Tuesday, June 3, 2014

माझी सवत

आमच्या लग्नाचे कौतुकाचे दिवस संपले म्हणजेच ऑफिस वगैरे रूटीन चालू झालं आणि माझ्या सवतीनं आमच्या संसारात प्रवेश केला!

सकाळ म्हणू नका,रात्र म्हणू नका सारखी आपली ती नव-याच्या जवळच! मी अजून तशी नवी नवरी होते पण जुनी व्हायच्या आतच त्या दोघांचं सुत जुळलं.

ऑफिसमधून घरी आल्यावर नव-यासोबत दिवसभरात काय झालं काय नाही हे बोलायला जावं तर नवरोबांचं लक्ष सगळं तिच्याकडेच!

मी एक-दोनदा प्रेमाने सांगून बघितलं पण माझे शब्द वा-यावरच.मग थोडंसं रागावून बघितलं पण छे! माझ्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे आहे नव-याला!! रूसले-फुगले तरी क्काही काही परिणाम झाला नाही मग शेवटी ब्रम्हास्त्र वापरायचं ठरवलं आणि अबोला धरला.मला खात्री होती की हे अस्त्र कधी निकामी जाणार नाही पण हाय रे कर्मा! माझा अबोला असेपर्यंत नव-याने विचारपूस केली पण मी पूर्ववत झाल्यावर परत पहिले पाढे पंच्चावन.

साम-दाम-दंड-भेद सगळं काही वापरून झालं पण कशाचाच उपयोग होईना.काय करू आणि तिला नव-यापासून वेगळं करू हा एकच विचार डोक्यात घुमू लागला पण उत्तर काही सापडेना.ह्यामुळे माझ्या सवतीला जे हवं होतं ते मात्र होऊ लागलं - आमच्यामधे वाद व्हायला लागले.कधी मी गप्प तर कधी तो गप्प,दिवस दिवस संभाषण होईना!

मला तिचं घरात असणं सहन होत नव्हतं पण नवरा काही तिला दूर करायला तयार होत नव्हता.माझी नुसती चिडचिड होऊ लागली पण तिकडे नव-याला त्याची जाणीवही नव्हती.तिच्याविरूद्ध बोललेला एक शब्दही त्याला खपत नव्हता.माझ्यापेक्षा त्याला तिचं महत्त्व जास्त वाटत होतं.सकाळी उठल्यापासून ते रात्री अगदी झोपतांना सुध्दा तीच जवळ, मी असले-नसले तरी काही फरक पडेनासा झाला.

हे सगळं माझ्या सहनशक्तीच्या बाहेर जायला लागलं मग मात्र मी ह्या प्रश्नाचा तुकडा पाडायचा ठरवलं आणि नव-याला स्पष्टपणे विचारलं,

मी - तुला तुझ्या आयुष्यात ती हवी आहे की मी?
नवरा ( खवचटपणे ) - दोघीही!
मी - ते आता शक्य नाही. एकतर मी तरी ह्या घरात राहीन नाहीतर ती तरी, ठरव काय ते एकदाचं. मला असं रोज रोजचं मरण नकोय!
नवरा - हम्म विचार करावा लागेल.
मी - विचार करावा लागेल काय?? ठीक आहे! तू करत बस विचार मी ठरवलं आहे जर ती ह्या घरात राहणार असेल तर मी ही निघाले!!
नवरा - लगेच निघत आहेस की उद्या जाणार?
मी ह्यावर काही बोलूच शकले नाही आणि अवाक होऊन त्याच्याकडे बघत राहिले! तो मात्र शांतपणे स्मीतहास्य करत माझ्याजवळ आला आणि माझ्या हातात एक छानसं गिफ्ट ठेवत म्हटला,' हे बघून ठरवं खरंच जायचं आहे की नाही ते'.

मला तर काही कळतंच नव्हतं हे सगळं काय चाललंय ते!
मी ते गिफ्ट उघडून बघितलं आणि त्यात एक नवा-कोरा टॅबलेट होता!  :)   :)


... आता आमच्याकडे सगळं आलबेल आहे.नवरा त्याच्या मोबाईलमधे आणि मी माझ्या टॅबमधे बिझी आहे :D

Monday, June 2, 2014

'ते' दिवस!

 स्त्री - निसर्गाने तिला मार्तृत्वासारखं वरदान बहाल केलं आहे. हे मार्तृत्व सुकर व्हावं म्हणून निसर्गाने अगदी काळजीपूर्वक एक यंत्रणा तिच्या शरीरात बसवून ठेवली आहे. मुलगी वयात आल्यावर ही व्यवस्था कार्यरत होते आणि योग्य वेळी तिचा कार्यभाग पार पाडते.

 निसर्गानेच जर हे सगळं तिला बहाल केलं आहे आणि त्याची निष्पन्नता एका निरागस जीवाला जन्म देण्यामधे होते तर ती गोष्ट 'घाणेरडी, विचित्र, किळसवाणी' कशी काय असू शकते???

 तुम्ही म्हणता देवाने निसर्ग,पृथ्वी,स्त्री,पुरूष यांना बनवलं मग ह्या देवानेच बनवलेल्या स्त्रीचं 'त्या' दिवसातलं वावरणं त्याला का खटकतं?? का त्या दिवसांमधे स्त्रीने 'बाजूला' बसायचं? का तिने देवपुजा करायची नाही? का तिने देवाचं नाव घ्यायचं नाही? का तिने कुठल्या देवालयात जायचं नाही? इतकंच कशाला तिने साधं कुठल्या घरी होत असलेल्या मंगलकार्यालाही उपस्थित राहायचं नाही?? का??

 एकवेळ असं समजून चालू की, आधीच्या काळी औषधं नव्हती म्हणजे पेनकिलर्स वगैरे आणि स्त्रीयांना पुष्कळ कामं करावी लागायची तर 'त्या' दिवसात शरीराची जास्त झिज होऊ नये म्हणून, त्यांना विश्रांती घ्यायला लावायची याकरता, त्यांनी बाजूला बसायचं.

 पण हे बाजूला बसणं म्हणजे, 'कावळा शिवला' आता तिला कोणी हात लावायचा नाही, तिने वेगळ्या अंधा-या खोलीत बसून राहायचं, तिच्यासाठी पाणी वेगळं, भांडी वेगळी, जेवणाचं ताटही दुरून देणार - अरे काय हा मूर्खपणा!! 'त्या' दिवसांमधे असं काय होतं म्हणून तिला इतकी विचित्र वागणूक?? आणि ही वागणूकही कोण देणार तर एक स्त्रीच म्हणजे सासू किंवा आई, की ज्या स्वतः त्या सगळ्यामधून गेल्या आहेत. त्यांना 'त्या' दिवसांचं महत्त्व आणि कार्यकारणभाव माहित आहे त्यांनी असं वागावं?? काय बोलणार!!

 हल्ली हा प्रकार क्वचितच बघायला मिळतो पण, अजूनही, विशेषत: हिंदू घरांमधे एखाद्या मुलीचं 'त्या' दिवसांबद्दलचं गणित हे तिच्यापुरतं कधीच राहत नाही. जर घरामधे लग्नकार्य किंवा मंगलकार्य असेल तर तिला आईकडून विचारणा होतेच.पुढे तिच्या स्वतःच्या लग्नासाठी तारीख काढतांना किंवा त्यापुढचा 'ऋतुशांती' हा विधी करायचा म्हणूनही चक्क गुरूजी ह्याबाबतीत विचारणा करतात! गुरूजी म्हणजे कुटुंबाबाहेरचा कोणीतरी तिसरा पुरूष आणि त्याला ह्याबाबतीत सांगायचं श्शी! विचार केला तरी किळस येते पण, हो, त्या मुलीला ह्याबाबतीत आईला किंवा सासूला खुलासा द्यावा लागतो आणि मगच मुहूर्ताचे दिवस ठरतात!!!

 विक्षिप्तपणाचा कळस आहे हा सगळा! मला तर समजतच नाही की काय असा फरक पडतो जर 'त्या' दिवसांमधे सुध्दा एखाद्या मुलीने कुठलं मंगलकार्य केलं तर. तुमचा देव काय तिच्याकडून पुजा करायला नाही म्हणणार आहे का? की तो त्या मूर्तीतून पळून जाणार आहे? वर्षानुवर्ष आंधळेपणाने काही गोष्टी आपण पाळत आलो आणि अजूनही त्या पुढे नेण्याचा आटोकाट प्रयत्न करत आहोत व्वाह रे संस्कार!

 वैज्ञानिक माहिती असं म्हणते की ह्या काळामधे स्त्रीच्या शरीरामधे उष्णता ब-याच प्रमाणात वाढते आणि पुरूषामधे असलेल्या जननक्षम कार्यप्रणालीला त्यामुळे त्रास होऊ शकतो म्हणून त्या काळापुरतं का होईना स्त्री-पुरूषाने एकत्र असू नये. पण ही तर गोष्ट एखाद्या विवाहीत किंवा लीव्ह-इन मधे असणा-यांसाठी लागू होते. मग ह्या गोष्टीमुळे देवाला कुठे काय प्रॉब्लेम होतो??

 हा त्रागा जर केला तर असं ऐकावं लागतं की, तुमचं सगळं विचार करणंच विचित्र आहे,आम्हाला आमच्या आईने जे सांगितलं ते आम्ही ऐकलं आणि वागलो.आम्हाला नाही असले प्रश्न पडले, तुम्हांला जे करायचं ते करा.

 मग असं ऐकल्यावर स्वतः स्त्री असल्याचीच किळस वाटायला लागते. एक मन म्हणतं आई म्हणते तर ऐकलं तर काय होतं, पण, दुसरं मन म्हणतं की का ऐकायच्या असल्या बिनबुडाच्या गोष्टी! आणि शेवटी काय होतं तर आतल्या आत धुमसतच रहावं लागतं आणि 'ते' दिवस मूड स्विंग्स आणि दुखणी घेऊन आलेलेच असतात!!