Thursday, February 26, 2015

शिक्षा

सोमवारी संध्याकाळी थोरात उद्यानात चक्कर मारावी म्हणून गेले..गेटमधून आत गेल्यावर डाव्या हाताला महादेवाचं मंदीर आहे आणि पुढे बाकी देवि-देवतांचं मंदीर आहे.

सोमवार म्हणून आपसूक पाय महादेवाच्या मंदीराकडे वळले.विशेष गर्दी नव्हती पण तरी दोन-तीन जण उभे होते.
महादेवाची पुजा अगदी छान मांडलेली होती,शिवलिंगावर एक पांढरं फुल त्याखाली बेलाचं पान आणि बाकी पिंड अगदी काळीशार स्वच्छ, प्रसन्न वाटलं ते बघून :)

नमस्कार करून मी निघत असतांनाच एक बाई लगबगीने पुढे आल्या.लगेचच त्यांनी हातातली चितळेंच्या गाईच्या दुधाची पिशवी फोडून महादेवावर धार धरली.काही क्षणांपूर्वीपर्यंत जिथे अगदी
सुंदर पूजा मांडलेली होती तिथे आता दुधाचा अभिषेक होऊन सगळंच विचित्र झालं होतं!

बिचारा महादेव! आतापर्यंत डोक्यावरच्या बेला-फुलाच्या मंदसुगंधामधे ध्यानस्थ बसलेला असतांना अचानक गार दुधाची धार पडल्यावर एकदम भांबावलाच असेल!!

मला ते बघून असं वाटलं त्या बाईचा हात धरावा आणि तिला विचारावं सुंदर साडी घालून मेक-अप करून तयार झाल्यावर डोक्यावर कोणी पाणी ओतलं तर कसं वाटेल?? का त्या बिचा-या
देवाला त्रास देत आहेस!!

पण माझ्या मनामधे हा संवाद होईतो ती बाई महादेवाच्या पुजेचं होत्याचं नव्हतं करून समोरच्या मंदिरातल्या देवांकडे वळली पण होती!

देव असण्याची कदाचित शिक्षाच मिळाली आज महादेवाला!!

Tuesday, November 11, 2014

ब्राम्हण

काल बसमधे माझ्या शेजारी दोन मुली गप्पा मारत उभ्या होत्या..विषय होता त्यांची रूममेट..तिच्याविषयी बोलता बोलता त्यातली एकजण म्हटली ,'ती ब्राम्हण आहे एक रूपया पण कधी सोडत नाही हां' आणि पुढे अजून काही-बाही..

मला एक कळत नाही जर ती तिसरी मुलगी हिशोबी असेल तर मग तो तिचा स्वभाव आहे त्यासाठी जातीवरून बोलायची गरजच काय??

समोरच्या माणसाबद्दल कुठली गोष्ट आवडली नाही की लगेच त्याच्या जातीवरून त्याला बोलायच ह्याला काही अर्थ आहे का? त्याचा स्वभाव, त्याचं वागणं ह्याला त्याची जात कशी काय जबाबदार असू शकते?? ज्याप्रमाणे माणसाचा स्वभाव असेल त्याप्रमाणे तो कुठल्याही गोष्टीसाठी प्रतिसाद देणार ना. त्याचा स्वभाव घडण्यासाठी घरातले संस्कार जितके जबाबदार तितकेच बाहेर घडणा-या, त्याच्या आजूबाजूला असणा-या गोष्टीपण जबाबदार असतात मग जातीनंच काय घोडं मारलंय?? जिथे जमेल तिथे तिला वर काढलीच पाहिजे का?

मी पण ब्राम्हणच आहे आणि ब-याचदा मलासुध्दा 'तू ब्राम्हण आहेस?' असं आजवर ब-याच जणांनी अगदी तुच्छतेने विचारलं आहे, जणू काही शिवीच आहे ब्राम्हण म्हणजे!

बरं ह्याबाबतीत काही बोलायला गेलं तर मग पुराणातले दाखले देतात की आमच्या जातीवर ब्राम्हणांनी अत्याचार केले होते म्हणून वगैरे वगैरे..

पण मला एक कळत नाही तुम्ही-आम्ही आजच्या काळामधे जन्माला आलो आणि वावरतोय ना मग पुराणातले संदर्भ देऊन उगाच का म्हणून एकमेकांना जातीवरून हिणवायचं किंवा उगाच का भावना दुखवायच्या??

जग कितीही कुठे गेलं तरी आपण आपल्या अशा खुळचट कल्पना सोडणार नाही असं ठरवूनच टाकलं आहे जणू सर्वांनी.जात-पात ह्या इतक्या क्षुल्लक गोष्टी आहेत ना की, ह्यावर विचार करायची पण इच्छा होत नाही पण, असे काही प्रसंग बघितले की वाटतं आपण तरी का गप्प बसतो आणि स्वतःच्या जातीबद्दल बोलत नाही? आपणही अभिमानाने बोलायला हवं स्वतःच्या जातीबद्दल पण नाही जमत ना कदाचित आमच्यावर तसे संस्कारच केले गेले नाहीत..अर्थात हे कोणाकोणाला म्हणून सांगणार ना..शेवटी काय शहाण्यालाच शब्दाचा मार असतो नं... ;D