Monday, October 6, 2014

चिखलफेक

विधानसभेच्या निवडणुका जाहिर झाल्या आणि परत एकदा महाराष्ट्रामधे गोंधळ चालू झाला. ब-याच वर्षांपासून असणा-या पक्षांची युती मोडली आणि मित्रपक्ष एकमेकांसमोर शत्रूपक्ष म्हणून उभे राहिले. उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी न-भूतो न-भविष्यती अशी पळवापळवी झाली आणि एकदाचे सर्व उमेदवार जाहीर करण्यात आले.

प्रचाराचं रणशिंग फुंकलं गेलं आणि खरी चिखलफेक सुरू झाली. प्रत्येकाने बेंबीच्या देठापासून ओरडून सांगायला सुरूवात केली की, माझ्या पक्षाने कसं आजवर महाराष्ट्राचं भलं केलं आणि बाकी पक्षांनी कसं वाट्टोळं! लोकसभेच्या निवडणुकीमधे जे-जे मुद्दे मांडले होते त्याची थोड्याफार फरकाने पुनरावृत्ती घडू लागली. स्थानिक पातळीवरचे उमेदवार ज्यांना आजवर फक्त मोठ-मोठ्या बॅनर्सवर बघितलं होतं ते लोक घरोघर जाऊन प्रत्येकाच्या पाया पडू लागले. आम्ही ह्यावेळेस 'उमेदवार' आहोत हं, लक्षात असू देत,अशी आठवण करून देऊ लागले. गावोगावी जाऊन प्रचारसभा, रस्त्यावरून प्रचारकांनी काढलेल्या बाईक दिंड्या यांनी शहर गजबजून गेलंय आणि मतदान करण्यांसाठी थोडी करमणूक आणि बरीच डोकेदुखी सुरू झाली.

लोकसभेच्या निवडणुकीत एका पक्षाने टेक्नॉलॉजीचा उपयोग अगदी योग्य प्रकारे करून आपलं स्थान यंगस्टर्सच्या मनात पक्क केलं. ते पाहून ह्यावेळेस प्रत्येक पक्षाने आपापली जाहिरात करण्यासाठी सोशल नेटवर्कींग साईट्स ची मदत घेतली आहे. टीव्ही, रेडिओ आणि जमेल त्या माध्यमातून लोकांपर्यंत स्वतःच्या पक्षाचा प्रचार करण्याची अहमहिकाच चालू आहे.

पण इतका भडिमार करून खरंच मतदाता योग्य ते मत देऊ शकेल का?

दिल्लीमधे असणा-या सरकारच्या पक्षाला महाराष्ट्रामधे तसंच काम करता येण्यासाठी खरंच त्या ताकदीचा, ह्या मातीतले प्रश्न समजून घेऊन त्यावर योग्य तो तोडगा काढणारा माणूस मिळाला आहे का?

ह्याआधी जो पक्ष ह्या राज्याची धुरा सांभाळत होता ते लोक त्यांनी केलेल्या(?)कामाचा डंका वाजवतात पण खरी परिस्थिती काय आहे हे इथल्या जनतेला माहित आहे, तरीही त्यांना, आपण निवडून येणारच हा विश्वास कसा काय वाटू शकतो?

उमेदवार किती शिकलेला आहे, त्याला आपल्या न्यायव्यवस्थेची काही जाण आहे की नाही ह्या आपल्याच संविधानामधे सांगितलेल्या नियमांना बगल देऊन त्याची संपत्ती किती आणि त्याच्याकडे किती सोनं वगैरे गोष्टींना जास्त महत्त्व देऊन उमेदवार ठरवला जातो???

असंही चित्र आहे की, काही पक्ष फक्त निवडणूक होईतो वेगळे झाल्यासारखं दाखवत आहेत पण प्रत्यक्षात मतमोजणी नंतर सरकार स्थापन करायची वेळ आली की ते परत एकत्र येतील आणि पहिले पाढे पंच्चावन!

एक पक्ष असाही आहे की जो स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून 'मराठी अस्मिता - मराठी माणूस - मराठी माणसांचं राज्य' इतकेच शब्द बोलत आला आहे. टोलधाडी आणि मतांची फोड करण्याव्यतिरिक्त दुसरं कुठलंच काम त्यांना करता नाही आलं तरीही, त्यांना हा विश्वास आहे की, जर महाराष्ट्रातून परप्रांतीय पूर्णपणे हाकलले गेले तर तो पक्ष महाराष्ट्राला परत एकदा सोन्याचे दिवस दाखवेल! खरं तर त्या पक्षाला चांगलं माहित आहे की त्यांच्यामधे हे राज्य चालविण्याची धमक नाही ना त्यांना इतका पाठिंबा मिळू शकतो पण, फक्त तोंडाची वाफ दवडली म्हणजे राज्यातल्या जनतेची मत मिळतील हा त्यांचा भ्रम काही अजून दूर होत नाही.

आज मी, एक मतदार म्हणून सध्या पूर्णपणे संभ्रमित आहे! आताच्या घडीला कोणत्याच पक्षाचा उमेदवार असा दिसत नाही की जो खरंच माझ्या भागातल्या, माझ्या शहरातल्या, माझ्या राज्यातल्या समस्यांवर निदान विचार करून पुढे काय करता येईल ह्या दिशेने पाऊल टाकू शकेल.

पण एक मात्र आहे, मतदान तर करायला जायचंच भलेही 'वरीलपैकी कोणीही नाही' हा पर्याय का निवडावा लागू नये!!!

No comments:

Post a Comment