Thursday, November 24, 2011

एक प्रसंग


संध्याकाळी ऑफिस मधून निघाले आणि आईचा फोन आला,

आई : अगं, सगळं ठिक आहे ना तिथे?
मी : (गोंधळून) हो, ठिक तर दिसतय, पण झालं काय?
आई : अगं, आज एका माणसाने एका नेत्याच्या तोंडात मारली!! टिव्हीवर सारखं तेच दाखवत आहेत आणि काही भागामधे ह्या गोष्टीमुळे गोंधळ सुरू झाल्याचं पण बातम्यांमधे सांगत आहेत, म्हणून लगेच तुला फोन केला.
मी : (हसून) अगं आई, इथे तसं काही नाही झालं, काळजी करू नकोस, घरी गेल्यावर बोलू.

मी फोन ठेवला आणि आईने सांगितलेल्या प्रसंगाबद्दल विचार सुरू झाले. मी तो प्रसंग डोळ्यासमोर आणायचा प्रयत्न केला आणि खरंच कौतुकमिश्रित आश्चर्य वाटलं त्या शुरवीर सरदारजीचं ज्याने इतक्या ज्येष्ठ नेत्याच्या मुखात भडकावली. ह्या सगळ्या नेत्यांना इतकी ’Z' लेव्हल ची सिक्युरीटी असते आणि तरीही ह्या व्यक्तीने इतकं अवघड काम कसं पार पाडलं असेल बरं. असो. त्याने आज जे काम केलं त्यासाठी प्रत्येकाने (अर्थात त्या नेत्याच्या समर्थकांना सोडून) त्याचं तोंडभरून कौतुकच केलं आहे.

मला तसं तर त्या नेत्याच्या (कृष्ण)कृत्यांबद्दल जरा कमीच माहिती आहे पण, गेल्या कित्येक वर्षांमधे आपल्या देशास जे काही नेते मिळाले ते फक्त दामाजीपंतांची आराधना, उपासना, जोपासना करणारे मिळाले, मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर त्यांना एकच ध्यास लागतो आणि जळी, स्थळी, काष्ठी-पाषाणी त्यांना फक्त पैसाच दिसतो मग सुरू होतात विविध मार्गाने आपल्या लक्षाला (life-time goal) मिळविण्याचे प्रयत्न. मग कोणी ’आदर्श’ घोटाळे करतं तर कोणी 2G स्कॅम आणि असेच फाईली भरभरून घोटाळे सुरूच आहेत.

९९% नेते असेच आहेत आजच्या भारताच्या नशिबात पण काही नेते अहं मी म्हणेन (मला कळायला लागल्यापासून) मी एकच असा माणूस बघितला जो राजकारणात असतांना देखील कधी कुठल्या प्रलोभनांना बळी न-पडता प्रामाणिकपणॆ दिलेली ५ बर्ष कारभार सांभाळून पुन्हा एकदा जन-सामान्यांमधे मिसळून गेला...मी बोलतीये डॉ.अब्दुल कलाम आझाद ह्यांच्याविषयी!

शाळेत असतांना मला ’अग्निपंख’ हे पुस्तक वाचायला मिळालं आणि एका प्रामाणिक, बुध्दिमान, आपल्या कामाशी आणि देशाशी इमान राखणा-या वैज्ञानिकाची ओळख झाली. त्यांचे आचार-विचार माझ्यासारख्याच अनेक मुला-मुलींसाठी,तरूणांसाठी प्रेरणादायी ठरले अजुनही ठरत आहेत.

जेंव्हा डॉ.कलाम आपल्या देशाचे राष्ट्रपती झाले तेंव्हा सगळ्या देशाला अत्यानंद झाला होता. खरं तर, सामान्य माणसाला देशाचा राष्ट्रपती कोण आहे ह्या गोष्टीची ब-याचदा माहिती नसते वा ह्याच्याशी काही घेणं-देणं नसतं पण डॉ.कलाम हे व्यक्तिमत्त्व असं आहे की ज्यामुळे प्रत्येक भारतीयाला ख-या अर्थाने आपल्या देशाचा प्रथम पुरूष अभिमानास्पद मिळाला होता.

(डॉ.कलाम ह्यांना राष्ट्रपती पद बहाल करण्यामागे ’राजकारण्यांचं’ काय कारस्थान होतं ते तर माहित नाही पण प्रत्येक भारतीयाला निदान ५ बर्षाकरिता हा दिलासा मिळाला की आता आपल्या देशाची धुरा एका बुध्दिमान माणसाच्या हातात आहे आणि नक्कीच आपल्या देशाचं भविष्य उज्ज्वल आहे.)

मागे एकदा मला ’The Kalam Effect' हे पुस्तक वाचायला मिळालं. हे पुस्तक पी.एम.नायर ह्यांनी लिहीलेलं आहे. लेखक हे खरं तर राष्ट्रपती डॉ.कलाम ह्यांचे पर्सनल असिस्टंट होते आणि त्यांनी ह्या पुस्तकात राष्ट्रपतींची कारकिर्दच थोडक्यात मांडली आहे. देश चालविण्याचं शिवधनुष्य डॉ.कलामांनी कसं पेललं, येणा-या बिकट प्रसंगांना कस उत्तर दिलं अशा गंभीर प्रश्नांपासून ते येणा-या प्रत्येक पत्राला उत्तर देण्याच्या प्रयासापर्यंतचा प्रवास ह्या पुस्तकातून उलगडत जातो. पुस्तक वाचतांना आपण एका असामान्य व्यक्तीला खुप जवळून बघत असल्याची जाणिव होते.

आपल्या देशाच्या घटनेला ६१ वर्षे पूर्ण झाली आहेत पण त्यातल्या कलमांमधे वेळोवेळी बदल करणं आवश्यक असतं ह्या गोष्टीची जाणीव डॉ.कलामांना होती आणि म्हणूनच त्यांनी स्वत: अभ्यास करून संसदेत अहवाल सादर करून काही कलमांमधे आवश्यक ते बदल करून घेतले.

एक ना अनेक अशा खुप गोष्टी ह्या पुस्तकातून आपल्याला कळतात. एखाद्या व्यक्तीचं राष्ट्रपती असतांना काय कर्तव्य आहे ह्याची सामान्य माणसाला उकल होते.
 
सामान्य माणसाच्या दुर्दैवाने आणि ’राजकारण्यांच्या’ कृपेने डॉ.कलाम ह्यांना फक्त पाचच वर्ष ह्या देशाचा राष्ट्रपती राहता आलं...पण ही व्यक्ती प्रत्येक भारतीयाच्या मनात कायमचं घर करून राहिली..

वाईट फक्त ह्याच गोष्टीचं वाटतं की, राजकारणी लोक पैशामागे इतके कसे आंधळे होतात आणि देश विकून बसतात.

Dr.Kalam's speech in the european union



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


Sunday, November 6, 2011

अपूर्ण


आजच्या युगात खालील लेखात नमूद केलेल्या काही गोष्टींचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण समूळ नष्ट झालेलं नाही.

’नवरा’ ही एन्टीटी जर स्त्रीच्या आयुष्यात नसेल तर फक्त तीच अपूर्ण राहते का? एखाद्या स्त्रीचं लग्न झालेलं नसेल तर फक्त तिच्याच आयुष्याला काहि महत्त्व नसतं का?

ठराविक वय झालं की, मुलीचे घरचे तिच्यासाठी ’योग्य’ वर शोधतात आणि ’बार’ उडवतात. त्यानंतर त्या मुलीने तिचं सगळं जग सोडून एका नव्या जगात स्वत:ला सिध्द करायची पराकाष्ठा सुरू होते. लव्ह मॅरेज असू देत नाही तर अरेन्ज मॅरेज, सून कम बायको कम बरीच अशी विशेषणं असलेली ’व्यक्ती’ घरात आली की प्रत्येकाच्या तिच्याकडून काहितरी अपेक्षा असतात पण तिच्या अपेक्षांचं काय होतं अशावेळेस?

माहेरची मंडळी म्हणतात की, सासरची मंडळीच आता तुझं घर आहे तेंव्हा तू त्यांच्या वळणाने घे, उगाच स्वत:चं डोकं चालवू नकोस, नीट रहा. पण, अशी अपेक्षा त्या मुलीची असेल तर, की, ती ज्या घरात नविन आलेली आहे त्या घरातल्या थोरामोठयांनी तिला सांभाळून घ्यायला हवं, तिला नविन वातावरणाशी जुळवून घ्यायला मदत करायला हवी, उसका क्या?

हल्ली जास्ती करून जोडपी लग्नानंतर वेगळीच राहतात(कारण कोणतंही असो). तर, अशावेळेस ’नवरा’ ह्या प्राण्याच्या देखील कधी-कधी अपेक्षा अवाजवी असतात. दुर्दैवाने आजही, आपल्या समाजात पूर्वापार चालत आलेल्या चुकीच्या सवयींमुळे, मुलगा झाला की, त्याला कोणतंच काम करायची सवय लावली जात नाही, तो पुढे जाउन घराचा कर्ता पुरूष होणार आहे म्हणूनच त्याच्या छोटयातल्या छोटया चुकांपासून ते शुद्ध मूर्खासारख्या वागण्याला झाकलं जातं, त्यामुळे लहानपणापासूनच एक गोड गैरसमजूत त्याच्या मनात रूजवली जाते की, तो जे करतो तेच बरोबर, तोच एक शहाणा वगैरे वगैरे. तर, ह्या सवयीचा पुढे परिणाम आणि अर्थात प्रयोग कम जबरदस्ती बायकोवर सुद्धा होतो ते ही       शे-यांसहित-’उगाच वेंधळ्यासारखं वागू नकोस’,’उगाच शहाणपणा करू नकोस, मी सांगितलेलच बरोबर आहे’. म्हणजे, त्या बाईच्या शिक्षणाचा, तिला असलेल्या बुध्दीचा जणू तिने वापर फक्त आज भाजी कोणती करायची आणि येणा-या पाहुण्यांचं स्वागत कसं करायचं यासाठीच करायचा का??

स्त्रीला निसर्गाने उपजतच ’मॅनेजमेंट’चं स्कील बहाल केलेले आहे त्यामुळे डिग्री न-घेताही ती घर-दार, व्यवसाय, मुलं-बाळं ह्या सगळ्या गोष्टी अगदी व्यवस्थित सांभाळू शकते पण, म्हणून घरातल्या सगळ्याच्या सगळ्या जबाबदा-या फक्त तिच्यावर सोपवणं ही सर्वस्वी चुकीची गोष्ट आहे.

हल्ली स्त्री-पुरूष समानता, स्त्री वर्गाला ५०% आरक्षण ह्या गोष्टी पुढे येत आहेत हे अतिशय चांगलं प्रतिक आहे समाजात होणा-या बदलाचं, पण, तरीहि अजुनही सगळया घराची ही अपेक्षा असते की, बाईने नोकरी करून आल्यावर, घरातली सगळी कामं करावी.पुन्हा सकाळी उठुन सगळी कामं करून घराबाहेर पडावं!! ही आणखीन एक अवाजवी अपेक्षा!!! स्त्री म्हणजे पण एक माणूस आहे, त्यालाही विश्रांतीची गरज असते हा विचार कुठे केलाचं जात नाही. बरं, हे झालं नोकरी करणा-या स्त्रीयांसाठी, पण, घरात बसणा-या बायकांचे तर हाल ह्याहीपेक्षा जास्त असतात. त्या एक तर घरी राहुन सगळं घर सांभाळतात + घराबाहेरची जी काहि छोटी-मोठी कामं असतात बॅंकेची वगैरे ती करतात + संध्याकाळी नवरा घरी येण्याच्या वेळेला त्याला प्रसन्न वाटावं म्हणून घर सज्ज ठेवतात आणि जर कधी तिने संध्याकाळी बाहेर जायची इच्छा व्यक्त केली तर आलाच नव-याचा शेरा,’तुला काय काम असतं दिवसभर, मी ऑफिसमधून थकुन आलोय अन लगेच तुला बाहेर जायचयं’!!

घ्या!! म्हणजे, ती बिचारी घरी दिवसभर मरमर करून इतकं सगळं करत असते आणि त्याचं फळ काय तर इतका छान डायलॉग!! उलट,
नव-यांना हे कळायला हवं की, ती सकाळपासून घरातच होती म्हणूनच तिला आता तुमच्यासोबत बाहेर जायचं असतं. पण, इतकी साधी गोष्ट कळेल ते नवरे कसले!!

पण, एक मात्र आहे, पुरूष वर्ग एका बाबतीत फारच हुशार आहे असं म्हणायला हवं, त्यांच्या सगळ्या अपेक्षा विनासायास पूर्ण करण्यासाठी ते कधी-कधी ’कौतुक’ ह्या गोष्टीचा आधार घेतात आणि आपलं काम करून घेतात. ह्या त्यांच्या कौतुकसोहळ्यासाठी पुरूष वर्गातील लेखकांनी प्रचंड मोठं कार्य केलेलं आहे. स्त्री ला त्यांनी अनंत काळची माता ही पदवी बहाल केली आहे तसंच सहनशील, संयमी, संसाराचा रथ समर्थपणे सांभाळणारी या आणि अशा ब-याच उपमा देउ केल्या आहेत, जेणेकरून, स्त्री वर्ग निसर्गत:च दिलेल्या हळव्या मनामुळे विरघळतात आणि कितीही कष्ट पडत असले तरीहि सगळ्या अपेक्षा पूर्ण करतात. आणि पुरूष वर्ग स्वत:च्या तल्लख बुध्दीवर खुष होतो!!

तुम्हांला वाटत असेल मी कोणी स्त्रीवादी चळवळीची कार्यकर्ती आहे की काय, पण असं अजिबात नाहीये. वर मांडलेले हे विचार माझ्या आजुबाजूला घडणा-या गोष्टींच्या निरीक्षणातून आलेले आहेत.

कदाचित पुरूष वर्गाला हे वाचून वाटत असेल की, तुम्ही काहीही बोला आमच्याबद्दल, पण निसर्गानेच आम्हांला निर्माण केलं आहे तुम्हांला पूर्णत्व बहाल करण्याकरता (आणि हा विचार वाचून ते पुरूषअसण्याच्या अहंकाराने सुखावतही असतील)

पण, मला इथे कोण कितपत पूर्ण किंवा अपूर्ण आहे हे नाही मांडायचं, मला फक्त हे म्हणायचं आहे की, जशी स्त्री अपूर्ण आहे पुरूषाशिवाय तसाच पुरूषही अपूर्ण आहे स्त्रीशिवाय. निसर्गाने फक्त पुरूषालाच सगळी शक्ती + बुध्दी बहाल केलेली नाहिये. काहीही झालं तरी नवनिर्मिती हे एकटया स्त्री किंवा पुरूषाला शक्य नाहिये. कदाचित कोणी एकाने उगाच दुस-यावर वर्चस्व गाजवू नये म्हणूनच की काय, निसर्गाने दोघांनाही अपूर्णत्व बहाल केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचा स्वीकार करून दोघांनीही ते आचरणात आणणं अपेक्षित आहे.



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


 


Thursday, November 3, 2011

नरसोबाची वाडी


दिवाळी म्हटलं की, मला आठवण होते नरसोबाच्या वाडीची.

नरसिंहवाडी म्हणजेच नरसोबाची वाडी हे दत्तात्रय महाराजांचं एक जागृत असं देवस्थान कृष्णामाईच्या तिरावर वसलेलं आहे.

सांगली पासून २५ किमी अंतरावर असणारं हे गाव म्हणजे साक्षात दत्तभूमीच. ही भूमी श्री.दत्तमहाराजांचे अवतार असलेल्या नरसिंह सरस्वतींच्या १२ वर्षे वास्तव्याने पावन झालेली आहे.

आमच्या घरामधे श्री.दत्तमहाराजांची आराधना केली जात असल्यामुळे, आम्ही दिवाळी च्या आधी येणा-या गुरूव्दादशी ला नरसोबाच्या वाडी ला जायचो. तिथे ह्या काळात खूप मोठा उत्सव असतो.

पुण्याहुन सांगलीला जाणा-या बस मधे बसलं की शेवटचा स्टॉप म्हणजे नरसोबाची वाडी. रात्री अगदी उशीरा पोहोचल्यावर विनोद पुजारी म्हणून बाबांचे मित्र होते आम्ही त्यांच्याकडे उतरायचो. त्यांचं घर मस्त दुमजली होतं. राहण्या-खाण्याची सगळी व्यवस्था तेच बघायचे.

दिवाळी म्हणजे अगदी कडक थंडी, तरीपण आम्ही एकदा का होईना कृष्णामाईला पहाटे जाउन आंघोळ करायचो. त्यानंतर मंदिरातील काकड आरती व प्रात:कालपूजेला हजर व्हायचो.

मंदिराचा आवार खुप मोठा आहे, प्रवेशव्दारातून आत गेल्यावर पहिले डाव्या बाजूची दुकानं तुमचं स्वागत करतात, ह्या दुकानांमधे पुजासाहित्य, प्रसाद आणि थोरा-मोठयांना वाचायला उपयुक्त अशी पुस्तकं देखील मिळतात. इथे मिळणारे पेढे अतिशय चविष्ट असतात आणि इथली खासियत म्हणजे कवठ बर्फी आणि ड्रायफ्रुट बर्फी, ह्या दोन प्रकारच्या बर्फी तुम्हांला दुसरीकडे कुठेच इतक्या छान मिळणार नाहीत. आणि इथली बासुंदी तुम्ही एकदा चाखलीत की तिची चव तुम्ही कधीच विसरू शकणार नाहीत.

तर, आत आल्यावर उजव्या बाजूला, नारायणस्वामींचं मंदीर आहे. त्यामागे, मोठी धर्मशाळा बांधलेली आहे.थोडंसं पुढे गेलं की, डाव्याबाजूला मुख्य मंदीर आहे जेथे औदुंबराच्या (झाडाच्या) सावलीमधे नरसिंह सरस्वती महाराजांच्या पादुका स्थापन केलेल्या आहेत. नरसिंह सरस्वती महाराजांनी नरसोबाची वाडी सोडण्यापूर्वी ह्या जागी आपल्या मनोहारी पादुकांची स्थापना केली होती ज्याचा पुढे श्री.गुळवणी महाराजांनी जीर्णोद्धार केला आणि सध्यस्थितीतील मंदीराची रचना झाली.

आता थोडी नजर वळवा, समोरच कृष्णामाईचं दुथडी भरून वाहणारं स्वच्छ, नितळ पाणी चकाकतांना दिसेल. असं म्हणतात की, पूर्वी पावसाळ्यामधे कृष्णामाईला इतका पूर यायचा की पाणी मंदिरातील पादुकांना स्पर्श करीत असे. पण, आजही कृष्णामाईच्या पात्राला पाणी अगदी काठोकाठ असतं. नदीकाठी बांधलेल्या सुंदर घाटामुळे मंदीर परिसराला एक उठाव आलेला आहे. असं हे प्रसन्न वातावरण असलेल्या मंदिराचं दर्शन घेउन आम्ही घराकडे परतायचो.

पुढे घराकडे जातांना, रस्त्यावर थोडंसं धुकं असायचं आणि सकाळच्या शुध्द हवेत धुपा-दिपाचे वास दरवळत असत आणि क्वचित कुठुन तरी गरमपाण्याच्या बंबाचा धुर दिसत असे. दुतर्फा असणा-या घरांची अंगणं सुध्दा सडा-संमार्जन करून सिध्द असत.सुवासिनी मंदिरामधे पुजायला जातांना दिसत. दिवाळी सुरू होण्यास अवकाश असून देखील अगदी मंगलमय वातावरण असायचं.

नरसोबाच्या वाडीला, मंदीरामधे सकाळी ९ ते १२ ह्या वेळेत मनोहारी पादुकांची पुजा करण्याची संधी भाविकांना मिळते.आम्हीदेखील एकादशीच्या दिवशी ही पुजा करीत असू. मंदिराच्या उजव्या आणि डाव्या बाजूला दोन लहान खिडक्या बसवलेल्या आहेत ज्यामधून पुजा करणा-या व्यक्तीला पादुकांची होणारी पुजा व्यवस्थित बघता येते. तसंच मुख्य व्दारातून इतर भाविकांना दर्शन घेता येते. ह्या तीर्थक्षेत्री असणारे ब्राम्हणवृंद आपल्याकडून यथासांग पुजा करवून घेतात. दुपारी १२ ते १ च्या सुमारास महापुजा, नैवेद्द व आरती होते.

त्यानंतर आम्ही परतायचो. दुपारी विश्रांती घेउन मग संध्याकाळी आम्ही कृष्णामाईच्या पैलतीरी वसलेल्या ’अमरेश्वर’ ह्या शंकराच्या मंदिराला भेट देत असू. हे मंदीर कृष्णामाईच्या काठावर वसलेलं असल्याने तुम्ही नावेतून जाउ शकता किंवा चालतही जाउ शकता.

संधीकालच्या प्रकाशात कृष्णामाईचं पात्र अधिकच सुंदर भासतं, त्या प्रवाहाकडे बघता बघता संध्याकाळच्या पुजेची वेळ कधी होते कळतच नाही.

सकाळी झालेल्या महापुजेपेक्षाही मला संध्याकाळी असणा-या पालखीचं खुप आकर्षण असायचं. नारायणस्वामींच्या मंदिरामधे पालखीची तयारी केली जाते. विशेष म्हणजे ही तयारी सर्व भक्तगणांना बघायला मिळते.सर्वप्रथम उत्सवमूर्तीला अभिषेक केला जातो.त्यानंतर चंदनगंध,कुकुम,काजळ आदिंनी मुखवटयाची सजावट केली जाते. त्यानंतर पुणेरी फेटा बांधला जातो. सरतेशेवटी ताज्या फूलांची आरास केली जाते. त्यानंतर आरती-वात,नैवेद्द होतो आणि "राजाssधिराज, महाराज" च्या गजरात मिरवणुकीची सुरूवात होते. पालखीसोबत चंद्र, सूर्य, चवरी (वारा घालण्याचा पंखा) घेउन तसंच भालदार, चोपदार औदुंबराभोवती प्रदक्षिणा घालायला सुरूवात करतात. भक्तांना देखील ह्या पालखीमधे स्वामींची सेवा करण्याची संधी मिळते. दत्तात्रय महाराजांची विविध स्तुतीपरपदं म्हणत म्हणत ही मिरवणूक साधारण तासभर चालते आणि दिवसाची सांगता होते.

दुसरा दिवस असतो गुरूव्दादशी चा, ह्या दिवशी मोठया प्रमाणात भक्तगण आपल्या गुरूमहाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याकरता येतात. महापुजा झाल्यानंतर प्रसाद असतो. नरसोबाच्या वाडीला मिळणा-या प्रसादाचं पण एक वैशिष्ठय आहे. इथे पुरी-भाजी असा प्रसाद नसून खीर व वांग्याची भाजी हा प्रसाद असतो. प्रसादाची खीर ही भरडलेला गहू आणि गुळाची केलेली असते. अतिशय चविष्ट अशा या प्रसादाचं सेवन केल्यावर आत्मा तृप्त होतो.त्या दिवशी पुन्हा संध्याकाळी पालखी असते. अशात-हेने गुरूव्दादशीचा उत्सव पार पडतो.

...आज कित्येक वर्ष झाले आम्ही नरसिंहवाडीला गुरूव्दादशीच्या निमित्ताने जाउ शकलो नाही पण, दिवाळी म्हटलं की आम्हांला ह्या सगळ्या उत्सवाची आठवण होत नाही असं कदाचितच घडत असेल..

जसा हा उत्सव माझ्या लक्षात आहे तशीच नरसोबाच्या वाडीशी निगडीत एक आठवण खुप वेगळी आणि छान आहे. दिवाळीच्या वेळेला आपल्याकडे किल्ला करायची पध्दत आहे. तिथे तर किल्ला बनविणे स्पर्धा घेतली जाते आणि ही स्पर्धा अशी तशी नाही तर अगदी अटीतटीची असते. फक्त २,४ विटा घेउन थोडी माती थापली की किल्ला तयार ही तिथे किल्ल्याची व्याख्या नाही. तर, तिथे लहान-मोठे सगळे मुलं व्यवस्थित आखणी करून, विचार करून शिवाजी महाराजांचा एखादा फेमस किल्ला निवडतात मग माती, विटा, चुना, विविध रंग ह्या सर्व साहित्यासह किल्ला बांधणीला सुरूवात करतात आणि साधारण २-४ दिवसात त्या फेमस किल्ल्याची हुबेहुब प्रतिकृती बनवतात. त्यानंतर त्या किल्ल्यावर शिवाजी महाराज, त्यांचे मावळे तसंच किल्ल्याच्या आवारात छोटंसं तळं करून त्यात दिव्यावर चालणारी बोट अशा गोष्टी रचून सजावट करतात. आम्ही सर्वजण तर हे सगळं बघून अगदी हरखून जायचो आणि आपण पण असाच किल्ला करायचा घरी गेल्यावर हा विचार घेउन नरसोबाच्या वाडीचा निरोप घ्यायचो..

तर, कशी वाटली तुम्हांला ही आगळी-वेगळी सफर..जमलं तर तुम्ही पण एकदा जाउन याच, माझं तर ह्या दिवाळीचं प्लॅनिंग फिक्स झालेलं आहे.

वरील ब्लॉग जालरंग प्रकाशनाच्या दिपज्योती २०११ ह्या दिवाळी अंकात प्रसिद्ध झाला आहे.

http://deepjyoti2011.blogspot.com/p/blog-page_12.html


या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check