Monday, March 3, 2014

अरे देवा! अजून एक??!!!

कधी नव्हे ते मला टीव्हीचा रीमोट हातात मिळाला म्हटलं बघावं जरा मराठी चॅनेलवर काय सुरू आहे. बघितलं तर फक्त लग्न, लग्नाच्या आधीचं जीवन आणि लग्नानंतरचं जीवन - प्रत्येक मालिकेचा हा एकच विषय!

अरे काय चाललय काय!!!

एका लग्नाची दुसरी गोष्ट त्यानंतर आता तिसरी गोष्ट ह्यानंतर माहित नाही अजून कितव्या क्रमांकापर्यंत ह्या गोष्टी जातील!

होणार सून मी ह्या घरची,बे दुणे दहा आणि आता नविन येऊ घातलेली 'जावई विकत घेणे आहे!'

अरे काय आहे हे सगळं!! कंटाळा कसा येत नाही फक्त एकाच विषयावरच्या सिरीयल्स बनवायला! आपल्या रोजच्या आयुष्यामधे जे घडतं तेच परत परत वेगवेगळ्या प्लास्टीक चेह-याच्या कलाकारांसमवेत बघायला कसा रस येऊ शकतो एखाद्याला?

हं आता तुम्ही म्हणाल की जर हा विषय सोडला तर मग कशावर बनवायची मालिका ते सांग पाहू...अरे आपल्या मराठी भाषेमधे इतका समृध्द ग्रंथभांडार आहे त्यातली एखादी चांगली कथा घेऊन त्यावर मालिका का नाही बनू शकत?

म्हणजे मग परत एखादी ऐतिहासिक किंवा देवावरची मालिकाच बनवायची ना? किंवा मग एखादा क्रांतिकारक किंवा देशभक्त??

ह्या वर्गवारीपेक्षाही काहीतरी वेगळं नक्कीच सापडेल हं आपल्या साहित्यात पण अर्थात ती मेहनत घेतली गेली पाहिजे..

जाऊ देत! माहित नाही हो मला, अजून कोणत्या विषयावर मालिका बनू शकते ते पण, इतकं मात्र कळतंय की सध्या चालू असलेल्या सगळ्या मालिका एकसुरी आहेत!! ह्यापेक्षा काहितरी चांगलं बघायला,ऐकायला मिळायला हवं!!

अर्थात लहानपणी बघितलेल्या मालिका इथे आठवणं साहजिक आहे.महाश्वेता किंवा दामिनी आठवतात, त्या दोन्ही मालिका टायटल साँग्समुळे जास्त लक्षात राहिल्या बाकी हिंदी मधल्या ब्योंमकेश बक्षी किंवा सुरभी..असं काही सुरू आहे का हो सध्या?

No comments:

Post a Comment