Friday, March 3, 2017

स्व

वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर काही व्यक्ती आयुष्यात भेटल्या आणि एक विशेष नातं त्या प्रत्येकासोबत होतं माझं..हम्म होतं असं म्हणायची वेळ परिस्थितीने आणली माझ्यावर :( पण जेंव्हा ती नाती वर्तमान काळात होती तेंव्हा असं वाटायचं की मला समोरच्या व्यक्तीच्या मनातलं सगळं सगळं अगदी चपखल कळतं आणि कित्येकदा त्या व्यक्तीने तशी ग्वाही पण दिली. मग मला पण असं वाटायचं की त्या व्यक्तीला पण माझ्या मनातलं जसंच्या तसं कळत असेल.पण एखादा प्रसंग असा समोर यायचा की ती व्यक्ती माझ्याबाबतीत काय विचार करते ह्याचा प्रत्यय यायचा आणि चर्र व्हायचं मनात :|
पण जसजशी मोठी होत गेले तसं कळायला लागलं की समोरच्याचं सगळं लख्ख समजतं हा खुप मोठ्ठा गोड गैरसमज आपण बाळगत होतो असं काही नसतं!!
फक्त एकच व्यक्ती तुम्हाला अगदी आतुन-बाहेरून स्वच्छपणे ओळखू शकते, जिला काहीही सांगायची गरज नसते आणि कोणत्याही अनपेक्षित उत्तराने ती व्यक्ती तुम्हांला दुखवू शकत नाही!!!
स्वतःचं मन, स्वत्वाचा आवाज हाच तुम्हांला आंतर्बाह्य ओळखतो. बाकी जे असं म्हणतात ना की मी मनकवडी आहे आणि तुझ्या मनातलं सगळं मला कळतं - सब साफ झूठ होता है!!!!
पण गोम अशी आहे की स्वतःचं मन जे बोलतं ते पटत नाही आणि अनपेक्षितपणे दुखावलं गेल्यावर त्याला कसं सावरावं हे आपल्याला कळत नाही :(

Monday, February 13, 2017

समुद्र

कादंबरीचा शेवट हा गोडच करावा असा काही नियम आहे का? म्हणजे त्या भास्करच्या आयुष्यात इतकं मोठं वादळ आलं आणि तरी पण दोन पानांच्या मजकुरामधे त्याने स्वतःला सावरलं आणि त्याच्या बायकोला 'भोळी' आहे, तिला जग माहीत नाही अशी स्वतःची समजूत घातली आणि सगळं आलबेल झालं??!! इतकं सोपं आणि सरळ ख-या आयुष्यात घडूच शकत नाही!!

मुळात जे स्पष्टीकरण नंदिनीने दिलं आहे तेच फोल वाटलं मला. तिचे विचार नव-याला समजत नव्हते मग तिला राजोपाध्याय भेटला, त्यांच्यामधे वैचारिक पातळीवर जवळीक निर्माण झाली पण मग शरीराने जवळ येतांना कितीही काहीही म्हटलं तरी जर नंदिनीची इच्छा नसती तर तिने पहिल्या क्षणाला त्याला झटकून बाजूला केलं असतं कारण त्याची जबरदस्ती सहन करायला ती काय त्याची बायको नव्हती!!
तिच्या म्हणण्यानुसार तिला मैत्री कुठवर जाऊ शकते हे बघायचं होतं पण वैचारिक पातळीवरुन शारीरिक पातळीवर जर ती जात आहे तर ते सुद्धा एक थ्रिल म्हणून तिने एंजाॅय केलं. फक्त एकदा बघायचं होतं तर पहिल्यांदा घडलं तेंव्हाच तिला प्रचिती येऊन तिची उत्सुकता शमायला हरकत नव्हती पण ते २-३ वेळेस घडलं, याचाच अर्थ तिला ते हवं होतं!

बाकी कथेचा वेग चांगला आहे, अगदी शेवटपर्यंत असं वाटत राहिलं की काहीतरी वेगळं समोर येईल पण मग शेवटी भास्कर स्वतःची समजूत घालतो आणि तिला माफ करतो हे जरा घाईत गुंडाळल्यासारखं वाटलं.
आवडलेल्या गोष्टी म्हणजे भास्करच्या मनातले विचार आणि समुद्राचं वर्णन ह्याची सांगड छान घातली आहे. तसंच समुद्र, रिसाॅर्ट, किनारा, टेकडी सगळं व्यवस्थितपणे डोळ्यासमोर उभं राहतं, चित्रदर्शी लिखाण आहे अगदी.