Thursday, January 26, 2012

सा.सू. - भाग ५


सुट्टीनंतर खरं तर कॉलेजला परत येण्याची उत्सुकता खुप जास्त होती पण, पुन्हा काकूंकडेच राहावा लागणार ह्या विचाराने उत्साह सगळा मावळला पण पर्याय नव्हता सो वी बोथ केम    बॅक टू द जेल.

घरी आलो तसं अगदी वेगळंच चित्र दिसलं, घरात कसली तरी तयारी सुरू होती.मी भितभितच (हो, दिवाळीची सुट्टी झाली म्हणून काकूंचा राग शांत झाला असेल असा गैरसमज मला करून घ्यायचा नव्हता.) काकूंना विचारलं की तयारी कसली सुरू आहे? तशा त्या अगदी हसून(?? काकूंना हसता सुद्धा येतं? :-) ) म्हणाल्या की, ’अगं, प्रद्दुम्न (बायदवे, हे काकूंच्या मुलाचं नाव) ला नविन जॉब मिळाला आहे आणि तो बाहेरगावी जाणार आहे म्हणून त्याची सगळी तयारी करून देतीये.पहिल्यांदाच तो माझ्यापासून दूर जाणार आहे अगं, मला तर इतकी काळजी वाटतीये ना!’. मी वरकरणी थोडंसं स्मित करत म्हटलं,’काळजी वाटणं साहजिक आहे पण, तुम्ही टेन्शन घेउ नका, तो जिथे जातोय तिथे आपल्यासारखं एखादं घर बघून पेईंग गेस्ट म्हणून राहायचं म्हणजे काहीच प्रॉब्लेम नाही येणार!’ आणि मनात म्हटलं
’काकू काळजी कशाला करताय, तो तर सुटला तुमच्या तावडीतून, अगदी उडया मारीत जाईल तो, आमचंच नशीब ग्रेट आहे जे अजुन ५ महिने इथे काढावॆ लागणार आहेत!’

घरी ही लगीनघाई सुरू होती आणि आमच्या कॉलेजमधे गॅदरिंगचे वारे वाहू लागले.काकू बिझी असल्यामुळे आम्ही बिनधास्तपणे गॅदरिंगच्या तयारीला लागलो.कॉलेजमधे फुल मस्ती करून घरी येउन अगदी सुखात झोपू लागलो.

फायनली प्रद्दुम्नच्या जाण्याचा दिवस उगवला,आम्हांला सगळ्यांना बाय करून तो निघून गेला आणि काकू इकडे जोरजोरात रडायला लागल्या अगदी लहान मुलासारख्या, मी आणि रूमी चाटच पडलो, हे काय होतंय?? काकू रडत आहेत? आमच्यासाठी नविनच शोध होता तो! आता आपण काही करायचं असतं का असं आम्ही एकमेकींकडे बघितलं आणि आत निघून गेलो..थोडया वेळाने काकू शांत झाल्या..तो दिवस पूर्ण त्या गप्पच होत्या..जेंव्हा रात्री त्यांच्या मुलाचा फोन आला तेंव्हाच त्यांची कळी खुलली आणि त्या नॉर्मल झाल्या :-)

मी, माझ्या दोन मोठया बहिणी आम्ही सगळ्याजणी शिक्षणानिमित्त घराबाहेर पडलो होतो, आईला मी नेहमी भरलेल्या डोळ्याने निरोप देतांना बघितलं होतं पण, आम्ही घराबाहेर पडल्यावर तिची काय अवस्था होत असेल ह्याची कल्पना आज मला काकूंना बघून आली, खरंच आईचा जीव तिच्या पिलांमधेच असतो..

आमच्या गॅदरिंगचा दिवस जवळ आला, आम्हां सगळ्या मुलींना साडी घालायची होती. आम्हां दोघींकडे पण साडया नव्हत्या मग आम्ही काकूंना रिक्वेस्ट केली, त्या अगदी आनंदून गेल्या,त्यांनी सगळा खजिनाच आमच्या समोर खुला केला :-) मला तर कोणती साडी घालावी काही कळत नव्हतं मग काकूंनीच मला एक साडी सलेक्ट करून दिली आणि बाकी सगळ्या गोष्टी अगदी आमच्या मापाच्या वगैरे पण करून दिल्या.त्या इतक्या खुश दिसत होत्या ना, अगदी स्वत:च्या मुलींना तयार केल्यासारखं त्यांनी आम्हांला तयार करून दिलं.दागिने पण घालायला दिले पण आम्ही दोघींनी उगाच रिस्क नको म्हणून तो आग्रह टाळला. घरून अगदी पहिल्यांदाच आम्ही इतक्या खुश होउन बाहेर पडत होतो :-) पण....

तो दिवस खुप म्हणजे खुप धावपळीचा निघाला, सगळे कामं करत, साडी सांभाळून धिंगाणा करत अगदी दमून-थकून आम्ही दोघी रात्री ११ वाजता घरी आलो.दिवसभराच्या गोंधळात आम्ही सपशेल विसरलो होतो की घरी जायची डेडलाइन क्रॉस होतीये, बरं, हे तरी लक्षात यावं ना की उशीर होणार हे काकूंना कळवावं पण त्या दिवशी आमचे ग्रह फिरलेच होते त्यामुळे आता काय होणार हा विचार करतच आम्ही दार वाजवलं.पहिल्यांदा कोणीच दार नाही उघडलं, आम्ही पुन्हा नॉक केलं, काकूंना हाक मारली पण नो रिप्लाय! आता थोडं टेन्शन यायला लागलं, एकतर दिवसभर काही धड खाल्लं नव्हतं त्यामुळे सडकून भूक लागली होती त्यातच साडी घातलेली त्यामुळे पण इरीटेट होत होतं, बरं तेंव्हा दोघींकडे मोबाईल पण नव्हते कोणा दुस-या मैत्रीणिला विचारून तिच्याकडॆ जावं म्हटलं तर, आता काय करायचं? पुन्हा एकदा हिय्या केला आणि जोरात दार वाजवलं, मग लगेच दार उघडल्या गेलं, आत गेलो तर काकू झोपेची तयारी करून बसल्या होत्या,मला तर त्यांच्याकडे बघायचीपण भिती वाटत होती.पण, काय करणार चूक आमची होती त्यामुळे आता घाबरून उपयोग नव्हता मग काय मी सॉरी म्हणायला सुरूवात करणार इतक्यात काकूंनी ब-याच दिवसांपासून दाबून ठेवलेला राग बाहेर काढला, एक एक वाकबाण आम्हांला घायाळ करत होते.
- ’उशीर का झाला?’
मी - ’सॉरी काकू, आज गॅदरिंग होतं त्यामुळे लक्षातच नाही राहिलं की उशीर होइल म्हणून :-( ’
- ’मग, घरी यायचं बरं लक्षात राहिलं!’
मी - ’....’ फक्त मान खाली!
- ’सुरूवातीलाच सांगितलं होतं, उशीर झालेला चालणार नाही, तसं असल्यास बाहेत व्यवस्था लाउन घ्यायची, विसरलात का??’-काकू ओरडल्या!
आम्ही ह्यावर काय बोलणार...
- ’पुढच्या वेळेस दार अजिबात उघडलं जाणार नाही,लक्षात ठेवा! आणि हो, त्या साडया धूवून, नीट इस्त्री करून आणून ठेवा!!’

आतून इतका राग येत होता आणि रडूपण येत होतं, एकतर भूक लागली होती आणि वरतून हे थर्ड डिग्री टॉर्चर सुरू होतं, पण आमचे फक्त हातच दगडाखाली नव्हते तर आम्ही पूर्णच एका खडकाखाली सापडलो होतो त्यामुळे त्यांनी सांगितलेल्या गोष्टी ऎकण्याशिवाय पर्याय नव्हता.मग काय,आत निघून गेलो,आवरलं आणि लगेच झोपायची तयारी केली. पोटभर बोलणे खाल्ल्यावर भूक तशीही मेलीच होती आणि काकूंनी सुध्दा जेवायला हाक मारली नाही.

विचार आला, आजची सकाळ किती छान उगवली होती, कुठेही असं वाटत नव्हतं की दिवसाचा शेवट असा निघेल! त्या दिवशी मला कळालं की ह्या जगात कितीही छोटी अथवा मोठी चूक असू देत त्याची शिक्षा तुम्हांला मिळतेच, यू कॅन नॉट एस्केप फ्रॉम इट!

क्रमश:

या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check
   

Tuesday, January 17, 2012

सा.सू. - भाग ४


संध्याकाळी मी आणि रूमी भटकून आलो आणि दारातच थबकलो, दोघीपण समोर घडत असलेलं दृश्य आ वासून बघत आत आलो.काका चक्क काकूंशी भांडत होते, काकूसमोर उभे राहून हातवारे करत मोठठया आवाजात ओरडत होते!! आजपर्यंत मी काकांना साधं मान वर करून बोलतांना बघितलं नव्हतं आणि आज अचानक त्यांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता!! विषय होता आज सकाळी झालेल्या तमाशाचा. काका आमची बाजू घेउन काकूंशी भांडत होते की, ’दुस-याच्या घरच्या पोरी आपल्या इथे पैसे देउन राहतायेत म्हणून तू वाट्टॆल ते करायला नको लाउस त्यांना. स्वत:च्या पोराला म्हटलं तर वळण नाहीये आणि परक्यांना शिक्षा देतीये.मी आतापर्यंत काहीच बोललो नाही पण हे असले प्रकार मला खपणार नाही!!! पुढच्या रविवारी असला तमाशा नकोय मला!!’
बाsपरे, काका आमच्याविषयी इतका चांगला विचार करतात?? मला तर मनामधे आनंदाच्या उकळ्या फुटत होत्या पण काकूंची अवस्था पार वाईट झाली होती, त्या आता रडतील की उठून काकांना मारतील काहीच अंदाज येत नव्हता. जे काही असेल, जे घडत होतं ते आमच्यासाठी खुप चांगलं होत होतं, मी मनातून काकांना अगदी साष्टांग नमस्कार घातला पुढच्या रविवारची शिक्षा रद्द केल्याबद्दल.
काका थोडे शांत झाले आणि आमच्याकडे वळून म्हणाले की, ’रविवारची शिक्षा रद्द झाली आहे पण, कपडे धुण्यासाठीचा जो नियम आहे तो तसाच राहील.’ आणि बाहेर निघून गेले.

मला एक क्षण कळलंच नाही ते काय बोलले ते..सुन्न डोक्याने मी आत गेले. २ मिनीटानंतर नॉर्मल झाल्यावर डोक्यात आलं की काकू तर काकू पण काकासुद्धा काही कमी नाहीत.काय त्रास आहे यार, कुठुन बुद्धी झाली आणि इथे राहायला आलो.काकूंनी पार अडकवून टाकलयं ५ महिन्याचे पैसे घेउन.आत्ता कुठे दिवाळी जवळ आलीये, हे वर्ष कसंही करून ह्याच जेलमधे काढावं लागणार आहे उगाच विचार करून डोकं फोडण्यात अर्थ नाही, जाउ देत!

मला वाटलं काकू आज जेवायला देणार नाहीत पण, लकीली तसं काही झालं नाही.जेवणं स्मशान शांततेत पार पडले आणि तो मोस्ट हॅपनिंग डे फायनली संपला.

पुढे काही दिवसात हाफ इयरली एक्झाम आली.आणि पुन्हा माझ्या डोक्यात किडा वळवळला.रात्री अभ्यास तर करायचा होता पण काकूंचा लाईट पण वापरायचा नव्हता.मग मी ओम सुपर मार्केट मधून एक डझन मेणबत्त्या आणल्या आणि रात्री बरोब्बर ११वाजता लाईट बंद केला आणि मेणबत्त्या लावल्या.आम्ही दोघींनी अभ्यास सुरू केला. खरं तर इतकं हसू येत होतं पण अभ्यासावर लक्ष द्यायचं होतं आणि हसलो असतो तर बाहेर आवाज गेला असता आणि आमच्यावर तोफ डागली गेली असती :-p
दुस-या दिवशी आम्ही आठवणीने मेणबत्तीचा सगळा कचरा व्यवस्थित साफ केला आणि परिक्षेला गेलो.दोन दिवस आमचा हा सगळा उद्योग कोणालाही खबर न-लागता सुरू होता पण तिस-या दिवशी सकाळी खुप घाई झाली आणि पेपर झाल्यावर माझ्या लक्षात आलं की मी सकाळी मेणबत्तीचा पसारा आवरालाच नाही! ओह नोss आता काही खरं नाही, काकू आज चांगलीच खरडपट्टी काढतील.इतके दिवस जे सांभाळून घेतलं ते सगळे प्रयत्न माझ्या एका शुल्लक चुकीमुळे पाण्यात जाणार.
शिट यार, हाउ कॅन आय फरगेट इट यारर.
क्लासमेट्स भेटले, पण रूमी कुठे दिसेना, सगळे जण पेपर कसा गेला वगैरे बोलत होते पण माझं कशात लक्षच लागत नव्हतं,कॉलेजच्या एक्झामपेक्षा मोठया परिक्षेतून मला घरी गेल्यावर जायचं होतं,माझं तर धाबच दणाणलं होतं.
भितभितच मी घरी गेले, लकीली रूमी पण माझ्या मागेच आली, मी तिला आत गेल्यावर सांगणार होते पण काकूंनी दारातच आम्हांला पकडलं. आणि काकूंच्या तोंडाचा पट्टा सुरू झाला!
’रूममधे मेणबत्त्यांचा कसला कचरा करून ठेवलाय तुम्ही? मेणबत्त्या कशाला वापरल्या तुम्ही? रात्री लाईट कधी जात नाहीत आपल्याकडे,मग काय करत होतात तुम्ही मेणबत्तीचं??’ मी मनात म्हटलं, प्लॅनचेट करत होतो असं सांगावं, पण तो विचार मी लगेच झटकून टाकला आणि खरं-खरं सांगून टाकलं की, ’तुम्ही सांगितल्याप्रमाणे आम्ही रात्री लाईट फक्त कामापुरता वापरला आणि ११ नंतर मेणबत्तीच्या प्रकाशात अभ्यास केला, तुमचं विजबील जास्त नको यायला ह्याची काळजी आम्हीच घ्यायला हवी ना!’ मला वाटलं आता काकू काहितरी बडबड करतील पण, काकू काहीच बोलल्या नाही फक्त पाय आपटत आत निघून गेल्या!! मी आणि रूमी एकमेकींकडे बघायला लागलो की हे जे घडलं ते खरं होतं? काकू आम्हांला एका शब्दाने देखील बोलल्या नाही? ग्रेट :-D १,२ मिनीटे थांबून आम्ही जणू वाट बघितली त्या बाहेर येउन भांडण कंटिन्यू करण्याची पण त्या खरंच आल्या नाही तशा आम्ही दोघी आत गेलो आणि लगेच स्वच्छतेच्या कामाला लागलो. थोडया वेळाने काकूंनी जेवायला हाक मारली,जेवण करून आम्ही बाहेर पडलो.

त्या दिवसापासून एक गोष्ट मात्र घडली की काकूंनी आमच्याशी जेवढयास तेवढंच बोलायला सुरूवात केली, म्हणजे फक्त जेवायला त्या हाक मारू लागल्या.सुरूवातीला चांगलं वाटलं की चला घरात शांतता नांदतीये पण, एक-दोन दिवसांतच भिती वाटायली लागली की ही शांतता वादळापूर्वीची तर नसेल!  

पण ह्यवेळेस आमचं लक खरंच चांगलं होतं, कुठलंही वादळ न-झेलता आम्ही अगदी हसतमुखाने दिवाळीच्या सुट्टीसाठी घरी गेलो :-)

क्रमश:



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check