Tuesday, May 8, 2012

काकस्पर्श




महेश मांजरेकर निर्मित 'काकस्पर्श' हा चित्रपट सिनेसृष्टीला १०० वर्ष पूर्ण झाल्याच्या निमित्ताने प्रदर्शित करण्यात आला आहे.

त्या चित्रपटाच्या पोस्टरवर एकुणच ब्राम्हण कुटुंब दाखवलेलं आहे त्यामुळे मला सुरूवातीला थोडी धाकधूक होती की पुन्हा एकदा कोणीतरी जातीयवाद घेउन उगाच चित्रपट काढला आहे की काय पण माझी ही भिती खोटी ठरली. हा चित्रपट एका खुप वेगळ्या विषयाचा आहे. आधीच्या काळी ज्या स्त्रीया लहान/तरूण वयात विधवा होत त्यांना सहन करावं लागणारं दु:ख, मानसिक आणि शारीरीक त्रास ह्यावर भाष्य करणारी अतिशय संवेदनशील कथा ह्या चित्रपटाचा गाभा आहे.

पार्वती नावाची १३-१४ वर्षांची कोवळी पोर लग्न होऊन सासरी येते, तिचा नवरा महादेव मुंबईला शिकत असतो तिथे त्याला एक कसलासा आजार होतो आणि ते दोघे भेटण्याच्या क्षणीच त्याचा मृत्यु होतो. पार्वतीचं लग्नानंतर नाव बदलून उमा केलेलं असतं, ती इतकी लहान असते की, नवरा काय असतो त्याचा मृत्यु झाल्यामुळे तिने काय गमावलं आहे हे तिला कळत पण नाही.
तिचा मोठा दीर हरी, हा घरातला कर्ता पुरूष असल्यामुळे महादेवच्या मृत्युनंतरचे सगळे विधी पार पाडणे ही त्याची जबाबदारी असते.सगळे विधी झाल्यावर कावळ्याला पिंड ठेवलं जातं, बराच वेळ कोणताच कावळा शिवत नाही त्यामुळे हा मोठा दीर महादेवच्या आत्म्याला काहीतरी वचन देतो आणि मग लगेच कावळा शिवतो.
पुढे त्या काळातल्या रूढींनुसार उमाचे केशवपन करायची वेळ येते तेंव्हा हरी पुढे होऊन कडवा विरोध दर्शवतो ह्या कृत्यामुळे तो बाकी सगळ्या समाजाचा रोष ओढवून घेतो आणि उमाच्या केसालासुध्दा धक्का लागून देत नाही.कित्येक प्रसंग असे येतात जिथे समाज घरामधे ठेवलेल्या विधवा स्त्रीबद्दल नाही नाही ते बोलतो, घरातली मोठी आत्या सुध्दा तिचा द्वेष करते पण हरी अगदी खंबीरपणे तिचं रक्षण करतो, पण हे सगळं हरी का करतो...?

चित्रपटाची कथा अत्यंत चांगली आहे, त्या काळातलं ब्राम्हण समाजाचं चित्र खुप व्यवस्थित उभं केलं आहे. सचिन खेडेकर, प्रिया बापट आणि शाळा चित्रपटाची शिरोडकर ह्यांचा अभिनय अप्रतिम आहे.विषय जरी जड असला तरी मांडणी व्यवस्थित केल्यामुळे कुठेही बोअर होत नाही उलट एका क्षणी प्रिया बापटची अवस्था बघून सुन्न व्हायला होतं..

एक चांगला मराठी चित्रपट बघण्याचा आनंद घ्यायचा असेल तर ह्या चित्रपटाची निवड तुम्ही नक्कीच करू शकता..अजुन एक चांगली गोष्ट म्हणजे महेश मांजरेकरच्या प्रोडक्शन हाऊसमधून काहीही मारधाड नसलेला हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीसाठी खरंच एक छान गिफ्ट आहे.


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Sunday, May 6, 2012

कंटाळा आला आहे मला ह्या +ve अ‍ॅटिटयूडचा



सारखं सारखं किती आशावादी राहायचं माणसाने. प्रत्येक गोष्टीमधून काहितरी कोरून-काटून चांगलं शोधून काढायचं. म्हणजे साधं सकाळी आंघोळीसाठी गरम पाणी काढायला जा तर लाईट जातात आणि गॅसवर पाणी तापवून घेण्याइतपत वेळ नसतो मग ’निदान पाणी तर मिळालं ना’ ह्या विचारासोबत समाधानाचा साबण लावून आंघोळ उरकायची!

ऑफीस मधे एखाद्या नविन प्रोजेक्टला रूजू झाल्यावर तुम्हांला एक कम्प्युटर दिला जातो ज्यामधे स्पीड नावाची गोष्टच नसते म्हणून तुम्ही मॅनेजरकडे ’रॅम’ वाढवून देण्याची विनंती करता जी हमखास ’प्रोजेक्ट कॉस्ट’ ह्या नावाखाली रद्द केली जाते, तेंव्हा तुम्ही पुन्हा एकदा स्वत:ला समजावता, ’निदान काम करायला काहीतरी दिलंय ना’.

एखादी गोष्ट तुम्हांला हवी असेल त्यासाठी तुम्ही प्रामाणिक प्रयत्न सुध्दा करत आहात पण ती गोष्ट तुम्हांला सारखी हुलकावण्या देत असेल तरी तुम्हांला स्वत:ला सांगावं लागतं,’अजुन वेळ आली नाही त्या गोष्टीची, होईल बरोबर वेळेत!’ अरे पण अशी कधी येणार ती वेळ, १ दिवसात, ६ महीन्यात, १ वर्षानंतर की कदाचित कधीच नाही??

कंटाळा आलाय मला ह्या आशावादी विचारांचा, सारखा स्वत:च्या मनाला समजावण्याचा, जर मनासारख्या गोष्टी घडत नसतील तर अजीर्ण होतात हे गोड-गोड आशावादी विचार. वाटतं ह्या निराशावादी विचारांसोबत निदान मनासारखे दोन अश्रूतरी ढाळता येतात उगाच आनंदी असण्याचा मुखवटा घालून स्वत:चीच फसवणूक करायची गरज नाही पडत. नको वाटतात कोणाचेही ’बी पॉझिटीव्ह’ म्हणणारे पाठीवरचे हात..राहावसं वाटतं ह्या अंधारात निदान थोडावेळ तरी, मनाला आलेली मरगळ बरी वाटते, कुठलंच काम करायची इच्छा नको वाटते उलट विचारचं नको वाटतात कारण कुठेतरी पुन्हा एकदा ती पॉझिटीव्ह एनर्जी आत शिरते त्या विचारांसोबत आणि सगळा आळस झटकायला लावते.

जर कोणी देव, नियती, निसर्ग ज्याने कोणी ही सृष्टी बनवलीये तो असेल तर त्याच्यासमोर नाराजी व्यक्त करायला फार मदत होते ह्या निराशेची, आपण लहानपणी रूसून बसतो ना जर आईने आपलं काही ऐकलं नाही तर, तसं रूसून बसावसं वाटतं जेंव्हा ही आपल्यातली आणि आपल्या आजुबाजूची पॉझिटीव्ह एनर्जी काही मदत करत नाही..

त्रास ह्या गोष्टीचा होतो की कुठुन कळतंच नाही आपल्याला हवं ते मिळवण्यासाठी आपण जे प्रयत्न करत आहोत ते बरोबर दिशेतले आहेत की नाही, पुन्हा जितक्या प्रमाणात आपण प्रयत्न करतोय जर ते कमी पडत आहेत तर अजुन काय करायला हवं, कुठनंच उत्तर मिळत नाही मग कंटाळा येतो, जाऊ देत नकोच ती गोष्ट मला, हा विचार जोर धरायला लागतो.

जवळपास असणा-या प्रत्येकाला ती गोष्ट मिळाली आहे आणि आपण प्रयन्त करूनही जर ते आपल्या बाबतीत अजुन घडतच नाहीये तर मग दाद मागायची कोणाकडॆ? ह्या जगातली पॉझिटीव्ह एनर्जीतर अशावेळी मूग गिळून बसलेली असते! थकवा येतो बुध्दीला विचार करून करून पण उत्तर सापडतच नाही. आतल्या आत घुसमट होते, काय करावं ते कळत नाही, ऊर फुटेस्तोवर रडावंस वाटतं पण ते करूनही उत्तर सापडणार नसतंच..मग अशावेळी करणार तरी काय? श्याsss जाऊ देत आता डोक्यातल्या ह्या शब्दांचासुद्धा कंटाळा आलाय..............


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check