Wednesday, July 5, 2017

गरज

आमच्या आॅफिसमधे खूप वेगवेगळी झाडं, फुलझाडं लावलेली आहेत. ठराविक काळानंतर त्यात आवश्यक ते बदल केले जातात म्हणजे त्यांना आकार देणं, छाटणी करणं वगैरे. आॅफिसच्या पाय-या चढतांना डाव्या बाजूला सुपारीची झाडं आहेत आणि त्यांच्या पायथ्याशी गवत किंवा काही फुलझाडं लावलेली असतात. रोज त्या इवल्या-इवल्या रोपांना आलेली फुलं बघत जाण्याचा मला छंदच लागला आहे.

गेल्या काही दिवसात एका झाडाभोवती असणारी झेंडूच्या फुलांची रोपं दिसेनाशी झाली पण तिथे असलेली माती नांगरल्यासारखी पण दिसली. मग दोन-तीन दिवसांनी तिथे सुंदर असं ताजं हिरवं लाॅन दिसलं पण मला प्रश्न पडला ती झेंडूच्या फुलांची फुलझाडं गेली कुठे? माझं कुतूहल शमविण्यासाठी मी बागकाम करणा-या काकांना तसं विचारलं, त्यावर त्यांनी अगदी सहज उत्तर दिलं - मॅडम त्या फुलांचा बहार संपला आता म्हणून ती इथून काढून टाकली.

त्यांचं उत्तर ऐकून मी एक क्षण स्तब्ध झाले पण लक्षात आलं हा तर नियम सगळ्या ठिकाणी लागू पडतो.
त्या फुलझाडांचं काम होतं फुलांनी बहरून त्या जागेला शोभा आणणं पण जेंव्हा बहार ओसरला तेंव्हा त्यांची गरज संपली म्हणून त्यांना उचलून कोप-यात टाकलं आणि ती जागा हिरव्या ताज्या लुसलुशीत गवताने घेतली!!

साधा नियम आहे - जोवर तुम्ही काही देण्यालायक किंवा काम करण्यालायक आहात तोवर तुमची गरज असेल, एकदा ते काम संपलं किंवा तुम्ही अपेक्षित काम करणं कमी किंवा बंद झालं की मग रिप्लेस व्हायला तयार रहा. कारण दुसरा कोणीतरी तसंच काम तुमच्या इतकं किंबहुना तुमच्यापेक्षा सरस करण्याच्या तयारीचा असतोच.
आॅफिसमधे तर हा गोल्डन रूल आहे पण घरामधे किंवा नातेसंबंधामधे पण असं सहज घडतं क्वचित आपल्या नकळत किंवा ठळकपणे :(

No comments:

Post a Comment