Tuesday, April 12, 2016

माय प्लेलिस्ट-१: भूपाळी

उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी

काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

लहानपणी आजोबांनी गायलेल्या भूपाळ्यांनी जाग यायची. पहाटेच्या शांत वातावरणात धीरगंभीर आवाजात एका लयीत माझे आजोबा वेगवेगळ्या भूपाळ्या म्हणायचे, खूप मस्त वाटायचं :)

नंतर आमच्याकडे टेपरेकॉर्डर घेतल्यावर भूपाळ्यांची कॅसेट आणली होती ती बहुतेक करून सणा-सुदीला लावली जायची. मध्यंतरी शिक्षणामुळे घर सोडलं आणि भूपाळी ऐकणं वगैरे बंद झालं. आता लग्नानंतर पहाटे उठायला सुरूवात केली तेंव्हा कुठेतरी काहितरी मिसिंग आहे असं वाटलं आणि गुगलून बघितलं तर माझ्या लहानपणी ऐकलेल्या सगळ्या भूपाळ्या सापडल्या :) :)

आता रोज सकाळी माझ्या घरातली पहाट अगदी सुरमयी असते.तर माझ्या आवडीची भूपाळी आहे - उठि श्रीरामा पहाट झाली

ही भूपाळी माझ्या आवडत्या गायिकेने म्हणजे आशा भोसले ह्यांनी गायली आहे आणि ह्यातले शब्द म्हणाल तर प्रत्येक शब्द इतका चित्रदर्शी आहे की जणू आपण श्रीरामाच्या प्रासादामधे, परिसरामधे उभे राहून सगळं बघत आहोत.

ही भूपाळी ऐकतांना डोळ्यासमोर चित्र उभं राहतं. कौसल्या माऊली हातामधे चांदीचा कलश घेऊन श्रीरामाच्या खोलीमधे आली आहे.श्रीरामाचं वय साधारण ७-८ वर्षे, तो अगदी गाढ झोपेत आहे.त्याच्या चेह-यावर एक निरागसपणा आणि साखरझोपेमधलं हास्य उमटलं आहे.अगदी कौतुकाने रामाला बघत कौसल्यामाता नाजुक आणि प्रेमाने ओतप्रोत आवाजात गाऊन त्याला जागं करायचा प्रयत्न करत आहे.

उठि श्रीरामा, पहाट झाली, पूर्व दिशा उमलली
उभी घेउनी कलश दुधाचा कौसल्या माऊली

उमलली हा शब्द फार सुंदर वाटतो ह्या ओळिमधे.जणू आकाशाचं फुल उमलत आहे आपली एकेक पाकळी बाजुला सारत असा भास होतो :)

होमगृही या ऋषीमुनींचे सामवेद रंगले
गोशाळेतुन कालवडींचे दुग्धपान संपले
मंदिरातले भाट चालले गाऊन भूपाळी

खोलिच्या सज्जामधे उभी राहून जणू आजुबाजुच्या परिसरामधे घडणा-या घटना आता कौसल्या वर्णन करत आहे.हे सगळं ऐकतांना कुठेतरी वेद ऐकल्याचा पुसटसा भास होतो तर दुस-या ओळीतून जाणवतं की गोठ्यातल्या गायींची वासरं-कालवड त्यांना लुचत आहेत आणि भूपाळी गात जाणारी भाटमंडळी मंदिरासमोरच्या रस्त्याने परतत आहेत असं जाणवतं.

काल दर्पणी चंद्र दावुनी सुमंत गेले गृहा
त्याच दर्पणी आज राघवा सूर्योदय हा पहा
वसिष्ठ मुनिवर घेउन गेले पुजापात्र राउळी

ह्या कडव्यामधे कौसल्यामाता श्रीरामाला चंद्र - सुर्याच्या आवागमनाची गंमत सांगत आहे आणि तितक्यात तिला वसिष्ठ मुनिंची काटकुळी पण तेजःपुंज आकृती मंदिराकडे जातांना दिसत आहे. प्रत्येक ओळीतून आजुबाजूला घडणा-या गोष्टी सांगून श्रीरामाला जागं करण्याचा प्रयत्न करत आहे.

राजमंदिरी दासी आल्या रत्नदीप विझविण्या
ऊठ राजसा, पूर्वदिशेचा स्वर्ण-यज्ञ पाहण्या
चराचराला जिंकुन घेण्या अरुणप्रभा उजळली

शेवटच्या कडव्यातुन ति सांगत आहे की, आता तर दासीपण आल्या आहेत खोलितल्या समया विझवण्यासाठी आणि बाहेर सूर्य पण अगदी झगझगीतपणे आपला प्रकाश पसरवत सगळ्या सृष्टीला जागं करत आहे, आता तरी जागा हो.

ह्या ओळि गातांना आशाबाईंनी 'राजसा' हा शब्द इतका प्रेमाने उच्चारला आहे की जणू कौसल्यामाता श्रीरामाच्या डोक्यावरून हात फिरवत आहे असा भास होतो.

मस्त वाटतं ही भूपाळी ऐकली की :) :)

Wednesday, March 30, 2016

दोन स्पेशल

मागच्या आठवड्यामधे गुरूवारची सुट्टी सार्थकी लागावी म्हणून 'दोन स्पेशल' नाटकाची तिकीटं मिळवली.ह्यावेळेस वेळेत काढल्यामुळे ४थ्या रांगेत मधल्या सिट्स मिळाल्या :)

**महत्वाची सुचना : हे नाटक अत्यंत सिरीयस आहे!

महत्वाची पात्रं तीन आहेत ह्यामधे. त्यातल्या त्यात जितेंद्र जोशी आणि गिरीजा ओक-गोडबोले ही मुख्य पात्रं आहेत.

पूर्ण नाटक हे एका वृत्तपत्राच्या ऑफिसमधे घडतांना दाखवलं आहे. १९८९ साल चालू आहे आणि रात्रपाळीसाठी आलेला उपसंपादक आहे जितेंद्र जोशी, त्याच्याकडे म्हणजेच दैनिक हिंदुस्थानच्या कार्यालयामधे नोकरी मागण्यासाठी आलेला एक होतकरू तरूण आहे रोहित हळदीकर आणि जितेंद्र जोशीची ९ वर्षांपूर्वीची प्रेयसी जी आज कोणा दुस-याची बायको आहे ती आहे गिरीजा ओक-गोडबोले. ही प्रेयसी ९ वर्षांपूर्वी ह्याच कार्यालयामधे काम करत होती.

रोहित हळदीकर हा बहुतेक नवोदित कलाकार आहे पण त्याचा अभिनय अतिशय नैसर्गिक आहे आणि सातारकडच्या लोकांच्या बोलण्याची लकब त्याने व्यवस्थित केली आहे.

जितेंद्र जोशी ला मी जवळ-जवळ ८ वर्षांनी नाटकात काम करतांना बघितलं पण तो एक ब्रिलियंट कलाकार वाटतो आणि म्हणून आवडतो सुद्धा मला, त्याचा अभिनय इतका सहज आहे ह्याही नाटकामधे की तुम्हांला वाटतच नाही कोणी कलाकार नाटक करत आहे तुमच्यासमोर! जणू एखादा मित्र त्याची कथा, व्यथा आपल्यासमोर मांडत आहे असं वाटतं बघतांना.

गिरीजा ओक-गोडबोले हिचं काम मी आजवर कधीच बघितलं नाही आणि नाटकात तर नाहीच नाही. पण ती कसदार अभिनेत्री आहे हे जाणवलं. कदाचित जितेंद्र जोशीसोबत जुळवून घेता यावं म्हणून तिला बरीच मेहनत घ्यावी लागली असेल पण परिणाम अगदी अपेक्षित साधला आहे तिने.

ह्या नाटकामधलं सगळ्यात जास्त काय आवडलं असेल मला तर ते बॅकग्राउंड म्युझिक! आजवर इतकी नाटकं बघितली पण असा जिवंत बॅकग्राउंड स्कोर कधी अनुभवला नाही मी! सायकल लावण्याचा आवाज, रस्त्यावरून जाणा-या गाड्यांचा आवाज, रात्रीच्या अंधारात अचानक कर्कश आवाज करत गेलेल्या टिटवीचा आवाज अगदी जिवंत आहेत हे सगळे आवाज.कथेमधल्या एखाद्या पात्रासारखा हा बॅकग्राउंड स्कोअर वापरला आहे.

कथा अशी आहे की, गिरीजा ओक-गोडबोले जितेंद्र जोशीला एक मदत मागायला आलेली असते. जर त्याने मदत केली तर तिची नोकरी शाबूत राहणार असते पण, तेच जितेंद्र जोशीची पत्रकारिता तत्त्व मात्र धुळीला मिळणार असतात.

दोघेही ९ वर्षांनी एकमेकांसमोर येतात आणि हळूहळू कथा उलगडत जाते.त्यांच्यामधले वाद, गैरसमज बाहेर येतात.

एकमेकांच्या संसाराबद्दल विचारपूस होते आणि हे सगळं घडत जातं एक बातमी आल्यामुळे.

नाटकातले संवाद अतिशय संवेदनशील आहेत आणि ज्यांना आयुष्यामधे ब्रेक-अप चा अनुभव आला आहे त्यांच्या आतमधलं सगळं ढवळून टाकणारे आहेत. तसंच पत्रकारिता त्या काळातली किंवा आजच्या काळातली ह्यावरही भाष्य केलं आहे.

तिनही पात्रांचे संवाद खूप छान आहेत पण दोन तासांनंतर सगळं खूप जड व्हायला लागतं.एखाद्या वृत्तपत्र कार्यालयामधे किती टेन्शन्स असू शकतात ह्याची चुणूक या नाटकामधून मिळते.