Sunday, February 23, 2014

हायवे...एक भन्नाट प्रवास



इम्तियाज अली हे नाव हिंदी चित्रपटसॄष्टीमधे आता सुपरिचित आहे. त्याचा नुकताच प्रदर्शित झालेला चित्रपट 'हायवे'. ह्या चित्रपटाची चर्चा प्रदर्शनापूर्वी ट्रेलर्समुळे आणि ए.आर.रेहमान ने बनविलेल्या गाण्यांमुळे जास्त झाली.

विशेष सुचना: अगदी टीपीकल लव्ह स्टोरी किंवा मनोरंजनात्मक चित्रपट नाहीये हा!

चित्रपटाची कथा म्ह्टलं तर फक्त एका ओळीची आहे. पण, प्रत्येक वेळेस काहितरी कथा असलीच पाहिजे का?

फक्त एक कल्पना,रोजच्या धकाधकीच्या पण आरामदायी तरीही कृत्रिम वातावरणापासून कुठेतरी दूर निसर्गाच्या जवळ जायचं..तिथली स्वच्छ हवा, रोजचाच उगवणारा पण वेगळा दिसणारा सूर्य..मधेच कडाक्याची थंडी-बर्फ..खळाळणारी नदी आणि नजर पोहोचणारही नाही इतक्या उंचीवरची हिमाच्छादित शिखरं..बस्स!

चित्रपटामधे जे निसर्गाचं चित्रीकरण केलं आहे ते लाजवाब आहे.. डोंगरातून जाणारा वळणावळणाचा रस्ता..उत्फुल्लपणे धावणारी पण जवळ गेल्यावर जिवाचा थरकाप होईल इतका वेग असणारी नदी..व्वॉव अर्थात मी त्या भागामधे प्रत्यक्ष गेले नाही म्हणून मलातरी असं वाटलं.

चित्रपट वेगवेगळ्या शहरांच्या रस्त्यावरून आपल्याला फिरवत फिरवत 'वीरा' आणि 'अबिराम भाटी' ह्या दोघांची एकमेकांपेक्षा अगदी भिन्न असणारी कहानी सांगतो.वीरा एका अतीश्रीमंत घरातली 'प्रोटेक्टेड' वातावरणात वाढलेली मुलगी.घरामधल्या 'सेफ' पण तरीही अनसेफ वातावरणाचा तिला उबग आलेला असतो.पण तरीही, ती, जे सगळं सुरू आहे ते निमूटपणे सहन करत पुढे जात असते.


अचानक लग्नाच्या आदल्या रात्री ती आपल्या होणा-या नव-याला 'हायवे'वरून फिरून येऊ असा आग्रह धरते आणि सगळं नाट्य सुरू होतं...

रणदीप हुडा ला विशेष काही अदाकारी दाखवायची आवश्यकता नव्हती पण आलिया भट्ट ने चांगलं काम केलं आहे, ह्यापेक्षा जास्त अपेक्षित आहे पण तिचं वय ह्या रोलला अगदी सुटेबल आहे म्हणून कदाचित तिची निवड झाली असावी.अर्थात तिला बघतांना कुठेतरी पुजा भट्टची आठवण येत राहते.


बाकी कोणताच ओळखिचा चेहरा चित्रपटामधे वापरलेला नाही.ए.आर.रेहमान यांचं संगीत बहुतकरून ग्रामीण संगीताचा साज ल्यालेलं आहे त्यामुळे गाणी लक्षात राहतात.

Wednesday, January 29, 2014

मेकअप उतरवल्यानंतर


  मृणाल कुलकर्णी यांचं 'मेकअप उतरवल्यानंतर' हे पुस्तक हातात घेतलं तेंव्हा वाटलं लेखिकेने कदाचित तिच्या आयुष्याबद्दल लिहीलं असेल.
पण, वाचायला सुरूवात केली आणि क्षणभर धक्काच बसला.प्रत्येक लेख एक एक प्रखर विचार घेऊन उभा राहतो.रोजच्या धकाधकीमधे आपल्या आजूबाजूला घडणा-या घटना आपल्याला दिसतात तरी का हा प्रश्न विचार करायला भाग पाडतो.साध्या-सोप्या भाषेतून आपल्या समाजाचं भयानक चित्र विशेषतः स्त्रीयांबाबातचं मांडलं आहे.
अगदी दीड पानी आहे प्रत्येक लेख पण वाचल्यावर सुन्न व्हायला होतं.
तासाभरात वाचून झाल्यावर वाटलं पुस्तकाला नाव अगदी योग्य दिलं आहे.आज आपल्यापैकी बरेच जण डोळ्यांवर, मनावर मेकअप करून फिरतोय जणू काही जे खरंखुरं क्वचित बेढब असं सत्य आहे ते आपल्याला दिसू नये जाणवू नये.त्यामुळेच की काय जाणिवांवरचा हा मेकअपचा मुलामा उतरवून सत्याला सामोरं जाण्याचं धाडस आपल्यात आहे का असा प्रश्न तरळत राहतो..