मग जोगवा मागणे असं अगदी साग्रंसगीत चालू असायचं.
साधारण रात्री ९च्या सुमाराला सगळे जण गरबा खेळायला त्यांच्या घरासमोरच्या मोकळ्या जागेत जमायला लागायचे. त्यांच्या अंगणामधे एक मोठ्ठा फोकस लावलेला असायचा आणि दोन स्पीकर्स मधून वेगवेगळी गाणी वाजत असायची. सुरूवातीला चिल्ले-पिल्ले सुरु करायचे मग आम्ही शाळकरी मुलं-मुली मग काॅलेजला जाणारे, असे एक एक करत गोळा झाले की मग अगदी जोमात गरबा चालू व्हायचा. पहिलं गाणं अगदी नियम असल्यासारखं 'पंखीडा तू उडके जाना पावागढ रे, माताजी को मिलके बोलना गरबा खेलेंग,पंखीडा ओ पंखीडाss' हेच असायचं. तेंव्हा काही समजत नव्हतं काय आहे हे गाणं पण ठेका चांगला होता म्हणून सगळे ताल धरायचे आणि सुरु!
अशी दोन-तीन धीम्या गतीची गाणी झाली की नंबर यायचा आमच्या फेव्हरेट पाॅप-राॅक पंजाबी गाण्यांचा-दी फेमस दलेर मेंहदी! काय गाणी होती अरे त्याची फुल्ल-आॅन :D :D तुनक तुनक तुन तारारा, बोलो तारारारा, हो गयी तरी बल्ले बल्ले होजाएगी बल्ले बल्ले एक ना दोन सगळीच भन्नाट गाणी :D :D :D ह्या गाण्यांमधे जो स्पीड आहे नं ओ गाॅड आम्ही तर इतके दमून जायचो पण नाचायचं कोणी थांबवू शकायचं नाही!!
छकडी की काहीतरी एक प्रकार असतो त्यात टिप-या नाही वापरत फक्त ६ पावलं फेर धरून नाचायचं एकाच रांगेत सगळ्यांनी, ती उलटा चष्मा मधली दया करते ब-याचदा तो प्रकार. तर ह्या दलेर मेंहदीच्या गाण्यावर तसं नाचतांना अक्षरशः चक्कर येईल इतक्या फास्ट करायचो नाही नाही आपोआप व्हायचं आमच्याकडून :P :P
रोज अगदी २-३ तास खेळायचो आम्ही गरबा पण थकवा आला आहे आणि पाय दुखत आहेत म्हणून आज नको खेळायला असं कधीच वाटलं नाही. जैन मावशी, पाटील मावशी अशा ब-याच जणी आम्हा गरबा खेळणा-यांना सरबत, पाणी, मसाला दूध असं काही-बाहि देऊन सतत चार्ज राहायला मदत करायच्या. भन्नाट होतं ते सगळंच :D :D :D

हां तर दुसरी गोष्ट अशी की मला कुमारिका म्हणून फराळ करायला बोलावलं जायचं. आमच्या समोर एक मामीजी रहायच्या त्या नवरात्रीचे उपवास करत होत्या. त्यांच्याकडे अशी पद्धत होती की जी मुलगी अजून 'नैसर्गिकरित्या' मोठी झाली नाही तिला बोलवायचं-उपवासाचा खाऊ दयायचा आणि दक्षिणा पण दयायची किंवा पूजा करायची. मी शाळेला निघायच्या आधी रोज मला त्या बोलवत आणि गरमा-गरम साबुदाणा खिचडी,केळ असा खाऊ आणि १-१.२५रू. दक्षिणा म्हणून देत. आपल्याला दक्षिणा मिळते ह्या गोष्टीचं त्या वयात मला फार अप्रूप वाटायचं आणि आपण इतके लहान असून आपली पूजा वगैरे केली जाते ह्या विचाराने उगाच काहीतरी 'खास' आहोत अशा खुशीतच मी शाळेत जायचे :D :D :D
#आठवणी_लहानपणाच्या

Saturday, September 2, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - 'V' आकाराची ओढणी


आमच्या आॅफिसच्या क्लीनिंग स्टाफ चा युनिफॉर्म बदललेला दिसला. सलवार-कुर्ता आणि V शेपची ओढणी. ती ओढणी बघितल्यावर एकदम मला शाळेचे दिवस आठवले!!

बहुतेक मी १०वी ला म्हणजे शाळेच्या शेवटच्या वर्षाला असतांना नेमका आमचा युनिफॉर्म बदलला. आधीच तर मला ओढणी असलेला युनिफॉर्म झेपायचा नाही त्यात आता 'V' आकाराची ओढणी म्हणजे तर मला जणू शिक्षाच केल्यासारखं वाटलं :(

सकाळी ७ची शाळा असतांना अशी V शेप ओढणी असलेला युनिफॉर्म घालून जाणं म्हणजे अगदी दिव्य होतं.
एकतर सळ-सळ करणारं ते शिफाॅन का कसलं तरी ओढणीचं कापड त्याच्या ४ घड्या करायच्या मग डाव्या खांद्यावर असणा-या पट्टी मधून ती पातळ घडी अलगद खाली सोडायची. ते झालं की मग तो V शेप तयार करुन दुसरं टोक उजव्या खांद्यावरच्या पट्टी तून आत सरकवायचं. ही प्राथमिक फेरी झाली की मग खाली सोडलेली ओढणीची दोन्ही टोकं सरळ रेषेत आहेत की नाही ते बघायचं, जी कधी पहिल्या फटक्यात येतच नव्हती, मग ते वर-खाली करत बसा. हा द्राविडी प्राणायाम करुन झाला की मग सायकल हाकत शाळेला जातांना सतत लक्ष ठेवा कुठे ओढणी चा V शेप तर बिघडत नाही नं!!देवा!! काय दिवस होते ते बापरे!! मला तर आज हे सगळं आठवून पण घाम फुटला.
#आठवणी_लहानपणाच्या

Sunday, August 13, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - स्पोर्टस् शूज

आज कित्येक वर्षांनी मी असे क्यूट शूज घेतले आहेत :) :) :) लहानपणी आम्हांला वर्षातून फक्त एकदाच नविन ड्रेस घेतला जायचा अर्थात ही तक्रार नाही तर तो नियमाचा-संयमाचा भाग होता, हं तर मी ५वी मधे होते तेंव्हा ड्रेसच्या ऐवजी स्पोर्टस् शूज चा हट्ट धरला होता आणि साधारण असेच पांढरेशुभ्र-गुलाबी रंगाची छटा असणारे मऊ-मऊ शूज घेतले होते :) :)जाम खुश झालेले मी आणि विशेष म्हणजे बरीच वर्ष ते शूज मी सांभाळून वापरले पण होते.बरं आहे ही फॅशन रिपीट होत असते आता मी परत हे शुज घालून उड्या मारायला तय्यार :) :)
#आठवणी_लहानपणाच्या

Friday, July 7, 2017

जादू

काय जादू असते यार पावसाच्या पाण्यात माझ्या गच्चीतली सगळी झाडं अगदी तरारून फुलली आहेत :) :) :) पावसाळ्याआधी मी दररोज दोन वेळेस पाणी घालायचे पण इतका टवटवीतपणा क्वचितच दिसत होता.

साधं लहानसं रोपटं असू देत किंवा मोठ्ठं झाड पावसाच्या पाण्याचा परिसस्पर्श झाला की त्यातलं सोनं झळाळून निघतंच :)
रोजच्या जाण्या-येण्याच्या रस्त्यावर डोंगर आहे त्यावर पुष्कळ झाडी आहे पण कधी मान वळवून बघितलं जात नव्हतं पण, पहिला पाऊस झाला आणि अहाहा! काय नैसर्गिक सौंदर्य खुलून समोर आलं की ते बघतांना हरखून जायला होतं :)

डोंगराळ भागात ट्रेकला वगैरे गेल्यावर तर अस्सल १००नंबरी सोन्यासारखा उजळळेला, निरागस मुलाच्या खट्याळपणे स्वतःच्या नादात खेळणारा-हसणारा-डोलणारा निसर्ग बघितला की आत आत अगदी सुखावल्यासारखं होतं. ते रुप डोळ्यात किती किती म्हणून साठवावं असं वाटायला लागतं. फक्त डोळे किंवा बुद्धी असे अवयव नाही तर पूर्ण शरीर टिपकागदासारखं तो सुखद अनुभव सामावून घेत असतं.माझे तर शब्द, विचार सगळं थिटे पडतात आणि मनोमन मी त्या निसर्गाला नटवणा-या शक्तीपुढे नतमस्तक होते.
अशा निसर्गाच्या सानिध्यात असतांना जे काही आत्मिक सुख मिळतं ना ते शब्दात मांडण्यापेक्षा अनुभवण्यात खरी मजा आहे

Thursday, July 6, 2017

मखमली पाऊस

अहाहा मस्त मखमली पाऊस पडतोय आत्ता :) :) :) :) मला हा खास पुणे स्पेशल पाऊस प्रचंड आवडतो :) :) :) शांतपणे येणा-या जलधारा भोवती हळुवार पसरत जाणारं धुकं आणि हवेत भरून उरणारा किंचित बोचरा गारवा अहाहा :) :) :) अशा पावसात भिजायचं नसतं तर बॅल्कनी किंवा खिडकीमधे उभं राहून फक्त डोळ्यांनी ते सुख अनुभवायचं असतं :) :) :) बघता बघता कधी पाऊस थांबतो ते कळत नाही पण मनाला आलेला तजेला मात्र दिवसभर पुरतो :) :) :)

Wednesday, July 5, 2017

गरज

आमच्या आॅफिसमधे खूप वेगवेगळी झाडं, फुलझाडं लावलेली आहेत. ठराविक काळानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातात म्हणजे त्यांना आकार देणं, छाटणी करणं वगैरे. आॅफिसच्या पाय-या चढतांना डाव्या बाजूला सुपारीची झाडं आहेत आणि त्यांच्या पायथ्याशी गवत किंवा काही फुलझाडं लावलेली असतात. रोज त्या इवल्या-इवल्या रोपांना आलेली फुलं बघत जाण्याचा मला छंदच लागला आहे.

गेल्या काही दिवसात एका झाडाभोवती असणारी झेंडूच्या फुलांची रोपं दिसेनाशी झाली पण तिथे असलेली माती नांगरल्यासारखी पण दिसली. मग दोन-तीन दिवसांनी तिथे सुंदर असं ताजं हिरवं लाॅन दिसलं पण मला प्रश्न पडला ती झेंडूच्या फुलांची फुलझाडं गेली कुठे? माझं कुतूहल शमविण्यासाठी मी बागकाम करणा-या काकांना तसं विचारलं, त्यावर त्यांनी अगदी सहज उत्तर दिलं - मॅडम त्या फुलांचा बहार संपला आता म्हणून ती इथून काढून टाकली.

त्यांचं उत्तर ऐकून मी एक क्षण स्तब्ध झाले पण लक्षात आलं हा तर नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतो.
त्या फुलझाडांचं काम होतं फुलांनी बहरून त्या जागेला शोभा आणणं पण जेंव्हा बहार ओसरला तेंव्हा त्यांची गरज संपली म्हणून त्यांना उचलून कोप-यात टाकलं आणि ती जागा हिरव्या ताज्या लुसलुशीत गवताने घेतली!!

साधा नियम आहे - जोवर तुम्ही काही देण्यालायक किंवा काम करण्यालायक आहात तोवर तुमची गरज असेल, एकदा ते काम संपलं किंवा तुम्ही अपेक्षित काम करणं कमी किंवा बंद झालं की मग रिप्लेस व्हायला तयार रहा. कारण दुसरा कोणीतरी तसंच काम तुमच्या इतकं किंबहुना तुमच्यापेक्षा सरस करण्याच्या तयारीचा असतोच.
आॅफिसमधे तर हा गोल्डन रूल आहे पण घरामधे किंवा नातेसंबंधामधे पण असं सहज घडतं क्वचित आपल्या नकळत किंवा ठळकपणे :(

Monday, June 26, 2017

ॐकार

आज सकाळी ॐकार म्हणून झाल्यावर डोळे बंद करुन बसले होते काही क्षण आणि अचानक असं वाटलं की मी माझ्या शाळेच्या पटांगणात वर्गाच्या रांगेत बसलेली आहे :)
रोज सकाळी प्रार्थना, प्रतिज्ञा म्हणून झाल्यावर सगळ्यांना आहे त्या जागेवर मातीमधे बसावं लागायचं. माइकवरुन एक मॅडम सुचना द्यायला सुरूवात करायच्या आणि त्यानुसार आम्ही डोळे मिटून, पाठीचा कणा ताठ करुन ॐकार म्हणायला सुरूवात करायचो.जेंव्हा पटांगणातल्या सगळ्या विद्यार्थिनी ॐकार म्हणत असायच्या तेंव्हा अगदी श्वास संपेपर्यंत होणारा म् चा उच्चार अजूनही कानात घुमत आहे.:):)
मस्त वाटलं खूप वर्षांनी शाळेची अशी आठवण झाली

Wednesday, June 21, 2017

आहे हे असं आहे - गौरी देशपांडे

हुश्श!!
संपवलं एकदाचं 'आहे हे असं आहे' पुस्तक मी!!
गौरी देशपांडे यांचं हे दुसरं पुस्तक वाचलं आणि कदाचित परत त्यांच्या वाटेला जाणार नाही असं वाटतं. मुक्काम कादंबरी वाचली तेंव्हा अगदी पुसटसा अंदाज आला होता आणि वाचतांना काही ठिकाणी बिचकायला झालं होतं. पण जेंव्हा आहे हे असं आहे हा कथासंग्रह हातात घेतला तेंव्हा पहिलीच कथा वाचल्यावर धाप लागली. डोळे नुसतेच फिरत होते अक्षरांवरुन मेंदूला काही समजतच नव्हतं!! किती अबस्ट्रॅक्ट आहे हे लिखाण बापरे! पुढच्या २-३-४ कथा वाचल्या तेंव्हा तर भोवळ, शीण, मेंदूला झिणझिण्या असे सगळे प्रकार झाले आणि मी का विकत घेतलं हे पुस्तक असा आयुष्यात पहिल्यांदाच पश्चात्ताप झाला मला 😳 मी अगदी सामान्य वाचक आहे ( हो हो मला फक्त वपुच कळतात आणि आवडतातही) म्हणून दुसरं काही वाचूच नये असं नाही ना म्हणून हात घातला आणि थेट चटकाच बसला नं!!

काही वर्षांपूर्वी असंच सुनिता देशपांडे यांचं कुठलसं पुस्तक वाचलेलं बहुतेक,'आहे मनोहर तरी' तेंव्हाही त्यातलं बरंसचं माझ्या सामान्य बुद्धीच्या आवाक्याबाहेरचं वाटलं मला:(

मी आजवर जे अगदी साधं, सोपं, गोड-गोड लिखाण वाचलं आहे त्याच्या अगदी विरूद्ध पण धारदार असं सत्य 'आहे..' मधल्या काही कथांमधून वाचायला मिळालं, ते पटलं पण तरी पचवता आलं नाही असं काहीसं झालं बहुतेक. पण विक्षिप्तपणाची झाक मात्र दोन्ही पुस्तकामधे बहुतांश वेळा जाणवली.
चूक की बरोबर असं काही पुस्तकाबद्दल असतं का हे मला नाही कळत पण हे पुस्तक मला पेलवलं नाही इतकंच आत्ता तरी वाटत आहे. त्यातलं लिखाण जाणिवेच्या पातळीवर तरी नाही पोहोचलं पण नकळतपणे काही जर आत झिरपलं असेल तर पुढे क्वचित उलगडा होईलही आणि न-जाणो मला परत एकदा वाचायची इच्छा होऊन आवडेलही

Saturday, June 10, 2017

वर्क-आऊट

पर्वती उतरतांना लोक कसले भन्नाट प्रकार करतात!
जिथे मला साधं चालत उतरता येत नव्हतं रेलिंग ला धरल्याशिवाय तिथे लोक उलट चालत येत होते!! आणि असं करणारे लोक वयस्क किंवा ४०+च असावेत, मानलं ब्वा!!
आज आम्हा आय.टी. वाल्यांचा सुट्टीचा वार तेंव्हा विचार केला जरा पर्वतीवर चक्कर मारायला जावं. सकाळी छान वारा सुटला होता, काही ढग दिसत होते पण पाऊस येणार नाही हे नक्की कळत होतं त्यामुळे छत्री न-घेताच गेले.

सुरूवातीला ४पाय-या चढले नसेन तर पायात गोळे यायला लागले :( मग सगळ्यात आधी तर आॅफिसमधे बैठं काम आहे त्याचा उद्धार करुन झाला, मग ४ महिने केलेलं जिम पाण्यात गेलं हा विचार येऊन मन जरा खट्टू झालं. रोज संध्याकाळी कँटीन मधे खाल्लं जाणार जंक फुड आठवून थोडी लाज वाटली पण मी नेटाने पुढे जात राहिले. ह्या सगळ्या विचारांमधे अर्ध-अधिक अंतर पार झालं होतं. मग एक ग्रुप दिसला, कदाचित एखाद्या शासकीय परिक्षेसाठी फिजिकल फिटनेस वाढवायची तयारी करत असावेत असं वाटलं. त्यांचा ट्रेनर त्यांना पर्वतीच्या पाय-यांवर हं, पर्वतीच्या पाय-यांवर धावायला लावत होता!! इथे मला चढतांना धड चालता येत नव्हतं ते लोक तर धावत होते आणि एका मागोमाग चालू होतं त्यांचं!! ते बघून मग मला पण थोडा हुरुप आला आणि मी १-२ करत चांगलं ३ वेळेस वर-खाली केलं :) :) खाली येतांना धावत पण कसाबसा तोल सांभाळत येत होते दोनेक मिनिटात पण वर चढायचा वेळ मात्र प्रत्येक खेपेला वाढत होता :|

पण ठीके पहिल्यांदाच असा काहीतरी प्रयोग मी केला होता.
तीन प्रदक्षिणा घातल्यावर इतकं मस्त वाटलं ना आणि मुख्य म्हणजे पाय दुखत आहेत असं अज्जिबात जाणवत नाही :) :) मस्त कार्डिओ वर्क-आऊट झालं आज,शाब्बाश रे पठ्ठे :):)

Thursday, June 8, 2017

माहितीचा महासागर

मी फेबु वापरण्याचं एक महत्वाचं कारण म्हणजे ब-याच लोकांचे चांगले लेख इथे अगदी बिनदिक्कत वाचायला मिळतात आणि जर मला काही सुचलं तर तेही सहज मांडता येतं. ह्या सवयी मुळे मी काही लोकांना फ्रेंडरिक्वेस्ट केली आणि नित्यनेमाने त्यांचे येणारे लेख, दोनोळी, चारोळी असे लेखन-प्रकार वाचते आहे.
जेंव्हा त्यातल्या काही गोष्टी आवडल्या त्या फेबुचा शेअर पर्याय वापरून लगेच माझ्या वाॅलवर शेअर पण केल्या. ह्या आॅप्शनमधे ज्याचं ते लिखाण किंवा फोटो किंवा काहीही कंटेन्ट असेल ते नावासकट येतं म्हणजे त्या व्यक्तीच्या प्रोफाईलचं जे नाव असेल त्यासकट, तुम्हाला तर माहित आहेच.

तर असंच मी एका प्रतिथयश लेखिकेचं फेबुचं लिखाण ब-याच काळपासून वाचत आहे, कधी जर आवडलं तर लाइक करते. पण आज मला दुर्बुद्धी झाली आणि त्यांची परवानगी न-घेता मी एक पोस्ट शेयर केली ज्यामधे त्यांचं नाव दिसत होतं बरंका, मी अज्जिबात काॅपी-पेस्ट करुन माझ्या नावावर खपवलं नाही! पण तरी त्यांना राग आला आणि त्यांनी मला ब्लाॅक केलं. त्यांचं म्हणणं असं आहे की मी त्यांची परवानगी घेऊन ते शेयर करायला हवं होतं, ठीक आहे. मी मान्य करते की त्यांना न-विचारता ते शेयर केलं पण..जाने दो, त्यांना पूर्ण हक्क आहे मला लिस्ट मधून उडवून टाकण्याचा,असो.

फेसबुक, ट्विटर, व्हाॅट्स-अप, गेल्याजन्मीचं आॅर्कुट, तुमच्या ब्लाॅगसाईट्स किंवा एकूणच इंटरनेट हा माहितीचा महासागर आहे. ह्यामधे तुम्ही एखाद्या ओळीची होडी किंवा भलामोठ्ठा लेख असलेलं जहाज एकदा सोडलं की पुढे तुम्ही त्याची दुस-या कोणाच्या वाॅल किंवा लेखामधे किंवा अजून कुठेही जाण्याची दिशा ठरवू शकत नाही. थोडक्यात काय तर तुमचा त्यावर नावापुरता पण हक्क उरत नाही!!

ती पोस्ट नानाविध पद्धतीने तुमचं नाव सपशेल पुसून उपलब्ध असणाऱ्या एक किंवा अनेक माध्यमातून कशाप्रकारे एखादी व्यक्ती वापरून स्वतःचा फायदा करुन घेईल हे सांगणं केवळ अशक्य आहे!!

मला आठवतं मी ब्लाॅग्स लिहायला नुकतीच सुरुवात केली होती.एका ब्लाॅगर्स कट्ट्याला मला एका साईटबद्दल कळालं ज्यावर तुमचं लिखाण कुठे दुसरीकडे वापरलं गेलं आहे का, हे तपासता येत होतं. सुरूवातीचे काही दिवस मी अगदी उत्साहाने त्यात तपासायचे नंतर नंतर वेळ मिळेनासा झाला आणि लिखाण वाढल्यामुळे ते कौतुकही गळून पडलं. मग काही दिवसांनी माझं ई-बुक प्रसिद्ध झालं आणि ते इंटरनेट वर फ्री उपलब्ध आहे.

तेंव्हा मला हा साक्षात्कार झाला की आता जर मी स्वतःहून माझं लिखाण प्रसिद्ध केलं आहे तर ते काॅपी करुन कोणी वापरण्यावर मी कोणताच वचक ठेऊ शकत नाही. अर्थात माझं लिखाण इतकं पण ग्रेट नाही की कोणी काॅपी करायचे कष्ट घेईल, पण तरी मी ही खूणगाठ स्वतःशी बांधून घेतली आणि लिहीत राहिले.
हां तर मुद्दा असा आहे की जर कोणी कधी माझं लिखाण (चुकून) शेअर केलंच तर मला तरी राग-बिग काही यायचा नाही ब्वा :)

Friday, June 2, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - कांदा

एका बुक्कीत कांदा फोडता येतो का तुम्हाला? काय चव लागते माहित आहे अशा कांद्याची, एकदम रसरशीत , थोडा तिखट थोडा गोडसर वाह्ह : :) सुरीने बारीक चिरलेला किंवा साधे चार काप केलेला कांदा उभ्या जन्मात कधी इतका टेस्टी लागणार नाही :D
लहानपणी आम्ही सगळे एकत्र जेवायला बसलो की माझे बाबा किंवा मावशी असा कांदा फोडायचे मग मी पण शिकले :) आणि तेंव्हा पिल्लू कांदे पण जास्त मिळायचे आजच्या मानाने त्यामुळे हाताला कधी दुखापत झाल्याचं आठवत नाही.
भाकरी - पिठलं किंवा हरभ-याची भाजी आणि भाकरी असा बेत असेल तेंव्हा तर अशा बुक्कीने फोडलेल्या कांद्याशिवाय चव पूर्णच व्हायची नाही.जेवायला बसल्यावर खूप भूक लागली असतांना जर पोळी किंवा भाकरी बनायला वेळ लागत असेल तर असा कांदा आणि त्यावर थोडंसं मीठ हे पण फार यम्म लागतं हं, चाखून बघा:)
#आठवणी_लहानपणाच्या

Sunday, May 28, 2017

#आठवणी_लहानपणाच्या - पिठाची गिरणी

आज कित्येक वर्षांनी गिरणीत जाऊन काही दळून आणायचा प्रसंग आला आणि तिथल्या ताज्या ताज्या गरम पिठाच्या वासाने एका क्षणात मी लहानपणात पोहोचले :) मला आठवतं मी कदाचित पहिली-दुसरीमधे असल्यापासून आईसोबत दळण आणायला जायचे.गिरणी मधे काम करणारा माणूस अगदी डोक्याच्या केसांपासून ते पायाच्या नखापर्यंत पिठामुळे पांढरा झालेला असायचा, अगदी त्याच्या पापणीच्या केसांवरही पिठ लागलेलं बघितल्याचं आठवतं मला :D सुरूवातीला आईसोबत जाऊन एखाद्या छोट्या डब्यात थोडंसं पीठ आणायचे मग हळूहळू डब्याचा आकार आणि त्यातलं धान्य वाढत गेलं.गरम-गरम पिठाचा डबा उचलून चालत घरी जाणं म्हणजे दिव्य कसरत असायची पण त्यातही आपण आईला मदत करत आहोत ह्याचं एक वेगळं समाधान आणि आनंद असायचा :)

गिरणीमधे येणारा एका लयीतला तो पट्ट्याचा चट् चट् आवाज अजून आठवतो, वेगवेगळ्या आकाराचे-प्रकाराचे डबे ओळीत ठेवलेले असायचे. काही पिशव्यांसकट असायचे तर काही नुसत्याच प्लास्टिकच्या पिशव्या असायच्या. कधी जर थालिपिठाची भाजणी किंवा चकलीचं मिश्रण दळायला असेल तर खमंग वास यायचा.एका गिरणीमधे तर 'आम्ही इथे काम करणा-या माणसाला पगार देतो, उगाच टिप देऊ नये' अशी पुणेरी पाटी बघितल्याचं पण माझ्या लक्षात आहे :D :D आई सुरूवातीला सांगायची किती किलो धान्य दिलं आहे आणि तिथे गेल्यावर त्या माणसाला सांगून नीट हिशोब करुन पैसे दे वगैरे, मग गिरणीत गेलं की किलोला किती पैसे ते बघून हाताच्या बोटावर मोजत हिशेब करायचा आणि तितकेच पैसे बरोबर उजव्या हाताच्या मुठीत ठेऊन दळण मिळायची वाट बघायची :) शक्यतो डबा ठेऊन कुठे जायचं नाही असं आईने बजावलेलं असायचं नाहीतर तो माणूस खाली सांडलेलं किंवा दुस-या कोणाचं पीठ आपल्या डब्यात भरून देईल ह्या सुचना आठवल्या की आता हसायला येतं, पण एकूण अशी सगळी मजा होती तेंव्हा.माहित नाही हल्ली लहान मुलांना असली कामं करायचा प्रसंग येतो की नाही ते,असो.

दळण घेऊन येणे हा कार्यक्रम तसा माहिन्यातून १-२वेळेस असायचा पण त्याहीपेक्षा धान्य निवडणे हा भाग महत्त्वाचा होता. विशेषतः उन्हाळ्याची सुट्टी लागली की नविन वर्षासाठी धान्य घेऊन, उन्हात वाळवून आणि मग स्वच्छ करुन साठवलं जायचं. त्यात सगळ्यात वेळखाऊ आणि किचकट काम असायचं धान्य निवडणे!
गहू, ज्वारी वगैरे धान्य आई चाळून स्वच्छ करुन द्यायची आणि आम्ही परात किंवा मोठ्ठं ताट घेऊन ते निवडायचो मग वेगवेगळ्या प्रकारचे खडे, गारगोटी सारखे पण गव्हाळ रंगाचे तुकडे सापडायचे.एका वर्षी तर कानाच्या आकाराचं कसलं तरी बी आलेलं गव्हामधे ;) कै च्या कै :)
धान्य निवडण्यामधे पण दोन-तीन इटरेशन्स असायचे, आधी मोठ्या आकाराचा गहू - जो रोजच्या खाण्यासाठी वापरला जायचा. मग त्याला चाळल्यावर खाली पडणारा लहान आकाराचा गहू - हा गहू इतर काही पदार्थ बनवायला वापरला जातो आणि शेवटी जे काही उरेल ते चिमण्यांना खाऊ म्हणून, असं वेगवेगळ्या टप्प्यांमधे काम चालायचं!
आता तर निवडलेलं धान्य मिळतं दुकानामधे आणि त्याही उपर म्हणजे तयार पिठ मिळतं.मी स्वतः आज कित्येक वर्ष तयार/रेडी टू ईट आट्टाच घेत आहे. वेळेअभावी धान्य निवडणं, दळण आणणं ही कामं जमत नाहीत निदान मला तरी, पण अजूनही माझ्या आई-ताईकडे ह्याच पद्धती चालू आहेत.
वेळेअभावी अशा ब-याच स्वस्त पण पौष्टिक पर्यायांना मी मुकत आहे असं आज जाणवलं,हम्म विचार तर चालू आहे बघू काही सुवर्णमध्य काढता येतो का
#आठवणी_लहानपणाच्या

Monday, May 15, 2017

मृत्यू???

What if you die d moment you said - मी काय मरणार नाही आज!!
काय काय करायचं राहून गेलं असं वाटेल? आत्ता ह्या क्षणी फक्त एका व्यक्तीला भेटायचं राहून गेलं ही खंत नक्कीच मनात राहील असं वाटलं आणि कडा पाणावल्या..माझ्या मागे आहे का काही असं की जे आठवेल लोकांना? माझ्या म्हणवणा-या कोणाला माझी उणीव खरंच कुठल्याही स्वार्थाशिवाय जाणवेल का? की मी फक्त अमूक एक काहीतरी नकारार्थी विशेषण असणारी असेन!!
जन्माची प्रक्रिया माणसाला माहित आहे पण मृत्यू? ?किती गृहीत धरलंय आपण त्याला आणि कित्ती आत्मविश्वास आहे आपल्याला की तो इतक्यात भेटायला येणारच नाही म्हणून!!
कदाचित तोच 'काळ' आहे जो आपल्या खात्यातल्या प्रत्येक क्षणाचं मोजमाप करतोय..सतत..आणि आपण अनभिज्ञ आहोत किंवा जगण्याच्या गराड्यात त्याला विसरून गेलो आहोत. कुठल्याही क्षणी कोणत्याही स्वरूपात तो आपल्या समोर येऊ शकतो किंवा क्वचित प्रसंगी दर्शन पण देऊन जातो पण मग आपली त्याला सामोरं जायची तयारी आहे? तुम्ही म्हणाल मला वेड लागलं आहे, असं मृत्यू येईल म्हणून कोणी तयारी करून ठेवेल का किंवा अशी तयारी खरंच करणं शक्य आहे का? मन धजावेल असं काही करायला???हूह नाही माहित! सकाळी सकाळी इतका जड विचार पचवतात येत नाही पण कधी ना कधी ह्याबाबतीत पण प्रत्येकाने विचार करायलाच हवा ना.
आर्थिक बाजू म्हणजे तुमच्यावर असणा-या पैशाशी संबंधित जबाबदाऱ्या हा एक मुद्दा झाला पण तुमच्यावर भावनिकरित्या अवलंबून असणा-या व्यक्ती नाही नाही तुम्ही कोणावर भावनिकरित्या अवलंबून आहात का? तसं असेल तर खरंच जीव मोकळा होईल? कोणी बघितलं खरंच काय होतं ह्या सगळ्या भाव-भावनांचं एकदा श्वास संपला की!!
खूप विचित्र पण गूढ आहे नं माणसासाठी आजही हा विषय...

Friday, May 12, 2017

त्रयस्थ शांतता

काही प्रसंग घडतातच असे की आपण एका विचित्र अवस्थेत जातो.
आपलं म्हणवणारं माणूस आपल्याला दुखावतं आणि ती जखम इतकी खोलवर होते की आपण चक्रावून जातो, जे घडलं आहे ते आपल्या आकलनापलिकडचं मुळात आपल्या अपेक्षेपलिकडचं असतं. आपल्या मनातली त्या व्यक्तीची प्रतिमा तेंव्हा हादरून जाते. तू?? शक्यच नाही इथून मनामधे प्रश्नांचं काहूर उठतं आणि मी तुझ्याकडून अशी अपेक्षा कधीच केली नव्हती इथवर येऊन मेंदू थकून जातो. जे समोर आलं आहे हे वास्तव भयंकर असतं जे एकवेळ बुद्धीला कळतं पण मन मात्र विचारांच्या भोव-यात अडकून गरगरा फिरतच राहतं, नाही कळत त्याला की ह्या भोव-यातून बाहेर कसं यायचं आक्रंदन चालू होतं त्याचं
पण तेंव्हाही त्या प्रिय व्यक्तीला ह्या गोष्टी कळणार नाहीत आणि त्याला त्रास होणार नाही ह्याची काळजी पण कुठेतरी सतत चालू असते.
अशा संभ्रमित करणा-या चमत्कारिक परिस्थितीत मन कुठेतरी बंड करुन उठतं की नको मला ती व्यक्ती आता माझ्या नजरेसमोरदेखील, सहनशक्तीच्या बाहेर आहे हे सगळं माझ्या!!
पण काहीच मनासारखं घडत नाही, ना ती व्यक्ती आपल्या नजरेसमोरून जाते ना आपण तिला मनातून कायमचं काढून टाकू शकतो :( मग ह्या सगळ्याचं पर्यावसन एका विचित्र गोष्टीत होतं- ती व्यक्ती अगदी अनोळखी, ति-हाईत वाटायला लागते, आपण जणू अजिबातच ओळखत नाही समोरच्याला असं बुद्धीलाही वाटायला लागतं आणि एकदा का समोरचा अनोळखी आहे असं मनाने पण मानलं की मग विषयच संपतो आणि त्या दोघांमधे एक त्रयस्थ शांतता पसरते पुढचा काही काळ-दिवस क्वचित महिने सुद्धा :'(

Friday, March 3, 2017

स्व

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही व्यक्ती आयुष्यात भेटल्या आणि एक विशेष नातं त्या प्रत्येकासोबत होतं माझं..हम्म होतं असं म्हणायची वेळ परिस्थितीने आणली माझ्यावर :( पण जेंव्हा ती नाती वर्तमान काळात होती तेंव्हा असं वाटायचं की मला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं सगळं सगळं अगदी चपखल कळतं आणि कित्येकदा त्या व्यक्तीने तशी ग्वाही पण दिली. मग मला पण असं वाटायचं की त्या व्यक्तीला पण माझ्या मनातलं जसंच्या तसं कळत असेल.पण एखादा प्रसंग असा समोर यायचा की ती व्यक्ती माझ्याबाबतीत काय विचार करते ह्याचा प्रत्यय यायचा आणि चर्र व्हायचं मनात :|
पण जसजशी मोठी होत गेले तसं कळायला लागलं की समोरच्याचं सगळं लख्ख समजतं हा खुप मोठ्ठा गोड गैरसमज आपण बाळगत होतो असं काही नसतं!!
फक्त एकच व्यक्ती तुम्हाला अगदी आतुन-बाहेरून स्वच्छपणे ओळखू शकते, जिला काहीही सांगायची गरज नसते आणि कोणत्याही अनपेक्षित उत्तराने ती व्यक्ती तुम्हांला दुखवू शकत नाही!!!
स्वतःचं मन, स्वत्वाचा आवाज हाच तुम्हांला आंतर्बाह्य ओळखतो. बाकी जे असं म्हणतात ना की मी मनकवडी आहे आणि तुझ्या मनातलं सगळं मला कळतं - सब साफ झूठ होता है!!!!
पण गोम अशी आहे की स्वतःचं मन जे बोलतं ते पटत नाही आणि अनपेक्षितपणे दुखावलं गेल्यावर त्याला कसं सावरावं हे आपल्याला कळत नाही :(

Monday, February 13, 2017

समुद्र

कादंबरीचा शेवट हा गोडच करावा असा काही नियम आहे का? म्हणजे त्या भास्करच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं आणि तरी पण दोन पानांच्या मजकुरामधे त्याने स्वतःला सावरलं आणि त्याच्या बायकोला 'भोळी' आहे, तिला जग माहीत नाही अशी स्वतःची समजूत घातली आणि सगळं आलबेल झालं??!! इतकं सोपं आणि सरळ ख-या आयुष्यात घडूच शकत नाही!!

मुळात जे स्पष्टीकरण नंदिनीने दिलं आहे तेच फोल वाटलं मला. तिचे विचार नव-याला समजत नव्हते मग तिला राजोपाध्याय भेटला, त्यांच्यामधे वैचारिक पातळीवर जवळीक निर्माण झाली पण मग शरीराने जवळ येतांना कितीही काहीही म्हटलं तरी जर नंदिनीची इच्छा नसती तर तिने पहिल्या क्षणाला त्याला झटकून बाजूला केलं असतं कारण त्याची जबरदस्ती सहन करायला ती काय त्याची बायको नव्हती!!
तिच्या म्हणण्यानुसार तिला मैत्री कुठवर जाऊ शकते हे बघायचं होतं पण वैचारिक पातळीवरुन शारीरिक पातळीवर जर ती जात आहे तर ते सुद्धा एक थ्रिल म्हणून तिने एंजाॅय केलं. फक्त एकदा बघायचं होतं तर पहिल्यांदा घडलं तेंव्हाच तिला प्रचिती येऊन तिची उत्सुकता शमायला हरकत नव्हती पण ते २-३ वेळेस घडलं, याचाच अर्थ तिला ते हवं होतं!

बाकी कथेचा वेग चांगला आहे, अगदी शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की काहीतरी वेगळं समोर येईल पण मग शेवटी भास्कर स्वतःची समजूत घालतो आणि तिला माफ करतो हे जरा घाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे भास्करच्या मनातले विचार आणि समुद्राचं वर्णन ह्याची सांगड छान घातली आहे. तसंच समुद्र, रिसाॅर्ट, किनारा, टेकडी सगळं व्यवस्थितपणे डोळ्यासमोर उभं राहतं, चित्रदर्शी लिखाण आहे अगदी.

Sunday, February 12, 2017

सावित्री - पु.शि.रेगे

अगदी मोजक्या पानांचं, छोटेखानी पुस्तक आहे. हातात घेतलं तेंव्हा वाटलं, हं लग्गेच वाचून होईल पण माझा हा भ्रम पहिल्या ४-५ पानातच मोडला.

ह्यामधे गोष्ट तशी आहे पण आणि नाही पण. एका 'साउ' ने नव्याने ओळख झालेल्या एका व्यक्तीशी केलेला पत्रव्यवहार आहे हा. ती व्यक्ती कोण आहे कशी आहे ते शेवटपर्यंत कळालं नाही किंवा कळू दिलं नाही बहुतेक.

सहजगप्पा आहेत पत्रातून व्यक्त केलेल्या पण त्यात कुठेही प्रेम-पत्र अशी छबी उमटत नाही. पत्रव्यवहार जरी एका पुरूषाशी होत असला तरी तो एकमेव प्रेमभावनेच्या भरातला नाही, उलट प्रगल्भ विचारांची सुरेख मांडणी केलेली आहे.

'साउ' ने लिहिलेली ही पत्रं म्हणजे कुठेतरी स्वत:शी संवाद साधला आहे असं जाणवत राहतं. अर्थात फक्त इतकंच नाही त्या मजकूरामधे तर, आजुबाजूला घडणा-या घटनांचे पडसादही आहेत पण गरजेपुरतेच.

काही विचार जरा अवजड झाले मला तरी समजायला, पण ते अपवाद सोडले तर भाषा अगदी सहज-सोपी आहे आणि मुळात एकसंधपणा व्यवस्थित साधला आहे. वाचतांना असं सतत वाटत राहतं की आता तरी 'त्याचं' पत्र दिलेलं असेल पण नाही, वाचकाने 'साउ' च्या पत्रांमधूनच 'त्याला' आणि 'त्याच्या प्रतिसादांना' समजावून घ्यायचं आहे :)

मी अशा पिढीत जन्माला आले जिथे असे पत्रव्यवहार करायची वेळ कधी येऊ शकली नाही पण, हे पत्ररूपी पुस्तक वाचून एक वेगळा अनुभव नक्कीच मिळाला

Saturday, February 11, 2017

पुस्तक पेठ

आज मुहूर्त लागला आणि मी पुस्तक पेठ एकदाची शोधली!!

प्रसिद्ध लेखक श्री.संजय भास्कर जोशी यांची ही खास पुस्तकांची पेठ. पुण्यनगरी मधे पेशव्यांनंतर नविन पेठ वसवणारे हे बहुदा एकमेव व्यक्ती असावेत,असो.

तर मी आतमधे गेले तेंव्हा संजय जोशी सर कोणासोबत तरी बोलत वेगवेगळ्या पुस्तकांबद्दल चर्चा करत होते. माझं पेठेचं निरीक्षण चालू होतं. मग संजय सरांनी मला विचारलं एखादं खास पुस्तक शोधत आहेस का? मी मग माझं आजवर जे काही छुटुक-पुटुक वाचून झालं आहे त्याबद्दल सांगितलं. मग सरांनी मला एक से एक पुस्तकं हातात दिले ज्यामधे गौरी देशपांडे यांचं 'आहे हे असं आहे' आहे परत पु.शि.रेगे यांचं 'सावित्री' आहे आणि अशीच अजून मस्त दहा-एक पुस्तकं आहेत.

मला कधीपासून 'जी.ए.कुलकर्णी' यांचं कुठलं तरी पुस्तक वाचावं असं वाटत होतं पण, कळेल की नाही आणि नेमकं कोणतं वाचावं हे कळत नव्हतं तर संजय सरांनी माझा तो प्रश्न चुटकीसरशी सोडवला 'डोहकाळिमा' हातात देऊन. बरं नुसतं पुस्तक नाही दिलं तर त्यात कोणत्या क्रमाने मी गोष्टी वाचायला हव्या त्याचे क्रमांक पण लिहून दिले :) :) काय भारी नं, म्हणजे मला तर असं वाटलं की अभ्यासक्रमातला कठिण विषयाचा अभ्यास करायचं गाईडच हातात मिळालं :)

मस्त गप्पा मारत अजून काहि इंग्रजी पुस्तकांबद्दल पण चर्चा झाली आणि मुख्य म्हणजे सरांनी त्यांनी लिहिलेल्या त्यांच्या आवडीच्या पुस्तकावर आॅटोग्राफ पण दिला :) :) :)

इतकं मस्त वाटलं ना आज तिथे जाऊन, दिल एकदम गार्डन गार्डन हो गया :)

इतकं हलकं-फुलकं आणि आपुलकीचं वातावरण आहे की कोणीही ह्या पेठेमधे वारंवार येत राहिल.

अजून एक खास बात म्हणजे इथे वेगवेगळे कार्यक्रम होत असतात ज्यायोगे आपल्याला अनेक लेखक-कविंना भेटायची, गप्पा मारायची संधी मिळू शकते.

आजची संध्याकाळ सत्कारणी लागली माझी आणि मनामधे एक पुस्तकांसाठीचा जो कोपरा आहे त्याची खिडकी परत एकदा सताड उघडली गेली :) :) थँक्यू सो मच संजय सर :)

Monday, January 30, 2017

चंद्रकोर

नुकतीच उगवलेली चंद्रकोर बघितलीस तू? जरा लालसर झाक आहे तिला..जणू तारूण्याने रसरसलेल्या, प्रणयासाठी आसुसलेल्या कोवळ्या सखीच्या डोळ्यात असलेला मादकपणाच..पण थोड्या वेळातच हा रंग बदलेल आणि शुभ्र झळाळी ल्यालेली ती चंद्रकोर आकाशामधे चमकत राहिल..असंच काहीसं होतं जेंव्हा तुला भेटायची आस असते..तू भेटणार ह्या विचारानेच माझं तारुण्य फुलून येतं आणि तु मिठीत घेतल्यावर सगळा बहर रिता होतो पण मी मात्र समाधानाने ओतप्रोत भरून पावते..

Sunday, January 15, 2017

मौत का कुँआ

लाल डब्यातून प्रवास करतांना जर पुढच्या सिटवर बसायची वेळ आली तर - मौत का कुँआ चा थरार सहन करावा लागेल ही मनाची तयारी करुन, आपल्याच बॅगचा बेल्ट सीटच्या हँडलला अडकवून स्वत:च्या सुरक्षेची तरतूद करुन घ्यावी!!

लहानपणी कधी माझी हिम्मत झाली नाही मौत का कुँआ बघायची पण आज एस.टी.महामंडळाच्या कृपेने तो अनुभव माझं आयुष्य परिपूर्ण करुन गेला!!

मी नगर-पुणे स्पेशल हिरकणी बसने आज यायला निघाले. दाराजवळच डाव्या हाताला असलेल्या पहिल्या सीटवर जागा मिळाली. पाय लांब करायला मोकळी जागा आहे म्हणून जरा बरं वाटलं,बॅग ठेवली आणि कानात हेडफोन्स लावून निवांत बसले. १०मिनीटात गाडी निघाली, नगरच्या दुस-या स्टँडमधून गाडी बाहेर पडली आणि ड्रायव्हर च्या अंगात काहीतरी संचारल्यासारखं झालं.

रस्त्यावर एकही गाडी आमच्या बसच्या पुढे नसली पाहिजे ह्या नियमानुसार त्याने कर्कश हाॅर्नचा मारा करत गाडी फुल्ल स्पीडमधे सोडली. वाटेत येणारा ट्रक असू देत की बाईकवाला जोवर तो बाजूला होत नाही तोवर त्याच्या जिवावर उठल्यासारखा सतत हाॅर्न वाजवत त्याला अगदी खेटून गाडी चालवत होता. रस्ता लहान असू दे की मोठा त्याने कशाचीही तमा बाळगली नाही आणि अॅक्सलरेटरवरची पायाची पकड काही सैल केली नाही!!

बसमधे बसल्यावर थोडी झोप घ्यावी असा माझा विचार ह्या रोलर-कोस्टर राईडमुळे पार धुवून गेला :(

माझी बॅग छातीशी घट्ट धरून मी डोळे सताड उघडे ठेऊन बसले होते. सतत असं वाटत होतं की आज रस्त्यावरचा एखादा बाईक-कार नाहीतर ट्रकवाला मरणार आहे किंवा आमची बस तरी इतक्या भयानक स्पीडमुळे उलटी-पालटी होणार आहे!!

पुण्याला येतांना वाघोलीला नेहमी ट्रॅफिक जॅम असतो, ज्यामधे अडकायची वेळ शत्रूवरही येऊ नये अशी मी प्रार्थना करते पण, आज मात्र तो जॅम लागावा अशी तिव्र इच्छा होत होती जेणेकरून ह्या रेकणा-या बसला जरा तरी ब्रेक लागला असता. पण कसलं काय आज रस्ता नेमका मोकळा होता, मग काय ड्रायव्हर चेकाळलाच!! त्याने गाडी नसून सायकल चालवत आहे ह्या आवेशात गाडी पार शिवाजी नगरला आणूनच थांबवली!! २.३०ला सुटलेली गाडी डायरेक्ट ४.४५ला बस स्टँड मधे येऊनच थांबली!!!

आई ग!!

आजवर कित्येक वेळा मी बसने प्रवास केला आहे पण आज आलेला अनुभव भयंकर होता, कधी एकदा बस थांबते आणि मी खाली उतरते असं झालं होतं :(