Thursday, June 19, 2014

निकाल!

काल हॉस्पीटल मधे गेले होते,हातात टोकन घेऊन बिलिंग काउंटरला वाट बघत होते आणि अचानक थोडी गडबड ऐकू आली. मागे वळून बघितलं तर, स्ट्रेचरवर एका मुलाला घेऊन येत होते.कदाचित बेशुद्ध असावा तो,अंगकाठी अगदी किरकोळ होती त्याची आणि साधारण १५-१६ वर्षांचा असेल असं वाटलं.आत आल्यावर लगेचच त्याला एका रूममधे नेलं आणि त्यासोबत आलेले सगळे नातेवाईक बाहेर थांबले.

सगळेजण तिथेच उभे राहून बोलू लागले तेंव्हा कळालं ज्या मुलाला आत नेलं होतं त्याने 'विष' घेतलं होतं! एकाने सांगितलं की त्याने व्हॉट्स अ‍ॅपला मेसेज टाकला की मी विष घेतो आहे पण माझ्या घरच्यांना ह्याबद्दल काही सांगू नका.दुस-या कोणीतरी विचारलं की,घरामधे झोपेच्या वगैरे काही गोळ्या होत्या का? तर एका बाईने कदाचित त्या मुलाची आई असावी तिने म्हटलं,अशा तर गोळ्या घरात नसतात पण क्रोसीन होत्या घरामधे!

परवा दहावीचा निकाल लागला त्यानंतर घडलेली ही घटना!!

...नंतर माझं काम करून मी बाहेर पडले पण त्या लोकांची चर्चा,तो मुलगा हे मात्र डोक्यातून जात नव्हतं.

दहावीचा निकाल लागल्यावर पेपरमधून हमखास अशा बातम्या वाचल्या आहेत.पण काल जेंव्हा समोर बघितलं तेंव्हा तिडीकच गेली डोक्यात आणि पहिला विचार आला की त्या पोराला जीव द्यायची अक्कल आहे पण मग तीच थोडी वापरून नीट अभ्यास केला असता तर!!

अर्थात, त्या मुलाची नेमकी कहाणी काय आहे मला माहित नाही पण, जीव देणं हा एकमेव पर्याय कसा असू शकतो कोणतेही प्रश्न सोडवायला? इतका स्वस्त वाटतो का जीव ह्या लोकांना? आणि ह्याहीपेक्षा आज ती व्यक्ती ह्या जगामधे ज्यांच्यामुळे आली आहे त्यांचा काही विचार आहे की नाही?? फक्त स्वतःचे प्रश्न सोडवता नाही आले म्हणजे अप्पलपोट्यासारखं असा काहितरी निर्णय घ्यायचा आणि आई-वडीलांना वा-यावर सोडून द्यायचं?

ह्या सगळ्यामधे चूक कोणाची? आई-वडीलांची की त्या मुलाची की आपल्या शिक्षण पध्दतीची की सामाजिक दबावाची??

मला आठवतं माझ्या दहावीच्या परिक्षेनंतर नाही नाही त्या नातेवाईकांनी आमच्या घरी फोन करून निकाल विचारला होता आणि इतकी हुशार पोरगी पण मेरिट मधे नाही आली?? असा शेराही मारला होता!!

मला एक कळत नाही की ह्या १०,१२वीच्या परिक्षांना इतकं महत्त्व का आहे आपल्याकडे? फक्त बोर्डाची परिक्षा आहे म्हणून की अजून काही?

मान्य आहे मला की, १०-१२वी नंतर पुढचं शिक्षण काय घेणार ह्यावर भवितव्य ठरतं पण तरी इतका उहापोह करायची खरंच गरज आहे का?

तसं बघितलं तर शाळेमधे प्रत्येक इयत्तेमधे शिकविला जाणार अभ्यासक्रम हा १०वी इतकाच महत्त्वाचा असतो मग फक्त ह्याच वर्षाला का इतकं महत्त्व द्यायचं?
मला तर वाटतं हे जे सगळे प्रायव्हेट क्लासेस वाले लोक आहेत ह्यांचाच ह्या सगळ्यामधे हात आहे!! कारण गेल्या काही वर्षांमधे क्लासेसचं जे पेव फुटलं आहे त्यामुळे मार्कांची स्पर्धा खूप जोरात चालू झाली आहे. प्रत्येक क्लास निकाल लागल्यावर मोठमोठाले बोर्डस लावून उत्तीर्ण झालेल्या मुलांचे फोटो आणि मार्क्स झळकवून 'आमच्या क्लासचे इतके टॉपर्स' वगैरे असं ठणाणा बोंबलत असतात! म्हणजे त्या मुलांनी फक्त अमका अमका क्लास लावला म्हणूनच तो टॉपर झाला असं त्यांना म्हणायचं असतं.याचा अर्थ त्या मुलाची अंगभूत हुशारी वगैरे काहीच नाही फक्त तो तमक्या क्लासचा म्हणून हुशार!! वाह!!

पण ह्या असल्या मार्केटींगला बहुतेक सगळे पालक भुलतात आणि क्लासवर अतिविश्वास ठेवून आपल्या मुलाची कुवत लक्षात न-घेता त्याच्याकडून अवाजवी अपेक्षा ठेवतात. पण, सगळीच मुलं काही अशाने टॉपर होत नाहीत आणि शेवटी जर निकाल अपेक्षेप्रमाणे नसेल तर मग कोणीतरी विष घेतं किंवा अजून काही!!

पण हे सगळं चुकीचं आहे!! हे थांबणं शक्य आहे का?

कदाचित हो, पण ह्यासाठी, परत एकदा आई-वडीलांनाच थोडे अजून कष्ट घ्यावे लागणार आहेत स्वतःला समजावण्याचे आणि स्वतःच्या मुलांना समजावून सांगण्याचे. परिक्षेमधे मिळणारे मार्क्स ह्या एकाच गोष्टीवर आयुष्य अवलंबून नाही.ती गोष्ट फक्त एखाद्या लहानशा विटेसारखी आहे, जी महत्वाची आहेच पण त्याचबरोबर जर कष्ट करण्याची तयारी, जिद्द, स्वभाव, परिस्थितीशी जुळवून घेण्याची क्षमता हे खांब वेळीच बळकट केले नाहीत तर आयुष्य उभं राहू शकत नाही आणि येणा-या वादळांमधे तगही धरू शकत नाही!

No comments:

Post a Comment