सध्या सगळीकडे 'सैराट'ची हवा जोरदार चालू आहे. मी तो चित्रपट अजून बघितला नाही पण गाणी कालच पहिल्यांदा व्यवस्थित ऐकली.
'याड लागलं' ह्या गाण्याचं म्युझिक आणि रेकॉर्डिंग प्रसिद्ध 'सिफ्मनी स्टुडियो' मधे झालं आहे. गाण्याची सुरूवात ऐकतांना जाणवलं की किती मधुर संगीत आहे आणि त्याची ओरिजिनॅलिटी लगेच लक्षात आली पण जेंव्हा मराठी शब्द कानावर पडले तेंव्हा अगदी जमिनीवर आल्यासारखं वाटलं.
अर्थात गायकाचा आवाज, शब्द छान आहेत पण हे गाणं कानात हेडफोन्स लावून ऐकत बसलोय असं नाही करता येत कारण त्यात ज्या लो व्हॉल्यूम नोट्स आहेत त्या ऐकण्यासाठी आवाज वाढवा आणि लगेच हाय व्हॉल्यूम नोट्स आल्या की आवाज कमी करा असं सतत करावं लागलं जे मला तरी अजिब्बात आवडत नाही, त्यामुळे ते गाणं अनुभवायची मजा सगळी निघून जाते.
अजय-अतुल ह्या जोडीला संगिताची व्यवस्थित जाण आहे आणि त्यांनी योग्य तेच ह्या गाण्यासाठी केलं असेल पण मला नाही ते पटलं,मग भलेही ते सिफ्मनी स्टुडियो मधलं रेकॉर्डिंग का असेना.
दुसरं गाणं - 'आताच बया का बावरलं' हे श्रेया घोषाल ने गायलं आहे जे मला सगळ्यात जास्त आवडलं. तिचा आवाज प्रचंड गोड आहे यार :) :) सतत ऐकावा इतका गोड आहे. ह्या गाण्यासाठी सुरूवातीला घेतलेला कोरस पण फार भारी वाटला मला, त्यात अगदी शेवटच्या शब्दाला घेतलेली हरकत तर लाजवाब आहे, बहोत खुब अजय-अतुल :)
ह्या गाण्याचे बोल पण अगदी त्या मुलीच्या कोवळ्या मनातल्या आणि तिच्या रांगड्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे आहेत.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे सगळ्या गाण्यांचे बोल 'अजय-अतुल' जोडीनेच लिहीले आहेत, त्यातही मी त्यांना ब-यापैकी मार्क्स देईन :)
तिसरं गाणं - 'सैराट झालं जी' हे गाणं सगळ्यात पहिले प्रसिद्ध केलं होतं. हे तसं स्लो पण रोमँटिक गाणं आहे, जे ऐकतांना जोगवा मधल्या 'जिव रंगला' ह्या गाण्याची आठवण येत राहते.ह्यामधे असणारं संगित अगदी 'अजय-अतुल' जोडीचंच आहे हे कोणीपण सांगु शकेल इतकी त्यामधे त्यांच्या आधीच्या गाण्यांना दिलेल्या संगिताची झाक आहे.असो, ह्या गाण्याचे बोल मला आवडले. दोघांच्या मनामधे असलेली नव्या प्रेमाची चाहूल, त्यामुळे आलेली हुरहुर,
प्रेमाच्या घेतलेल्या आणाभाका सगळं सगळं अगदी अलगदपणे टिपलं आहे.त्या दोघांच्या गोड-गुलाबी प्रेमाचा प्रवासच जणू ह्यामधून सांगितला आहे.
चौथं गाणं - 'झिंग झिंग झिंगाट' - हे तर सगळ्या लहान मुलांचं अत्यंत फेव्हरेट गाणं आहे आणि ह्या वर्षीच्या गणपती महोत्सवामधे फक्त ह्याचाच आवाज असणार गॅरेंटीड! ह्या गाण्याचे बोल आणि संगित दोन्ही मधे अगदी तुफान मस्ती करून घेतली आहे अजय-अतुल जोडीने.
तर माझ्या मते पहिलं गाणं सोडलं तर हा अल्बम तुम्ही नक्कीच ऐकू शकता आणि ऐजाँय करू शकता.
Wednesday, May 11, 2016
Tuesday, April 12, 2016
माय प्लेलिस्ट-१: भूपाळी
उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी
राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली
लहानपणी आजोबांनी गायलेल्या भूपाळ्यांनी जाग यायची. पहाटेच्या शांत वातावरणात धीरगंभीर आवाजात एका लयीत माझे आजोबा वेगवेगळ्या भूपाळ्या म्हणायचे, खूप मस्त वाटायचं :)
नंतर आमच्याकडे टेपरेकॉर्डर घेतल्यावर भूपाळ्यांची कॅसेट आणली होती ती बहुतेक करून सणा-सुदीला लावली जायची. मध्यंतरी शिक्षणामुळे घर सोडलं आणि भूपाळी ऐकणं वगैरे बंद झालं. आता लग्नानंतर पहाटे उठायला सुरूवात केली तेंव्हा कुठेतरी काहितरी मिसिंग आहे असं वाटलं आणि गुगलून बघितलं तर माझ्या लहानपणी ऐकलेल्या सगळ्या भूपाळ्या सापडल्या :) :)
आता रोज सकाळी माझ्या घरातली पहाट अगदी सुरमयी असते.तर माझ्या आवडीची भूपाळी आहे -
उठि श्रीरामा पहाट झाली
ही भूपाळी माझ्या आवडत्या गायिकेने म्हणजे आशा भोसले ह्यांनी गायली आहे आणि ह्यातले शब्द म्हणाल तर प्रत्येक शब्द इतका चित्रदर्शी आहे की जणू आपण श्रीरामाच्या प्रासादामधे, परिसरामधे उभे राहून सगळं बघत आहोत.
ही भूपाळी ऐकतांना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. कौसल्या माऊली हातामधे चांदीचा कलश घेऊन श्रीरामाच्या खोलीमधे आली आहे.श्रीरामाचं वय साधारण ७-८ वर्षे, तो अगदी गाढ झोपेत आहे.त्याच्या चेह-यावर एक निरागसपणा आणि साखरझोपेमधलं हास्य उमटलं आहे.अगदी कौतुकाने रामाला बघत कौसल्यामाता नाजुक आणि प्रेमाने ओतप्रोत आवाजात गाऊन त्याला जागं करायचा प्रयत्न करत आहे.
उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली
उमलली हा शब्द फार सुंदर वाटतो ह्या ओळिमधे.जणू आकाशाचं फुल उमलत आहे आपली एकेक पाकळी बाजुला सारत असा भास होतो :)
होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी
खोलिच्या सज्जामधे उभी राहून जणू आजुबाजुच्या परिसरामधे घडणा-या घटना आता कौसल्या वर्णन करत आहे.हे सगळं ऐकतांना कुठेतरी वेद ऐकल्याचा पुसटसा भास होतो तर दुस-या ओळीतून जाणवतं की गोठ्यातल्या गायींची वासरं-कालवड त्यांना लुचत आहेत आणि भूपाळी गात जाणारी भाटमंडळी मंदिरासमोरच्या रस्त्याने परतत आहेत असं जाणवतं.
काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी
ह्या कडव्यामधे कौसल्यामाता श्रीरामाला चंद्र - सुर्याच्या आवागमनाची गंमत सांगत आहे आणि तितक्यात तिला वसिष्ठ मुनिंची काटकुळी पण तेजःपुंज आकृती मंदिराकडे जातांना दिसत आहे. प्रत्येक ओळीतून आजुबाजूला घडणा-या गोष्टी सांगून श्रीरामाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे.
राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली
शेवटच्या कडव्यातुन ति सांगत आहे की, आता तर दासीपण आल्या आहेत खोलितल्या समया विझवण्यासाठी आणि बाहेर सूर्य पण अगदी झगझगीतपणे आपला प्रकाश पसरवत सगळ्या सृष्टीला जागं करत आहे, आता तरी जागा हो.
ह्या ओळि गातांना आशाबाईंनी 'राजसा' हा शब्द इतका प्रेमाने उच्चारला आहे की जणू कौसल्यामाता श्रीरामाच्या डोक्यावरून हात फिरवत आहे असा भास होतो.
मस्त वाटतं ही भूपाळी ऐकली की :) :)
Subscribe to:
Posts (Atom)