Thursday, October 9, 2014

२००

बँग-बँग चित्रपटाने पाचच दिवसात २०० कोटीची कमाई करत 'एलीट २०० करोर क्लब' मधे आपल्या चित्रपटाची नोंद केली असून आता त्याची घोडदौड किती कोटीपर्यंत जाते ते बघायचं आहे.

२००९ मधे प्रदर्शित झालेला '३ इडियट्स' हा चित्रपट ह्या क्लबचा आद्यजनक. ह्या चित्रपटापासूनच क्लबची सुरूवात झाली आणि त्यानंतर येणा-या प्रत्येक चित्रपटाने ह्या क्लबमधे स्थान मिळविण्यासाठी आटोकाट प्रयत्न केले. ह्या क्लबमधे सलमान खानच्या ३ चित्रपटांनी नोंद करून आपला खुंटा अगदी बळकट केला आहे.त्याखालोखाल शाहरूख खान आणि आमीर खानचा नंबर लागतो.

नुसती मारधाड, झिरो फिगर असलेल्या नट्या, परदेशामधील नयनरम्य ठिकाणं, कर्णकर्कशमधुर संगीत, फोडनीला म्हणून थोडासा रोमान्स आणि मग जर लक्षात राहिलं तर, असलीच तर एखाद्या ओळीची 'कथा' असा सगळा बाज उभा केला की झालीच म्हणून ह्या क्लब मधे एंट्री!!

फक्त आणि फक्त पैसा कमावणे हा एकमेव हेतू आहे सध्याच्या बहुतांशी 'बॉलिवूड' चित्रपटांचा.

मुळात चित्रपटाला कथाच नसते त्यामुळे कलाकारांनी अभिनय करणे वगैरे तर दूरच्याच गोष्टी. बरं गाणी किंवा त्याचं संगीत तरी नवं-कोरं असावं तर तिथेही आपली निराशाच होते. हल्ली तर जुन्या गाण्यांना नविन संगीतामधे घोळवून आपल्यासमोर गाण्याचं जणू कॉकटेलच सादर केलं जातं. एक गाणं ओठांवर येतं न येतं की लगेचच दोन-तीन गाणी डोक्यात पिंगा घालू लागतात आणि काही दिवसातच मग त्यातलं कोणतंच गाणं ऐकावसंही वाटत नाही!

सध्या तर एक नविन गायक-गीतकार-संगीतकार-डान्सर-डीजे असा सर्वगुणसंपन्न व्यक्ती प्रत्येक चित्रपटासाठी 'खास' गाणं बनवून देत आहे. त्याच्या प्रत्येक गाण्याचा हेतू एकच, तरूण पिढी झिंगली पाहिजे!! त्याच्या गाण्यामधे जे शब्द वापरलेले असतात ते सगळे तरूण पिढीच्याच शब्दकोशातले असतात.आधुनिक ढोल-ताश्यांचं जोरदार संगीत, उसासे-धापा टाकत म्हटलेलं गाणं आणि अंगविक्षेप करत नाचणारी मंडळी ही त्याच्या गाण्याची वैशिष्ठ्ये!!

काय म्हणावं ह्याला - नुसता सावळा नाही तर काळाकभिन्न गोंधळ!!

खरं तर ३ इडियट्स हा चित्रपट खूप वेगळ्या धाटणीचा होता.भलेही त्याची कथा कोणा लेखकाच्या कथेशी साधर्म्य असणारी होती पण, त्यातला मूळ आशय फारच वेगळा आणि मनाला अगदी भिडणारा, जवळपास प्रत्येकाच्या आयुष्याला कुठे ना कुठे स्पर्श करणारा होता. त्यामधे सगळं काही होतं, मैत्री, कॉलेजच्या दिवसामधली मजा, शैक्षणिक पातळीवरची स्पर्धा, रोमँटीक गाणी आणि कानपिचक्या देणारे प्रसंग. एका हिंदी चित्रपटासाठी लागणारा सगळा माल-मसाला होता पण त्याला चव मात्र काहीतरी वेगळीच होती.कधीही तो चित्रपट बघितला तरी दोन घटका करमणूकीव्यतिरिक्त काहीतरी वेगळं त्यातून सापडत जातं.

जर अशाच चित्रपटांची यादी 'एलीट २००' मधे लागत गेली असती तर एक प्रेक्षक म्हणून आपल्याला खरंच खूप कसदार काहितरी बघायला मिळालं असतं पण...असो.

हल्ली तर असं झालं आहे ना की, दर शुक्रवारी ढिगानी हिंदी चित्रपट प्रदर्शित होतात पण त्यातला कुठलाच असा आवर्जून बघावा असा नसतो. मधेच कधीतरी एखादा येतो म्हणा पण सरासरी बघता हेच वाटतं की, चित्रपटामधे काम करणारे कलाकार इतक्या वर्षाच्या अनुभवानंतरही कसे काय तयार होतात 'अशा' चित्रपटामधे काम करायला?! अगदीच उदाहरण द्यायचं झालं तर,'हमशकल्स' किंवा बोल बच्चन किंवा ब्ल्यू वगैरे वगैरे..यादी बरीच मोठी आहे.

सुदैवाने मराठी चित्रपटसृष्टीला अशी काही बाधा झाली नाही.अर्थात नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'पोश्टर बॉईज' आणि 'लई भारी' चित्रपटांनी नाही म्हटलं तरी ब-यापैकी गल्ला जमविला.पण, ही लाट अधिक काळ मराठीमधे राहील असं वाटत नाही.

नशिबाने मराठी मधे आता प्रयोगशील दिग्दर्शकांचा एक नविन चमू आलेला आहे जो अधिकाअधिक वेगळ्या विषयांवरील चित्रपट काढून विविध देशांमधे होणा-या फिल्म फेस्टीव्हल्समधे वाहवा,शाबासकी मिळवत आहे.

सध्या तर असं चित्र दिसत आहे चित्रपट गृहांमधे की मराठीचे ४-५ सिनेमे चालू आहेत आणि सगळे निदान एकदा बघू शकतो असे आहेत हिंदीच्या मानाने :)

एक प्रेक्षक म्हणून फक्त इतकीच अपेक्षा आहे की,दोन घटका करमणूक म्हणून चित्रपट असायला हवा पण जर प्रत्येकजण फक्त मारधाड किंवा थोड्याफार फरकाने तेच तेच दाखवत असेल तर मग कशाला मी माझा वेळ आणि पैसा खर्च करू, त्यापेक्षा इंटरनेटवर पायरेटेड व्हर्जन बघितलेलं बरं, मनात येईल तेंव्हा बंद तरी करता येईल आणि पैसेही जास्त खर्च नाही होणार ;)

असो, आता बघायचं आहे की हिंदीमधे कोण असा माईकालाल आहे जो ३०० च्या घरात चित्रपटाची कमाई करू शकेल!!

No comments:

Post a Comment