Sunday, October 9, 2011

सोलेदाद

Lyrics link

वेस्टलाईफ ह्या बॅन्ड च ’सोलेदाद’ हे गाणं ऎकलं आणि डोक्यात विचार सुरू झाले,

ह्या गाण्याची खरी कथा मला माहित नाही, पण, जेंव्हा हे गाणं मी पहिल्यांदा ऎकलं तेंव्हा वाटलं की, बहुदा ह्या कपल चं ब्रेक-अप झालं असावं आणि ह्या मुलाचं त्या मुलीवर खुप प्रेम असणार पण ती सोडून गेल्यामुळे तो दु:खसागरात पार बुडून गेला आहे.

त्या प्रियकराने आपल्या सोडून गेलेल्या प्रेयसीच्या आठवणींमधे आळवलेलं हे गाणं आहे..त्याला ती सोडून गेल्यावर झालेलं दु:ख प्रत्येक शब्दातून वाहत आहे. ज्या ज्या ठिकाणी त्या दोघांनी पुढच्या आयुष्याची स्वप्न बघितली होती त्या जागा आता त्याला भकास वाटत आहेत.आणि म्हणूनच तो म्हणतो, You're a loss I can't replace.

ह्या गाण्यात जे काही तो कवी सांगतो आहे ते कित्येकांच्या बाबतीत घडलंही असेल पण, खरंच, असं कितपत शक्य आहे की, जी व्यक्ती तुम्हांला तुमच्या आयुष्यभरासाठी हवी होती पण काही कारणास्तव ते शक्य झालं नाही, तर तुम्ही त्या व्यक्तीशिवाय जगूच शकणार नाही. तुमचं त्या व्यक्तीवर अगदी जिवापाड प्रेम होतं, तिच्यासाठी तुम्ही काहीही करायला तयार होतात पण, आता तिच नाही म्हणून एखाद्याला जिवंतपणी जगणं सोडून देता येतं?

मी कल्पना करू शकते ब्रेकअप झाल्याचं दु:ख किती तीव्र असू शकतं, पण आपल्याला सगळ्यांना हेही माहित आहे, की वेळ-काळ-आयुष्य हे कोणासाठीही थांबत नाही, त्याच्या गतीनुसार ते पुढे सुरूच राहतं कोणाचीही वाट न-बघता, एकदा पुढे गेलेली वेळही त्याचमुळे कितीही इच्छा असली आणि कितीही प्रयत्न केले तरी परत येऊ शकत नाही. अशा परिस्थितीत कोणी स्वत:ला एकाच जागी थांबवू शकतं, मनातल्या विचारांना एकाच व्यक्तीसाठी बांधून ठेवू शकतं?  

मला तरी वाटतं, एक ठराविक काळच ह्या दु:खाची तीव्रता राहत असावी. मान्य आहे, ह्या आठवणी आयुष्यभरासाठी मनावर ठसे उमटवून जातात पण त्यामुळे माणूस जगण्याचा स्वार्थ सोडू शकत नाही.काहि देवदास झालेही असतील कदाचित अशा प्रसंगानंतर पण, कुठेतरी जगण्याची जी उमेद निसर्गाने माणसात जन्मत:च दिलेली आहे तीला इतक्या सहजा-सहजी झुगारून देणं केवळ अशक्य आहे. तुम्ही स्वत:ला कितीही थांबवायचा प्रयत्न केला तरीहि, काळ, ज्याच्याशी आपलं आयुष्य बांधलं गेलेले आहे आणि आपले आप्तस्वकीय ज्यांमुळे आपल्याला जगण्याची ताकद मिळाली आहे, थांबू देत नाहीत!!

पण, मी म्हणते का थांबावं एखाद्याने? फक्त हट्ट म्हणून की दुस-याचं अटेन्शन मिळविण्याकरता? छ्या....

माझं तर स्पष्ट मत आहे की, निदान स्वत:साठी तरी माणसाने मनमुराद जगायला हवं. माणसाचा जन्म मिळाला आहे आणि ह्या पृथ्वीतलावर कित्तीतरी गोष्टी बघण्यासारख्या, करण्यासारख्या, जगण्याचा खराखुरा आनंद लुटण्यासारख्या आहेत मग का स्वत:हून आयुष्याची राख-रांगोळी करायची.

आयुष्य हे सरप्राइजेस नी भरलेलं असतं, कदाचित तुम्हांला हवी असलेली व्यक्ती पुढच्याच वळणावर भेटणार असेल, फक्त तुम्ही तीथवर जायचा उशीर...    


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Wednesday, September 28, 2011

My daddy strongest :-)


माझ्या आयुष्यातला पहिला हिरो आणि आयडॉल म्हणजे माझे बाबा! ’साधी राहणी आणि उच्च विचारसरणी’, हा माझ्या बाबांचा जीवनमंत्र. त्यांची  रास सिंह आहे आणि तसचं त्यांचं व्यक्तिमत्त्व ही सिंहासारखं रूबाबदार आहे, कोणत्याही प्रसंगाला अगदी धीराने, न-डगमगता सामोरं जाण्याची त्यांच्यात ताकद आहे. कधीच उतावीळपणा, अधीरता त्यांच्या वागण्यात आम्हां भावंडांना दिसली नाही.

अगदी हालाखीचे दिवस काढूनही त्यांनी स्वबळावर शिक्षण पूर्ण केलं, शून्यातून सगळं विश्व उभं केलं, पण, या गोष्टीचा त्यांना जरा देखील गर्व नाहीये.

लहानपणी आमच्यावर सगळे संस्कार बाबांनी त्यांच्या वागणुकीतून केले. कोणतही काम असलं तरी आमचे बाबा ते काम परफेक्टच करणार. मग ते त्यांच्या ऑफिसचं काम असू दे किंवा स्वयंपाक! खरं सांगू, माझ्या आईपेक्षा बाबाच पुरणपोळी आणि भाकरी छान बनवतात ;-)

त्यांच्यामुळेच आमच्यातही व्यवस्थितपणा अगदी  लहानपणापासून रूजला. मला अजून आठवतं, शाळा सुरू झाल्यावर नविन आणलेल्या वह्या, पुस्तकांना कव्हरं घालायला बाबा आम्हांला शिकवायचे, कधी जर चूक झाली तर व्यवस्थित समजावून सांगायचे पण, ’मार’ हा प्रकार कधीच नव्हता.

माझ्या बाबांचं अक्षर अतिशय सुंदर आहे, ते उत्तम शिक्षक आहेत आणि त्यांची देवावरही खूप श्रद्धा आहे. पण, देव आहे म्हणून तारून नेईल अशी त्यांची वृत्ती नाही, तर ते एक कर्तव्यनिष्ठ मुलगा, पती आणि पिता आहेत.

पुस्तकं वाचायची आवड मला बाबांमुळे लागली, माझ्यासोबत बुध्दिबळ खेळायला बाबाच नेहमी पार्टनर असायचे. माझ्या वक्तृत्व स्पर्धांची तयारी सुद्धा बाबाच करून घ्यायचे, मला जेंव्हा पहिलं बक्षिस मिळालं होतं तेंव्हा बाबांनी मला एकच गोष्ट सांगितली होती,’बक्षिस मिळालं म्हणून हुरळून जायचं नाही आणि जर एखाद्यावेळेस नाही मिळालं तर रडायचं नाही, फक्त प्रयत्न करत राहायचे, यश जरूर मिळतं’..असे अनेक छोटे-छोटे प्रसंग आहेत ज्यामधून बाबांनी आमचा स्वभाव घडवला.

मी कधीच त्यांना निराश झालेलं बघितलं नाही, कायम त्यांनी संकटातून अगदी धीराने स्वत:ला सावरलं, कधीच त्यांच्या डोळ्यात मी अश्रू नाही पाहिला आणि त्यांनी आमच्या डोळ्यात येऊ नाही दिला.

असं सगळे जण म्हणतात की, आई-वडील जर काही गोष्टी त्यांच्या आयुष्यात मिळवू नाही शकले तर त्या गोष्टी पूर्ण करण्याची अपेक्षा ते आपल्या मुलांकडून ठेवतात, पण, आमच्यावर कधीच बाबांनी त्यांच्या इच्छांचं ओझं लादलं नाही, प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या आवडीनुसार शिकू दिलं.

मध्यमवर्गीय म्हटल्यावर ’बाबा’ ह्या व्यक्तीला घर आणि ऑफिस यातून आपल्या मुलांसाठी म्हणावा तितका वेळ काढता येत नाही पण, आमचे बाबा प्रत्येक वेळेस आमच्यासाठी, आमच्याजवळ होते, आहेत. कधी बोर्डाची परिक्षा असू देत अथवा कॉलेजचं अ‍ॅडमिशन, गणपतीची मिरवणूक किंवा कर्णपूरा देवीची जत्रा..

बाबांच्या संयमी स्वभावामुळे लहानपणापासून ते आजतागायत मी कधीही घरामधे कुरबूर, भांडण, रडारड असे प्रकार बघितले नाही, आम्ही सगळी भावंड अगदी खेळकर वातावरणात मोठे झालो.

आम्हां मुलींना स्वावलंबी बनविण्यात आमच्या बाबांचा खूप मोठा वाटा आहे, मी स्वत: ला अतिशय भाग्यशाली समजते मला इतके प्रेमळ, कर्तव्यदक्ष,ढाल बनून आमचं रक्षण करणारे बाबा मिळाले.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check