Tuesday, May 15, 2012

मदत



सध्या विविध कारणांमुळे चर्चेत असणा-या ’सत्यमेव जयते’ ह्या कार्यक्रमामधे शेवटच्या टप्प्यात आमीर खान आपल्याला म्हणजे सगळ्या देशाला एक प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर आपण एस.एम.एस. व्दारे देऊ शकतो ज्याला फक्त एक रूपया लागतो आणि त्याव्दारे जितके पैसे जमा होतील त्यातून टॅक्स कापून जे पैसे उरतील ते आणि त्याच रकमेइतकी रक्कम रिलायन्स कंपनी त्यात जमा करून एका ठरावीक सेवाभावी संस्थेला देणार असं सांगण्यात येतं, त्या संस्थेचं नावदेखील तिथे दिलेलं असतं...

हल्ली ब-याच मोठमोठया कंपन्यांमधे काही सेवाभावी संस्था मदतीसाठी जातात, तिथे मग सगळ्या कर्मचा-यांना दरमहा काही ठरावीक रक्कम ह्या संस्थेला देण्याची तरतूद आपल्या पगारातून करता येते.

वर दिलेल्या दोन्ही उदाहरणांमधे एकच मुद्दा स्पष्ट होतो की, आपण हल्ली कोणत्याही सेवाभावी संस्थेला अगदी सहजपणे हव्या त्या रकमेची मदत करू शकतो आणि काहीही कष्ट न-घेता, घरबसल्या ’पुण्य’ कमावू शकतो

पण, यात एक शंका अशी निर्माण होते की, कितपत शाश्वती आहे की ते पैसे खरंच गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचतात..टी.व्ही.वरील अनेक कार्यक्रमांमधून ह्याही आधी अशा सेवाभावी संस्थांना देणग्या देऊ असं ऐकलं, पाहिलं होतं पण ह्या गोष्टीची शहानिशा कशी करायाची की खरोखर, मुळात त्या सेवाभावी संस्थेला ही मदत मिळाली आणि पुढे त्या संस्थेत काम करणा-या कर्मचा-यांच्या तावडीतून सुटुन ती रक्कम गरजू लोकांसाठी उपयोगात आणली गेली..

मला आठवतं मी शाळेत असतांना लातूर गावात खुप भयानक स्वरूपाचा भूकंप झाला होता आणि त्यासाठी मदत करा म्हणून सगळीकडे आवाहन केलं होतं, लोकांनी भरभरून मदत केलीसुध्दा पण नंतर वर्तमानपत्रात ’गरजू लोकांपर्यंत मदत पोहोचलीच नाही’ ह्या स्वरूपाच्या बातम्या वाचाव्या लागल्या..

माझी एक मैत्रीण मुंबईला राहायला आली, तिला पावसाळ्यामधे एका गरजू कुटुंबाला छत्री द्यायची इच्छा होती, बाहेर जातांना ती नेहमी दोन छ्त्र्या बाळगायची.मी तिला एकदा, एका सिग्नलला आमची रिक्षा उभी असतांना, रस्त्याच्या कडेला असणा-या एका बाईकडे इशारा करत म्ह्टलं की तू तिला मदत करू शकतेस, तिलापण वाटलं म्हणून ती जाणार तितक्यात त्या बाईजवळ ४-५ मुलं आणि एक पुरूष येऊन बसलेले आम्हांला दिसले, तशी मैत्रीण परत फिरली आणि म्हणाली, ’नको, ते लोक छत्री न-वापरताच विकून पैसे मिळवतील’!

’ट्रफिक सिग्नल’ ह्या सिनेमामधे सुध्दा हा मुद्दा मांडलेला आहे की, लोक गरजू असण्याचा अभिनय किती हुबेहुब करून आपल्याकडनं मदत मिळवतात..

माझी आई नेहमी म्हणते की,’सत्पात्री दान द्यावं’ म्हणजे खरंच जो गरजू मनुष्य असतो त्याला मदत करावी..पण आपण हे ठरवणार कसं की कोणती व्यक्ती गरजू आहे आणि कोणती व्यक्ती फक्त पैसे मिळविण्यासाठी तसं असण्याचं ढोंग करत आहे..सिग्नल वर भिक मागणारे, अधू-पंगू असण्याचा अभिनय करणारे किती आणि खरे गरजू तसे लोक किती ह्यामधे फरक करणं अवघड जातं.

पण मग अशा लोकांना मदत करायची कशी? कदाचित एक करता येईल की, पैशापेक्षा वस्तूंच्या स्वरूपात आपण ही मदत सेवाभावी संस्था किंवा समाजकार्य करणा-या लोकांना करू शकतो.एखाद्या वीकएन्डला संस्थेला जाऊन भेट देउ शकतो पण, अशा स्वरूपाची मदत त्यांना पुरेशी नाही असंही मला वाटतं.म्हणजे, संस्थेच्या विस्तारासाठी,विकासासाठी त्यांना काही वस्तू खरेदी करणं आवश्यक असतं, मग अशावेळेस पैशाचीच मदत लागते पण, पैसा म्हटलं की पुन्हा 'भ्रष्टाचार' बोकाळण्याची शक्यता नाकारता येत नाहीच.

आता कोणी म्हणेल की, हल्ली तुम्ही संस्थांना भेटी देउन तिथे चालणा-या कामकाजाबद्दल सगळी माहिती घेऊ शकता पण, तुमच्या-आमच्या पैकी किती लोक, पगारातून दरमहा जाणा-या १०० रूपयांकरता, अशी माहिती घेण्याची तसदी घेता?

खुप गोंधळ झाला आहे माझ्या डोक्यात, गरजू लोकांना मदत करायची इच्छा तर आहे पण कोणत्याही संस्थेतर्फे जाण्याला मन धजावत नाही, अशा वेळेस काय करायचं?



या ब्लॉग वरील लिखाण कॉ्पीराईट प्रोटेक्टेड आहे, कुठेही पब्लिश करण्यापूर्वी लेखिकेची परवानगी घेणे आवश्यक आहे.
Protected by Copyscape Online Plagiarism Check


No comments:

Post a Comment