Thursday, June 12, 2014

वटपौर्णिमा

तुमच्या घराच्या आजूबाजूला वडाचं झाड नाहीये का? किंवा शोधायला वेळ नाही का? डोण्ट वरी अ‍ॅट ऑल!! आता बाजारामधे १०रू. ला तुम्हाला वडाची फांदी मिळू शकते.ती घेऊन या,त्या फांदीला दोरा गुंडाळून मनोभावे तिची पूजा करा आणि उद्या सकाळी ती फांदी कच-यात फेकून द्या!! काय सोप्प झालं आहे ना हे सगळं हल्ली!

म्हणजे वडाचं झाड असं फांद्या-फांद्या करून तोडून टाकायचं आणि वडाची पूजा केली म्हणून मिरवायचं वाह रे संस्कृतीचं पालन!!

अरे काय संस्कृतीचं गुणगाण गाता आणि नटून-थटून मिरवता! आजच्या पिढीतल्या ज्या काही पोरी,बायका वटपौर्णिमा 'सेलिब्रेट' करतात त्यांना किंवा त्यांच्या आई,सासू,घरातली वयाने मोठी बाई ह्यांपैकी किती जणींना हा सण का साजरा करतात ते माहित आहे?किंवा त्यांच्यापैकी कितीजणींनी कधी प्रयत्न केला आहे का ह्या सणामागचं खरं कारण शोधण्याचा? आपली संस्कृती आहे म्हणून आई,सासू ह्या जनरेशन ने हा सण साजरा केला आणि आता 'आपलं ट्रेडिशन आपणच सांभाळलं पाहिजे ना' म्हणून नविन पिढी एंजॉय करते!

तुम्ही म्हणाल इतकी बडबड करण्यापेक्षा तू सांग तुला माहित असेल कारण तर! हं तर ऐका! अर्थात ही माहिती मला माझ्या आजीने सांगितली आहे.तर आजी म्हणते की,मागच्या काळी चूल-मूल-रांधा वाढा-उष्टी काढा ह्याव्यतिरिक्त देव-देव करणं हा एकच 'टाईमपास' बायकांसाठी होता.तसंच घरातल्या बाईला घरातलं सगळं-सगळं सोडून सारखं बाहेर पडायचा 'चान्स' मिळत नव्हता मग अशा सणांच्या निमित्ताने ती बाहेर जाऊन मैत्रिणींसोबत 'एंजॉय' करू शकायची.बरं त्या काळी स्वयंपाकघर म्हणजे नुसता धूर आणि काळोख त्यामुळे जर वडासारख्या झाडाची पूजा केली तर भरपूर 'ऑक्सिजन' मिळायचा

मग मी विचारलं की मग धागा का बांधायचा आणि सात जन्म वगैरे काय प्रकरण आहे? तर ती म्हटली,'अगं त्या काळी कळत्या न-कळत्या वयात लग्न व्हायची आणि नव-याव्यतिरिक्त कोणी पुरूष आयुष्यात कधी इतका जवळून माहित व्हायचाच नाही.त्यामुळे देवाला सांगायचं की,देवा नारायणा मला हाच नवरा बरा रे बाबा.ते तुमच्या भाषेत म्हणतात ना ते नोन एनिमी इझ बेटर दॅन अन्नोन फ्रेंड का काय ते तसंच बघ अगदी :) आणि दोरा बांधायचं म्हणशील तर नेमकं कारण मलापण आठवत नाही गं पण, ह्या पुजेमुळे झाडं,निसर्ग ह्याचा मानवाने सांभाळ करायला हवा हेही नकळतपणे मनावर बिंबवलं जायचं.

आजी जे म्हटली ते तिचं व्हर्जन होतं पण मला तरी हे वाटतं की,फक्त बायकोनेच नव-यासाठी ही पूजा करण्यापेक्षा दोघांनी जर ह्या सणाकडे एक सामाजिक कर्तव्य म्हणून बघितलं तर हा सण ख-या अर्थाने साजरा होईल.

तर एक असं करता येऊ शकतं की तुम्ही वड,पिंपळ,आंबा ह्यांसारखे भरपूर प्राणवायू देणारे आणि अधिक आयुर्मान असणा-या एकातरी वृक्षाची लागवड करा.नियमितपणे त्याची निगा राखा.अर्थात हल्ली फ्लॅटसंस्कृती असल्या कारणाने गॅलरीमधे तर ही झाडं लावू शकत नाही पण, तुमच्या आजूबाजूला असणा-या एखाद्या टेकडीवर किंवा एखाद्या निसर्ग मित्रमंडळासोबत जाऊन तुम्ही हा प्रयत्न करू शकता.आज तुम्ही सुरूवात केलीत तर तुमच्या आजूबाजूचे आणि तुमची पुढची पिढीसुध्दा ह्या कामात हातभार लावेल.

आज प्रदूषणाची मात्रा इतकी वाढली आहे की वडाची पूजा करण्यासारखे सण दर महिन्यात येण्याची गरज आहे पण ती पूजा फक्त आणि फक्त वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धानातूनच होऊ शकते.मग ख-या अर्थाने आपल्या संस्कृतीचं जतन होऊन मानवजातीचं कल्याण होऊ शकतं.

No comments:

Post a Comment